आपण जग सोडून पळालो आहोत, त्याअर्थी जग असार आहे, या जगातले संसारी लोक मूर्ख आहेत आणि आपण शहाणे आहोत, अशी अनेक बोगस संन्याशांची समजूत असते. ही मंडळी हिमालयात कंटाळली की समाजात येऊन डायरेक्ट उद्धाराच्या कार्याला लागतात. समाज आपल्या बोधामृतासाठी ताटकळत बसलेला आहे, अशी त्यांची समजूत असते.

अशाच एका साधुबुवांनी तुरुंगामध्ये प्रवचनं देऊन कैद्यांना सुधारण्याचा चंग बांधला होता. त्यांची प्रवचनं ऐकणं हे सद्वर्तन मानून कैद्यांना त्यांच्या शिक्षेत सूट मिळत असे. त्यामुळे कैदी डुलक्या काढायला का होईना त्यांच्या प्रवचनांना हजेरी लावत. या तुरुंगात एक विकृत खुनी आणि बलात्कारी दरोडेखोरही बंदिवान होता. तो या प्रवचनांना नियमित हजेरी लावायचा. दहाएक वर्षं सतत प्रवचनं ऐकली होती त्याने. त्याची सुटका होण्याचा दिवस आला, तेव्हा साधुमहाराजांनी तुरुंगाधिकाऱ्यांना सांगितलं की मला त्या कैद्याला भेटायचंय.

स्वामी महाराज त्या कैद्याला सुटकेच्या दिवशी भेटले आणि त्यांनी विचारलं, आता तुम्ही सुटका झाल्यावर काय करणार? पुन्हा जुन्याच उद्योगांकडे वळणार की इतर काही करणार?

तो कैदी म्हणाला, नाही. आता मी माझ्या जन्मगावी परत जाणार. तिथे माझी थोडी शेती आहे, घर आहे. तिथे राहणार आणि यापुढे आराम करणार.

साधुबुवांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आपल्या अखंड प्रवचनधारेने एका दगडाला पाझर फोडला, एका माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणलं, त्याला सुधारलं या कल्पनेने ते खूष झाले आणि त्याला म्हणाले, तुम्ही मला केवढा आनंद दिलाय याची कल्पना नाही तुम्हाला. माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझी सगळी प्रवचनं आज सार्थ सिद्ध झाली. त्यांनी तुम्हाला सन्मार्गावर आणलं.

तो दरोडेखोर फिस्कारून म्हणाला, ओ महाराज, तुमच्या त्या कंटाळवाण्या बडबडीचा याच्याशी काही संबंध नाही. सुधारणा व्हायला मी बिघडलोच कुठे होतो? कुठल्याही धंद्यातला माणूस वय झाल्यावर, हातपाय थकल्यावर रिटायर होतो की नाही? आराम करतो की नाही? मी फक्त रिटायर होतोय… रिटायर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा