चांदण्यात फिरताना

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा!

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती ‘तात्पर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
‘चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !’

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

एवढे दे पांडुरंगा !

माझिया गीतात वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे !

आशयांच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा !

स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षांत व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी !

एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला;
नामयाहाती बनावे
हे जिणे गोपाळकाला !

माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !

मी तुक्याच्या लोचनांनी
गांजल्यासाठी रडावे;
चोख वेव्हारात मझ्या
मी मला वाटून द्यावे !

ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडीला हा
मी तुझ्या दारात दंगा !


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

बोलणी

आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
"ही कृपा ईश्वरी"- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
"छान धन्वंतरी बोलती !"

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - एल्गार

रोज

गात्रागात्राला फुटल्या
तुझ्या लावण्याच्या कळ्या
जन्म वेढून बांधिती
तुझ्या भासांच्या साखळ्या!

रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षत्रे खुडती;
रोज तुझ्या भेटीसाठी
बाहू आसवांचे होती!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

ते

त्या वेळी
तू आलास
आणि म्हणालास
” एक्मेकांवर प्रेम करा ! “

त्यांनी तुला क्रुसावर खिळले !

मग
शतकांचा अंधार ओलांडुन
पुन्हा आलास सूर्यकिरणांतून
आणि म्हणालास
” सबको सन्मति दे भगवान ! “

त्यांनी तुझ्यावर गोळ्या झाडल्या !


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - झंझावात

ओठ

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?

आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?

बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?

कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - एल्गार

पोरवयात

पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ
आपल्या जन्मजात दारिद्र्याइतके स्पष्ट,
विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत.
तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना
नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा
पोरक्या पोरवयासह पळणाय्रा झाडांसकट;
भवतीच्या समवयीन भाग्यवंतांचे
बोबडे कौतुक तिने नाकारले;
नाकारला स्पर्श वत्सल, हळवा,
अहंकार जागवणारा....
तिने फक्त ओठ घट्ट मिटले,
डोळे स्थिर समोर....
आणि समजूतदारपणे
मेमसाबची बॅग सांभाळली.त्या वेळी
मी हादरलो माझ्या वयासकट....
प्रिय आत्मन,
इतक्या कोवळ्या वयात,
तू
तुझी जागा ओळखायला नको होतीस....

सांगाडा

तारेत अडकलेल्या,
मुळारंभाशी संबंध तुटलेल्या
पतंगाचे काय होते?
प्रथम, संपूर्ण निरागस नेणीव
अडकल्याची;
वारा आल्यावर उडतोही मनमोर
पूर्विसारखाच
अद्न्यात हाती लीलसूत्र असल्यासारखा..
नंतर,तार वर्याशी संगनमत करुन
त्याचे ऊडण्याचे सुत्रच गायब करते तिथे
प्रस्थान त्याचा धडपडीचे;
सर्वांग फाटेपर्यंत त्याचे
हल्ले चहुबाजूंनी तारेवर
तारेची बेलाग ताकद उमगेपर्यंत...
मग, गहीरे मस्तवाल रंग फिकट होऊ लागतात,
वार गिधाडासारखा
फिकट झालेले रंगही तोडून नेतो दिगंती...
आणि एके दिवशी संध्यासमयी पहावे तो तर-
नुसता सांगाडा काड्यांचा
सांगाडा नुसत्या काड्यांचा
सांगाडा देखण्या रंगीत रुपाचा
सांगाडा हवेत झेप घेणार्याचा
सांगाडा आकाशात गर्वाने डोलणार्याचा
सांगाडा सुतावर स्वर्गाचा भरवसा ठेवणार्याचा
सांगाडा खुप अनंत खूप अनादी
"नियती भोगल्यावर
एवढेच शिल्लक रहाते" हे सांगणारा


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

ह्या फुलांचे काय करावे?

वाढदिवशी भेटीस आलेली
ही अनंत अगणित फुले...
ह्या फुलांचे काय करावे,हे
बिरबलही सांगू शकणार नाही.
कारण सर्व कारणपरंपरेच्या पलीकडचे त्यांचे 'असणे'
त्याला आमचे हेतू चिकटवता येणार नाहीत...
फुलांकडे फक्त पहा डोळे भरून.
पहा कशी असतात अस्तित्वचा मस्तित,
पहा कशी असतात स्रव्स्वी 'त्या'चीच
सदैव, झाडावर या मातीत ..
फुलण्यापुर्वी,फुलताना वा निर्माल्य झाल्यावरही
परमेश्वराला शरण गेलेल्या या कोमल पाकळ्यांनी
म्रुत्युला नगण्य केले आहे
फुलांचे काहीही करा
ती आमच्यासारखी रिक्त नाहीत
तुमच्या करण्याचे ओरखडे त्यांच्या आत्म्यावर उमटणार नाहीत.
त्यांना आपली प्रतीष्ठा जन्मत:च लाभलेली आहे.
म्हणून म्हणतो महराज,
फुलांचे काय करावे हा प्रश्न
फक्त तुमचा आहे, तसाच
सर्व उपयुक्तवाद्यांचाही , पण त्याचा
फुलांशी संबध नाही
कारण त्यांचे 'असणे' तुमच्या प्रश्नाहून अनादी आहे
तुम्हाला शब्द माहीत नव्हते
तेंव्हाही ती होती आणि
तुमचे शब्द संपतील तेंव्हाही ती
असणार आहेत - जशी होती तशी
अस्तीत्वास शरण,
अस्तीत्वमय ,
अशरण्य


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

लोकलमधला चणेवला

पाय अनवाणी पोरके असले की
दुधाचे दात पडण्यापूर्वीच डोळे
उदास,सावध होतात...
मानेवरून पट्टा घेउन
पुढे पोटावर टोपली अडकवता येते;
लाल, जांभळे कागद डकवून
तिला सजवता येते;
आपल्यालाच आपल्यापुढे
विस्तवाचे मडके धरून,
चणे विकत नेता येते.

पायच अनवाणी असले की
आपल्या चड्डीचा कडा
टांग्याचा घोड्याचा आयाळीसारख्या
कातरलेल्या असतात,
आणि आपला अतोनात मळलेला शर्ट
मोडक्या छ्परासारखा
खाली उतरलेला असतो
शर्टावर एक चित्रही असते पुनरूक्त;
एक आलीशान घोडागाडी,
आत निवांत बसलेले कुणी;
चाबूक उगारलेला हात,
आणि जीवाचा आकंताने
रनोमाळ पळणारे घोडे..


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

झाडे सत्तेवर आली की

माणसे
निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात
त्यांचे हात्पाय तोडून त्यांना
बेमुर्वतखोरपणे
उघ्ड्यावर रचून ठेवतात...
माणसांच्या राज्यात हे असेच चालायचे

उद्या झाडे सत्तेवर आली की तीही
तोड्लेल्या माणसांची हाडे
अशीच उघ्ड्यावर रचून ठ्वतील;
व्रुक्षकुळातील कुणी मेला तर
माणसांच सर्पण म्हणून उपयोगही करतील
फिरून माणसांचे राज्य येण्यापूर्वी
खुनाच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला
झाडेही आत्मसात करतील...
फक्त एकदा
त्यांचे राज्य आले पाहिजे


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

वही मोकळी करताना

कवितेची वहि गच्च भरून गेल्ये:
आता पाने सुटि करून मोकळे करायला हवीत...
काही अशी वार्यावर सोडून द्यावित
ज्यांची दूर विजनवासात गाणी होतील
काही नदीत सोडावीत
म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील
काही पाखरांना द्यावीत
त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल
त्यांनाच परत केल्यासारखी
काही ढगांवर डकवावीत
जी दीशा ओलांडताना
आपोआपच रुपांतरीत होतील...

नंतर
ज्यांची दूर विजनवासात गाणी होणार नाहीत
जी नाकारतील वाहणे नव्याने
ज्यांचा कुठल्याही कोलाहलाशी संबंध नाही
ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायचा नाहीत
अशी काही पाने उरतीलच; ती सर्व
कुठल्याहि झाडाचा तळाशी ठेवावीत:
तुम्हीच झाडांचे बहर आहात.असे
मीच त्यंना कितीदा सांगितलेले आहे


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

कुंती

प्रत्येकीलाच राहतो गर्भ कौमार्यावस्थेत,
अवांछीत नपुसक राद्न्यिपदापूर्वि;
फरक इतकाच की तिची ताकद होती
एक प्रतिसुर्य वाढवण्याची,
गंगेत सोडून देण्याची निर्मम
जी प्रत्येकीची नसते.
हिरण्यगर्भ पोसावा
इतकी जबरदस्त कूस कुणाची आहे?
म्हणून तर हे असंख्य, निरपराध गर्भपात
दिशा लाल लाल करणारे सकाळ-संध्याकाळ...
म्हणून तर ही वस्त्रहरणे दिवसांची,
उलटे फासे नियतीचे परत परत,
वनवास विराट अद्न्यातघरचे,
फजीत करणारे मायावी इंद्रप्रस्थ,
मुल्यांची अणुभट्टीच असे युध्दाचे प्रसंग
आपल्याशीच,
आणि स्वर्गाच्या फक्त प्रवेशद्वारापाशीचे मरण-
मग सारेच संपते ते...


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

हस्तांतर

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेंव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगा मला म्हणाला: द्या इकडे

मी मूर्ती तात्काळ मुलाचा हातावर ठेवली
चौरंगासहित
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून,तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याचा....

मी पुन्हा तरूण ययातिसरखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा
परंपरेचा ओझ्याने वाकलेला...


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

कंदील विकणारी मुले

उत्साहाने घरचा कंदील करण्याचा वयात त्यांना
परोपरीने सजवून विकणारी ही मुले या
दिवाळीची खरेदी केरीत हिंडणार्या
श्रिमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत..
त्यांचे खांदान मुळातच वेगळे
ती आली आहेत उपासमारीचा अर्धपोटी संसारातून
किंवा संप-टाळेबंदीत हकनाक
देशोधडीला लागलेल्या कुटुंबातून,
किंवा कर्त्याच्या अपमृत्युने
छप्पर उडालेल्या घरामधून;किंवा
आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर
जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारतून...
थोडक्यात म्हणजे, कायमची
रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मुले...
त्यांना आहे एकदम मान्य तुमचा
सर्वाधीकार प्रकाशावरचा; म्हणून तर ती
तुमचाच प्रकाश अधीक वैभवशाली दिसावा यासाठी
काठ्यांना रंगीबेरंगी आकाशकंदील अडकवून
भर बाजारात
तुमचीच वाट पहात उभी आहेत


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

घर

माझी मुलगी सकाळीच
जागा शोधण्यासाठी बाहेर पडते
त्याचाबरोबर नवे घरकूल थाटायचे आहे..

ती उशिरा परत येते तेंव्हा आत माझे
जेवण चाललेले. मी कमालीच उत्सुक
ती आत यावी म्हणून;तर ती
बाहेरच कितीतरी वेळ-
हिला, बहिणीला जागेविषयी सांगत रहिलेली
तिचा आवाज इअतक्या दुरुनही
जाणवतो आहे बराचसा विकल आणि
सारे पर्युत्सुक प्रश्न, त्यांना न कळत तिला
सतावीत रहिलेले..

माझे जेवण होते तेंव्हा
कोलाहल केंव्हाच संपलेला; म्हणून मी
बाहेरचा खोलीत डोकवतो तर
माझी मुलगी पूर्ण थकलेली
कपडे न बदलताच सोफ्यावर
भिंतीकडे तोंड करून निजलेली
मी पुन्हा निरखून पहातो तर
मुलगी नसतेच; असते कुणी
प्रौढ स्त्री डोळे मीटून
पराभूतशी पडलेली.तिचा कपाळावर
ओळीमागून ओळी आखलेल्या सुस्पष्ट
ज्याचावर घर नावाचा म्रुगजळाविषयीचे
काही सुरवातीचे निष्कर्ष अक्षरश:
रक्ताचा पाण्याने लिहिलेले...


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

समुद्राविषयी

१.
सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला मिळतात. त्यांच्या
निमुट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.

२.
समुद्र आपल्यासारखाच : दुःखी.
त्याच्या विव्हळण्याचा
समुद्रगर्जना म्हणून प्रथम
कुणी अधिक्षेप केला?
आवेगाने किनार्‍यापर्यंत
वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना
भरती कुणी म्हटले आणि
डोळ्यात जमणारे पाणी मागे
खेचणार्‍या निग्रहाला ओहोटी?


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

पानं

पानं फाटलेली: वार्‍याचे
सारे अतिप्रसंग सहन केलेली.

पानं भुईवर विखुरलेली : झाडानेच
अपरात्री घराबाहेर काढलेली.

पानं मूक, स्तब्ध : अतर्क्य उत्पातात
वाचा गमावून बसलेली.

पानं हीन-दीन : कुणावरही
सावली धरण्याची पुण्याई संपलेली.

पानं असहाय्य : सीतेसारखी शेवटी
मातीच्या गरीब आश्रयाला आलेली. . .


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

नास्तिक

माणसांचे संघटित क्रौर्य पाहून
त्याच्या डोळ्यांत पाणी आले;
त्यांच्या उथळ ज्ञानाने तो व्यथित झाला
आणि त्यांच्या मूर्ख श्रद्धांनी त्याला
खराखुरा दैवी मनस्ताप दिला…

मग, त्याने हृदयातील सारी कणवच
हृदयासह फुंकून टाकली एका
सतत जागणार्‍या मेंदूच्या मोबदल्यात; आणि
हातातील बुद्धिवादाचा दंडुका परजीत तो
आव्हान देत सुटला धर्मग्रंथातील
निर्दय ईश्वरी सत्तेला…

बंधुभाव शिकवणार्‍यांनीच
माणसामाणसांत उभारलेल्या भितींवर त्याने
मनसोक्त प्रहार केले आणि
आमचे ज्ञानचक्षू कायमचे मिटावेत म्हणून राबणार्‍या
शिक्षणव्यवस्थेवर तो दांडूका हाणत राहिला…

आत्मघातकी वेगाने जन्मणारी
गरीब देशांतील मुले पाहताना अचानक
सर्व मानवजातच एखाद्या अणुयुद्धात
संपवून टाकण्याची शक्यता त्याला दिसली
आणि एका कल्पित सुखाचे हासू त्याच्या गालांचे
स्नायू प्रसरण पाववून गेले.

मानवाचा निर्वंश तसा वाईट नाही हे
त्याने दंडुक्याशिवायही पटवून दिले असते;
प्रश्न परंतु पृथ्वीवरच्या
इतर समजूतदार, सुंदर प्राण्यांचाही होता -
खारी, मोर, ससे, वाघ, हरणे इत्यादी इत्यादी.

त्यांचा विचार करताना त्याची
दंडुक्याची पकड सैल झाली आणि
एका दयाळू अनिवार्यतेने
फक्त माणसांच्याच विनाशाची
नवीन शक्यता तो शोधू लागला….


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

परिपक्व झाडे

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत…


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

साधना

तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे….तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही…

कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही…


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

अनंताचे फूल

तुझ्या केसात
अनंताचे फूल आहे म्हणजे
तुझ्याही अंगणात अनंताचे
झाड आहे, ह्या जाणिवेने मी
मोहरुन जातो.
नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात
एक तरल संबंध रुजून
आलेला मी पाहतो...


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

प्रेमाचा गुलकंद

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित 'तिज'ला नियमाने!

कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!

गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!

प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!

कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!

या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगत करी मग मनातले बोल!

अशा तर्‍हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!

अखेर थकला! ढळली त्याचि प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!

धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, 'देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)

'बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तांचे काज?

गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?'

तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी'

असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!

म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!

कशास डोळे असे फिरविता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!'

क्षणैक दिसले तारांगण त्या,-परि शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!

'प्रेमापायी भरला' बोले, 'भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?'

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रदय थांबुनी कधीच नातरि तो असता 'खपला'!

तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
'प्रेमाचा गुलकंद' तयांनी चाटुनि हा बघणे!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

मोडीसाठी धाव

दे रे हरि, दोन आण्याची मोड!
मोडीसाठी भटकुन आले तळपायाला फोड ॥ध्रु०॥

काडि मिळेना, विडी मिळेना, इतर गोष्ट तर सोड!
मीठही नाही, पीठहि नाही, मिळे न काही गोड!

पै पैशाचे धंदे बसले, झाली कुतरेओढ!
'मोड नाही,' चे जेथे तेथे दुकानावरी बोर्ड!

ट्रँम गाडितहि मोड न म्हणुनी, करितो तंगडतोड!
कुणी 'कूपने' घेउनि काढी नोटांवरती तोड!

मोडीवाचुनि 'धर्म' थांबला, भिकार झाले रोड!
दिडकि कशी तुज देऊ देवा, प्रश्न पडे बिनतोड!

श्रीमंतांचे कोड पुरवुनी मोडिशि अमुची खोड!
पाड दयाळा, खुर्द्याची रे आता पाऊसझोड!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

बायको सासरी आल्यानंतर

बायको आली आज परतून! ॥ध्रु०॥

बारा महिने तब्बल बसली माहेरी जाऊन!
वाटू लागले नवर्‍याला कि गेलि काय विसरून!

झोपुनि झोपुनि रोज एकटा गेलो कंटाळून,
थकुनी गेलो सक्तीचे हे ब्रह्मचर्य पाळून!

आंघोळीला रोज यापुढे मिळेल पाणी ऊन,
गरम चहाचा प्याला हासत येइल ती घेऊन!

लोकरिचा गळपट्टा रंगित देइल सुबक विणून,
आणि फाटक्या कपड्यांनाही ठिगळे छान शिवून!

टाकिन आता सर्व घराचा रंगमहाल करून,
तात्यामाई घेतिल दिवसा मग डोळे झाकून!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

एका पावासाठी

धाव पाव देवा आता । देई एक पाव!
मारु चहावरति कसा मी । कोरडाच ताव?
पाव नाहि म्हणुनी पत्‍नी । करित काव काव!
पावरोटिसाठी आलो । धुंडुनि मी गाव!
माजलेत बेकरिवाले । म्हणति 'चले जाव!'
बोलतो हसून इराणी । 'जा चपाती खाव!'
वाढवी गव्हाचे वाणी । चौपटीने भाव!
नफेबाज व्यापार्‍यांचा । हाणुन पाड डाव!
पाहिजे तरी सरकारा । तूच लोणि लाव!
नरम पाव देऊन देवा, राख तुझे नाव!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

वधूवरांना काव्यमय अहेर

अहा, उगवली आनंदाची शुभमंगल वेला,
आज तुम्हा अस्मान ठेंगणे वाटे ना? बोला?

रोमांचातुनि हर्षाच्या ना उसळतात लाटा
गांभीर्याचा मुग्धपणा मग का वदनी खोटा!

