दूर मनो~यात

वादळला हा जीवनसागर - अवसेची रात
पाण्यावर गडाबडा लोळतो रुसलेला वात

भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गल्बते आपुली अशा काळराती
वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो~यात
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात

कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

निर्माल्य

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी
वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी !

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस
डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !
जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,
गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,
पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

आगगाडी आणि जमीन

शिरवाडकरांची ही कविता रुपकात्मक आहे. दलित-वर्गावर होणाऱ्या अत्याचारांचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे हे चित्रण आहे.


नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -

धावसी मजेत
वेगत वरून
आणिक खाली मी
चालले झुरुन

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितिक ढाळसी
वरून निखारे!

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेहोष होऊन.

आगगाडी मात्र स्वतःच्या मस्तीत गुर्मित म्हणते -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन! धावेन!

या उन्मत्त गाडीचे बोल ऐकून जमीन सूडाने पेटून उठते.

हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!

जमीनीच्या ताकदीपुढे गाडीचे काहीही चालले नाही -

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडती खालती!


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

अनंत

एकदा ऐकले
काहींसें असें
असीम अनंत
विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा
इवला कण
त्यांतला आशिया
भारत त्यांत
छोट्याशा शहरीं
छोट्या घरांत
घेऊन आडोसा
कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही
अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी
जळ्मट जाळी
बांधून राहती
कीटक कोळी
तैशीच सारी ही
संसाररीती
आणिक तरीही
अहंता किती?
परंतु वाटलें
खरें का सारें?
क्षुद्र या देहांत
जाणीव आहे
जिच्यात जगाची
राणीव राहे!
कांचेच्या गोलांत
बारीक तात
ओतीत रात्रीत
प्रकाशधारा
तशीच माझ्या या
दिव्याची वात
पाहते दूरच्या
अपारतेंत!
अथवा नुरलें
वेगळेंपण
अनंत काही जें
त्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत
वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत
ताऱ्यांचे पाणीं
वसंतवैभव
उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....
प्रेरणा यांतून
सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें
अंतरी झरे
त्यानेच माझिया
करी हो दान
गणावे कसे हें
क्षुद्र वा सान?


कवी :- कुसुमाग्रज

निरोप

(  ह्या कवितेची पार्श्वभूमी ही फाळणीच्या काळात पूर्व पाकिस्तानात घडलेल्या एका प्रसंगाची आहे. पूर्व पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात यायला निघालेल्या एका विमानात एक माता आपल्या कोवळ्या मुलाला सोडून देते)

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!


कवी :- कुसुमाग्रज

स्वगत

शब्द - जीवनाची अपत्ये -
मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहात आहे
माझे मौन

मृत्यूसारखेच अथांग
अस्पष्ट, अनाकार
सारे आकाश व्यापून
अज्ञाताच्या प्रदेशाकडे
प्रवाहात जाणा-या
स्वरहीन संथ मेघमालेचे
मौन


कवी  - कुसुमाग्रज

हा चंद्र

या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते
त्या चंद्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी माकड,मानव, कूत्री यांना जाता येते

या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हा ही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही

नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरुन जातो फुलाप्रमणे

भग्न मंदीरावरी केधवा बृहस्पतिसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून

तट घुमटावर केव्हा चढतो, कधी विदुषक पाणवठ्यावर घसरुन पडतो
कुठे घराच्या कौलारावरुनी उतरुन खाली शेजेवरती
तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो
कुठे कुणाच्या मूक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो

अशा बिलंदर अनंतफंदी या चंद्राचे त्या चन्द्राशी कुठले नाते?
त्या चन्द्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी शास्त्रज्ञांना जाता येते
रसीक मनांना या चंद्राला पळ्भर केव्हा डोळ्यात वा जळात केवळ धरता येते

कवी  - कुसुमाग्रज