२००६ की २००७ ची एक पत्रकार परिषद, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबा लोकप्रियतेच्या शिखरावर होते व पत्रकार परिषदेत हिंदी मध्ये उत्तरे द्यायची त्यांची हौसही जोरात होती.

कुठल्या तरी अट्टल गुन्हेगारांना पकडल्या बद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. त्यावर कुणा हिंदी वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना विचारले की अब इस मामले में आपकी सरकार क्या करेगी?

यावर आबा चटकन म्हणाले की, उन्हे शिक्षा मिले इसका हम पूरा प्रयास करेंगे. जेव्हा कुणीतेरी ही चूक आबांच्या लक्षात आणून दिली व समजावले की मराठीमधली शिक्षा म्हणजे हिंदीतले शिक्षण, आबांनी सजा असे म्हणायला हवे होते.

त्यावर आबांनी पत्रकारांना विनंती करून नव्याने बाईट दिला व यावेळी शिक्षेऐवजी सजा देंगे असं ते म्हणाले.

 लोकसभा निवडणूक १९८४. बारामती मधून शरद पवारसाहेब (स. काँग्रेस) आणि शंकरराव पाटील (काँग्रेस) असा प्रमुख सामना होता.

पवारसाहेबांची आकुर्डीच्या सभेमधील भाषणातील काही वाक्ये -
".... आजच टाईम्समधे गेल्या पाच वर्षांत ज्यांनी लोकसभेत एकही प्रश्न विचारला नाही अशा खासदारांची लिस्ट आली आहे.
त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ खासदारांची नावे आहेत. त्यात पहीले नाव आहे शंकरराव बाजीराव पाटील. या माणसानी लोकसभेत फक्त दोन वेळा तोंड उघडले. पहील्यांदा खासदारकीची शपथ घ्यायला. कारण त्याशिवाय खासदारकीचे बेनीफिट मिळत नाहीत. आणि दुस-यांदा जांभई दयायला..."

 लालबहादूर शास्त्रींनंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान बनविण्यात कामराज, निजलिंगप्पा, अतुल्य घोष इत्यादी सिंडिकेटचा महत्वाचा वाटा होता. १९६७ च्या निवडणुकांपर्यंत इंदिरांना पंतप्रधानपदी ठेवायचे तोपर्यंत त्यांना कठपुतलीप्रमाणे कसेही फिरवता येईल असा त्यांचा कयास होता.पण तो कयास जोरदार फसला. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदी आल्यावर स्वतःचा इंगा दाखवून द्यायला सुरवात केली. १९६६ मध्ये रूपयाचे अवमूल्यन करायचा निर्णय इंदिरा गांधींच्या सरकारने घेतला.हा निर्णय सिंडिकेटला फारसा रूचला नव्हता.त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी "Great man's daughter--small man's mistake" असे म्हटले. म्हणजे Great man's (नेहरूंच्या) daughter (इंदिरांना) पंतप्रधान बनविणे ही small man's mistake होती. इथे small man हे कामराजांनी स्वतःला उद्देशून म्हटले.

 १९९६ साली अट्लबिहारी वाजपेयीं पंतप्रधान असताना विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आणला व NDA सरकार १३ दिवसात पडलं.त्यानंतर तिस-या आघाडीला बाहेरुन पाठींबा देऊन काँग्रेसनी देवेगौडांना पंतप्रधान केलं. त्या वेळी संसदेच्या पहिल्याच सत्रात प्रमोद महाजन बोलत होते. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी तुफानी आतिषबाजी केली होती. त्या वेळच्या तडजोडीच्या राजकारणावर सडकुन टिका करताना त्यांनी एक किस्सा सांगायला सुरुवात केली.एकदा भारतीय सर्व-पक्षीय संसदीय मंडळ चीनच्या दौर्यावर गेले होते,त्यावेळी एका चिनी राजकारणी माणसाने महाजनांना भारतीय लोकशाही बद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले," हम जब चीन मे गये तो बहुत सारे लोग हमारे साथ थे| तब मुझे किसीने पुछा आपकी democracy कैसे चलती है? मैने कहा की democracy समझाने से अच्छा मैं सिर्फ आपको अपने सहचारिंओंका परीचय करवां देता हूं आप खुद ही भारतीय democracy समझ जायेंगे. मैंने कहा..'I am Pramod mahajan, I am member of Loksabha, I belong to single largest party in the house.. and I am in opposition!' फिर मैंने श्रीवल्लभ पाणिग्रहींकी ओर हाथ करे बोला,'He belongs to second largest party (Congress). He is outside the Government..supporting the Government', फिर मैंने अहमद बेदी साहाब को उठाया और कहा,'He is in third largest party(Janata Dal).. he is inside the front but out side of government' और फिर मैंने कहा,'he is Mr. Ramakant Khalap,( Maharashtrawadi Gomantak Party) he is the only member of his party and he is in the government!!(Law Minister)'...

 लॉयड जॉर्ज/ लिंकन एकदा निवडणूक प्रचारासंबंधात एक "नुक्कड़ सभा" सारखी सभा घेत होते तेव्हा प्रेक्षकात बसलेला एक टारगट बाप्या ओरडला

"ह्याचा बाप एक जुना खटारा चालवत असे ज्याला घोड्या ऐवजी गाढ़वे जुंपलेली असत!"

ह्यावर अजिबात तोल न ढळू देता लॉयड जॉर्ज / लिंकन मिश्किलपणे म्हणाला की

"आज आमचे पिताजी जिवंत नाहीत किंवा त्यांचा तो खटारा ही अस्तित्वात नाहीत पण त्याला जुंपलेली गाढ़वे मात्र अजुन जिवंत आहेत"

 १९६२ सालच्या चिनी आक्रमणा नंतर पं. जवाहरलाल नेहरू , आपण गमावलेल्या १२,००० चो. मैलाच्या भुभागाचे , न पटणारे समर्थन करीत असतांना म्हणाले , " नाहीतरी त्या जमीनीवर गवताचे एक पाते उगवत नव्हते, जमीन काही कामाची नव्हतीच. " त्यावर श्री पिलू मोदी हे गुजराथ मधील खासदार , नेहरुन्च्या , तुळतुळीत टकलाकडे पाहून म्हणाले, " आपल्याही डोक्यावर असेही काही उगत नाही, तेही आपल्या काय कामाचे ? " लोकसभेत हंशा पिकला हे सांगायला नकोच.

 लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. ( कोणत्या साली ते आठवत नाही, जाणकारानी शोधुन लिहावे ) केरळमधुन काँग्रेसचे खासदार जाफर शरीफ निवडून आले होते. पहिलाच दिवस असल्याने , खासदारांचा शपथविधी सुरु होता. जाफर शरीफ यांचे नाव पुकारले गेले आणि नेमक्या त्याच वेळेला ते बाहेर निघून गेले होते. त्यावेळी नाथ पै की मधू दंडवते कोणीतरी पटकन म्हणाले , " हमारे में एक ही तो ' शरीफ ' था , वो भी बाहर गया है '! !

 अमेरीकेतील नागरी युद्धाच्या काळातला हा एक किस्सा -

दक्षिणी राज्यांविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत उत्तरी राज्यांचा मॅक्लेलान नावाचा एक सेनापती होता. हा मॅक्लेलान आपले रिपोर्ट पाठवण्याबाबत कमालीचा आळशी होता. त्याच्या एखाद्या चकमकीचा अहवाल बर्‍याचदा महिन्याभराने लिंकनच्या हाती येत असे! वैतागून लिंकनने एकदा त्याला रोजच्यारोज डिटेल रिपोर्ट पाठवण्याचा सक्तं हुकूम सोडला.

"आज आम्ही शत्रूच्या चार गाई पकडल्या आहेत!" मोजून दोन दिवसांनी मॅक्लेलानचा संदेश आला!
"ताबडतोब दूध काढून सैनिकांना पिण्यास द्या!" लिंकानने उत्तर पाठवलं!

 सर विन्स्टंट चर्चिल हे पंतप्रधान असताना, एकदा आजारी असून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांना भेटायला विरोधी पक्षाचे काही सद्स्य हॉस्पिटलमध्ये आले होते. नेमके त्याचवेळी, एक नर्स, त्यांचा नैसर्गिक विधी उरकून, ते भांडे घेऊन चालली होती. रुममध्ये त्यावेळी उपस्थित विरोधी पक्ष सदस्याना बघून सर विन्स्टंट चर्चिल म्हणाले, "First time I am seeing my 'motion' being carried unopposed.”

 जॉर्ज बर्नाड शॉने एकदा आपल्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाची दोन तिकीटं चर्चीलला पाठवली. सोबत एक खवचट चिठी होती.

"तुला एखादा मित्रं असलाच तर त्याच्याबरोबर नाटकाला ये!"
"तुझ्या नाटकाचा दुसरा प्रयोग झालाच, तर नक्की येईन!" चर्चीलने त्याच कागदावर खाली लिहून पाठवलं!

चर्चील आणि नॅन्सी अ‍ॅस्टर (ब्रिटनच्या पहिल्या महिला खासदार) यांच्यातला किस्सा आहे.

चर्चिल हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिध्द होते. एकदा विरोधी पक्षाच्या सदस्या चिडून त्यांना म्हणाल्या," मी जर तुमची पत्नी असते तर तुमच्या चहात विष मिसळले असते." क्षणाचाही विलंब न लावता चर्चिल उत्तरले,"मी जर तुमचा नवरा असतो तर तो चहा आनंदाने प्यायलो असतो!"

 बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तान चा न भूतो न भविष्यती असा पराभव केल्यावर फील्डमार्शल सॅम माणेकशॉ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. पंतप्रधान म्हणून इंदिराजींनि खेळलेल्या राजकीय डावपेचांबद्दल त्यांनाही यथोचित श्रेय मिळतच होते.

पंतप्रधान व सैन्यप्रमुख म्हणून दोघांचेही संबंध सलोख्याचे होते. परंतु या दिग्विजयी कामगिरीनंतर इंदिराजींच्या भोवती असलेल्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी इंदिराजींचे कान भरणे सुरू केले की माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर उठाव करणार आहे.

आपल्या देशाच्या सुदैवाने इंदिराजींनी कुठलेही अविचारी पाऊल न उचलता सरळ माणेकशॉ यांना पाचारण केले व स्पष्ट शब्दांत याबाबत विचारणा केली. सॅम यांनी अगदी सहजणे उत्तर दिले.

देवाने आपल्या दोघांनाही चांगले धारदार नाक दिले आहे जे आपण दोघेही एकमेकांच्या कामात कधी खुपसत नाही व यापुढेही खुपसणार नाही.

 इंग्लंडच्या उच्च संसदीय परंपरांचे उदाहरण म्हणून सांगितला जाणारा एक किस्सा...


एकदा इंग्लंडचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्यासाठी तेथील संसदेत पोचत होते. प्रवेशद्वारापाशीच एक विरोधी सदस्याला सिगारेट ओढताना पाहून ते कुत्सितपणे म्हणाले, 'महोदय, उद्यापासून ही चैन आपल्याला परवडणार नाही'.


अर्थसंकल्प मांडून झाल्या झाल्या तो विरोधी सदस्य उभा राहून म्हणाला की अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे म्हणून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. संपूर्ण सभागृह अवाक होवून पाहत असताना त्या सदस्याने सकाळचा किस्सा समजावून सांगितला. अर्थसंकल्पात तंबाखुजन्य पदार्थांवरील कर वाढवल्यामुळे सकाळी बोललेले वाक्य म्हणजे अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा शपथेचा भंग केलेला आहे.


अन आपल्याला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे अर्थमंत्र्यांनी हा आरोप मान्य करून तडक राजीनामा दिला व तो लगेच मंजूरही करण्यात आला.

 महाराष्ट्र विधानसभेत एकदा सर्व सदस्यांच्या छापील माहितीच्या सूचीवरुन चर्चा झाली. या सूचीत अनवधानाने सर्व महिला सदस्यांच्या इंग्रजीतील नावामागे मिस लावले होते. याला विवाहित महिला सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावर सभापती मधुकरराव चौधरी यांनी ती चूक दुरुस्त करण्याचा आदेश दिला आणि गंमतीने महिला सदस्यांकडे पाहून म्हणाले, ' मला खात्री आहे. सन्माननीय सदस्या आता 'मिसप्रिंट' वर आक्षेप घेणार नाहीत.

 खासदार पिलू मोदी हे मिश्किल गृहस्थ होते. लोकसभेत त्यांच्या विधानांनी खसखस पिकत असे. ते काही वेळा बिनधास्त बोलत असत. एकदा भाषणात टीका करताना ते म्हणाले, 'काही दुय्यम नेते आता स्वतःला सरकार समजू लागले आहेत. यांची पात्रता ती काय? हे नुसते आपल्या विद्यमान पंतप्रधानांचा पेटिकोट पकडून चालत चालत आलेत.' त्यावर सत्तारुढ सदस्यांनी 'पेटिकोट' शब्दाला आक्षेप घेतला आणि तो शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. अध्यक्षांनी त्यावर मोंदीकडे पाहिले. तर मोदी म्हणाले, 'महोदय, पण पेटिकोट काढून टाकला तर मग उरलं काय?' यावर तत्कालीन पंतप्रधानांनाही हसू आवरले नाही.

 दादाराजे खर्डेकर सातार्‍यात एक निवडणूक सभा घेत होते.

भाषण संपल्या नंतर लोकानी घोषणा दिल्या

शरद पवार झिंदाबाद.

त्यानंतर कोणीतरी जोरात ओरडले "दादा राजे......"

लोकाना जय म्हणावे /झिंदाबाद म्हणावे हे कळाले नाही एकदम शांतता पसरली.

कोणीतरी त्या घोषणेला उत्तर दिले ".खर्डेकर........"

सभेत एकदम हशा पिकला

 आचार्य कृपलानी हे प्रजा समाजवादी पक्षाचे तर त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी Congress पक्षाच्या खासदार होत्या. आचार्य कृपलानींनी त्यांच्या भाषणात Congress पक्षावर टिका करायला सुरवात केली. अर्थात त्यांच्या पत्नी त्याच पक्षाच्या खासदार म्हणून त्याच सभागृहात उपस्थित होत्या. आचार्य कृपलानी पुढे म्हणाले: "I knew that congressmen are crooks. Still I never expected them to run away with the wives of members of opposition parties". यावर सभागृहात हशा पिकला हे वेगळे सांगायला नको.

 एकदा महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री पार्वतीबाई परीहार ह्या त्या वर्षातील साहीत्यसंमेलनाध्यक्ष शंकरराव खरात यांच्या समवेत एकाच स्टेजवर कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्या बोलायला उठल्या पण एकदम शंकररावांचे नाव डोक्यातून गेल्याने (आपले हे, असे काहीसे म्हणत) अडखळल्या. म्हणून कोणी तरी पटकन सांगितले. कार्यक्रम सुरळीत पार पडला. पण दुसर्‍या दिवशी एका वृत्तपत्रात मथळा होता: "पार्वतीबाई, शंकररावांना विसरल्या!" 

 एका बिल ला त्यांचा पक्ष समर्थन करणार का असे विचारले असता तो नेता म्हणाला...


आय विल... (समर्थक खूश)


नॉट... (विरोधक खूश)


टेल यु... (हशा नि टाळ्या)

 बाळासाहेब भारद्यांनी केलेली भारतीय राजकारणाची व्याख्या: "काँग्रेसवाल्यांच्या खुर्च्या, जनसंघाच्या पुजाअर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा आणि कम्युनिस्टांचा मोर्चा"