उत्सुकतेने तुम्ही पाहिली आजवरी वाट
प्रसंग आला तोच! शांत का मग मिटवुनि ओठ?

लग्नाचे काढिता तुम्ही कुणि आजवरी नाव
'छे-भलते!' दाविलात लटका असाच ना भाव?

'नव्हते कारण लग्नच!' तर मग का बसला आता
सस्मित वदने 'अन्याया'चा प्रतिकार न करता?

तरुण मंडळी 'नको' बोलती अर्थ परी त्याचा
काय असे तो नीट उमगतो थोरांते साचा!

असो' कसे पण वाँरंटाविण आज तुम्ही झाला,
खरे चतुर्भुज! ('जन्मठेप' कुणि म्हणति बरे याला!)

अरे, कुणी हे लांबलचक विधि लग्नाचे केले?
हाच चालला विचार मनि ना! (ते मजला कळले!)

वाङ्‌निश्चय, श्रीमंतपूजने आणि रुखवते ती,
आनंदाच्या समयि कशाला ही भारुडभरती!

पक्वान्ने रुचिमधुर कशाला भोजनास भरती
'त्या घासा'विण विचार असतो का दुसरा चित्ती!

मुंडावळि या डोळ्यांवरती पुन्हा पुन्हा येती
नीट न दिसते 'मुख ते' ! अगदी कटकट ही नसती!

किती यातना वधुवरांच्या ह्रदयाला होती!
वृद्धांना कळणार तरि कधी या नाजुक गोष्टी?

लग्नकालिचा अनुभव अपुला विसरतात सारे
म्हणुनि वधुवरा निष्कारण ते छळती म्हातारे

घास घालणे, विड्या तोडणे नाव आणि घेणे
हाताला अन हात लावणे! पदरगाठ देणे!

एवढेच विधि विवाहात जरि ठेवतील मोठे
उरेल तर मग पृथ्वीला या स्वर्ग दोन बोटे!

निष्कारण भटभिक्षुक म्हणती लग्नाचे मंत्र
तरुणांच्या ह्रदयातिल त्यांना नच कळणे तंत्र

किती मंगलाष्टके लांब ही अजुनि न का सरती?
घसा खरडुनी कानाजवळी किंकाळ्या देती!

लाल अक्षता मारित सुटती डोक्यावर सारे
खराब होतिल केस! तेवढे नच कळते का रे?

चला संपले दिव्य! 'वाजवा' असा ध्वनी उठला
अरे, अजुनि हा अंतःपट तरि कुणी उंच धरिला!

मंडपात का लोक रिकामे रेंगाळत बसती,
हस्तांदोलन वा अभिनंदन का करण्या येती?

उगाच घ्यावा किती कुणाचा मौल्यवान वेळ!
लोकांना आमुच्या कधी हे रहस्य उमगेल!

स्पष्ट बोललो वधुवरांनो, क्षमा करा मात्र!
असेच तुमच्या ह्रदयाचे ना असे खरे चित्र?

चला बैसला जिवाजिवाचा आज खरा मेळ!
संसाराचा सुरू जाहला सुखद आज खेळ!

तुम्हा सांगतिल कुणी 'भवार्णव दुस्तर हा फार!
जीवन नुसति माया! नसते संसारी सार!'

नका घाबरू! अशा ऐकुनी भूलथापा खोट्या,
अजीर्ण ज्याते श्रीखंडाची रुचि येइल का त्या?

आनंदाची सर्व सुखाची जीवित ही खाण
हसेल आणि जगेल त्याते नच कसली वाण!

नका त्रासुनी बघू! समजले! आवरतो सारे!
म्हणाल ना तरि 'बोलुनि चालुनि कवि बेटे न्यारे!'

आनंदाचा मधुर मनोहर वसंतकाल सदा,
तुम्हास लाभो! हीच शेवटी विनंति ईशपदा!

