बाळ तुझे गेले भेदरुन भारी

तुवा अचानक सोडून वादळ

किती रे गोंधळ माजवीला !

पाहायाची होती मौज वा कसोटी !

काय हेतु पोटी होता तुझ्या ?

वावटळीमध्ये सापडावे पीस

तसा कासावीस झालो तेव्हा

बागुलाचें भय आई दाखवीते

पोटाशी धरिते लागलीच

बाळ तुझे गेले भेदरुन भारी

आंजारी गोंजारी प्रभो, तया


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा - वसुंधरेवर खरा तू मानव

तपश्चर्या तुझी चालली कधीची

अगा हे दधीचि ऋषिश्रेष्ठा,

वसुंधरेवर खरा तू मानव

जिंकिले दानव अहिंसेने

करोत प्रळय स्फोटक असंख्य

तुझे गा अजिंक्य आत्मबळ

स्थापाया शांतीचे अहिंसाप्रेरक

दलितोद्धारक लोकराज्य

आपुल्या अस्थींचे निर्मूनीया वज्र

पारतंत्र्य-वृत्र संहारिला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा - भयाण काळोखी एक कृश मूर्ति

भयाण काळोखी एक कृश मूर्ति

घेऊनि पणती हिंडताहे

सापडलेले होते भूमीवरी रक्त

करीत पुनीत पादस्पर्शे

जागोजाग होती लागलेली आग

म्हणे, ’फुलबाग फुलवीन’

पशु होते तिथे घालीत तांडव

’करीन मानव त्यांना’, म्हणे

शुक्रतारा कोणी किंवा देवदूत

पूर्वेला उदित झाला आहे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा - पाउलापुरता नाही हा प्रकाश

सांगायाचे होते सांगून टाकले

जावो ते ऐकले वा न जावो

कधीचा घेऊन दीप अंधारात

आहे मी चालत पुढे पुढे

येणारे येतील शोधीत ही वाट

आहे मी एकटा नाहीतरी

पाउलापुरता नाही हा प्रकाश

दूरचे भविष्य माझ्यापुढे

म्हणोत कोणी हे अरण्यरुदन

माझे समाधान चिरंतन !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा

अजून उराशी धरिली मी आस

मजला प्रकाश दिसणार

काळोखच आहे मागेपुढे दाट

त्यातूनही वाट काढणार

पदोपदी काटे, पदोपदी ठेच

प्रभु गोमटेच करणार

दुःखाचेच घोट प्यालो आजवरी

सुख कधीतरी लाभणार

चाललाच आहे माझा नित्य शोध

होईल तो बोध होवो केव्हा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा - उत्तम मानव वसुंधरेचा हा

मानवधर्माची पाजळून ज्योत

ईशाचा प्रेषित गेला स्वर्गा

अहिंसाशांतीचा सत्याग्रही वीर

त्यजूनी शरीर गेला स्वर्गा

दिव्य वज्रे जगा अर्पूनि अस्थींची

महात्मा दधीचि गेला स्वर्गा

उत्तम मानव वसुंधरेचा हा

त्यजुनीया देहा गेला स्वर्गा

हिंदजननीचा थोर हा सुपुत्र

गात ’राम-मंत्र’ गेला स्वर्गा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा

मारेकर्‍या, गेला व्यर्थ तुझा वार

नाही पारावर फजीतीला

अमर तो जाशी ज्याला मारायाला

मेल्याहूनी मेला झालास तू

काळे तुझे तोंड लोपे काळोखात

त्याला प्रकाशात जागा नाही

ज्यावरी येशूला केली खिळेठोक

धर्माचे प्रतीक झाला क्रूस

युगायुगाचा तो जाहला महात्मा

धनी तू दुरात्मा रौरवाचा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हरे राम ! किती पाहिला मी अंत !

"पिस्तुलाने मला दिला हा इशारा

विश्रांति शरीरा, हवी तुला

दरिद्री दलित झाला मायदेश

दिले तुला क्लेश त्याचेसाठी

सत्याग्रहास्तव तुला बंदिवास

सोशीले उपास निर्वाणीचे

मायबहिणींची पुसाया आसवे

तुला हिंडवीले आगीतून

हरे राम ! किती पाहिला मी अंत !

जा रे पंचत्वात विलीन हो"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराचे दान

अरे हिंदपुत्रा, सांग कशासाठी

तुझी ही हाकाटी रात्रंदिस ?

कोणता तू केला आजवरी त्याग

जीवनाचा याग मातेसाठी ?

तुझा हा कलह, क्षुद्र तुझा मोह

तुझा मातृद्रोह ख्यात जगी

काय ही पायीच्या तोडतील बेडया ?

कल्पना ही वेडया सोड खुळी

स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराचे दान

याचकाची दीन भिक्षा नोहे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

फार मोठी आम्हा लागलीसे भूक

फार मोठी आम्हा लागलीसे भूक

आता नाही भूक राहणार !

यापुढे आमचा रोज क्रांतिदिन

नाही हीनदीन राहणार

पेटविली आम्ही एकदा मशाल

आता सर्वकाल पेटणार

प्रचंड आमचा सुरु झाला यज्ञ

त्याला कोण विघ्न आणणार ?

चाळीस कोटींचे घोर आक्रंदन

कोण समाधान करणार ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी !

मंगल मंगल उजळे प्रभात

कुजबुजे वात कानी माझ्या

उगवत्या सूर्या कराया वंदन

फिरवी वदन पूर्वेला मी

काय मी पाहिले ? काय मी ऐकिले ?

मस्तक जाहले सुन्न माझे

नव्हता तो रम्य अरुणाचा राग

होती आग आग पेटलेली

नव्हत्या प्रेमळ प्रसन्न भूपाळ्या

आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आता हवे बंड करावया

केवळ आमुची केली समजूत

चांद आरशात दाखवीला

पुरा वीट आला, नको ती याचना

केवळ वंचना-मृगजळ

पुरे झाल्या थापा, होते ते थोतांड

आता हवे बंड करावया

माघारी आणाया हरपले श्रेय

आता हवे दिव्य करावया

उचलीला विडा, लाविला भंडार

आता हा निर्धार शेवटला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोटि कोटि आम्ही उभे अंधारात

नाही का आमुचे संपले ग्रहण ?

कधी मोक्षक्षण यावयाचा

क्षितिजी लागले कधीचे नयन

कुठे तो अरुण ? कुठे उषा ?

येणार येणार म्हणती उदया

कधी सूर्यराया येणार तो ?

तेजस्वी तयाच्या प्रकाशाचे कडे

कधी पूर्वेकडे दिसणार ?

कोटि कोटि आम्ही उभे अंधारात

कधी काळरात जाणार ही ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हिरीताचं देनं घेनं

नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं

हिरीताचं देनं घेनं नही पोटासाठीं

उभे शेतामधी पिकं

ऊन वारा खात खात

तरसती 'कव्हां जाऊं

देवा, भुकेल्या पोटांत'

पेटवा रे चुल्हा आता, मांडा थाटवाटी

नको लागूं सदा जीवा, मतलबापाठी

पाहीसनी रे लोकाचे

यवहार खोटे नाटे

तव्हां बोरी बाभयीच्या

आले आंगावर कांटे

राखोयीच्यासाठीं झाल्या शेताले कुपाटी

नको लागूं जीवा, आतां मतलबापाठी

किती भरला कनगा

भरल्यानं होतो रिता

हिरीताचं देनं घेनं

नहीं डाडोराकरतां

गेली देही निंघीसनी नांव रे शेवटीं

नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

परदेशातून प्रगट हो चंद्रा

परदेशातून प्रगट हो चंद्रा

तुझी हास्यमुद्रा दिसो आम्हा

अवचित मागे जाहलास गुप्त

करुनी स्तिमित सर्व जगा

अतिपूर्वेकडे तुझा हो उदय

पावली विस्मय पश्चिमा ही

स्वदेशाचे मुख कराया उज्ज्वळ

तारक-मंडळ निर्भिले तू

औषधिपते, दे दिव्य संजीवनी

करी रे जननी व्याधिमुक्त


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अरे कुलांगारा, करंटया कारटया,

अरे कुलांगारा, करंटया कारटया,

घातक कुलटा बुद्धि तुझी

जन्म दिला, केले लालन पालन

संस्कृति-शिक्षण दिले तुला

राहिली न तुला आईची ओळख

तुझे पापमुख पाहू नये

भोगिली अपार तिने कष्टदशा

आता तिच्या नाशा टपलास !

खांडोळी कराया उगारिशी हात

अरे तुझा घात ठरलेला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आपुलेच आहे आता कुरुक्षेत्र

एकदा तू मागे फुंकिलास शंख

फुंक तू निःशंक अनेकदा

प्रक्षोभक ध्वनि ऐकोत श्रवण

येऊ दे स्फुरण रोमरोमी

मोहनिद्रेतून झालास तू मुक्त

आता देवद्त्त फुंक पुन्हा

आचराया हवा तोच कर्मयोग

पारतंत्र्य-रोग हरावया

आपुलेच आहे आता कुरुक्षेत्र

आहे ’भगवंत’ पाठीराखा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

तोच का आज ये सोन्याचा दिवस ?

आज नवी काही येत अनुभूति

नवी येत स्फूर्ति गीत गाया

नवीन युगाची नवीन पहाट

आज नवी वाट दिसू लागे

आज झाल्या बेडया पायीच्या या खुल्या

चित्तवृत्ति खुल्या झाल्या माझ्या

अवनम्र शिर झालें हे उन्नत

नवीन हिंमत आज वाटे

तोच का आज ये सोन्याचा दिवस ?

नकळे हा भास किंवा सत्य !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जगातले समर्थ !

न कळे काय हे शांततेचा अर्थ

लाविती 'समर्थ' जगातले?

विश्वबंधुत्वाची करिती घोषणा

न कळे कल्पना काय त्यांची !

दुबळ्यांच्या माथा ठेवूनीया हस्त

म्हणती हे, 'स्वस्थ बसा आता!'

पिंजर्‍याचे दार करूनीया बंद

म्हणती हे, 'नांदा सौख्यभरे!'

बोलती, 'जगाचे कराया रक्षण

लढतो भीषण महायुद्ध!'


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात

समर्थांनो, असो तुमची शाबास !

तुमच्या शौर्यास जोड नाही

विजय-दिनाचा सोहळा साजरा

सावकाश करा आता तुही !

नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात

भकास, उधवस्त जगात या

जिंकिली भूमि ती केवळ स्मशान !

फुलवा खुशाल बागा तिथे

आणि द्या एकदा काळाला आव्हान,


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा

"आता थांबवीले आम्ही हत्याकाण्ड

उन्मत्तांचे बंड शमविले

दुबळ्या राष्ट्रांच्या वाराया आपदा

आम्ही परिषदा भरवीतो

शस्त्रास्त्रावरती घालुनी निर्बंध

करू प्रतिबंध अत्याचारा

समताशांतीची निर्मू लोकराज्ये

करू अविभाज्ये पृथ्वी स्वर्ग !"

दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा

रिकाम्या भांड्याचा नाद जैसा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हे फिरस्त्या काळा

सोडून काळा, ही सराई फिरस्त्या

धरशील रस्ता कोणता तू?

काल बाबिलोनी ठेविला मुक्काम

नंतर तू रोम गाठिलेस

आज मंदिरात साधु पॉलाचिया

विसावा घ्यावया थांबलास

एक तुझा पाय दिसे रिकिबीत

झाली इतक्यात हालचाल

जन्म झाला नाही अशा त्या स्थळास

जावया झालास उतावीळ


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

श्रीमती सौभाग्यवती – काशीबाई हेरलेकर यांस

तूं या दीन जना स्वबन्धुपदवी आर्यें ! कृपेने दिली,
तेणें बुद्धि कृतज्ञ ही तुजकडे आहे सदा ओढली;
भाऊबीज तशांत आज असतां, व्हावी न कां ती मला
वारंवार तुझी स्मृती, वितरिते आनन्द जी आगळा ?          १

जीं तूं पाठविलीं मला स्वलिखितें, मीं ठेविलीं सादर,
त्यांतें काढुनि होतसें फिरुनि मी तद्वाचनी तत्पर;
त्यांचा आशय तो प्रसन्न सहसा अभ्यन्तरीं पावतां,
होतो व्यापृत मी पुन: गहिंवरे-नेत्रांस ये आर्द्रता !             २

विद्वत्ता, सुकवित्व, गद्य रचनाचातुर्य, वाक्-कौशल;
चित्ताची समुदात्तता, रसिकता, सौजन्य तें दुर्मिळ,
ऐसे आढळती नरांतहि क्कचित् एकत्र जे सद्रुण,
त्यांही मण्डित पण्डिते सति ! तुला माझें असो वन्दन !    ३

माझ्या या हृदयांत तूजविषयीं सद्भाव जो वागतो,
तो अत्यादरयुक्त नम्र जन मी पायीं तुझ्या अर्पितो;
अंगीकारुनि गे स्वये ! समजुनी त्यालाच ओवाळणी;
ठेवीं लोभ सदा स्वबन्धुवरि या, नेच्छीं दुजें याहुनी.        ४


- नम्र बन्धु केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
फैजपूर,यमद्वितीया शके १८२५

संस्कृतीचा गर्व

विकट हासूनी काळ ओरडला,

"खुळ्यांनो, तुम्हाला भान नाही

हजारो हजार वर्षापाठीमागे

तुम्हा जावे लागे खुणेसाठी

कोण होता तुम्ही? पटली ओळख?

आता का रे सुख चुकविता?

हजारो हजार वर्षे लोटतील

प्राप्त ती होईल गती पुन्हा

नका वाहू व्यर्थ संस्कृतीचा गर्व

हारवीन सर्व क्षणमात्रे !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

असा तू प्रवासी विक्षिप्त रे !

मुख मागे पण पुढे तू चालशी

रीत तुझी अशी उफराटी

सरळ का तुझे पडते पाऊल !

तुझी वाटचाल नाही सुधी

तुझी कुरकुर पाउलागणिक

नेहमी साशंक मुद्रा तुझी

मागीलासंबंधी प्रशंसा अक्षयी

पुढीलांविषयी पूर्वग्रह

पुढे पुढे तरी चालत असशी

असा तू प्रवासी विक्षिप्त रे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

रामराज्य मागे कधी झाले नाही

रामराज्य मागे कधी झाले नाही

होणार पुढेही नाही कधी

केवळ ते होते गोड मनोराज्य

कल्पनेचे काव्य वाल्मीकिचे

कधीच नव्हती रावणाची लंका

अपकीर्ति-डंका व्यर्थ त्याचा !

दोन्ही अधिराज्ये होती मानवांची

नव्हती देवांची -दानवांची

भाविकांनो, झाली होती दिशाभूल

सोडूनी द्या खूळ आता तरी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आई मानवते

आई मानवते, आता तुझी काही

बघवत नाही विटंबना

आक्रोश तुझा गे ऐकवत नाही

बघवत नाही अश्रु तुझे

उन्मत्त जाहले शंभर कौरव

जाहले पांडव हतबुद्ध

द्रौपदीस छळी दुष्ट दुःशासन

मिळे त्या शासन प्राणांतिक

कोण कृष्ण तुझी राखावया लाज

अवतार आज घेणार गे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मानवाचा आला पहिला नंबर

पशूंचे एकदा भरे सम्मेलन

होते आमंत्रण मानवाला

"दुबळा, भेकड, क्षुद्र कोण प्राणी !"

करी हेटाळणी जो तो त्याची

"ऐका हो," बोलला अध्यक्ष केसरि

"जाहीर मी करी बक्षीस हे

क्रूर हिंसा-कर्मी उच्चाङक गाठील

पात्र तो होईल बक्षिसाला"

मानवाचा आला पहिला नंबर

लाजले इतर पशु हिंस्त्र !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जातीवर गेला मानव आपुल्या

अणुस्फोटकाचा नका मानू रोष

सारा आहे दोष मानवाचा

मानव म्हणजे एक पशुवंश

मुख्य तो विध्वंस-कर्म जाणे

अणुरेणूमध्ये वसे परब्रह्म

गेला वेदधर्म विसरुनी

मर्कटाच्या हाती दिधले कोलीत

सुटले लावीत आग जगा

जातीवर गेला मानव आपुल्या व्हायचा होऊ द्या नाश आता !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अभागिनी आई

का गे रडतेस आता धायधाय !

आणि हाय हाय म्हणतेस !

शेफारले पोर तुझे खोडकर

झाले अनावर आता तुला

नको म्हणताही कोठाराची किल्ली

त्याचे हाती दिली भोळेपणे

गुप्त तिथे होती संदूक ठेविली

अखेर लागली त्याचे हाती

अभागिनी आई, पुरा झाला घात

तुझ्या नशिबात दुःख आता !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

गोसाई

तठे बसला गोसाई

धुनी पेटयी शेतांत

करे 'बं बं भोलानाथ'

चिम्‌टा घीसन हातांत

मोठा गोसाइ यवगी

त्याच्या पाशीं रे इलम

राहे रानांत एकटा

बसे ओढत चिलम

अरे, गोसायाच्यापाशीं

जड्याबुट्या व्हत्या फार

देये लोकाले औसद

रोग पयी जाये पार

अशा औसदाच्यासाठीं

येती लोकाच्या झुंबडी

पन कोन्हाबी पासून

कधीं घेयेना कवडी

चार झाडाले बांधल्या

व्हत्या त्याच्या चार गाई

पेये गाईचज दूध

पोटामधीं दूज नहीं

एक व्हती रे ढवयी

एक व्हती रे कपीली

एक व्हती रे काबरी

आन एक व्हती लाली

सर्व्या गायीमधीं व्हती

गाय कपीली लाडकी

मोठ गुनी जनावर

देवगायीच्या सारकी

व्हती चरत बांदाले

खात गवत चालली

रोप कशाचं दिसलं

त्याले खायासाठीं गेली

रोप वडाचं दिसलं

भूत बोले त्याच्यांतून

'नींघ वढाय कुठली !

व्हय चालती आठून'

आला राग कपीलाले

मालकाच्याकडे गेली

शिंग हालवत पाहे

माटी उखरूं लागली

तिचा मालक गोसाई

सम्दं कांहीं उमजला

'कोन आज कपीलाले

टोचीसनी रे बोलला?'

तसा गेला बांधावर

रोप हाललं हाललं

त्याच्यातून तेच भूत

जसं बोललं बोललं

टाके गोसाई मंतर

भूत पयीसनी गेलं

तसं वडाच्या रोपाचं

तठी जैर्‍ही रोप झालं

आरे जहरी बोल्याची

अशी लागे त्याले आंच

रोप वाढलं वाढल

झाड झालं जहराचं

मोठ्ठ झाड जहाराचं

गोसायाच्या शेतामधीं

ढोरढाकर त्याखाले

फिरकती ना रे कधीं

काय झाडाचं या नांव ?

नहीं मालूम कोन्हाले

आरे कशाचं हे झाड

पुसा गोसाई बोवाले !


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

आरंभ उद्यान, शेवट स्मशान

आरंभ उद्यान, शेवट स्मशान

आमुचे जीवन असे आहे !

सुंदर, आनंदी निसर्ग स्वतंत्र

त्याला आम्ही यंत्र केले आहे

एकाच आईची बाळे आम्ही सारी

परी हाडवैरी झालो आहो

जे जे अकृत्रिम, करावे कृत्रिम-

आमुचे अंतिम ध्येय आहे

आदमईव्हाच्या वारसाकडून

अपेक्षा याहून दुजी काय !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या