राजेश खन्ना

एक दिवशी इंद्र त्याच्या दरबारात जातो तिथे त्याला कोंणीच दिसत नाही...

तेव्हा त्याची सटकते....

तो जोरात ओरड्तो - रंभा, उवंशी, मेनका कुथे मेल्या सगळ्या जंणी??
...
चित्रगुप्त हळुच कानात म्हंणतो- देवराज, तो "राजेश खन्ना" आला आहे ना म्हंणुन...........

आई

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दरी

चार मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना, ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई

येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी


कवी - यशवंत

गाऊ त्यांना आरती

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाऊ त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाऊ त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती
आप्तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाऊ त्यांना आरती

देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाऊ त्यांना आरती

देह जावो, देह राहो; नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाऊ त्यांना आरती

जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाऊ त्यांना आरती

नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृती, गा तयांची आरती."


कवी - यशवंत

पाणपोई

येइं भाई, येथ पाही घातली ही पाणपोई
धर्मजाती कोणती ती भेद ऐसा येथ नाही
संसॄतीचा हा उन्हाळा तल्खली होई जीवाची
स्वेदबिंदू, अश्रुधारा यांविना पाणीच नाही

वायुवीची भोंवतीं आंदोलुनी त्या वंचिताती
झोंबती अंगी झळा अन् मूर्छना ये ठायिंठायीं
सांवली नाही कुठेंही, तापतो मार्तंड डोईं
श्रांत पांथा ! बांधिली ही तूझियासाठीं सराई

आद्य जे कोणी कवी तत्स्फूर्तिच्या ज्या सिंधु गंगा
आणिल्या वाहून खांदीं कावडी त्यांतील कांही
पांथसेवासाधनीं हें व्हावयाचे गार पाणी
मॄत्तिकेचे मात्र माझे कुंभ, ही माझी नवाई

ओंजळी, दो ओंजळी, आकंठ घे ईं वा पिऊनी
हो जरा ताजा तवाना, येऊं दे सामर्थ्य पायीं
पावतां तॄप्ती मना, संचारतां अंगीं उमेदी
जो दुवा देशील पांथा तेवढी माझी कमाई


कवी - यशवंत

श्रावणबाळ

शर आला तो धावुनी आला काळ
विव्हळला श्रावण बाळ
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी

त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा

मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले
कावड त्यांची
घेवून मी काशिला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे
तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला

मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला
त्यां वृध्दपणी
मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा बघतील ते
वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होउनिया श्रावण बाळ

परी झांकुनी सत्य कसे हे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्यामागे
घ्या झारी... मी जातो.. त्याचा बोल
लागला जावया खोल
सोडीला श्वास शेवटला
तो जीव - विहंग फडफडला
तनु - पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी


कवी - ग.ह.पाटील

सांगाती

हाती हात धरुन माझा
चालवणारा कोण तू?
जेथे जातो तेथे माझा
काय म्हणून सांगाती?
आवडतोस तू मला
की नावडतोस?
माझे मला कळत नाही !
एवढे मात्र जाणवते की
माझा हात धरुन असे चालवलेले
मला मुळीच खपत नाही !
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना !
झिडकारुन तुझा हात
म्हणून दूर पळत जातो
बागडतो, अडखळतो, धडपडतो
केवळ तू कनवाळू पाठीशी उभा म्हणून
माझे दु:ख जाणवून
उगाच किंचाळत सुटतो
एरव्ही तू नसतांना
पडलो अन लागले तर
पुन्हा उठून हुंदडतो !

खांद्यावर हात माझ्या सदोदित
असा ठेवू नकोस ना
अशानेच माझी वाढ खुंटत जाते
असे मला वाटते ना !
बरोबरीचे वागणे हे खरोखरीचे आहे का?
खूप खूप माझी उंची एकाकीच
माझी मलाच वाढवू दे
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊ दे
तोवर असे दुरदुरुन, तुझा हात दूर करुन
मान उंच उभारुन
तुझ्याकडे धिटकारुन पाहू दे !


कवी - अनिल

एक दिवस

जीव लागत नाही माझा असा एक दिवस येतो
कधी अधुनमधुन केव्हा लागोपाठ भेट देतो

अशा दिवशी दुरावलेले उजाड सारे आसपास
घर उदास बाग उदास लता उदास फ़ुले उदास

वाटते आयुष्य अवघे चार दिवसांचेच झाले
कसे गेले कळले नाही हाती फ़ार थोडे आले

दोन दिवस आराधनेत दोन प्रतिक्षेत गेले
अर्धे जीवन प्रयत्नात अर्धे विवंचनेत गेले

आस हरपलेली असते श्वास थकले वाटतात
अश्रू बाहेर गळत नाहीत आत जळत राहतात.


कवी - अनिल [आ. रा. देशपांडे]

तळ्याकाठी [दशपदी]

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते

जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही

सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत

पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो

हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते !


कवी - अनिल [आत्माराम रावजी देशपांडे]

आणिबाणी [दशपदी]

अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो

वादळ असे भरून आले तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते

हरपून जावे भलतीकडेच इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान

असे पडत होते डाव सारा खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते जीव पुरा वीटून जावा

कसे निभावून गेलो कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते नुसते हाती हात होते!


कवि - अनिल [आ. रा. देशपांडे]

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा


कवियत्री - शांता शेळके

मावळतीला

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणिक मजला घेरित आले

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे

जाणिव विरते तरीही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय


कवियत्री - शांता शेळके

लाडकी बाहुली

लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख

किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले

हासती केसही सुंदर काळे कुरळे

अंगात शोभला झगा रेशमी लाल

केसांवर फुलले लाल फितीचे फूल

कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी

पण तीच सोनुली फार मला आवडती

मी तिजसह गेले माळावर खेळाया

मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या

किती शोध-शोधली परी न कोठे दिसली

परतले घरी मी होऊन हिरमुसलेली

वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी

शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी

जाणार कशी पण पाऊस संततधार

खल मुळी न तिजला वर झोंबे फार

पाऊस उघडता गेले माळावरती

गवतावर ओल्या मजला सापडली ती

कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला

पाहुनी दशा ती रडूच आले मजला

मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान

केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून

पण आवडली ती तशीच मजला राणी

लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी



कवियत्री- शांता शेळके

सखेसोबती

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी

अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे

तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ

मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?


कवियत्री- शांता शेळके

बरसात

संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत
त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुळझुळनितळ जिव्हाळा
जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा.

संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून,
जसे हिवाळ्यातल्या झोंबऱ्या पहाटगारठ्यात
अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह.

संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता....
एक धागा... जपून ठेवावा खोल हृदयात
एखादे रखरखीत तप्त वाळ्वंट तुडवताना
माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात...


कवियत्री - शांता शेळके

सहजखूण

सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वास
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास
सुवास, पाकळ्या, पराग, देठ - फुल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही

दोन पावलांपुरते जग तेच अखेर असते खरे
हिरवीगार हिरवळ तीच, त्याच्यापुढे काय उरे?
पुढे असते वाळवंट फक्त, करडे, रेताड आणि भयाण
निर्वात पोकळीमध्ये अश्या गुदमरून जातात प्राण

फुल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा
वाळूइतकाच खरा आहे वाळूमधला खोल झरा
थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखूण
सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून?


कवियत्री - शांता शेळके

अज्ञात प्रदेश

काळजातले अनेक अज्ञात प्रदेश
ज्यांचे अस्तित्वही ठावूक नव्हते आजवर,
हलके हलके दिसत आहेत मला
पावलांखाली नव्याच वाटा, आतबाहेर, सर्वभर.

हररोज हरघडी अचानक नवे प्रश्न समोर
जुन्या संबंधांची तेढीमेढी अतर्क्य वळणे
चक्रव्यूहात आपले आपल्याला जपणे जोपासणे
अनेक गोष्टींचे अर्थ आयुष्यात प्रथमच कळणे

माझा मीच आता किती शोढ घेते आहे
अज्ञाताशी जुळवते आहे रोज नवी नाती
आतल्या आत घडत, मोडत, पुन्हा घडत
अपरिचीत रुपे घेत आहे माझी माती.


कवियत्री - शांता शेळके
बऱ्याच दिवसांनंतर हॅंगरवरचा कोट काढला
कॉलरवर केवढा लांबलचक केस सापडला

आठवते आहे, गेल्या हिवाळ्यात घातला होता अंगात!
रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात
रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची

हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते!
झुंबराला हलकेच स्पर्श करीत हवा वावरते घरात
तेव्हा तुझ्या आवाजाचेच जणु शिंपण करत रहाते

गुदगुल्या केल्या की तू अशीच खुदखुद् हसायचीस ना?
एखाद्या घासासारखी झोप गिळून टाकते मला
रेशमी पायमोजे पायातून अलगद निघावेत तशी...

आणि सकाळी वाटते, थडग्यातून बाहेर पडतो आहे मी!
किती दूरपर्यंत होता तो माझ्याबरोबर, आणि एके दिवशी
मागे वळून बघतो तर तो आता सोबत नव्हता!

खिसाच फाटका असेल तर काही नाणी हरवूनही जातात!
रांगेत ठेवलेल्या पुस्तकांची पाने फडफडू लागली अचानक
हवा दार ढकलून थेट आत घुसली

हवेसारखी तुही कधीतरी इथे ये-जा कर ना!
कितीतरी आणखी सूर्य उडाले आकाशात
मी आकाशाचे गूढ उकलत होतो

ती टॉवेलने केस झटकत होती...
ईतक्या सावधगिरीने चंद्र उगवला आहे आभाळात
जशी रात्रीच्या काळोखात खिडकीशी येतेस तू

काय?! चंद्र आणि जमीन ह्यांच्यातही आहे काही आकर्षण?
अशा रणरणत्या उन्हातही एकटा नव्हतो मी
एक सावली माझ्या आगे-मागे धावत होती सारखी

तुझ्या आठवणीने एकटे राहूच दिले नाही मला

मौनमुद्रा

आतल्या हळवेपणावर
तिने आता चढवले आहे
एक भरभक्कम चिलखत,
मनात नसेल तेव्हा
अतिपरिचित स्नेह्यांनाही
ती नाही देत प्रतिसाद, नाही ओळखत.

तिच्यासमोर अनेक प्रश्नचिन्हे
डोळे वटारुन बघणा-या समस्या
ज्यांच्याशी करायचा आहे तिचा तिलाच मुकाबला,
आता कुठे तडजोड नाही
लाचार माघार नाहीच नाही
तिचा लढाच आहे मुळी इतरांहून वेगळा.

तसे वॄक्ष अजूनही बहरतात
फुलांनी गच्च डवरतात
हृदयतळातून फुटतात अंकुर, झुलतात पाने,
एका अज्ञात आकाशात
शुभ्र शुभ्र भरारी घेतात
गातातही पाखरे तिच्या आवडीचे एकुलते गाणे.

आतले विश्व समॄध्द संपन्न
जपत कराराने मनोमन
बाहेर मात्र ती रुक्ष, कोरडी, नि:स्तब्ध,
प्रचंड कल्लोळ प्राणांत सावरीत
डोळ्यातले पाणी प्रयासाने आवरीत
ओठांवरची मौनमुद्रा उकलून ती बोलते मोजका शब्द


कवियत्री - शांता शेळके

नाते

एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!

चिंब मिठी

सर्सर सर्सर वळवाची सर
आली अचानक धावत धावत
थेंब टपोरे माथी झेलत
झाडे वेली अवघी नाचत

अवेळीस हा पाऊस चावट
तुझ्या बटांवर होता अलगद
झाडाचा आधार चिमुकला
तिथेच तू ही होती निथळत

थरथरणारा देह तुझा तो
भिजून सारी वसने ओली
भिरभिरलेल्या त्या नजरेतच
भिती अनामिक तरळून गेली

कडाड् लखकन वीज चमकता
नकळत सारे अवचित घडले
मिठीत केव्हा अलगद दोघे
तुला- मला ना काही कळले

चिंब चिंब हा पाऊस अजूनी
तनामनाला हुरहुर लावी
पाऊस येता वळवाचा तो
चिंब मिठी ती स्मरते सारी

अरे संसार संसार र

शेवंताबाईंसोबत लग्न झाल्या दिवसा पासुन बळवंतराव बायकोच्या स्वभावामुळे जीवनाला कंटाळले होते. रोज रोजच्या भांडणापासुन मुक्ती मिळावी या विचाराने ते एक दिवस भांडण चालू असतानाच तडक बाजारात गेले व विषाची बाटली घेऊन आले.

बायको काही ऎकत नाही हे बघुन त्यांनी बाटली फोडली व गटागटा विष पिऊन झोपले. त्यांना वाटले झोपल्यावर विषाचा परिणाम लौकर होणार व त्रासही होणार नाही.

दोन तासांनी बळवंतरावांना जाग आली हे बघुन पुन्हा शेवंताबाईंनी आपली टकळी सुरु केली,"तुमच कोणतही कामा असच असते. आता बघाना आज विष आणल पण काही फायदा झाला का ? ......................................."

अशक्य

अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आसमची सायकल बाहेर काढली. ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे

अनुप- पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही

तो- मग त्याच्याकडेच घेऊन जा.

योग्य क्रम

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

एप्रिलफूल

फुलराजाने फुलराणीला फुलांच्या फुलदाणीत फूल देऊन शुभेच्छा दिल्या.
तो म्हणाला, 'हे फुलराणी, तू फुल टू ब्युटीफुल, वन्डरफुल
आणि सगळ्या फुलात कलरफुल.
माझ्या भावना आहेत ख-याखु-या. समजू नकोस त्याला एप्रिलफूल.'

प्रेमपत्र

अखंडीत लिहिले
अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर सुधारले मात्र

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥


कवी - माधव ज्युलियन

मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

ऋण

पदी जळत वालुका
वर उधाणलेली हवा जळास्तव सभोवती
पळतसे मृगांचा थवा

पथी विकलता यदा
श्रमुनि येतसे पावला तुम्हीच कवी हो, दिला
मधुरसा विसावा मला !


अहो उफळला असे
भवति हा महासागर धुमाळुनि मदांध या
उसळतात लाटा वर,

अशा अदय वादळी
गवसता किती तारवे प्रकाश तुमचा पुढे
बघुनि हर्षती नाखवे !

असाल जळला तुम्ही
उजळ ज्योति या लावता असाल कढला असे,
प्रखर ताप हा साहता,

उरात जखमातली
रुधिर-वाहिनी रोधुनी असेल तुम्हि ओतली
स्वर-घटात संजीवनी !

नकोत नसली जरी
प्रगट स्मारकांची दळे असंख्य ह्रदयी असती
उभी आपुली देवळे


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

मधुबाला

मदीरा साकीसंगे जेथे
एकच होतो मधु प्याला
ती स्वर्गाहुन सुखकर म्हणती
कुणी बच्चंजी मधुशाला
नकोत असल्या व्यर्थ जल्पना
सर्व असंभव काव्यकल्पना
तुम्हास तुमची मधुशाला
अम्हास प्यारी मधुबाला

नार अनारकलीसम नाजुक
पडदा दुर जरा झाला
महाल स्वप्नांचा झगमगता
लखलखली चंद्रज्वाला
डोळे दिपता चोरी झाली
दिलदारांची ह्रदये गेली
कठोर काळा दाद न देता
फरार झाली मधुबाला

कुठे हरपली शोधीत बसला
जगात जो तो दिलवाला
स्वप्नामध्ये खळी चाचपुन
स्पर्शुन पाही कुणी गाला
अजुन तिला मन शोधीत राही
धुंडुन झाल्या दाही दिशाही
रजतपटावर कितीक झाल्या
मधुबाला ती मधुबाला


कवी - वसंत बापट

अमेरीकन शेतकरी भाऊ

अमेरीकन शेतकरी भाऊ केवढं तुमी तालेवार
उगवतीला मावळतीला पघावं ते हिरवंगार
एवढा थोरला बारदाना चारच गडी त्याच्या पाठी
औजारं बी नामी तुमची पेरनी, कापनी, मळनीसाठी
मिशीशीप्पी नदी म्हंजी ईमानदार कामवाली
पानी भरती, चक्की पिसती, बिजलीबत्तीबी तिनंच केली
म्या म्हनलं, "ह्यो राक्किस कोन?"...तर ती फवारनीची चक्की
निस्तं योक बटन दाबा...फसाफसा उडवती फक्की
गाया मस्त दूध देत्यात बैलं कापून खाता म्हनं
अगडबंब गोदामांतनं खंडी खंडी भरता दानं
गहू म्हनां भुईमूग म्हनां समदं बख्खळ पिकत असंल
बाजाराची कटकट न्हाई सॅमकाकाच ईकत असंल
सूटबूट ह्याट पाईप... आयला कामं होत्यात कशी
तुमची पोरं झ्याकूबाज... शिरीमंतांची असत्यात तशी
आमच्या गवनेराला नसतं असं आंगन हिरवकंच
असा बंगला अशी मोटर अशी बायको गोरीटंच


कवी - वसंत बापट

शतकानंतर आज पाहिली

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले.. भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये.. आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट

पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही.. प्रतिभाशाली भाट


कवी - वसंत बापट

कवि आणि कवडा

माडीच्या खिडकीमधे कवि कुणी होता सुखे बैसला
'भिक्षांदेहि' करावयास कवडा आला कुणी त्या स्थळा!
'का हो काव्य नवीन काय लिहिता?'
त्याते पुसे खालुनी सांगे नाव कवी;
हसून कवडा हो चालता तेथुनी!
चार दिवसांनी मासिकात येई
काव्य कवड्याचे; नाव तेच त्याही!
रसिक म्हणती, 'वा! और यात गोडी!'
कवि हासुनि आपुले काव्य फाडी!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

श्यामले

तू छोकरी, नहि सुन्दरी । मिष्कील बाल चिचुन्दरी,
काळा कडा मी फत्तरी । तू काश्मिरांतिल गुल-दरी !
पाताळिंचा सैतान मी । अल्लाघरींची तू परी,
तू मद्रदेशिय श्यामला । मी तो फकीर कलन्दरी !
मैदान मी थरर्पाकरी । तू भुमि पिकाळ 'गुर्जरी,
अरबी समुद्रहि मी जरी । तू कुद्रती रसनिर्झरी !
आषाढिंचा अन्धार मी । तू फाल्गुनी मधुशर्वरी !
खग्रास चंद्र मलीन मी । तू कोर ताशोव सिल्व्हरी !
बेसूर राठ 'सुनीत' मी । कविता चतुर्दश तू खरी,
'हैदोस' कर्कश मी जरी । 'अल्लाहु अक्बर' तू तरी!
माजूम मी, तू याकुती । मी हिङ्ग काबुलि; तू मिरी,
अन् भाङ्ग तू चण्डोल' मी, । गोडेल मी, तू मोहरी !
मी तो पिठ्यातील बेवडा । व्हिस्कीतली तू माधुरी,
काडेचिराइत मी कडू । तू बालिका खडिसाखरी
पँटीस तू, कटलेट मी । आँम्लेट मी, तू सागुती,
कांदे-बटाटे-भात मी । मुर्गी बिर्‍यानी तू परी !
अक्रोड मी कन्दाहरी । तू साहर्‍यातील खर्जुरी,
इस्तम्बुलीय अबीर मी । नेपाळची तू कस्तुरी !
मी घोङ्गडे अन् लक्तरी । मख्मूल तू मउ भर्जरी,
बेडौल वक्र त्रिकोण मी । तू लम्बवर्तुळ गे परी ।
तू वाढली कितीही जरी । मज वाटसी पण छोकरी,
जरी मूल हे कमरेवरी । तरी तू मला छकुल्यापरी !
गाम्भीर्य आणि वयस्कता । जरि ही तुझ्या मुखड्यावरी,
स्मरते मला तव सानुली । मूर्ती मनोहर पर्करी !
लव हासरी, लव लाजरी । लव कावरी, लव बावरी,
चिनिमातिची जणु बाहुली । मउ शुभ्र, सफेत नि पांढरी !
चल सोनुले, छकुले, घरी । वात्सल्य गे दाटे उरी,
निर्दोष तो देशील का । पापा छुपा फिरुनी तरी?
तू दोन इच्च जरी दुरी । फलाङ्ग भाससि गे परी,
चल श्यामले, म्हणूनी घरी ! बसु खेटुनी जवळी तरी !
घे माडगे, घे गाडगे । घे गुलचमन् घे वाडगे,
ताम्बूल घे, आम्बील घे, । घे भाकरी, घे खापरी !
किति थाम्बु मी? म्हण 'होय' ना । खचली उमेद बरी उरी,
झिडकारुनी मजला परी । मत्प्रीतिचा न 'खिमा' करी !


कवी - प्रल्हाद केशव अत्रे

हुरुप

कुठून येतो हा हुरुप मला?
खाली घातलेली मान वर होते
हारलेले हात पुन्हा लागतात मुठी आवळू
खचली कंबर पुन्हा ताठ होते
पेलण्यास ओझे
पावले थकली चढू पाहतात
अडल्या वाटा
कुठून येतो हा हुरुप मला !

शिणलेला आणि वैतागला मी
गोळा करताना वाळली पाने
मातीमध्ये हात मळवीत होतो
आहे का ह्या सुप्त मातीमध्येच
असे सामर्थ्य
स्पर्शानेच जागणारे चैतन्य ?


कवी - अनिल

घर वाळूचे बांधायाचे

घर वाळूचे बांधायाचे
स्वप्न नसे हे दिवाण्याचे...

सहज बोलली,निघून गेली
झाले, गेले ,विसरायाचे......

आरशात मी, आरशा-पुढे
कोण तोतया,समजायाचे....

ठरविल्याविना ,ठरले आहे
स्वप्नामध्ये भेटायाचे....

- इलाही जमादार

आसवांचा येतो वास

कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला

हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळया कळयांनाही
आसवांचा येतो वास

गीतकार :आरती प्रभू
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

नक्षत्रांचे देणे

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा


कवी / गीतकार : आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
गायिका  : आशा भोसले
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर

सप्रेम द्या निरोप

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगय्राचा पानी मिटून आहे
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे
वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निश्वास टाकताहे
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे
बोले अखेरचे तो: आलो ईथे रिकामा
"सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे"


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

नाही कशी म्हणू तुला

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे, लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी


गीतकार :आरती प्रभू
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर.

मी नजरेला खास नेमले

मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी
तुला वाटले,ती भिरभिरते,तुला पहाण्यासाठी

म्हणून तू,जाहलीस माझी,माझी,केवळ माझी
किती बहाणे केले होते, तुला टाळण्यासाठी

घडीभराने मलूल होतो, गजरा वेणीमधला
खरेच सांगतो,खरेच घे हे,हृदय माळण्यासाठी

गुपचुप येऊन भेटत असतो, तुझी आठवण मला
तिचा दिलासा, मला पुरेसा आहे जगण्यासाठी

कधी कवडसा, बनुन यावे, तुझ्या घरी एकांती
उघडझाप करशील मुठीची, मला पकडण्यासाठी

तु म्हणजे ग, फ़ुल उमलते,गंध तुझा मी व्हावे
दवबिंदू, व्हावेसे वाटे, तुला स्पर्शिण्यासाठी

तुझी साधना करता करता,अखेर साधू झालो
निर्मोही झाला 'इलाही',तुला मिळविण्यासाठी


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे

चुकली दिशा तरीही

कणिका

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी कै. विंदा करंदीकर यांच्या काही कणिका सादर करत आहे.
कणिका म्हणजे चार ओळींची छोटीशी कविता...

उत्क्रांती

माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी

कवी - विंदा करंदीकर

दर्पण

परमेशाला गमलें, आपण
रुप पहावें अपुले सुंदर;
आणिक केला त्यानें दर्पण;
तोच समजतो आपण सागर!

कवी - विंदा करंदीकर

चंद्र आणि क्षय

चंद्र जाहला क्षयी कशाने?
शापबलाने, म्हणती कोणी;
कुजबुकला पण तो माझ्याशी;
या कवितांनी! या कवितांनी!

कवी - विंदा करंदीकर

नायक

रामायण वाचुनिया नंतर
बोध कोणता घ्यावा आपण
श्रीरामासम मिळता नायक
वानर सुद्धा मारिती रावण

कवी - विंदा करंदीकर

इतिहास

इतिहासाचे अवघड ओझे
डोक्यावर घेउनी ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा

कवी - विंदा करंदीकर

खळी

स्वर्गामधुनी येता बालक
अमृत त्याचे काढुन घेती
उरे रिकामी वाटी जवळी
ती खळी ही गालावरती

कवी - विंदा करंदीकर

मला टोचते मातीचे यश

श्रावणातले ऊन रेशमी
आकाशाला बांधून ठेवी
घट्ट धरेशी
सह्याद्रीच्या गळ्यात पडती
श्रावणतल्या सरी सराईत
ओलेत्याने
आणि ओणव्या माळालाही
हंबरणारा अवखळ वारा
ढुशी मारतो भलत्या जागी
अडचणीतल्या पाऊलवाटा
अंग चोरुनी हळूच पळती
माझ्या जवळून
मजला टाळून
- ब्रम्ह जाहले धरणीला वश
अशा प्रसंगी
आत कुठेसे
मला टोचते मातीचे यश
संकलक Kshipra वेळ ८-२७ म.नं. 4 अभिप्राय या पोस्टचे दुवे
वर्ग विंदा करंदीकर
सोमवार ७ फेब्रुवारी २०११
असेल जेव्हा फुलावयाचे - विंदा करंदीकर
असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याचसाठी फुल सखे तू
फुल सखे तू फुलण्यासाठी;
फुल मनातिल विसरून हेतू.

या हेतूला गंध उद्याचा;
या हेतूची किड मुळाला;
फुल सखे तू फुलण्यासाठी;
या हेतूचा चुकवून डोळा.

फुल सखे होउन फुलवेडी;
त्या वेडातच विझव मला तू.
विझव नभाच्या आळवावरचे;
स्थळ-कालाचे हळवे जंतू.


कवी - विंदा करंदीकर

मानवाचे अंती । एक गोत्र

मिसिसिपीमध्ये। मिसळू दे गंगा;
र्‍हाइनमध्ये "नंगा"। करो स्नान.

सिंधुसाठी झुरो। ऍमेझॉन थोर,
कांगो बंडखोर। टेम्ससाठी.

नाईलच्या काठी। "रॉकी" करो संध्या;
संस्कृती अन्‌ वंध्या। नष्ट होवो.

व्होल्गाचे ते पाणी। वाहू दे गंगेत;
लाभो निग्रो रेत! पांढरीला.

माझा हिमाचल। धरो अंतर्पट,
लग्नासाठी भट। वेदद्रष्टा!

रक्तारक्तातील। कोसळोत भिंती;
मानवाचे अंती। एक गोत्र.

छप्पन भाषांचा। केलासे गौरव
तोचि ज्ञानदेव। जन्मा येवो.

जागृतांनो फेका। प्राणांच्या अक्षता
ऐसा योग आता। पुन्हा नाही!


कवी - विंदा करंदीकर

फ्रॉईडला कळलेले संक्रमण

हल्ली हल्ली फुलू लागल्या
शेजारील सान्यांच्या पोरी
उन्निस वर्षांच्या अभयेला
येऊ लागली मधेच घेरी


सतरा वर्षांची सुलभाही
हुळहुळणारे नेसे पातळ
मधेच होई खिन्न जराशी
मधेच अन ओठांची चळवळ


पंधरा वर्षांची प्रतिमापण
बुझते पाहून पहिला जंपर
तिला न कळते काय हवे ते
तरी पाहते ती खालीवर


हल्ली हल्ली फुलू लागल्या
शेजारील सान्यांच्या पोरी
बाप लागला होउ प्रेमळ
आई कडवट आणि करारी


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - स्वेदगंगा

डोळ्यातल्या डोहामध्ये

डोळ्यांतल्या डोहामध्ये
खोल खोल नको जाऊ;
मनांतल्या सावल्यांना
नको नको, सखे, पाहू;

जाणीवेच्या गाभा-यात
जाऊ नको एकटीने ;
गेलेल्यांना साधले का
व्यथेवीण मागे येणे ?

व्यथेच्या या पेल्यांतून
सत्याचे जे घेती घोट,
पूस त्यांना कसा कांपे
पिता पिता धीट ओठ !


कवी - विंदा करंदीकर

एवढे लक्षात ठेवा

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥


कवी - विंदा करंदीकर

मी

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी

कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे

कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!

कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे

टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!

कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी... तसा मी... कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!


कवी - विंदा करंदीकर

लागेल जन्मावें पुन्हा...

माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.

तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.

तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.

होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.

म्हणतेस तू, "मज आवडे रांगडा सीधेपणा!"
विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं.

लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.


कवी - विंदा करंदीकर

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - जातक

माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध

वेड्याचे प्रेमगीत

येणार तर आत्ताच ये;
येणार तर आत्ताच ये;
उद्या तुझी जरूर काय?
... आज आहे सूर्यग्रहण;
आज मला तुझा म्हण;
उद्या तुझी जरूर काय?
बेकारीच्या खुराकावर
तुझी प्रीती माजेल ना?
सूर्याच्या या तव्यावरती
चंद्राची भाकर भाजेल ना?
... भितेस काय खुळे पोरी;
पाच हात नवी दोरी
काळ्या बाजारात उधार मिळेल.

सात घटका सात पळे
हा मुहूर्त साधेल काय?
संस्कृतीचे घटिकापात्र
दर्यामधे बुडेल काय?
... उद्याच्या त्या अर्भकाला
आज तुझे रक्त पाज;
... भगवंताला सारी लाज.
येणार तर आत्ताच ये;
अंधाराच्या मांडीवरती
जगतील सात, मरतील सात;
आकाश आपल्या डोक्यावर
पुन:पुन्हा मारील हात.
... भरल्या दु:खात रडू नये;
येणार तर आत्ताच ये;
येणार तर आत्ताच ये;
उद्या तुझी जरूर काय?


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - जातक

गझल उपदेशाचा

तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको;
मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको.

आत्मास आत्म्याचे मिळे; ते कोण घेईल काढुनी?
पण इंद्रिया दरडावुनी शरिरास तू हिणवू नको

मोठ्यास मोठे मान तू, त्याहून मोठे चिंतता;
पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको

खोटा गळा काढू नको; खोटा टिळा लावू नको;
जीव जडतो त्या ठिकाणी पाय तू अडवू नको.

विवेक, संयम, नम्रता असले सदाचे सोबती,
तरि व्हायचे वेडे जिथे तेथे मढे होऊ नको.

खुश्शाल जा तू मंदिरी, त्याला-तिला देण्या फुले;
पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरु नको.

पोचायचे जेथे तिथे ना ऊन आणिक सावली,
म्हणुनी वडाच्या खालती अस्वस्थ तू होऊ नको.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - जातक

झपताल

ओचे बांधून पहाट उठते...
तेव्हापासून झपझपा वावरत असतेस.
कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून
दोन डोळे उमलू लागतात
आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून
तुझ्या स्तनांवर बाळसे चढते.
उभे नेसून वावरत असतेस.
तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल
पुन्हा एकदा लाल होते.
आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो!
मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात,
त्यांची मान चिमटीत धरुन
तू त्यांना बाजुला करतेस.
तरीपण चिऊ काऊच्या मंमंमधील
एक उरलेला घास त्यांनाही मिळतो.
तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तुंमध्‍ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..
स्वागतासाठी "सुहासिनी"असतेस,
वाढतांना "यक्षिणी"असतेस,
भरवतांना "पक्षिणी" असतेस,
साठवतांना "संहिता" असतेस,
भविष्‍याकरता "स्वप्नसती" असतेस.
....संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.


कवी - विंदा करंदीकर

भास

संध्याकाळी किनाऱ्यावर एकाएकी झाला भास
कोण आलं... कोण गेलं? कोणीच नाही जवळपास?

कुठून आली... कुठे गेली? मी पाहिली एवढ खरं
अस येणं अस जाणं तिला दिसलं नाही बरं!

चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली
रेतीवरती पाउलखुणा न ठेवता परत गेली

थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली
गुल्बाक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली!

पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगल का हे पुन्हा येणं?
तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईन देणं !

आयुष्याच्या क्षितीजावर अंधारात बुडले रंग
कशासाठी, कशासाठी आता असा तपोभंग?

समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो
ओल्याचिंब देहांनीच पेटलो होतो, विझलो होतो!

आता असे कोरडे.. जसे जळण्यासाठी उत्सुक सरण
निमित्ताला ठिणगी हवी! एवढ्याकरता दिलं स्मरण?


कवी - वसंत बापट.

ये उदयाला नवी पिढी

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी

ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल आम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी?

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी


कवी - वसंत बापट

सैनिकाप्रत

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे

प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे

कवी - वसंत बापट

शाई, कागद, टांक...

शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे
(काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला!
स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला-
"काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला!" वदे!

टाकी बंद करून सर्व खिडक्या-जाळ्या, झरोके तसे
दारालाही तशीच लावित कडी आतूनबाहेरुनी!
दोस्ताला कुठल्यातरी बसविले दारावरी राखणी;
"काव्याची बघतो मिजास!" वदला अस्पष्ट काही असे!

आता कंबर बांधुनीच कवने 'पाडावया' तो बसे
वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लीत चोहीकडे!
आले धावुनि लोक सर्व! दुसरे कोणा सुचावे कसे?
चिंताक्रान्त मुखे करूनि बसले निःस्तब्ध दारापुढे!

झाला तब्बल तास! चाहुल परी काही न ये आतुनी,
सर्वांचा अगदीच धीर सुटला! कोमेजले चेहरे!
भाळी लावुनि हात कोणी वदती "मजी प्रभूची बऽऽरे!"
दृष्टी खिन्नपणे नभी वळवुनी निःश्वास टाकी कुणी!

गंभीर ध्वनि तोच आतुनि निघे! उंचावली मस्तके!
श्वासोच्छ्वास क्षणैक थांबत! मुखे रुंदावली कौतुके!
डोकावूनि बघे फटींतुनि कुणी-तो त्या दिसे अद्‌भुत!
होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत!!


कवी - प्र. के. अत्रे

आम्ही कोण?

'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!


कवी - प्र. के. अत्रे

कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?


कवी - आचार्य अत्रे

अनामवीरा

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा


कवी - कुसुमाग्रज

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका

कवी - कुसुमाग्रज

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

कवी - कुसुमाग्रज

स्मृति

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट!

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग!

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

वादळवेडी

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात...

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात

कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात

तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात


कवी - कुसुमाग्रज

समिधाच सख्या या...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

नदी

नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर

नदीबाई आई माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी

नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्यांना देई
कोणी असो कसा असो भेदभाव नाही

शेतमळे मायेमुळे येती बहरास
थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास

श्रावणात आषाढात येतो तिला पूर
पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर

माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय


कवी - कुसुमाग्रज

अहि नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !

कधी लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,
प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !
अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला ! आला देख, नकूल !

थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !

रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !

क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्‍यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले कीटक भोती !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

जालियनवाला बाग

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

सागर

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे


कवी - कुसुमाग्रज

सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी

प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट

आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत

(अर्थात - चहाच्या कपात पडलेल्या माशीस... )

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके.

या प्रभातसमयास मंगल,
चमकती दंवमौक्तिक निर्मल,
गात पक्षिगण हा गगनी फिरे,
पण दशा तव काय अर-अरे!

ओसरीवरुनि या तव मैत्रिणी,
गात स्वैर फिरतात सुलक्षणी;
परि तुला न बघती मुळि ढुंकुनी,
'संकटी जगि कुणा न असे कुणी!'

मंडई नव्हति का तुज मोकळी,
की मिठाई 'मघुरा-भुवनांतली',
नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,
म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,
मनुजवस्तित आलीस का इथे!

करीत 'दत्तु-भट' काय तपासणी
म्हणुनि घाबरुनी आलीस तू झणी!
शर्कराकण येथिल सांडले
सेवुनी न तुज सौख्य जाहले?

की 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवी भूक न काय तुझी बरे?
पेय बोलुनिचालुनि घातकी,
बुडविते बघ भारतियास की !

या अशा व्यसनात विलायती,
अडकता फळ दारुण शेवटी !
नर जसा बुडतो भवडोही
तेवि खालिवर जासि अयाई!

काडी वाचवि जरी बुडत्याला,
काडीचा न परि आश्रय गे तुला!
स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
बघु तरी उघड्या नयनी कशी?

अंगि तेवि भरले भयकापरे,
आणि त्यात निवला न चहा बरे!
हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,
छे, सले नुसती मनी कल्पना?

समिप पाउसकाळहि पातला,
आणि तू निघुनि जाशिच आजला!
अहह, आम्रफल-मोसम येईल,
अम्हि असू परि तू नसशील!

फेकु सालटि चोखुनि चोखुनि,
तुजविना पण जातिल वाळुनी
तुजविना कवि-मुखे दिसतील की,
भृंगहीन कमळांसम ती फिकी,

कौन्सिलात, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवाचुनी?
राजकारण रोज नवे नवे,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.

शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,
त्या इशारत कोण तरी गडे?
यापरी नव-तरंग मनात
येउनी ह्रदय होय कंपित.

पेयपृष्ठि उठली इतुक्यात,
मंद-श्वास,-लहरीसह लाट!

फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणि खालती खोल गेली!

टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,
चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

परीटास...

परिटा येशिल कधी परतून? || धृ ||

काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून!

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!

सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन!

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून!

तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन!

गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन!

रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन!

सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
परिटा येशिल कधी परतून?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कवी आणि कारकून

बोले हासुनि कारकून कुठला गर्वे कवीला असे
'माझे साम्य तुझ्यामधे दिसतसे-आहोत बंधू जसे!
दोघेही दिनरात्र ना खरडतो काहीतरी आपण,
जन्माचे पडलेत की ठळक हे बोटास काळे वण!

'माझे अक्षर का कुणास उमगे-आला जरी तो खुदा
ब्रह्याच्याहि पित्यास का समजणे काव्यार्थ तूझा कदा!
येती कागद जे समीप करणे त्यांची मला नक्कल
तूही ना नकला अशाच करिसी-लागे न ज्या अक्कल!

आणे, पै, रुपये हिशेब करितो-ज्यांचे न हो दर्शन,
नाही पाहियली तरी करिसि ना ताराफुले वर्णन?
पोटाचे रडगान मी रडतसे वेळी अवेळी जसे
चाले संतत काव्यरोदन तुझे तीन्ही त्रिकाळी तसे!'

'मित्रा, हे सगळे खरे,' कवि वदे, 'तुझ्याप्रमाणे पण-
माझ्या मूर्खपणास ना दरमहा देई कुणी वेतन!'


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

फत्तर आणि फुले

होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला
वर्षें कैकहि तरी न तो हाले मुळीं आपुला
आनंदी फुलवेल एक जवळी होती सुखें राहत
बाळे सांजसकाळ हासत तीचीं तैशीच कोमेजत

थट्टेखोर फुलें हंसूनि ती वदलीं धोंड्यास त्या एकदा
"धोंडा केवळ तू ! अरे, न जगती काही तुझा फायदा !"
संतापून तयांस फत्तर म्हणे " कां हीं वॄथा बोलणी
सारी सुंदरता इथेंच तुमची जाईल रे वाळुनी !"

धोंडयाच्या परि काळजास भिडले ते शब्द जाऊनिया
काळाठिक्कर यामुळें हळुहळू तो लागला व्हावया
पुष्पांच्या कवळ्या मनांतहि सले ते फत्तराचें वच
गेली तोंडकळा सुकून, पडली तीं पांढरी फारच !

कोणी त्या स्थलि शिल्पकार मग तो ये हिंडता हिंडता
त्याच्या स्फुर्तिस फत्तरांत दिसली काहीतरी दिव्यता
त्याची दिव्यकलाकरांगुलि न जों त्या फत्तरा लागली
श्रीसौंदर्यमनोरमा प्रगटुनी साक्षात् उभी राहिली

वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकी ये त्या स्थळा
ती मूर्ती बघतांच तो तर खुळा नाचावया लागला
त्यानें ती खुडुनी फुलें भरभरा पायीं तिच्या वाहिली
तों, त्यांची फुलुनी कळी खद्खदा सारीं हसूं लागली

लावण्यकॄति ती वनांत अजुनी आहे उभी हांसत
पुष्पेंही बसलींत तीं बिलगुनी पायी तिच्या खेळत


कवी - केशवकुमार

देवा तुझे

देवा, तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो .

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!


कवी - ग. ह. पाटील

राजहंस माझा निजला

हे कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला'

दुर्दैवनगाच्या शिखरी, नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें, मी उगाच सांगत नाही
जें आनंदेही रडते, दु:खांत कसें ते होई

हे कुणी कुणां सांगावे
आईच्या बाळा ठावें
प्रेमाच्या गावा जावें
मग ऐकावें या बोला, 'राजहंस माझा निजला"

मांडीवर मेले मूल, तो हृदया धक्का बसला
होउनी कळस शोकाचा, भ्रम तिच्या मानसीं बसला
मग हृदय बधिरची झाले, अति दुःख तिजवी चित्ताला

ते तिच्या जिवाचें फूल
मांडीवर होत मलूल
तरि शोके पडुनी भूल
वाटतची होतें तिजला, 'राजहंस माझा निजला'

जन चार भोंवतीं जमले, मृत बाळा उचलायाला
तो काळ नाथनिधनाचा, हतभागी मना आठवला
तो प्रसंग पहिला तसला, हा दुसरा आतां असला

ते चित्र दिसे चित्ताला
हे चित्र दिसे डोळ्यांला
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां, 'राजहंस माझा निजला'

करु नका गलबला अगदी, लागली झोंप मम बाळा
आधीच झोंप त्या नाही, खेळाचा एकच चाळा,
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा

वाजवूं नका पाऊल
लागेल तया चाहूल
झोपेचा हलका फूल
मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला

हें दूध जरासा प्याला, आतासा कोठें निजला
डोळ्याला लागे डोळा, कां तोच भोवतीं जमलां?
जा, नका उठवुं वेल्हाळा, मी ओळखतें हो सकलां

तो हिराच तेव्हा नेला
हिरकणीस आता टपला
परि जिवापलिकडे याला
लपवीन, एकच मजला, राजहंस माझा निजला

कां असलें भलतें सलतें, बोलतां अमंगळ याला
छबकड्यावरुनि माझ्या या, ओवाळुनि टाकीन सकलां
घेतें मी पदराखालीं, पाहूंच नका लडिवाळा,

मी गरीब कितिही असलें
जरी कपाळ माझें फ़ूटलें
बोलणें तरी हें असलें
खपणार नाहिं हो मजला, राजहंस माझा निजला

हें असेच सांगुनि मागें, नेलात जिवाचा राजा
दाखाविलाही फिरुनी नाहीं, नाहीत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां, राजहंस राजस माझा!

हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा
पाहुनी गरिब कोणाला, राजहंस माझा निजला


कवी - गोविंदाग्रज[राम गणेश गडकरी]

एखाद्याचें नशीब

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


कवी - गोविंदाग्रज

एका तळ्यात होती...

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

कवी - ग. दि. माडगूळकर

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

गीतकार :ग. दि. माडगुळकर

मातृवंदना

दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
जिण्यालागि आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

गुरु आद्य तू,माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात,
प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच,
वठे भूमिका पाठ जैसा दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझे थोर संस्कार आचार झाले
तुझे यत्नप्रामाण्य सिध्दीस गेले,
तुझ्या चिंतने,लोभ पावे निरास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

उमेचे,रमेचे,तसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस


कवी - ग. दि. माडगूळकर

नदी मिळता सागरा

नदी सागरा मिळ्ता, पुन्हा येइना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर

काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले

सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर
तरी तीला आठवतो, जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेपायी, रुप वाफ़ेचे घेउन
नदी तरंगत जाते, पंख वाऱ्याचे लावून

पुन्हा होउन लेकरु, नदी वाजवते वाळा
पान्हा फ़ुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा.


कवी - ग. दि. माडगूळकर

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी

हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसी कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा

मी देह विकुनीया मागून घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडीला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे


कवी - ग. दि. माडगूळकर

अंदाज आरशाचा

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे

रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे 

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!

काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा

भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा

दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही'
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा


कवी- इलाही जमादार

चुकले का हो?

आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?
धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?

चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी
जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?

कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?
आठवणींना, श्र्वास म्हणालो, चुकले का हो?

मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे
मी त्याना, विश्र्वास म्हणालो, चुकले का हो?

निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो
प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?

लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली
सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?

चौदा वर्ष, पतीविना, राहिली उर्मिला
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

घात आप्त, आघाता सगे, अपघात सोयरे
ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?

जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही'?
कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे

मृत्यू

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानीला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली।


कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

सिद्धांत आसवांचा

आरंभही मी जीवनाचा, रडण्यातुनी केला सुरू
अंतावरी रहील वाटे, कार्य हे माझे सुरू

आता जसा निःशंक रडण्या, सरसावलो थोडा पुढे
आले स्वये भगवान, आणि टाकली गीता पुढे

याही जरी जन्मात आम्हा देइल ना कोणी रडू
मी तरी सांगा अता कोठे रडू, केव्हा रडू

बोललो रडलास तूही, हरवता सीता तुझी
रडता अम्ही आम्हापुढे, टाकसी गीता तुझी?

ओशाळला ऐकून आली, सारी स्मृती त्याला पुन्हा
भगवानही मी काय सांगू, माझ्या पुढे रडला पुन्हा

आसवे आम्हीच पुसली, नयनातली आम्ही स्वये
प्रार्थुनी म्हणतो कसा, सांगू नको कोणास हे

बोललो कि व्यर्थ आहे, परमेश्वरा शंका तुझी
राखायची आहे मलाही, परमेश्वरा अब्रू तुझी

रडण्यातही सौंदर्य माझ्या, ना जरी बघते कुणी
भगवन अरे, ही शायरीही ऐकली नसती कुणी

सिद्धांत ऐसा आसवांचा, त्यालाच मी सांगितला
होता जसा युद्धात त्याने, कुंतीसुता सांगितला

बोलला, साक्षात अविध्यानाथ आम्ही पहिला
पार्थाहुनीही मूर्ख आम्ही, अद्याप नव्हता पाहिला.


कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

पत्ते

मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो

पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे

आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला

राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली

दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला

विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले

नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे

खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला इश,म्हणति अल्ला कुणी, येशू कुणी

त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले
एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले

आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला
आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला

नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी

हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा


कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

स्वप्न

भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते
येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते

म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या
सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या

जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी
स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी

भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे
स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे

त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा
नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा

ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे
बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे

आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले
पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले

हसतील ना कुसूमे जरी...

हसतील ना कुसूमे जरी, ना जरी म्हणतील 'ये'
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती अमुची नव्हे

भ्रमरा परी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे अम्ही
इश्कातही नाही हुठे भिक्षुकी केली अम्ही

खेळलो इश्कात आम्ही बेधुंद आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत नाही पायी कूणाच्या लोळलो

अस्मिता इश्कात सा-या केव्हांच नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो

रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले
तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले

आसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला
नुसताच नाही इश्क त्याला मो़क्ष आहे साधला

बर्बादिची दीक्षा जशी इश्कात आम्ही घेतली
इश्कही बर्बाद करण्या माघार नाही घेतली

ना रडू नुसतेच आम्ही हाय ना नुसते करु
आहो शिवाचे भक्त आम्ही हेही करु तेही करु

कवी - भाऊसाहेब पाटणकर

जयहिंद आणि जयजवान

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला,
नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला

विरतेची भारती या ना कमी झाली कधी,
आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी

तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद,
बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद

बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो,
देउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो

धर्माहुनी श्रेष्ठ आपल्या देशास जो या समजला,
मानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला

जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला,
अध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला

कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे,
कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे

हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा,
पाहिली नसतील जर का बुजगावणी यांना बघा

पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे,
नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे

आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची,
फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची

हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही,
बोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही


कवी - भाऊसाहेब पाटणकर

कीर्ति

एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी
तेच होते दार आणि तीच होती ओसरी

होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली
खूप होती धूळ आणि कसर होती लागली

द्रवलो तिला पाहून, होती शेवटी माझीच ती
दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती

बोलली की हीच का, माझ्यावरी माया तुझी
गेलास ना टाकून, होती प्रत्यक्ष जी छाया तुझी

बोलली हे ही तुला का सांगावया लागते
मेल्यावरी जगण्यास वेड्या, खूप कीर्ति लागते

होऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू
आहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू?

समजली ना, आता तरी, आपुली स्वत:ची पायरी
समजले ना काय मिळते, नुसती करूनी शायरी?

ओशाळलो ऐकून, नेली तसबीर मी ती उचलुनी
सांगतो ह्याची तिथे, चर्चाही ना केली कुणी


कवी - भाऊसाहेब पाटणकर

नाजूकता

नाजूकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी
नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी
भय आम्हा नाजूकतेचे हेच होते वाटले
भारही नजरेतला या सोसेल नव्हते वाटले

टाकसी हळुवार अपुली नाजूक ईतुकी पाऊले
टपकती हलकेच जैसी परिजाताची फ़ुले
नाजूकता जाणून आम्ही आधीच होती बिछवली
पायातळी केव्हाच तुझिया विकल ह्रुदये आपुली

इतुका तरी हा स्पर्श ह्रुदया होईल होते वाटले
इतुके तरी सद्भाग्य उदया येईल होते वाटले
कल्पना नाजूकतेची आम्हासही नव्हती कधी
गेली आम्हा तुडवून आम्हा कळलेच ना गेली कधी

कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

ऐसि शायरी माझी नव्हे

सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान, तितुकी पायरी माझी नव्हे

आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सन्मानितो
सन्मानितो हासू, तसे या आसवा सन्मानितो

जाणतो अंति ,अम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत, दुसरे काय असते व्हायचे

मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे

आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे


कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

मधुघट

मधु मागशि माझ्या सख्या परी,
मधुघटचि रिकामे पड़ती घरी

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पजीला तुला भरोनि,
सेवा हि पुर्वीची स्मरोनी,
करी रोष न सखया, दया करी

नैवेद्याची एकच वाटी
अतां दुधाचि माझ्या गाठी,
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशि तरी

तरुण-तरुणीची सलज्ज कुजबुज
वृक्ष-झर्यांचे गुढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परी रे बळ न करी

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया,
अतां मधुचे नांव कासया?
लागले नेत्र रे पैलतीरी

कवी - भा. रा. तांबे

मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा |

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा |

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा |

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा |

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा |


कवी - भा.रा.तांबे

जन पळभर म्हणतील, हाय हाय!

जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
मी जातां राहील कार्य काय ?

सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?

मेघ वर्षतील, शेतें पिकतील,
गर्वानें या नद्या वाहतील,
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?

राम-कृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
मग काय अटकलें मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावें ?
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शांतींत काय ?

कवी - भा.रा.तांबे[भास्कर रामचंद्र तांबे]

या बाळांनो, या रे या

या बाळांनो, या रे या
लवकर भरभर सारे या

मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया

खळखळ मंजुळ गाती झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसही गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया


कवी - भा. रा. तांबे

सायंकाळची शोभा

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्यांचे

अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.

झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?

कवी - भा. रा. तांबे

मरणांत खरोखर जग जगते

मरणांत खरोखर जग जगते
अधीं मरण अमरपण ये मग ते

अनंत मरणे आधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारील मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते

सर्वस्वाचे दान आधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरी
रे! स्वयें सैल बंधन पडते

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काही मिळते?

सीता सति यज्ञीं दे निज बळी
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देऊनी बळी हो बळी
यज्ञेच पुढे पाऊल पडते

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो
स्वसत्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते

प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां
उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर!'गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी काही का मिळते?


कवी - भा.रा.तांबे[भास्कर रामचंद्र तांबे]

कळा ज्या लागल्या जीवा...

कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.

नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.

कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.

पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !


कवी - भास्कर रामचंद्र तांबे

श्रावण मासि

श्रावण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत


कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

ती फुलराणी

हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !


कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.


कवी - बालकवी

गाणाऱ्या पक्ष्यास

समय रात्रीचा कोण हा भयाण
बळे गर्जे हे त्यांत घोर रान
अशा समयी छबुकड्या पाखरा तू
गात असशी; बा काय तुझा हेतू?

गिरी वरती उंच उंच हा गेला
तमे केले विक्राळ किती याला
दरी गर्जे, फूत्कार पहा येती,
किती झंझानिल घोर वाहताती

दीर्घ करिती हे घूक शब्द काही
क्रूर नादे त्या रान भरुनी जाई
अशा समयी हे तुझे गोड गाणे
रम्य पक्ष्या, होईल दीनवाणे

तुझ्या गानाचे मोल नसे येथे
कुणी नाही संतुष्ट ऐकण्याते
जगे अपुल्या कानास दिली टाळी
वृथा मानवी हाव अशा वेळी

तुझे गाणे हे शांत करी आता
पहा, गर्जे वन घोर हे सभोंता
किर्र करिती हे तीक्ष्ण शब्द कीट
असे त्यांचा या समयी थाटमाट

पुढे येईल उदयास अंशुमाली
दिशा हसतील वन धरिल रम्य लाली
हरिणबाळे फिरतील सभोवार
तदा येवो गाण्यास तुझ्या पूर

तुझे भ्राते दिसतील एक ठायी
हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही
वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे
मधुर नादे वन भरुनि टाक सारे


कवी - बालकवी

पक्ष्यांचे गाणे

प्रणयमंजुषा उषा उदेली,
दिव्यत्वाने वसुधा नटली,
की स्वर्गाची प्रभा फाकली ही वरती खाली.


निर्विकार विश्वाचे अंतर
प्रशांत पसरे नभःपटावर
शांतिदायिनी भूमि मनोहर ही हसते खाली.


पटल धुक्याचे हळूंच सारुनि,
चंडोलाच्या चाटु वचांनी,
स्पष्ट भूमिला समजावोनी हा चुंबी तरणी.


उषःकालची मंगलगीते
ही सरिता, हे कानन गाते,
हा विहगांचा ध्वनी मजेचा साथची हो त्याते.


प्रभातवायू मंद वाहती,
वनराजी आंदोलन घेती,
हळूंच लतिका फुले आपुली-उधळुनिया देती.


माझ्या प्रिय विहगांनो, आता
प्रसंग सुंदर असा कोणता?
यापुढती हो उघडा अपुली - प्रेमाची गाथा.


पुरे कोटरी आता वसती,
रान मोकळे, पुष्पें हसती,
उडा बागडा प्रशांत गगनी जा, जा, जा वरती.


नभात मारा उंच भरारी,
प्रेमपूर्ण की रमा भूवरी,
विविधा सृष्टी ही देवाची तुमची ही सारी.

कवी - बालकवी

अनंत

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत।

कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?

विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?

अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?

तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाईल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून।

कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे;

हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनी जड गोड काळिमा पसरी लाटांवर;

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर


कवी - बालकवी

प्रीती हवी तर

प्रीती हवी तर जीव आधी कर अपुला कुर्बान,
प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान !

तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत,
याद ठेव अंगार जगाला लावील निमिषांत !

प्रीती निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी?
प्रीतीदेवी जगदेकवीर जो जाय तयापाठी !

नव्हे प्रीतीला रंग लाविला लाल गुलाबांचा,
परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा.

गुल गुल बोले प्रीती काय ती? काय महालांत?
प्रीती बोलते काळ घालिता कलिजाला हात !

स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला
हीन जिवाने घेऊ नये त्या जहरी प्याल्याला !

सह्य जिवाला होय जाहला जरी विद्युत्पात,
परी प्रीतीचा घात भयंकर दुसरा कल्पांत !

जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात;
साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत !


कवी - बालकवी

दोष आणि प्रीति

दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?

दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.

गड्या पुर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्युना, ये मार मिठी देही
प्रीति माझ्या ह्रदयात करी वास
न्युनतेला पुर्णत्व द्यावयास !


कवी - बालकवी

तेच ते नि तेच ते

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते

कवी - विंदा करंदीकर

समुद्रराग

पावसात जागला समुद्रराग सावळा
लाट लाट दाटते भरुन भाव कोवळा

काठ काठ ढासळे, पिसाट माड स्फुंदती
आंधळ्या ढगांतूनी प्रकाशबिंदू सांडती

हाक ये दूरुन एक झाकळून टाकते
गाढ गूढ आठवांत मूक वेल वाकते

माखते चराचरी अथांग गांग गारवा
आगळा जगास ये उदास रंग पारवा

धूसरे सरींत दूर, सूरसूर व्याकळे
भाव की अभाव हा करी सुगंध मोकळे

कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते
सागरार्थ कोणत्या उसासुनी उधाणते


कवी - बा. भ. बोरकर

माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||


कवी - बा. भ. बोरकर

चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलूनी गेला गगनमंडला
फ़णा डोलवित झोंबू पाहॆ
अस्तरवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तिचा पानोपानी
बघून झाले ओलेओले

कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीनकांति गोरे गोरे

फूलपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटींबे
आरसपानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राउळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीण
अजूनी करते दिडदा दिडदा.


कवी - बा. भ. बोरकर

तव नयनांचे दल......

तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी
जग सारे डळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

वारे गळले तारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषी मुनी योगी चळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ह्रुदयी माझ्या चकमक झडली
दो नयनांची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले गं
तव नयनांचे दल हलले गं

कवी - बा. भ. बोरकर

स्फूर्ती

काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
 - मुंबई, २३ मे १८९६