आणि सांगतो अखेर एकच की भांडणतंटा
जरि झाला कधि तरि तो घ्यावा प्रेमाने मिटता!

आरंभी येतील अडथळे! जोवरी न हलला-
सदनि पाळणा-क्षमा करा, हा चुकुनि शब्द गेला!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

मनाचे श्लोक

मना, नीट पंथे कधीही न जावे,
नशापाणि केल्याप्रमाणे चलावे,
जरी वाहने मागुनी कैक येती
कधि ना तरी सोडिजे शांतवृत्ती!

दुकानांवरी लाविल्या लांब पाट्या
मना, थांबुनी वाच रे वाच बा त्या!
अकस्मात् दिसे जाहली जेथ गर्दी
तिथे चौकशी जा करायास आधी!

तिर्‍हाईत कोणी जरी जाय पंथे
तरी रोखुनी पाहणे त्याकडे ते!
अहा, अंगना त्यांतुनी ती असेल
वळोनी तरी पाहि मागे खुशाल!

कधी आगगाडीतुनी हिंडताना,
सिनेमा-तमाशे तसे पाहताना,
विचारी मना, त्वां न खर्चीत जावे,
सदा श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे!

कधी 'मंदिरी' जासि वाचावयाला
तरी इंग्रजी मासिकी ठेव डोळा!
कुठे छान चित्रे कुठे 'कूपने' ही
दिसे सर्व ते नीट कापून घेई!

कुणाचेविशी अंतरी होय तेढ,
निनावी तया धाडि रे 'नाँटपेड'!
तयाचेनि नावावरी लठ्ठ व्ही.पी.
मना, मागवी-त्याहुनी रीत सोपी!

सदा खाद्यपेयावरी हात मारी
बिले देइ सारुन मित्रासमोरी;
'अरेरे, घरी राहिले आज पैसे-'
खिसे चाचपोनी मना बोल ऐसे!

कुणाच्या घरी जा करायास दाढी,
कुणाची फणी घेउनी भांग काढी?
कुणाचा 'स्वयंटाक' टाकी खिशात,
घड्याळेहि बांधी तशी मनगटात!

कुणाच्या विड्य नित्य ओढीत जाव्या,
तशा आगपेट्याहि लंबे कराव्या!
चहा होतसे केधवा पै कुणाचा
अरे मन्न, घेई सुगावा तयाचा!

इथे पायगाडी तिथे वाद्यपेटी
इथे पुस्तके वा तिथे हातकाठी;
अशी सारखी भीक मागीत जावे,
स्वताचे न काही जगी बाळगावे!

कुणाचे असे मगले काहि देणे
कपर्दीकही त्यातली त्या न देणे
कधी भेटला तो तरी त्या हंसोनी
म्हणावे 'असे सर्व ते नीट ध्यानी!'

कुणाचे कधी लागले पत्र हाती
कुणाची तशी चिठ्ठी किंवा चपाटी;
तरी त्यातल्या वाचणे चार ओळी,
न ठावे कळे कोणते काय वेळी!

जिथे चालल्या खाजगी कानगोष्टी
उभी आणि धेंदे जिथे चार मोठी,
मना, कान दे तोंड वासून तेथे,
पहा लागतो काय संबंध कोठे!

कडी लागलेली दिसे आत जेथे,
मना सदगृहस्था, त्वरे जाय तेथे!
जरी पाहसी आत ना काक-अक्षे,
कशाला तरी त्या फटी अन् गवाक्षे?

नसे ज्याविशी ठाउके आपणाते,
मना, बोलणे 'दाबुनी' त्यावरी ते!
दुजांची जरी जाणशी गुप्त बिंगे
तरी धाव घे वृत्तपत्रात वेगे!

मना सज्जना, चार आण्यात फक्त
तुला व्हावयाचे असे 'देशभक्त'!
तरी सांगतो शेवटी युक्ति सोपी,
खिशामाजि ठेवी सदा गांधिटोपी!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें