माणूस

घरांनीं आपलीं दारें बंद केलेलीं असतात, 
डोळ्यांना वेढून बसलेल्या अस्तित्वांच्या 
रांगाही निवून जातात.

वैराण आणि एकाकी आकाशाच्या 
पार्श्वभूमीवर संथपणानें हा जात असतो.... 
त्याच्या चेहऱ्यावर कदाचित् कमळांचीं 
सरोवरें उगवली असतील....

परंतु इतक्या लांबून तीं दिसत नाहींत. 
त्याच्या पावलागणिक माझ्या गीतांचीं 
शक्लें होऊन रस्तोरस्तीं सुरांचीं

कारंजी उडतात, आणि तुझ्या-माझ्यापासून 
निघालेला हा दुःखाचा काळोख, केवळ 
त्याच्या निसटत्या स्पर्शानंहि पैंजणासारखा 
रुणझुणत वाहूं लागतो....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा