मानसिक गुलामगिरी

 एके दिवशी राजा आपल्या दरबारात बढाया मारत असतो. तो म्हणतो, "काल मी शिकारीला गेलो होतो. तिथे मला एक काळवीट दिसले. मी इतक्या वेगाने आणि अशा कोनातून बाण मारला की, तो बाण एकाच वेळी त्या हरिणाच्या डोळ्याला लागला आणि तिथून आरपार जाऊन थेट त्याच्या मागच्या पायाच्या खुरामध्ये अडकला!

दरबारी लोक चक्रावून जातात. एकाच बाणाने डोळा आणि पाय एकत्र कसे काय भेदले जातील? हे अशक्य आहे. पण राजासमोर बोलायची कोणाची हिंमत नसते.

सगळे लोक भाटाकडे बघतात. भाट अजिबात न डगमगता म्हणतो, "महाराज, यात नवल ते काय? तुम्ही तर उत्तम धनुर्धर आहातच, पण त्या हरिणाची स्थितीही तशीच होती."

भाट पुढे त्या थापेचे  'रसभरीत समर्थन' करताना म्हणतो:

"महाराज, तो बाण सुटला तेव्हा नेमका त्याच क्षणी त्या हरिणाच्या डोळ्याला खाज सुटली होती. त्यामुळे त्याने आपला मागचा पाय उचलून डोळा खाजवण्यासाठी तोंडापाशी नेला होता. त्याच स्थितीत तुमचा बाण आला, तो आधी त्याच्या डोळ्यातून गेला आणि पाय तिथेच असल्याने तो पायातही रुतला!"

राजा खूश होतो, पण त्यालाही समजते की भाटाने आपली इज्जत वाचवली आहे. नंतर राजा हळूच भाटाला विचारतो, "अरे, पण असे घडणे अशक्यच होते."

तेव्हा भाट अतिशय मार्मिक उत्तर देतो. तो म्हणतो, "महाराज, तुम्ही थापा मारताना थोड्या जपून मारत जा. तुमच्या एका थापेला 'सत्य' करण्यासाठी मला त्या बिचाऱ्या हरिणाला दोन पायांवर उभे करून त्याचे पाय डोळ्यापर्यंत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली!"

लोकशाही राज्य पद्धतीत साधी माणसे आणि पार्टी लायनर मंडळी अश्याच पद्धतीने आपल्या पक्षाचे समर्थन करत असतात. 

भाट भाग्यवान होता , राजाच्या दरबारी होता. राजा त्याला पोसत होता...लोकांना जरी त्याने थापा मारल्या तरी राजाला सत्य सांगण्याचे त्याच्यात धाडस तरी होते.  लोकशाही मधले भाट घरचे खाऊन अश्या लष्कराच्या भाकर्‍या भाजतात. आणि ज्याच्यासाठी अशी जोरदार बॅटिंग करतात त्याचा आणि यांचा आयुष्यात संबंध येण्याची शक्यता सुद्धा नसते... 

मानसिक गुलामगिरी ही एक फार वाईट गोष्ट आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा