पुष्पांचा गजरा

पुष्पांचा गजरा विशीर्ण मजला वाटेवरी आढळे

त्याची खिन्न विपन्न पाहुन दशा, त्याला करी घेतले

होता येत सुवास त्यास अजुनी, गेला जरी कोमुन

काले जाय निघून यौवन परी मागे उरे सद‌गुण

कोणाचा गजरा ? प्रमत्त तरुणी-वेणीतुनी हा पडे ?

किंवा होउन प्रेमभंग युवती याला झुगारुन दे ?

शृंगारास्तव भामिनीस गजरा आणी तिचा वल्लभ

त्याने काढुनि टाकिला निज करे, की होय हा निष्प्रभ !

आता मागिल सर्व वैभव तुझे स्थानच्युता ओसरे !

बाला कोण तुला धरुन हृदयी चुंबील हुंगील रे !

कृष्ण, स्निग्ध, सुगंधयुक्त विपुला त्या केशपाशावरी

डौलाने मिरवेन हासत, अशी आशा न आता धरी

घेई मानुनि तू तथापि गजर्‍या चित्ती समाधान हे

की एका कवितेत भूषित मला केले कवीने स्वये !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जकातीच्या नाक्याचे रहस्य !

"कोणिकडे जाशी स्वारा, दिसशी का घाईत ?"
"जकातिचे नाके आहे त्या आंबेराईत !"

बिजलीपरि चमकुन गेला ---घोडेस्वार
नवल अहो, हां हां म्हणता झाला नजरेपार !

जकातिचे नाके आहे त्या आंबेराईत
बहारास आली होती दो जीवांची प्रीत

ऐका तर गोष्टीला त्या झालि वर्षे वीस
स्वार अजुनि तेथे दिसतो अवकाळ्या रात्रीस

जकातिचे नाके जळके आज दिसे ओसाड
घोटाळुनि वारा घुमवी काय बरे पडसाद !

म्हातारा नाकेवाला मल्हारी शेलार
त्याची ती उपवर कन्या कल्याणी सुकुमार !

मोहिमेस निघता तेथे स्वार करी मुक्काम
कल्याणी झाली त्याच्या जीवाचे आराम !

मोहरली अंबेराई, सरता झाला माघ
बहारास आला त्यांच्या प्रीतीचा फुलबाग

"मनहरणी, शीतळ तुझिया स्वरुपाचा आल्हाद
अमृताचा धारा ढाळी जणु पुनवेचा चांद

आंब्याचा मोहर तैशी कांति तुझ्या देहास
जाईचे फूल तसा तव मंद सुगंधी श्वास

कल्याणी, पाहुनि तुजला फुलतो माझा प्राण
दे हाती हात तुझा तो, कर माझे कल्याण !

या आंबेराईची तु वनराणी सुकुमार
कल्याणी, सांग कधी ग तू माझी होणार ?"

"आणभाक वाहुनि कथिते, तुम्हि माझे सरदार
प्रीत तुम्हांवरिती जडली, तुम्हि भारी दिलदार

नाहि जरी बाबांच्या हे मर्जीला येणार
म्हणतातच, ’पेंढार्‍याची बाइल का होणार ?’

पंचकुळी देशमुखांचे तुमचे हो घरदार
नाहि परी बाबांच्या हे मर्जीला येणार !"

कोण बरे फेकित आला घोडा हा भरधाव ?
जकातिच्या नाक्यापुढले दचकुन गेले राव !

"चैतपुनव खंडोबाची, ऐका हो शेलार
ध्यानि धरा लुटुनी तुमची जकात मी नेणार"

आंब्याच्या खोडामध्ये घुसला तो खंजीर
बेलगाम निघुनी गेला---गेला तो हंबीर !

पुनव करी राईवरती चांदीची खैरात
जकातिच्या नाक्याकडली लख्ख उजळली वाट

सोंग जसे लळितामधले यावे उडवित राळ
धुरोळ्यात भडकुन उठला तो टेंभ्यांचा जाळ

ओरडला गढिवरला तो टेहेळ्या झुंझार
’सावध व्हा, पेंढार्‍यांचा आला हो सरदार !’

वाघापरि गर्जत आला, "येळकोट-मल्हार !
रामराम अमुचा घ्या हो मल्हारी शेलार !

पारखून घ्या तर आता हिरा आणखी काच ! "
आणि सुरु झाला नंग्या समशेरींचा नाच

"कल्याणी पेंढार्‍याची बाइल का होणार !"
काय असे डोळे फाडुनि बघता हो शेलार ?

"कल्याणी नेली’ एकच झाला हाहाकार
पाठलाग होऊन सुटले स्वारामागे स्वार

स्वाराच्या पाठित घुसला अवचित तो खंजीर
विव्हळला; परि नाही तो अडखळला खंबीर !

तसाच तो दौडत गेला विजयाच्या धुंदीत
तसाच तो दौडत गेला मृत्यूच्या खिंडीत

"जकात ही लुटिली ज्याने प्रीतीची बिनमोल
जीवाचे द्यावे लागे मोल," बोलला बोल

’कल्याणी जातो !’ सोडी शेवटला हुंकार
कोसळला घोडयावरुनी धरणीवरती स्वार !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

वेळ नदीच्या पुलावर

घटिकाभर मोटर पुलाजवळ थांबली
ती अजून घटिका स्मरणी मम राहिली

किति श्रावणसंध्या उन्हात पिवळ्या खुले !
गगनात पसरले मेघखंड रंगले

क्षितिजावर पडले इंद्रधनूचे कडे
चम्‌चमति तृणावर नीलपाचुचे खडे

सृष्टिचे रुप रमणीय दृष्टिला पडे
आनंद अहो, आनंद भरे चहुकडे !

नुकतीच जिची का बाल्यदशा संपली
चेहरा गोल, हनु जणू उजळ शिंपली !

कुणि थोर मराठा कुळातील कन्यका
ऐटीत पुलावर बसली नीलालका

निर्व्याजपणा मोकळा निसर्गातला
संपूर्ण तिच्या चेहर्‍यावरी बिंबला

ती प्रसन्नवदना लावण्याची कळी
भावंड धाकटे खेळवीत बैसली !

खालती नदीचे जळ वाहे खळखळा
वरि गुंगुनि तारायंत्र साथ दे जळा

सृष्टिचे सानुले भाट-अशी गोजिरी
पाखरे येउनी बसली तारेवरी

मनसोक्त लागली गाऊ ओतुन गळा
मोहरली त्यांची संगीताची कळा

का स्फूर्ति एवढी उचंबळे अंतरी ?
तर कोणाची ही सांगा जादूगिरी ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बालयक्ष

बोलतात बाई बालयक्ष याला
कुंजातुनि आला यक्षिणींच्या

विसरुन पंख इवले धवल
आला, हे नवल नाही काय ?

हासत, खेळत, बोबडे बोलत
आला हा डोलत सदनात

जाईच्या वेलीला आला का बहर
आंब्याला मोहर फुटला का ?

गाऊ का लागली पाखरे मंजुळ
वारे झुळझुळ वाहू लागे ?

अशी काही जादू घडली घरात
काय गोकुळात यशोदा मी ?

खोडकर तरी खोडया याच्या गोड
पुरविती कोड शेजारणी

मेळा भोवताली लहान्या बाळांचा
फुलपाखरांचा फुलाभोती

’एक होता राजा’ गोष्टी या सांगत
गंमत जंमत करीत हा !

नाजुक रेशमि धाग्यांनी आमुची
मने कायमची बांधणारा

काळजीचे काटे काढून आमुची
काळिजे फुलांची करणारा

खेळकर माझा लाडका वसंत
जीवाला उसंत नाही याच्या

झोप गुर्रकन लागे कशी तरी !
नाही जादूगिरी कळत ही

झोपेत गालाला पडतात खळ्या
कोण गुदगुल्या याला करी ?

पंख लावूनीया गेला का स्वप्नात
यक्षिणी-कुंजात उडून हा ?

तिथे यक्षिणींनी घेरला वाटत
मुके मटामट घेतात का ?

कल्पवल्लरीच्या फुलाला पाहून
बाळ खुदकन हसतो का ?

असा बालयक्ष माझा ग गुणाचा !
बाई न कुणाचा, माझाच हा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आजोळी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो

नाही बिकट घाट

सारी सपाट वाट

मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळवाणी हो

पाजी बैलांना ओहाळ पाणी हो

गळा खुळखूळ घुंगुरमाळा हो

गाई किल्‌बील विहंगमेळा हो

बाजरिच्या शेतात

करी सळसळ वात

कशा घुमवी आंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो

कोण लगबग धावून येई हो

गहिवरुन धरुन पोटी हो

माझे आजोबा चुंबन घेती हो

लेक एकूलती

नातु एकूलता

किति कौतूक कौतूक होई हो


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आजोबा

आजोळ माझे लहान गाव
’कळंब ’ आहे तयाचे नाव

नदी ’अश्विनी’, ’माणिक’ ओढा
गावशिवारा घातला वेढा

ओढयाच्या काठी मळा मामाचा
पडाळ छोटी,छोटी बगीचा

मायाळू भारी माझे आजोबा
म्हणती त्यांना सगळे ’बाबा !’

आंघोळ त्यांची भल्या सकाळी
गोपीचंदन लाविती भाळी

नारायणाला हात जोडिती
पूजा करिती, पोथी वाचिती

ऐन दुपारी आंब्याखालती
घोंगडीवरी अंग टाकिती

घायपाताचा वाक घेऊनी
दोर वळिती पीळ देऊनी

करडे पाटीखाली झाकिती
गुरा वासरा पाणी पाजती

शेण काढुनी झाडिती गोठा
स्वच्छ ठेविती अंगण , ओटा

तिन्ही सांजेला येत माघारी
गुरे दावणी बांधिती सारी

पाठीवरुनी मुक्या जीवांच्या
हात फिरतो प्रेमळ त्यांचा

पाहुणा कोणी येता दुरुनी
बोलती त्याशी तोंडभरुनी

गोष्टी सांगती देवाधर्माच्या
अभंग गाती तुकारामाचा

देवाचे नाव सदा तोंडात
झोप तयांना लागते शांत

आजोबा माझे भारीच गोड
त्यांच्या प्रेमाला नाहीच जोड !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

डराव डराव

डराव डराव ! डराव डराव !

का ओरडता उगाच राव ?

पत्ता तुमचा नव्हता काल

कोठुनि आला ? सांगा नाव

धो धो पाउस पडला फार

तुडुंब भरला पहा तलाव

सुरु जाहली अमुची नाव

आणिक तुमची डराव डराव !

बटबटीत डोळ्यांचे ध्यान

विचित्र तुमचे दिसते राव !

सांगा तुमच्या मनात काय ?

ही घ्या छत्री, ही घ्या नाव

जा गाठा जा अपुला गाव

आणि थांबवा डराव डराव !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मागणे

"हात तुजला जोडितो देवबाप्पा

सुखी माझ्या तू ठेव मायबापा

करी भाऊला परीक्षेत पास

त्यास नाही देणार कधी त्रास !

ताइ माझी किति शहाणी हुषार

तिला मिळु दे बाहुली छानदार

मित्र बाळू धरि अबोला रुसूनी

जुळव गट्टी रे आमुची फिरुनी

करी किरकिर तान्हुले पाळण्यात

काम आईला सुचेना घरात

उगे त्याला कार, लागु दे हसाया

फार होतिल उपकार देवराया !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बगळे

कुणिकडे चालले हे बगळे

रांगेत कसे उडती सगळे !

नदी वाहते संथ खालती

जळी ढगांच्या छाया हलती

तटी लव्हाळे डोलडोलती

वर कुणी उधळिली शुभ्र फुले ?

पाय जुळवुनी, पंख पसरुनी

कलकल कलकल करीत मधुनी

कुठे निघाले सगळे मिळुनी

पडवळापरी किति लांब गळे !

वाटे सुटली शाळा यांची

शर्यत सुटली की पळण्याची !

यात्रा भरली की पक्ष्यांची ?

तिकडेच चालले का ? न कळे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

माझी बहीण

मला आहे धाकटी बहिण नामी
नाव ’कमला’ ठेविले तिचे आम्ही

सदा हसते नी सदा खेळते ती
कधी रडते नी कधी हट्ट घे ती

बाळ माझी ही गुणी अन्‌ शहाणी
तुम्ही जर का देखाल न्याहळोनी

कौतुकाने बोलाल, ’ह्या मुलीला-----
कुठुनि इतुका हो पोक्तपणा आला !’

तशी आहे ती द्वाड अन्‌ खठयाळ
तुम्हा भंडावुन नकोसे करील

आणि तुम्ही बोलाल, ’अशी बाई,
मूल हट्टी पाहिली कधी नाही !’

सुटी माझ्या शाळेस जो न होते
तोच माझे मन घरा ओढ घेते

धरुनि पोटाशी बाळ सोनुलीचे
मुके केव्हा घेईन साखरेचे !

अशी वेल्हाळ लाडकी गुणाची
नाहि आवडती व्हायची कुणाची ?

झैत्रिणींनो, कधि घरा याल माझ्या
तुम्हांला मी दावीन तिच्या मौजा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बाजार

बाजार आज गावचा पहा वाहतो

खिडकीत उभा राहुनी मौज पाहतो

हा गाडयांनी गजबजला गाडीतळ

किति गडबड, गर्दी, गोंगाट नि गोंधळ !

बाजारकर्‍यांची रहदारी ही सुरु---

जाहली, चालती पहा कसे तुरुतुरु !

ध्वनि खुळखुळ घुंगुरमाळांचा मंजुळ

जणु मला वाहतो, करितो मन व्याकुळ

ही शेतकर्‍यांची मुले शिवारातली

घालीत शीळ, मारीत उडया चालली

उगवेल सणाचा दिवस उद्या पाडवा

पैरणी नव्या, पोषाख हवा नवनवा

काकडया लांब, गरगरित गोल टरबुजे

गुळभेली, साखरपेटि, गोड खरबुजे-----

आणिती गाढवे पाठीवर वाहुनी

कशि दुडक्या चाली येती गिरणेहुनी !

जरि सावलीत मी, तहान किति लागली

खायला कलिंगड-खाप लाल चांगली !

मन गेले गेले वार्‍यावर वाहुनी

मज बाजाराला जाऊ द्या हो कुणी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मेघांनी वेढलेला सायंतारा

चम्‌चमणारा । घनवेष्टित बघ हा तारा

तारा-जननी संध्या रमणी

तरणी-विरहे रडे स्फुंदुनी

आरक्त छटा उमटे वदनी

बघुनि वेल्हाळा । गहिवरुनि वदे या बोला

"बाळ सोनुले उघडे पडले

कोण अता मायेचे उरले ?

किति दिसताहे मुख हिरमुसलें !

भिउ नको बाल । मी करिन तुझा सांभाळ

पुत्र कुणाचा ? दावित सकला

मोहक हा तव वदनतजेला

एक एक गुण जणू तिकडला

साठला वदनी । वाटते लाडक्या बघुनी

तळपत होते जोवर गगनी

मुठीत होती सग्ळी अवनी

खळ दिपले स्वारीस पाहुनी

कुणाची छाती । आपणा छळाया नव्हती

तेच पहा त्यांच्या माघारी

अनाथ अबला मला पाहुनी

बालवय तुझे हे ओळखुनी

चोहिबाजूंनी । भिवविती नीच घेरोनी

मेघखळांची कृष्ण साउली

बाळा, तुझिया भवती पडली

दिव्य वपू तव झाकिल सगळी

परि तुझें तेज । आणिते तयांना लाज

धैर्य न होई स्पर्श कराया

दचकुन बघते बघ घनछाया

’अवचित येइल की रविराया’

दरारा हाही । तव रक्षण करितो, पाही

घनमण्डल काळासम भासे

त्यात धैर्य जणु तुझे प्रकाशे

वीरकुळाला हे साजेसे

भिउ नको बाळ । मम अंकी नीज खुशाल !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मानवीं तृष्णा

हा आकाश-विकास मूर्त गमतो उत्कर्ष नेत्रोत्सव

तारा-पुञ्ज, दिवाकर, ग्रह, शशी त्याचे असे वैभव

ते आम्ही बसतो पहात हृदयी होऊनिया विस्मित

तारामण्डल व्योमभूषण कसे व्हावे परी अंकित !

काढी मानव कष्ट सोसुन हिरे का खोल खांणीतुन

मोती आणिक सागरातुन, मला त्याचे कळे कारण !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बहरलेला आकाश-लिंब !

"पर्णश्रुती तरुवरा, तव लक्षसंख्य

हे डोलती धवल डूल तयीं सुरेख !

नक्षत्रपुञ्ज नयनोत्सव अंबराचे

की लोल हे झुलति लोलक झुंबराचे !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

विचारविहग

हृदयस्थानी येउ लागती थवे विचारांचे

दुरुन त्या माहेर वाटले केवळ शांतीचे !

एक एक मारुन चालला चंचु परी परता

विचारविहगा येइ एवढी कोठुनि चंचलता !

काकुळती येऊन फोडिली हाक पाखरांनो

’यारे या, गाउ द्या तुम्हांवर गीत गोजिर्‍यांनो !’

परंतु नव्हते हृदयच जेथे स्थिरतेचे धाम

स्वैर विचारां कसा मिळावा तेथे आराम

जीवनमार्गावरुन संतत भ्रमण असे यांचें

हृदयाच्या छायेत बसाया मन यांचे नाचे !

भविष्यवादी दूत जणू सैराट हिंडतात

या दूतांच्या संदेशाने काव्यें होतात


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

भटक्या कवी !

मी उदास होउनि सहज मनाशी म्हणे
’ये मुशाफिराचे का हे नशिबी जिणें ?

घरदार सोडुनी प्रिया, लाडकी मुले
हिंडतो खुळा मी, काय मला लाभले ?’

किति विचार आले गेले हृदयांतरी
पाखरे जशी चिंवचिंवती वृक्षावरी

विमनस्क होउनी चढलो मी टेकडी
सोडुनी श्वास चहुकडे दृष्टि फेकली

पश्चिमेस दिसला भटकत गेला रवी
ती म्लान मुखश्री मन माझे मोहवी

पाहिला नभी मी मेघखंड हिंडता
खग दिसला गिरक्या घेत तिथे एकटा !

ये वाहत सरिता डोंगररानातुनी
बागडता दिसली निर्झरबाळे गुणी

हा वायु विचरतो भुवनी वेडापिसा
परि तर्‍हेतर्‍हेचे सूर काढितो कसा !

ग्रहमाला करिते भ्रमण रवीभोवती
संगीत गूढ निर्मिते तयांची गती

सगळेच विश्व हे दिसे प्रवासी मला
खुललेली दिसते तरीच त्याची कळा !

जाहले हिमाचे प्रळय, आर्यपूर्वज
ध्रुव सोडुन भटकत फिरले, स्मरले मज

या देवभूमिचा लाभ त्यास जाहला
गाइले वेद ते ठावे तुजला मला

ख्रिस्तादि महात्मे नसते जर भटकले
पाजळते का जगि धर्मदीप आपले !

ते जगत्प्रवासी गल्बत हाकारुनी
भटकले, जाहले नव्या जगाचे धनी

ते आङ्‌ग्लकवी ज्या म्हणत ’सरोवर-कवि’
गाइली तयांनी निसर्गगीते नवी

तो अमेरिकेचा भटक्या कवि ’डेव्हिस’
का त्याची कविता भुलवी मम मानस ?

मग मीच कशाला विशाद मानू तरी
भटकेन जगावर असाच जिप्सीपरी !

हातात शिदोरी, खिशात कविता-वही
जाहलो प्रवासी पहावया ही मही

त्या क्षितिजाजवळिल निळ्या टेकडयांकडे
ही वाट जात घेऊन वळण वाकडे

तिकडेच निघालो वाजवीत पावरी
या अद्‌भुततेची काय कथू माधुरी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

वेताळ

"स्मशानवासी मी आहे भूतपाळ वेताळ
वर्ण असे माझा काळा, मन माझे बेताल !

कडकडते बिजली तैसे माझे हास्य कराल
खदिरांगारासम डोळे जळजळ करिती लाल !

कैलासेश्वर सांबाचा आहे गण मी ख्यात
समंध भूत पिशाच्चांचा राजा मज म्हणतात

उत्तररात्रीं तरुछाया लंबमान दिसतात
देह दिसे माझा तैसा-धड माझे गगनात !

भीषणता जेथे अपुला गाजविते अधिकार
संचरतो तेथे माझा देह भैरवाकार

थोर थोर वटवृक्षांच्या थंडगार छायांत
धरुन पारंब्यांना मी झोके घेतो शांत !

विहीर शेतातिल किंवा परसामधला आड
घुमून त्यात कधी देतो पारव्यांस पडसाद

दबा धरुनी रात्रीचा बसतो मी वेशीत
चुकार कोणी जो भटके त्यास करी भयभीत !

चिलीम विझवुनि पेंगाया लागे चौकीदार
खडा पहारा जागवितो त्याचा घेउनि भार

ललकारी देउनिया मी गस्त घालितो गस्त !
वेसरकराची ऐकुनि ती छाती होई धस्स !

सातिआसरा, बहिरोबा, म्हसोबाहि महशूर
जेथ तिव्हाठयावर बसती फासुनिया शेंदूर

फेरी करुनी मी येतो रात्रीचा तेथून
विकट हास्य करितो त्यांच्या मौजा मी पाहून !

लोक उतारे तिन्हिसांजा ठेवितात उतरुन
पाळत ठेवुनि त्यांवर मी नेतो ते चोरुन

डोकावुनि काळया डोही पाडी मी प्रतिबिंब
घामाने होउनि जाई भ्याडाची तनु चिंब

रानपठारावर केव्हा जाउनि मांडी ठाण
शीळ फुंकुनी घुमवितो आसपासचे रान

भूते मग होती गोळा तेथे चोहिकडून
हसती बागडती माझ्या भवती फेर धरुन !

गावशिवेवरती आहे वटवृक्षांचा पार
अवसेच्या रात्रीं अमुचा होत तिथे संचार

डमरुच्या तालावरती तांडव करितो सांब
आणि घालितो आम्हीही धुमाकूळ बेफाम

नाचत तालावर आम्ही येतो उडवित राळ
लोळ विजेचा उठे तसा भडकुन त्याचा जाळ

उजेडात दिसती अमुचे चेहरे भेसूर
बघेल जो त्याचे व्हावे हृदय भयाने चूर

पाजळुनी केव्हा माझे भाईबंद हिलाल
जलसा करिती गाऊनी कर्कश अन्‌ बेताल

कभिन्न काळोखात अशा भीषण देखाव्यास
बघेल जो कोणी त्याला मूर्च्छा येइल खास !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नांगर

जग सगळे बनले रणकुण्डच भीषण
पातला काय प्रळयाचा निकट क्षण !

लक्षावधि पडती जीवांच्या आहुती
नररुधिराच्या खळखळा नद्या वाहती !

मानवते, का तू बडवुनि घेशी उर ?
उलटले तुझ्यावर तुझेच भस्मासुर

जी दिलीस भौतिक शास्त्रांची खेळणी
त्यांचिया करी, ती शस्त्रे झाली रणी !

संहार होत जो आज पुरा होउद्या
शांतीची किरणे दिसणारच ती उद्या

परतंत्र भारता, शस्त्रहीन तू पण
तव कवण महात्मा करील संरक्षण ?

भडकली आग कुणिकडे ! तयाची धग----
लागून इथे करि जीव कसा तगमग !

भाजला भयानक कोलाहल अंतरी
मी दूर दूर भटकलो पिसाटापरी !

शेवटी गाठिली घारकडयाची दरी
विमनस्क बैसलो एका दरडीवरी

संध्येची होती सौम्य उन्हे पांगली
अन् घारकडयाची दीर्घ पडे साउली

त्या सावलीत लाकडी जुना नांगर
कुणि हाकित होता बळिराजा हलधर

खांद्यावर आसुड, हालवीत खुळखुळा
घालीत तास तो सावकाश चालला

फोडीत ढेकळे फाळ जसा तो फिरे
बैलांच्या नावे गीत तयाचे स्फुरे

त्या श्रमिगीतातिल आशय का समजला ?
’पिकवीनच येथे मी मोत्यांचा मळा !’

तुम्हि याला भोळा खुळा अडाणी म्हणा
तुम्हि हसा बघुनि या दरिद्रनारायणा !

बळराम आणि बळिराजा यांच्या पुन्हा
मज याचे ठायी दिसल्या काही खुणा

हा स्वयंतुष्ट करि जगताचे पोषण
होऊन ’हलायुध’ करितो पण रक्षण

जरि भोळा, याच्या औदार्याची सरी
येणार न कोणा कुबेरासही परी

जाहला कशाचा गर्व तरी आपण ?
की ओळखल्या सृष्टीच्या खाणाखुणा ?

सृष्टीची कोडी सोडविता शेवटी
छांदिष्ट बंधुंनो, भ्रमिष्ट झाली मती

त्या भयासुराची दावुनि कारागिरी
तुम्हि मानवतेची फसगत केली खरी !

किति तुम्हांस कुरवाळुनी लाविला लळा
पण आपण भाऊ कापू सजलो गळा

एकान्त शांत शेतात पहा हलधर
हा ध्येयनिष्ठ हाकितो कसा नांगर !

हा दिसे दरिद्री, चिंध्या अंगावरी
गरिबांस घालितो खाऊ पण भाकरी

गंभीर, धीर हा स्थितप्रज्ञ का ऋषी !
मानिलें ध्येय, कर्तव्य एक की ’कृषि’

घारीपरि घाली विमान घिरटया वर
ये ऐकू याला त्याची नच घरघर !

ते बाँम्ब घटोत्कचनाशक शक्तीसम
पण स्फोट व्हावया ठरले ते अक्षम

रणगाडयांचा ये ऐकू नच गोंधळ
घनगर्ज गर्जती तोफा-हा निश्चळ !

त्या रणनौका, ते छत्रीधर सैनिक
ते पाणतीर, काही न तया ठाउक

या संहाराचा प्रेरक अग्रेसर
त्या माहित नाही कोण असे हिटलर !

क्रांतीची त्याने कदर न केली कधी
काळासहि त्याने जुमानले नच कधी

ही युद्धे म्हणजे घटकेची वादळे
का नांगर याचा थांबणार त्यामुळे !

लोटली युगे किति, तो ग थांबला कधी
येतील युगे किति, थांबेल न तो कधी

होतील नष्ट शस्त्रास्त्रे केव्हातरी
हा अखंड, अक्षय, अभंग नांगर परी !

जो जगन्नियंता विश्वंभर ईश्वर
धनधान्ये करितो समृद्ध जग सुंदर

हे पवित्र त्याचे प्रतीक हा ’नांगर’
वंदितो त्यास जो बळिराजा हलधर !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

भा. रा. तांबे


खोकली माय

हिवायाचं थंड वारं

बोरी पिकल्या रानांत

आली जयगावामधीं

आली खोकल्याची सात

रस्त्यांवर वावरांत

लोक खोकल्यांत येडे

घरोघरीं खोकलंनं

जसे वाजती चौघडे

अरे, घेतले औसदं

नही राहे कुठें बाकी

तरी जायेना खोकला

सर्वे वैद्य गेले थकी

सर्वे वैद्य गेले थकी

आतां जावा कुठें तरी?

करे मनांत इचार

कोनी गांवाचा कैवारी अरे, गांवाचा कैवारी

होता मोठा हिकमती

मेहेरूनच्या रस्त्यानं

जात व्हता कुठे शेतीं

"कसा आला रे खोकला

म्हने आवंदाच्या सालीं"

गांवच्याच शिववर

कोन्ही म्हातारी भेटली

तशी म्हातारी बोलली

"कांहीं धर्म वाढ बापा

इडापीडा या गांवाची

व्हई जाईन रे सपा"

तव्हां गांवचा कैवारी

काय बोले म्हातारीले

"माझ्या गांवचा खोकला

सर्वा दान केला तुले."

ऐकीसनी म्हतारी बी

तव्हां पडे भरमांत

म्हने 'घेनंच पडीन

दान आलं जें कर्मात !'

मंग घेतला खोकला

सर्व गांव झाडीसनी

आन् बसे खोकलत

सदा गया खल्ळीसनी

गेला गेला सर्व निंघी

गांवामधला खोकला

अशा खोकल्याचा वांटा

म्हतारीनं उचलला

खोकला निंघीजायासाठीं

ध्रती म्हतारीचे पाय

हात जोडती रे लोक

खोक्ली माय खोक्ली माय

मेहेरूनच्या वाटेनं

जरा वयव रे पाय

तुले दिशीन रस्त्याले

तठे आतां खोक्ली माय


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

इंफाळ

"इंफाळ-जंगलातल्या चिमुकल्या फुला,

मोकळे करुनि सांगतो मनोगत तुला

एकलेपणा मज असह्य हा जाहला

तू विरंगुळा एकल्या जिवाला मला !

मी जखमी होउन खंदकात या पडे

मज टाकुनि गेले बांधव मम कुणिकडे ?

चहुबाजू धूसर दिसति नागटेकडया

उद्‌ध्वस्त त्यांमधे नागांच्या झोपडया

ओतितो आग तोफांचा भडिमार हा

की प्रलयंकर भूकंप होत हा महा !

सर गोळ्यांचे सोडिती यंत्रबंदुका

कित्येक चाटुनी जाती या खंदका

चढउतार भारी, किर्र रान भोवती

बेधडक त्यातुनी रणगाडे धावती

हे वनदेवीच्या मुला, नवल हे पण

या वणव्यातुन वाचलो कसे आपण ?

घरदार सोडुनी लष्करची चाकरी

का धरिली, ते तुज कसे सांगु मी तरी ?

मी कृष्णा-खोर्‍यातला मराठा गडी

या ब्रह्मी आघाडीत घेतली उडी

बोलोत शिपाई भाडोत्री मज कुणी

लढतोच तरी तळहाती शिर घेउनी

हा कुणी कुणास्तव जिंकायाचा लढा

मज याचा अजुनी झाला नच उलगडा !

इंफाळ दिशेचा सर्द वात वाहतो

कुजबुजुनी कानी काय मला सांगतो ?

रणघोष ’चलो दिल्ली’ चा हा ऐक रे !

’जयहिंद !’ हाक तव बंधूंची ऐक रे !

ते शत्रु नाहित---हिंदपुत्र फाकडे

ते सज्ज जाहले जाया दिल्लीकडे !

स्वातंत्र्यरवीला द्यायाला अर्ध्य हे

रक्ताला आहे बोलावित रक्त हे !

इंफाळ दिशेचा वारा हे हृद्गत--

सांगून म्हणे, ’ये, तुझे असो स्वागत !’

ही हाक कुणाची ? मातेची हाक ही !

ऐकून संचरे मनी चेतना नवी

घायाळ पाखरु तडफड तडफड करी

पण येत उडाया नाही त्या अंबरी !

असहाय तसा रे झालो मी सर्वथा

ही सांगु कुणा मी मनची माझ्या व्यथा !

सह्याद्री माझा माहित नाही तुला

नसशील ओळखत रानजाइच्या फुला

तुज पाहुनि होते त्यांची मधुर स्मृती

रे हास हास ! तव कौतुक करु मी किती !

जखमेतुनि गेले गळुनि रक्त घळघळा

रे थकलो मी, नच अधिक बोलवे मला

ती येइल गाडी ’अँम्ब्युलन्स’ अवचित !

मज घेउन जाइल, होइल ताटातुट !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

गस्तवाल्याचा मुलगा

चांदने फिकटले, तिनकांडे मावळले

तरि पाय आमुचे घरास नव्हते वळले

लागल्या व्हावया लांब लांब तरुछाया

जणु काय पसरिती भुताटकीची माया !

क्षितीजावर नव्हती अजुनि ’चांदणी’ आली

पक्ष्यांची किलबिल सुरुहि नव्हती झाली

अद्याप जगाची निद्रा नव्हती सुटली

परि झोप अम्हांला निशाचरांना कुठली !

चावडीपुढे रंगात तमाशा आला

करि बहार शाहिर होनाजीचा चेला

लावण्या, गौळणी ऐकुनि मानस रिझले

घटकाभर अमुचे स्मरण घराचे बुजले

’धनि रामपारबी व्हाया नव्हं का आला !

तांबडं फुटल, ’ धर्माजी बोलुनि उठला

मग बोलत बोलत घरा परतलो आम्ही

परि कान ऐकती ललकार्‍या त्या नामी !

अंगणात छाया दिसे घराची पडली

जणु त्यावर त्याची माया-पाखर जडली

त्यातून प्रगटली एक चिमुकली मूर्ती

हळुहलू यावया लागे पुढती पुढती

थरकले हृदय, थबकले आमुचे पाय

हा भुताटकीचा चमत्कार की काय !

धर्माजी बोले, ’घ्या देवाचे नाव

भेटेल तो जर का त्यावर अपुला भाव !

डावलू नका जी, बघा तरी न्याहळुनी

सांगुन का होते कधि देवाची करणी !’

तो ’बा-बा-बा-बा !’अशी बोबडी वाणी

ती बाळमूर्ति मग बोले मंजुळवाणी

आश्चर्य-भीति-हर्षाचे-वादळ उठले

क्षणभरच मनी, मग संशय सारे फिटले

धावलो पुढे, ओरडलो, ’माझ्या बाळा !’

पोटाशी धरुनी घट्ट, चुंबिले त्याला

’तू’ बालक होउनि देवा, देशी भेटी

इतुके का आहे पुण्य आमुच्या गाठी !’

धर्माजी दुरुनी पडला त्याच्या पाया

गहिवरुनी हृदयी लागे नेत्र पुसाया

तो सताड उघडे दिसे घराचे दार

माउलीस होती झोप लागली गाढ !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

रानफुले

मन फुले हर्षुनी रानफुले पाहुनी

सृष्टिची मुले साजिरी गोजिरी गुणी !

शिकविले यांस हो गोड हसाया कुणी ?

मिळविले सुखाचे निधान हे कोठुनी ?

ही इथे डोलती पिवळी ’तरवड फुले’

निष्पर्ण ’किरळ’ शेंदरी फुलांनी खुले

भुइवरी उमलली शुभ्र ’कळइची ’ फुले

कुणि यक्षिणिने का मोती हे विखुरले !

डोकावति मधुनी चंद्रापरि ’चांदिल’

तर कुठे झळकती झेंडूंचे मंदिल !

शोभती किती जांभळी निळी ’रुइफुले’

की सृष्टिसतीच्या कानांतिल चौफुले !

तृणफुले उमलली ठायि ठायि चिमुकली

नावेही त्यांची अवगत नसती मुळी

क्षण फुलून क्षणभर दुसर्‍यांना फुलविणे

का यास्तव यांचे क्षणभंगुर हे जिणे !

"रमतात यक्षिणी का तुमच्या संगती !

ही फुलपाखरे तुमच्याशिच रंगती

किति सृष्टीची करमणूक करता तुम्ही

चर्येवर तुमच्या गोड हसू नेहमी !

भावंड एक मी दुःखी कष्टी, मला

हसवून एकदा फुलवा जीवनकळा !

सहवास सुखाचा तुमचा मज लाभला

तर फुलून गाणे गाइल माझा गळा !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

सोनावळीची फुले

मी हिंडत होतो स्वैरपणे एकदा

गगनात विहरतो मेघ जसा एकटा

तो एकाएकी रानी दिसला मला

तो पिवळा पिवळा सोनावळिचा दळा

ओढयाच्या काठी तिच्या फुलांचे थवे

किती डोलत होते मंजुळ वार्‍यासवे !

सुरतरंगिणीपट चमचम करितो निशी

मज शोभा दिसली सोनावळिची तशी

हलवीत आपुली शिरे गुंग नर्तनी

पाहिली फुले लक्षावधि एक्या क्षणी

त्या खळखळ लाटा नाचत होत्या जळी

मज ’सळसळ’ यांची गोड अधिक वाटली

परिवार बघुनि हा आनंदी भोवती

मम कविच्या हृदयी हर्षा नुरली मिती

मी सूक्ष्म विचारी गढलो, नकळे परी

कोणती साठली दौलत मम अंतरी !

विमनस्कपणे वा शूनय मने कैकदा

आरामखुर्चिवरि उगीच बसतो,तदा-

नाचती फुले ती अंतर्दृष्टीपुढे

एकांतपणाचे श्रेय अहा केवढे !

तेधवा हृदय मम हर्षे ओथंबते

अन् सोनावळिच्या फुलांसवे नाचते !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

प्रचीति

इथून पश्चिमेकडे भरारि घे मनोविहंग

तिथेच दंग होत तो, नका करु समाधि-भंग !

म्हणाल दृश्य कोणते

तयास भूल पाडिते

समोर पाहिलेत का विशाल विश्व नीलरंग !

अथांग सिंधु होत हा निळया नभात एकरुप

परेश याच दर्पणी बघे स्वरुप विश्वरुप

विलीन जीव हो शिवात

उमा जशी सदाशिवात

अशी प्रचीति येउनी अमूप ये मना हुरुप

लुटून घेति लोचने प्रसन्न नीलिमा प्रशांत

गमे शरीर न्हाउनी बने तजेल नीलकान्त !

किती पहा पुढे पुढे

किती पहा पलीकडे

असीम जे, अगाध जे, कुठून ते असेल सान्त ?

मऊ नि आर्द्र सैकती उभा न मीच दीर्घकाल

उभ्या सदाच नारळी, सदा उभेच उंच ताल !

बुडी हळूच घे जळी

कसा रवी, कसा शशी !

सहर्ष हे न्यहाळिती अशी सुरम्य हालचाल !

जिथे नभात मीनला समुद्र त्या कडेवरुन

धरुन ओळ चालली सलील तारचे दुरुन !

सरोवरात राजहंस

सफेत हालवून पंख

मजेत पोहती जणू, हरेचि भान हे बघून !

कुठून चालली कुठे ? मनास होत गूढ भास

त्यजून या जगा सुरु नव्या जगाकडे प्रवास

बघा शिडेच पांढरी

अदृश्य नाखवे परी

बसून तारवात त्या अधीर मी फिरावयास !

अलीकडील बंदरा कशास खुंटवून नाव

मुशाफिरा विरामसी, तुझे पलीकडेच गाव

हळू हळू पुढे पुढे

तुझेहि तारु जाउ दे

अनंत नीलिमेत त्या कधीतरी मिळेल ठाव !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

ते आम्ही---!

फुलबाग फुलवितो-ते आम्ही फुलमाळी

गोकुळा भुलवितो-ते आम्ही वनमाळी

स्वर्चाप निर्मितो-ते आम्ही भिंगारी

रंगवितो क्षितिजे-ते आम्ही रंगारी

तार्‍यास उजळितो परेश ज्या जादूने

वार्‍यास घालितो फुंकर ज्या जादूने

ती जादू अमुच्या भरली अंतःकरणी

ती घडवी अमुच्या करवी अद्‌भुत करणी

बीजांना आम्ही वृक्षरुप देणारे

कलिकांना आम्ही पुष्परुप देणारे

बालांना आम्ही नारायण करणारे

ते शिक्षक आम्ही धन्य जगी ठरणारे

देतात अम्हांला देव दिव्य निज अंश

उद्धरितो आम्ही अवघा मानव-वंश !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

दूर दूर कोठे दूर

दूर दूर कोठे दूर

मंजुळ मंजुळ चाले सूर

नकळे का ये भरुन ऊर

नयनी चाले अश्रूपूर !

निळ्या क्षितिजी टेकडया निळ्या

कोणत्या स्वप्नी पेंगती खुळ्या

त्याच सुरांनी भारल्या गेल्या

भानावर ना अजून आल्या

गूढ गूढ भारी गूढ

बावरले मन, झाले मूढ

कोण करी तर हे गारुड !

कुण्या जन्मिचा उगवी सूड !

अज्ञात कोणी अद्‌भुत कोणी

वाजवी पावा जादूची राणी

निळ्या क्षितिजी रांगती छाया

त्याच सुरांनी भारल्या गेल्या

भूल भूल अवघी भूल

न कळे कोणाची चाहूल !

त्याच दिशेला हे पाऊल

चालू लागे हलकेफूल !

अंधार मागे अंधार पुढे

चाललो आहो आम्ही बापुडे

भेटो न भेटो जादूची राणी

ऐकत चालू अद्‌भुत गाणी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हे स्वतंत्र भारता

आज घरा परतुनि ये देवता स्वतंत्रता

हाच खरा पाडवा तुझा स्वतंत्र भारता

हा अशोकचक्रांकित

राष्ट्राचा ध्वज पवित्र

फडकत डौले नभात

हृदय ये उचंबळून हर्षभरे पाहता

ध्येयास्तव जे लढले

राष्ट्रवीर आत्मबले

प्राण तुला अर्पियले

थोर हुतात्म्यांचे करि स्मरण ही कृतज्ञता

नौरोजी, टिळक, दास

लाल, जवाहर, सुभाष

तप यांचे ये फळास

राष्ट्रपिता गांधींची होत ध्येय--पूर्तता

आज तुझे शिर उन्नत

आज तुझे भाग्य उदित

आज तुझे हृदय मुदित

घोष ’जयहिन्द’ करुं सतत, हीच धन्यता !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

गुरुवर्य बाबूरावजी जगताप यांस अभिवादन

प्रांजळ भावे तुमच्या चरणी अर्पित हे अरविंद,

करितो मी सानंद तुम्हांला अभिवादन ’जयहिंद !’

खडकावरती करुनि मशागत तुम्ही फुलविला बाग

अपूर्व तुमची सेवा, गुरुजी अपूर्व स्वार्थत्याग

तुम्ही उधळिली चैतन्याची किरणे, जाती दूर

आणि उजळिला शिवरायाचा महाराष्ट्र महशूर

पवित्र तुमच्या तपे निर्मिले हे शिक्षणमंदीर

शिवरायाचे नाव ठेवुनी तुम्ही राखिले ब्रीद

वसिष्ठ-सांदीपनीसारखे ’शिक्षक’ आपण थोर

कितीक छोटे तुम्ही शिकविले राघव, नंदकिशोर

तेजस्वी शुक्रासम तुमचे प्रसन्ना जीवन गोड

सुगंध देते अखंड झिजुनी जीवन-चंदन-खोड

शिक्षण-क्षेत्री आघाडीवर सज्ज सदा राहून

समाज जागृत करण्या झटला उदंड कष्ट करुन

पूर्ण साठ पानांचा लिहिला ग्रंथ तुम्ही यशवंत

शतपत्रांचे सुवर्ण-लेखन पूर्ण करो भगवंत

फिटेल न कधी ऋण तुमचे जरि लक्ष अर्पिले होन

करुन घ्यावा गोड आमुचा हा बोरांचा द्रोण !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे !

अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे,

करी प्रेमभावे तुम्हा वंदने

तुम्हांला पुन्हा भेटुनी जीव धाला

मनी पौर्णिमेचे पडे चांदणे

मला अर्पिला शुद्ध सौहार्द ठेवा

अहो, धन्य मी भाग्यशाली खरा !

वृथा दूर सोडून गेलो तुम्हांला

करावी क्षमा दीन या पाखरा

तुम्ही लाविला वृक्ष जोपासिला तो,

किती भव्य आता दिसू लागला

इथे अश्रया पातले बाळपक्षी

फुटू लागला गोड त्यांना गळा

अशा भव्य वृक्षी कुणी एक पक्षी

बसे येउनी दूर देशाहुनी

पुरा रंगुनी जाय मेळयामधे या

कला आपली दाखवी गायनी

कुठे देश त्याचा, कुठे दूर कोठे

कुठे राहिले दूर मातापिता !

लळा लाविला, कोडकौतुक केले

सदा राहिला दक्ष त्याच्या हिता

तयाचे इथे अल्प वास्तव्य झाले

मधु स्वप्न गेले क्षणी भंगुनी

पिसारा उभारुन गेला उडूनी,

तया मारिली हाक सांगा कुणी ?

तुम्ही थोर आचार्य बंधूच माझे

अहो, तूमच्या काय वानू गुणा !

तुम्ही गाळिला घाम, उद्योग केला,

मला अर्पिला मात्र मोठेपणा

अहो, छात्र झाला तुम्ही शिक्षकांनो,

शिकाया नवाध्यापनाची कला

तुम्हा आमुच्यापासुनी ध्येय-दीक्षा

मिळाली, किती स्फूर्ति सांगा मला ?

अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे,

तुम्ही लीन शालीन साधेसुधे

जरीला मऊ शुभ्र कापूस तैसा

ऋजू भाव शोभे स्वभावामधे

जणू साखरी मेहरुणीच बोरे

अशी माधुरी भाषणी आर्जवी !

मनाचे तुम्ही मोकळे, संपदा ही

गुणांची, कुबेरासही लाजवी

तुम्ही सर्व पाटील द्यायास आला

’मराठा समाजास’ संजीवनी

जयांनी जुना हाकिला गावगाडा

असे गावचे थोर राजे गुणी !

समाजा, तुझे संपले दैन्य आता

धुरा वाहती सूज्ञ पाटील की

नवा काळ येणार, व्हा शक्तिशाली

नवी चालवायास पाटीलकी

जये स्थापिले हिंदवी राष्ट्र शौर्य

महाराष्ट्रधर्मा जये प्रेरिले

जिजाबाइचा पुत्र तान्हा शिवाजी

तयाचे अम्ही सौंगडी मावळे

महाराष्ट्र त्याचा सुविख्यात, आहो

मराठे अम्ही राज्यकर्ते खरे

नव्या भाग्यकाळामधे भारताच्या

पुढे चालवू आपुले मोहरे

जिथे जन्म झाला शिवाजीप्रभूचा

शिवनेरिच्या त्या शिवारातला

कवि स्फूर्तिने गात राहे पवाडा

करुनी गळा मोकळा आपला !

फुटे तांबडे भारताच्या क्षितीजी

उठा, स्वागताची तयारी करा

अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे,

प्रणामांस माझ्या तुम्ही स्वीकरा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

त्रिपुरी पौर्णिमा

ये आज त्रिपुरि पौर्णिमा । वदन चंद्रमा । पूर्ण फुलवोनी

करि विलास भुवनी शरदऋतूची राणी

किति धवल पडे चांदणे । गोड हासणे । जसे रमणीचे

जे रातराणिचे कुंज फुलवि हृदयीचे

ही विश्वाची प्रणयिनी । सिंधु-दर्पणी । बघे न्याहळुनी

ही रुपसुंदरी स्वताच जाई भुलुनी

मम हृदयसिंधु उचमळे । होउनी खळे । भाव-लहरींचे

उमलतात कवने जणू कळे कमळांचे

पौर्णिमा करा साजरी । हर्षनिर्भरी । तुम्ही भावंडे

चांदणे चकोरापरी लुटा आनंदे

मी रुग्ण इथे आश्रमी । होउनी श्रमी । तळमळे शयनी

मन माझे तुमच्याकडेच गेले उडुनी

मज दिसतो रांगोळिचा । रम्य गालिचा । रेखिला कुशले

ती भावमधुर पाहुनी कला मन भुलले

तुम्हि गगनदीप बनविला । उंच चढविला । विलसतो गगनी

राहील चिरंतन तेवत अंतःकरणी

त्या पणत्या तुम्हि लाविल्या । स्मृती आपुल्या । कधि न विझणार्‍या

या कळया जीवनातल्या सदा फुलणार्‍या !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कागदी नावा

कागदी नावा करोनी एक एकामागुनी

वाहत्या पाण्यात देतो मी मजेने सोडुनी

नाव माझे, गाव माझे माझिया नावांवरी

मी लिहीतो शाइने काळ्या नि मोठया अक्षरी

वाहुनी जातील नावा दूर त्या बेटावरी

वाटते, वाचील माझे नाव की कोणीतरी

सोडितो नावा भरोनी शुभ्र जाईची फुले

जायची काळ्या प्रदेशा ही प्रकाशाची मुले

पाहता ही मौज जाते दृष्टि आकाशाकडे

चालती नावा ढगांच्या पांढरी ज्यांची शिडे

माझिया नावांसवे की लावण्याला शर्यत

कोण माझा सौंगडी तेथूनि नावा सोडित ?

झाकुनीबाहूत डोके सांजवेळी झोपतो

तारकागंगेत नावा पोहताना पाहतो

स्वप्नपुष्पांच्या भरोनी टोपल्या नावांतुनी

चालल्या मारीत वल्ही काय निद्रायक्षिणी ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या