रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय

                            आमच्या घरात त्या वेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खर्वस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली.

                            "श्यामला खर्वस पाठविला असता, कोणी येणारे-जाणारे असते तर!" आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, "कोणी येणारे-जाणारे कशाला? मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खर्वस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील?"
"त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खर्वसाने भरलेले घेऊन जावे." आई म्हणाली.
आईने सुंदर खर्वस तयार केला. खर्वसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले.

                            शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत.

                            मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती. कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती. कोणी खेळत होती, कोणी झाडाखाली रेलली होती, कोणी वाचीत होती, तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होती; शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी, यांसारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूस एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस; तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत.

                            आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले "श्याम, अरे श्याम" अशी हाक मारत आली. त्यांतील एकजण मला म्हणाला, "श्याम! अरे, कुणीतरी तुला शोधीत आहे. आमचा श्याम कोठे आहे, अशी चौकशी करीत आहे." इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही.
मी विचारले, "भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो." वडिलांचा तो कसातरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांत मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखांचे कळू लागले होते. सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही! मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतरदृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भल्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची, जीवनाला सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे.

                            सहा कोस वडील चालून आले. का आले? तो खर्वस, ती एक खर्वसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात! हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खर्वस दिला असता तर? एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर? शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा, असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा?

                            परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजीत होते, म्हणून थोडेतरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्या वेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत, माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावीत होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे, ओसाड नाही, रूक्ष, भगभगीत नाही.

                            मुले मला हसतील. "ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट!" असे म्हणून चिडवतील, ह्याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे जण 'अहं वेद' असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे 'अहं!' सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू, सारे आपलेच. आपणांस म्हणून मोठे होता येत नाही. जो स्वतःस विसरू शकत नाही, तो काय प्रेम करणार?"
वडील म्हणाले, "श्याम! तुझ्या आईने तुला खर्वस पाठविला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या." त्यांनी खर्वसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, "श्याम! अरे, बघत काय बसलास? टाक उरकून! लाजायला काय झाले? या, रे मुलांनो! तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खावयाला लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी नयेच खाऊ. चारचौघांना द्यावे." इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. "ये रे श्याम! या रे आपण फन्ना करू. फडशा पाडू." असे तो म्हणाला. आम्ही सारे खर्वसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो, तर म्हणाले, "तुम्हीच खा. मुलांनीच खाण्यात गंमत आहे."

                            आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, "झाला, रे, खाऊन? आण ते भांडे. मी नदीवर घासून घेईन." ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, "अभ्यास नीट कर, हो. प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे." असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो.
                            मला माझी शरम वाटत होती; अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे, असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली; परंतु रुखरुख लागून राहिली. सहा कोस केवळ खर्वसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई! या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीणभावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन, तर त्यानेच थोडे अनृणी होता येईल. येरव्ही नाही.


********************************************************************************************
 रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण    अनुक्रमणिका    रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाऊस दे
********************************************************************************************

रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाऊस दे

                            त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला; परंतु मागून पडेना. लावणी झाली होती; परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कोठे काळा डाग दिसतो का, पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी 'जीवन' हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत, त्यांत केवढे काव्य आहे. पृथ्वीला 'क्षमा' हा शब्द ज्याने योजला, तो केवढा थोर कवी असेल! तसेच पाण्याला 'जीवन' हा शब्द ज्याने लावला, त्याचेही हृदय किती मोठे असेल! पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत! पाण्याला अमृत, पय, जीवन, अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते. पाण्याला अमृत नाही म्हणावयाचे तर कशाला? कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंडा, वाळलेल्या झाडाला पाणी घाला, सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू देत. म्हणजे पाहा कशी जीवनाला टवटवी तेथे येते ती. मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे. आई मुलाला दूध देते. परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरेपावेतो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी आहे, असे ऋषी म्हणतो. पाण्यात जीवनशक्ती आहे, तशी कशात आहे? पाण्याचा महिमा कोण वर्णन करील? पुन्हा निरुपाधी! ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही. जो रंग द्याल, जो आकार द्याल, तसे ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचे रूप आहे.

                            त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना. अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा, म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकावयाचा. भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हांडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात. सात दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. सात दिवसच नाही, तर पाऊस पडेपर्यंत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो, त्याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून ते देत. तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत.

                            शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या-त्या ऋषीच्या-डोळ्यांसमोर सर्व ब्रम्हांड आहे, असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्याच्या डोळ्यांसमोरून जात आहे, असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यांसमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे, असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री बारानंतर पाळी येत असे.

आई मला म्हणाली, "जा ना रे देवळात. तू पाणी आणावयास नाही का लागत, जा."
"मला नाही उचलणार हे हंडे. केवढाले हंडे व घागरी!" मी म्हटले.
"अरे, आपली लहान कळशी घेऊन जा. नाही तर तांब्या नेलास, तरी चालेल. विहिरीतून एकेक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा." आई म्हणाली.
"एवढासा तांब्या ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील की, झारी नाही तर पंचपात्रीच घेऊन जा. लोक हसतील तेथे!" मी नाखुशीने म्हटले.
"श्याम! कोणी हसणार नाही. उलट, तू मोठी घागर उचलू लागलास, तर मात्र लोक हसतील. आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईट; परंतु आपल्याला जेवढे करता येईल, तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट. हे साऱ्या गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही, तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. कामचुकारपणा वाईट. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला, तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या. या साऱ्यांची शक्ती सारखी का होती? तू उगीच वाचतोस मात्र. असले नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळेचीही नाही का गोष्ट? मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठेमोठे वानर पर्वत आणीत होते. परंतु ती लहानशी खार. तिला वाटले, आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते. त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिकटत, तिच्या केसांत अडकत, ते सेतूजवळ आणून ती टाकी. तेथे जाऊन ती अंग झाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती, त्याप्रमाणे ती काम करीत होती. तुला हंडा उचलत नसेल, तर कळशी घे. कळशीने दमलास, तर तांब्या आण. त्यानेही दमलास, तर फुलपात्र ने. जा श्याम? किती रे सांगायचे?" आई मला समजावून सांगत होती.

                            शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती, शंकराला कोंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यांत मिळालो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, "श्याम, आज आलास वाटते? तू इंग्रजी शिकतोस, म्हणून लाज वाटत होती वाटते?" मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हेत, हो, संस्कृत नव्हेत, हो. त्यांचे मंत्र मराठीत होते.
"सांब सदाशिव पाऊस दे
शेते भाते पिकू दे
पैशाने पायली विकू दे"
हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतभाते पिकोत, स्वस्ताई होवो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणावयास लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मीही मोठमोठ्याने 'सांब सदाशिव पाऊस दे' म्हणू लागलो; मीही त्या मुलांत मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो.

सामुदायिक कामात आपणांसही जे करता येईल, ते आपण निरलसपणे केले पाहिजे, त्यात लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे. हत्तीने हत्तीप्रमाणे.



********************************************************************************************
 रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय   अनुक्रमणिका   रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी
********************************************************************************************

रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी

                            आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यांतीलच ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हां मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, "श्याम! तुला पाहिजे की काय अंगठी?" त्यांनी असे विचारले, म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे; परंतु एकाही बोटात ती बसत नसे! ती खाली पडे. "अरे, जाडा हो जरा, मग बसेल हो ती." असे मग ते हसून म्हणावयाचे.

                            मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला. परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचीत असे; परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांचा लेखांचा फार परिणाम झालेला आहे. यांतील तेजस्वी, सोज्ज्वल, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केले होते. परंतु त्या वेळेस मला हे भाग मिळाले नाहीत. माझ्या कोणीतरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले, "तुला रे काय समजणार त्यात?" मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता. कारण मी सहृदय होतो. मी कविहृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्या- पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रद्धामय व भावमय झालेले होते. मला वाटले, "आपण भाग विकत घ्यावे." परंतु पैसे कोठून आणावयाचे! वर्गातील पुस्तकेही सारी मजजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो; परंतु एकही कोश मजजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थांचे भाग आपणांस पाहिजेतच, असे मला वाटले.

                            आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक लांबवावी, असे मी ठरविले. दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप होते; परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे, असे मला वाटले! माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवीत होतो.
'आस ही तुझी फार लागली
दे दयानिधे बुद्धि चांगली'
बुद्धि चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवीत होतो; परंतु चोरी करून बसलो होतो! माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक पाच रुपयांची नोट कमी!
"भाऊराव! पाच रुपये कमी भरतात. एक नोट नाही." ते पाहुणे म्हणाले.
"नीट पाहिल्यात का साऱ्या खिशांतून? कोणाला दिली तर नाहीत?"
माझे श्लोक शिकवणे सारे थांबले, चोराला कोठली झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो.
"आई! तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही, वाटते?" मी विचारले. "बाळ, इच्छा कोठे आहे? दोन घास कसेतरी बळेच पोटात दवडावयाचे. दोन धंदे झाले पाहिजेत ना? पाणीउदक करता आले पाहिजे ना? तुम्ही कधी मोठे व्हाल-इकडे लक्ष आहे सारे." आई म्हणाली.
"आई! मी खरेच मोठा होईन. पुष्कळ शिकेन. खूप वाचीन!" मी म्हटले.
"शीक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात, म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत, तरी मनाने चांगले राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील; परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते." आई म्हणाली. ती प्रेमळ, थोर माता किती गोड सांगत होती! माझ्या अशिक्षित आईला असे चांगले चांगले विचार कसे सांगता येत, याचे मला आश्चर्य वाटे. महंमदाला लोक म्हणत, "तू देवाचा पैगंबर असशील, तर चमत्कार करून दाखव." तेव्हा महंमद म्हणाला, "साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत. मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा काय चमत्कार नाही? त्या अफाट सागराच्या वक्षःस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुरीची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का?" असे सांगत शेवटी महंमद म्हणाला, "माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का?" मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आईसुद्धा कळकळीनेच मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते. हृदयगाभार्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी श्रुतिस्मृती होती.
                            "मोठा नाही झालास, तरी गुणी हो." थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो! इंग्लंडात ट्यूडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडेतिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे, की, "त्या वेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते." कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यातसुद्धा विंचू आहेत. ते तुम्हांस झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात, तरी ते गुप्त दूत आहेतच. सदसद्विवेकबुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे.
"घरात तर कोणी आले नाही. चमत्कारच म्हणावयाचा!" वडील म्हणाले.
"श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा यांशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम! अरे श्याम!" बळवंतरावांनी हाक मारली.
मी गेलो. "काय?" मी विचारले. बळवंतराव म्हणाले, "श्याम! तुझा कोणी मित्र वगैरे आला होता रे? एक नोट नाहीशी झाली आहे."
मी म्हटले, "नाही, बोवा. मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते."
वडील म्हणाले, "श्याम! तू तर नाही घेतलीस? घेतली असलीस तर सांग."
"छे, हो! तो कसा घेईल?" बळवंतराव म्हणाले.
आई हात धुऊन आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपुट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारले, "श्याम! अगदी खरेच नाही ना घेतलेस पैसे तू? कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपासपेटीसाठी पैसे मागत होतास."
आई म्हणाली, "श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला रुसला, तरी कोणाच्या वस्तूस हात लावावयाचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले, तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होतीन् त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, "मी घेतली हो, आई." श्याम घेणार नाही व घेईल, तर कबूल करील. "श्याम! तू नाही ना बाळ हात लावलास?"
आईचा माझ्यावर केवढा विश्वास! "आधी घेणार नाही. घेईल, तर कबूल करील." तिची माझ्यावर केवढी श्रद्धा! आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे
'विश्वासाची धन्य जाती' - ज्याच्यावर विश्वास टाकता येतो, त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझा असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला.

                            माझ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप-पर्वत पडला. "श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीस घ्यायचास. मला माहीतच आहे. उगी!"असे आई म्हणाली.
आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाणे रडत आईला म्हटले, "आई तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, आई!"
माझ्याने बोलवेना. आईला वाईट वाटले. "माझा मुलगा घेणार नाही!" केवढा तिचा विश्वास! स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला; परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रू राखली. "घेणार नाही; परंतु घेईल तर कबूल करील." तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही; परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला.
"श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. उगी!" आईने माझी समजूत घातली.
बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला एक रुपया दिला; परंतु तोही मी आईजवळ दिला.
"श्याम! तू का रे घेतले होतेस ते पैसे?" आईने विचारले.
"आई! मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी!" मी म्हटले.
"अरे, पण पहिलीच्या पुस्तकात 'चोरी कधी करू नये', असे वाचलेस, ते तर अजून शिकला नाहीस? मग आणखी दुसरी पुस्तके कशाला?" माझी आई बोलली; परंतु ते बोलणे फार खोल होते.
गड्यांनो! पतंजलिच्या भाष्यात, म्हणे एक असे वाक्य आहे, की "एकः शब्दः सम्यक् ज्ञातः स्वर्गे लोके कामधुग्भवति!' एकच शब्द; परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल, तर मनुष्याला मोक्ष मिळतो. "सम्यक् ज्ञातः" नीट समजलेला; वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले, ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते, कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, "लाव, लाव हात!" ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवितो, तेच ज्ञान.

                            "चोरी करू नये" हे वाक्य मी पढलो होतो; परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम अहिंसा, ब्रम्हचर्य-लहान शब्द. आपण पटकन ते उच्चारतो; परंतु त्यांची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत!


********************************************************************************************
 रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाऊस दे  अनुक्रमणिका   रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस... मनाने
********************************************************************************************

रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस... मनाने

                            मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे! नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. "गंधवती पृथ्वी" या वचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला.
                            घरून दापोलीस येताना या वेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, "तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको धरू हट्ट." मित्रांनो! माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसांत धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते. जाकिटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरांत तर विचारूच नका. परंतु खेड्यांतूनही कितीतरी कपडे लागतात. वारा, प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल, तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो! परंतु त्या सृष्टिमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणांस जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, "जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात." रशियातील मुले फार थंडी नसली, म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवीत आहे.
माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला दोनतीन गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा, असे मी ठरवून आलो होतो; परंतु पैसे कोठून आणावयाचे?

                            माझे वडील कोर्ट-कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्र्य येत होते, तरी कज्जेदलाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट-कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही. स्वतःचे संपले, तर दुसऱ्याचे खटले चालवावयास ते घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला, तर मला इतके पैसे; खटला फसला, तर झालेला खर्च सारा माझा." असे सांगून खटला चालविण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत.
                            वडील दापोलीस आले, म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे. खाऊच्या पैशातील एक पैही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरविले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेशचतुर्थीला तीन महिने होते. तेवढ्या महिन्यांत या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता, गणेशचतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असे मी मनात निश्चित केले.
ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेशचतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ एक रुपया दोन आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील; परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईन.

                            मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. दोन वार कापड घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला.
                            तो कोट हातात घेतला, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात; परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले.
                            मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो, ते म्हणाले, "पावसापाण्याचा जाऊ नकोस. नदीनाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्ह्या, सोंडेघरचा पर्ह्या यांना उतार नसेल; आमचे ऐक." मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता, तर नदीनाल्यास थोडीच भीक घालणार!
                            नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते, तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल, या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसा बाहेर आलो, देवाला माहीत! माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला! तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्याइतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो.

                            रस्त्यावरील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड् कडाड् आकाश गरजत होते. विजा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत हेते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो.
                            शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. "आई!" मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते.
"अण्णा आला, आई, अण्णा!" धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले.
"इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?" आई विचारू लागली.
"सोंडेघरच्या पर्ह्याला पाणी नव्हते का रे?" वडिलांनी विचारले.
"हो! परंतु मी आलो कसातरी!" मी म्हटले.
"त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून!" वडील म्हणाले.
"गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ. कढत पाण्याने आंघोळ कर." आई म्हणाली.
मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते, की काही तरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो.
परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट! तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते! ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती.
"अण्णा हा लहानसा कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे?" धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला.
"मग सांगेन. घरात जा घेऊन." मी म्हटले.
"आई! हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलान्. होय, आई?" धाकटा भाऊ आईला विचारू लागला.
आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो.
आई म्हणाली, "श्याम! हा कोणाचा कोट?"
"मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठविला असेल!" वडील म्हणाले.
"नाही. हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे." मी म्हटले.
"पैसे, रे, कोठले? कोणाचे कर्ज काढलेस? का फीचे दवडलेस?" वडिलांनी विचारले.
"कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?" आईने कातर स्वरात विचारले.
"आई! त्या दिवशी तू सांगितले होतेस "हा पहिला व शेवटचा हात लावलेला." ते मी विसरेन का? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत." मी म्हटले.
"मग उधार का शिवून आणलास, श्याम?" वडिलांनी विचारले.
"भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा, दोन आणे देत असा; ते मी जमविले. गेल्या दोन-तीन महिन्यांचे सारे जमविले. त्यांतून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, "तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट." मी मनात ठरविले होते, की गणपतीला नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का?" मी म्हटले.
"अण्णा! हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा! आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई, बघ!" पुरुषोत्तम आईला दाखवू लागला.
                            मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली, "श्याम! तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस; परंतु मनाने मोठा आजच झालास, हो. हेच प्रेम, बाळांनो, पुढेही ठेवा. या प्रेमावर, देवा, दृष्ट नको कुणाची पाडू!"
वडिलांनीही माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या.
"आई, याला कुंकू लावू?" पुरुषोत्तमाने विचारले.
"बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून, देवांना नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणायला जा, हो." आई म्हणाली.



********************************************************************************************
 रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी     अनुक्रमणिका     रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ
********************************************************************************************

रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ

                            राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात, असे नाही; तर चांगल्या गोष्टींचेही असतात.

                            "श्याम! आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम! तू ज्या आठवणी सांगतोस, त्या असतात साध्या; परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले; तसे तुझ्या या लहान गोष्टींत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम! काल मी रामजवळ म्हटले, की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टीरूपाने तू धर्म सांगत आहेस; धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणांस ओतता येईल, हे तू दाखवीत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीणभावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम! तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले! त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास. त्या वेळेस मला गहिवरून आले होते. श्याम! आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही?"
                            "राजा! अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे; तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो, तेव्हा संगीतगायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने व कळकळीने भरून काढतो. राजा! मजजवळ दुसरे काय आहे? काही नाही. खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता. मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्दवेल्हाळ मी; परंतु तुम्ही कार्यवेल्हाळ आहात. राजा! मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात! तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी मजजवळ काही नाही, हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात." श्याम बोलत होता.
इतक्यात राम आला.
"काय, रे, राम? गाडी आली की काय?" श्यामने विचारले.
"नाही. बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा! रात्री जा, काही उशीर होणार नाही!" राम म्हणाला.
"देवाची इच्छा!" राजा म्हणाला.
                            सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदीतीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातांत घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते.
"श्याम! चला परत जाऊ." राजा म्हणाला.
"राजा! असे भव्य सृष्टिदर्शन झाले, म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा." श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती.
शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एकेक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एकेक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती.
श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.

                            आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते, त्या वेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामस्तीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस्तीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्याइतकी सशक्त राहिली नव्हती, तरी हिंडू-फिरू शकत होती, दोन धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडीची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ, वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरास जावयाचे, असे ठरले होते.
                            आई केव्हा येते, याची मी वाट पाहात होतो. किती तरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती! बारा वर्षांत पालगडच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवापालट, ना कधी थारेपालट. आई आली. दापोलीहून लाडघरास जाण्यासाठी मी गाडी ठरविली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर तीन कोस होते. तीन तासांचा रस्ता होता.
                            पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरविले होते. सकाळी सात आठ वाजता पोचू, असे वाटत होते.
गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टिमंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या! फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टिमंदिरात काकड-आरती सुरू झाली होती.
                            गाडीमध्ये मी व माझी आई दोघे जणच होतो. मी व माझी आई; माझी आई आणि मी. दोघे, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय चौदा-पंधरा वर्षांचे होते; तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली, असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती.
"किती रे भरभरीत शेंडी? श्याम? तेलबील नाही वाटते लावीत कधी?" आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो.
सुखावले मन
प्रेमे पाझरती लोचन
अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी, आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे, आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी. होय. आम्हां दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही; तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन, वगैरे मनोरथ मी मनात मांडीत होतो. मनोरथाचे मनोरे रचावयाचे व पाडावयाचे, हा मनाचा चंचल स्वभावच आहे.

आई मला म्हणाली, "श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली?"
"आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई, मला थोपट. आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे, असेच मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण." माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धो धो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडांवरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती; परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती. तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ; परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. या वेळेसही तोच अनुभव आला.
घनदाट या रानात
धो धो स्वच्छ वाहे पाणी
माझ्या श्यामच्या जीवनी
देव राहो
आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो.
आईने विचारले, "काय, रे, उठलाससा? कंटाळलास, वाटते? नीज, हो. माझी मांडी दुखायची नाही."
मी म्हटले, "आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का?"
                          
                            दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा, की तिथे हा आनंद तुम्हांला भेटेल.

                            दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैलरहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कुऊ कुऊ आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळीपोफळीचे-नारळींचे आगर. मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी.

                            आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हांस माहीत नव्हते. विचारीत विचारीत चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते.

                            सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुद्धा किती तरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती.

                            आईला एकदम पाहताच चकितच झाली. "वयनी! ये. किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत!" अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. "आणि हा कोण?" तिने माझ्याकडे पाहून विचारले.
आई म्हणाली, "सुभ्ये! हा श्याम हो. लहानपणी हट्ट करणारा. सर्वांशी भांडणारा तो हो हा. तुला नाही का आठवत?"
"बराच की रे मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते?" सुभाताईने विचारले.
"हो, मी चौथ्या इयत्तेत आहे." असे मी उत्तर दिले.
त्या प्रेमळ, भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, "वयनी, समुद्रावर आताच स्नाने करावयास जा; म्हणजे दहा-अकरा वाजायला परत याल. दुपारी जेवणे-खाणे झाल्यावर देवीला जाऊ; म्हणजे सायंकाळी तुम्हांला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढी आल्यासारखी आठ दिवस राहतीस, तर किती चांगले झाले असते! मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का?"

"सुभ्ये, ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आल्ये आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो." आई म्हणाली.

                            आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोरात निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस्तीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो! अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र.

                            आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे, ते त्यांनी आम्हास दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. "येथेच लाल पाणी का बरे?" असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला.
ते म्हणाले, "देवाचा चमत्कार; दुसरे काय?"
आई म्हणाली, "येथे देवाने राक्षसास मारले असेल, म्हणून हे पाणी लाल झाले!" सुभाताईचे यजमान म्हणाले, "हो! तसा तर्क करावयास हरकत नाही."

                            लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुऊ लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत खेळत-खिदळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपासमुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते, तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदकुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली; चार आणे समुद्रात फेकून दिले! मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने चार आणे दिले! ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने, निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काही तरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहात असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकावयाला?
                            कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली, तो बारा वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नानसंध्या, देवतार्चन, पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या, आगराच्या कामास लागत असत.

                            आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा आंगरस काढला होता; नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकढे तूप होते.

"श्याम, श्लोक म्हण चांगलासा." आई म्हणाली.
मी "केयूरा न विभूषयन्ति पुरुष" हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला.
"इंग्रजी शाळेत जातोस, तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते? अलीकडच्या मुलांना चार श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे, श्याम!" त्यांनी मला विचारले.
"दुसरा." मी सांगितले.
"वा! चांगला हुशार दिसतोस!" ते म्हणाले.
सुभाताईचा मुलगा पाच वर्षांचा होता व मुलगी दोन-अडीच वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखविला.
"श्याम! खांडवी घे हो आणखी. लाजू-बिजू नकोस." सुभाताई म्हणाली.
"श्याम मुळी साऱ्या जगाचा भिडस्त. येथे नको हो लाजायला! श्याम!" आई हसत म्हणाली. माझी आईही जेवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली, "वयनी! तू आपली सावकाश जेव. त्यांना जाऊ दे उठून."

                            साऱ्यांची जेवणे झाली. ओल्या पोफळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे; परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवराआवर केली. दोघी जणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलग्याबरोबर मी आगरात गेलो. आगरातील मजा पाहात होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात. परंतु फार असले, म्हणजे त्यांना कोण विचारतो! केळफुलाची एकेक पारी उघडत होती व केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते. त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुभाताईने हाक मारली, म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला.

"श्याम! त्या पपनशीवरची दोन-तीन पपनसे तोडून आण. दोन येथे फोडू व एक बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल." सुभाताईने सांगितले.
"कोठे आहे झाड?" असे मी विचारताच "चल, मी दाखवितो, मामा!" असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुखडीएवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती; परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून दोन-तीन पपनसे पाडली, पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली, की रानात देवाला जावयाचे तेथेच पपनसे फोडावी. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, "रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा." पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे.

                            देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायांवर वाहिल्या. खणनारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोर्यात आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते, मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने, तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो.

                            देवीच्या पाया पडून आम्ही घरी आलो. आम्हांला आता परत दापोलीस जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला.
"तू दापोलीस जवळच आहेस; एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे, तर येथे येत जा. ऐकलेस ना, श्याम!" सुभाताई म्हणाली.

                            तिचे यजमान म्हणाले, "श्याम! येत जा, रे. आम्ही काही परकी नाही. अरे गेल्या-आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार. ये हो!" मी 'हूं' म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली. पपनसेही दोन घेतली.

                            "सुभ्ये, येते हो!" आई म्हणाली. आई निरोप मागू लागली.
"वयनी! आता पुन्हा, ग, केव्हा भेटशील?" सुभाताई भरल्या मनाने म्हणाली.
आई म्हणाली, "सुभ्ये! देवाला माहीत, केव्हा भेटू, ते. बारा वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडल्ये. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे दोन भाऊ पुण्या-मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेल्ये तर! परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी? सुभ्ये, गेली पाच वर्षे सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला, की पडावे अंथरुणावर; घाम येऊन ताप निघाला, की उठावे कामाला. घरात तरी दुसरे कोण आहे? गरिबाला दुखणी येऊ नयेत हो. पापच ते. जिभेला चव मुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कसे तरी दोन घास घशाखाली ढकलायचे. असो. देवाची इच्छा! आपण माणसे तरी काय करणार दुसरे. आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा. हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दुःख उगाळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस; तुझा प्रेमळ स्वभाव, म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू. चंद्री नि तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू, म्हणून बोलत्ये. जरा दुःख हलके होते. बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो, हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे." असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईनेही डोळ्यांना पदर लावला.

"वयनी! आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वयनी! श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही हो ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी!" सुभाताई म्हणाली.

आई म्हणाली, "हो. तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला, की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे, येत्ये हो!" असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात एकेक रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला.
"वयनी! रुपया कशाला?" सुभाताई म्हणाली.
"राहू दे, ग! मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुभ्ये, तुझी वयनी आता श्रीमंत नाही, हो. असू दे हो तो रुपया." असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली.

                            आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली.
                            सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामस्तीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तास जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या-भागलेल्या सूर्याला सहस्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. बुडाला, सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्या वेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता.

दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्रांची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली.
"आई! पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई! तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे, असे वाटते." मी आईचा हात हातात घेऊन म्हटले.

                            आई म्हणाली, "तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका, सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुद्धा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर! आपल्यात म्हण आहे ना? "काशीस जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे." जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी हो सोय आहे. बाळा! आपण कोठे जावयाचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिणे! पुरे हा संसार! कोठल्या यात्रा नि बित्रा! अरे, ही संसारयात्रा हीच मोठी यात्रा, हो! या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रूनिशी मला डोळे मिटू दे, म्हणजे झाले."

डोंगरावर धो धो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यांतूनही शांत प्रवाह होता. गालांवर घळघळत होता. त्या पवित्र गंगा-यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले.
"आई, तू मला हवीस, आम्हांला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस, तर कोणासाठी शिकावयाचे, कोणासाठी जगावयाचे? आई! तुला देव नाही हो नेणार!" असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेविले. जणू त्या वेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवीत होतो.
"देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले." आई म्हणाली.

                            आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेविले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले, "आई! तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील चार दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई! आपलेही तसेच सारे चांगले होईल. नाही का? आपले दारिद्र्य जाईल. चांगले दिवस येतील."

"श्याम! देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो. विषाचे अमृत करतो, सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसाराची माणसे. आपली कोठे तेवढी लायकी आहे?" आई म्हणाली.

"आई! देवाची कृपा नेहमीच असते. होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हालपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच, असे म्हणतात, ते खरे का ग?" मी प्रश्न विचारला.

"बाळ! तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे. देव जे जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले, ते तुझ्या बऱ्यासाठी ना? मग माझ्याहून, किती तरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रद्धा असावी." आई जणू श्रद्धोपनिषदच गाऊन राहिली होती.

                            एकदम माझे लक्ष समोर गेले. "वाघ! आई! वाघ!" मी घाबऱ्या घाबऱ्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा! काय ती ऐट! उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो. तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यावयाला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत. गाईगुरे, मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता.
                            हळू हळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री नऊ वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही. दुसऱ्या दिवशी गेली.
                            मित्रांनो! तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कोठे गेलो नाही. तो एकच दिवस! त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टिमाऊलीच्या-समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो. प्रेमात डुंबलो. हृदये हृदयांत ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने, अस्सल शंभर नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती.

                            असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंतःकरणाने गेली.


********************************************************************************************
 रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस... मनाने           अनुक्रमणिका         रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
********************************************************************************************
 

रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक

                            त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे; परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते; भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा. दीनपणा.

                            सावकाराचा माणूस! वडील त्याची बरदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेविली. "कढी कर व कढीत कढीलिंब टाक, म्हणजे वास लागेल." अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती; तरी शेजारून आई घेऊन आली. चहापानानंतर आईने कढत पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली; परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर! श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास २५ रुपये दंड झाला, असे मी वाचले होते! शेतकरी! शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम! साऱ्या खुशालचेंडूंना पोसणारा तो जणू पशू! असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो? मित्रांनो! हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे, कावळे चालतील; घरात पोपट-मैना चालतील; परंतु हरिजन खपणार नाही! पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत, तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार?
                            त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा, असाही ईश्वराचा हेतू असेल! परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य असे, कोठून करवून घेईल, याचा नेम नसतो.

                            माझे वडील शेतावरून आले. "तुमचे स्नान वगैरे झाले का?" असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो 'होय' म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्या जवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावयाचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन, असे तो म्हणाला. "बरे, मी स्नान करतो; लौकरच पूजा वगैरे आटोपतो. तुम्ही थोडी विश्रांती घ्या." असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, "त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून? कोठून आणून द्यायचा होतास." आई म्हणाली, "सारे काही दिले. त्याचे धोतरही धुऊन वाळत घातले आहे. एकदाची धिंडका जाऊ दे येथून लवकर."
                            आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते, तरी त्यांची मनातील, खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लौकरच देवळातून परत आले.
                            "उठा, वामनराव, हातपाय धुवा." असे वडील त्यांना म्हणाले.
"या, बसा येथे. सोवळे नसले तरी चालेल. काही हरकत नाही." असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हांस सोवळ्या- ओवळ्यासाठी बोलावयाचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदोउदो करणे, एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्त्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्नमुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने; पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने; ह्या खोट्या कुलाभिमानामुळे; आंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे; भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्टकचेर्यांमुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे; कर्ज उरावर बसत होते, तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे! गड्यांनो! तुमच्या बायकामाणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल, तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच, तर शेतभात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा.
                            पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. "पुरुषोत्तम! छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील, असा म्हण." वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला; परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय मोठे नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदार होत चालले होते; आढ्यताखोर व दिमाखबाज होत चालले होते.
                            "संकोच नका करू वामनराव; भाजी घ्या आणखी, वाढ ग आणखी एक पळीभर." असे आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल! चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी, लवंग देण्यात आली. त्यांना प्यावयाला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवावयास बसली.
                            "मग काय, भाऊराव! व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज पंचाहत्तर रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दवडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावयाला म्हणून आलो." वामनराव बोलू लागले. "हे पाहा, वामनराव! दहा मण भात होते ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून पंचवीस रुपये तुमच्यासाठीच बांधीव तयार ठेविले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी चार शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठी होऊ देत-मिळवती होऊ देत-एक यंदा प्रीव्हिअसमध्ये गेला आहे. हे पाहा, वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात? तेही बाहेर पडतात." माझे वडील अजीजी करून सांगत होते.
"ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधलेत, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकविण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत; फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो! सावकारांचा वसूल आला नाही, तर आम्हांला तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही. आम्हांलाही मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते. रुपये द्या." वामनराव रागाने, बेमुवर्तखोरपणे बोलत होता. तो तरी काय करील? तोही गुलामच!
"वामनराव! काय सांगू तुम्हांला? घर ते काय? अहो केंबळी घर. मापाच्या भिंती! तिचा आग्रह म्हणून बांधली मठी, उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधावयासही तिच्या हातांतल्या पाटल्या विकाव्या लागल्या!" वडील शरमिंदे होऊन सांगत होते.
वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यांतील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता, भात गिळवत नव्हता.
"घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका." असे वामनराव निर्लज्जपणे बोलला.
                            विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुऊन ती बाहेर आली. तिच्या डोळ्यांतून शोकसंतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, "या ओटीवरून चालते व्हा! बायको विका, असे सांगायला तुम्हांला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हांला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा, की घरादाराचा लिलाव करा. परंतु असे बोलणे ऐकवू नका. खुशाल. दवंडी पिटा, जप्ती आणा. परंतु पोराबाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका."
"ठीक आहे. आम्ही तरी त्याचीच वाट पाहात आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली, तर मी वामनराव नव्हे! एका बाईमाणसाने, भाऊराव, आमचा असा अपमान करावा का?" वामनरावांनी वडिलांस विचारिले.
"तू घरात जा. जातेस की नाही?" माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता पंचवीस रुपये घेऊन कारकून निघून गेला.
                            वडील घरात आले. "तुम्हां बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हांला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो! त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे, एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडीगुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना?" वडील आईला बोलू लागले.
                            "पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीसफिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव, आपणही मोलमजुरी करू, मथुरीच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूरसुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला, आपण मोलमजुरी करू, धरित्रीवर निजू, झऱ्याचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला." आई भावनाविवश झाली होती.
"बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली, म्हणजे समजेल सारे!" असे बोलून वडील बाहेर गेले.
धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, "आई! रडू नकोस. तू रडलीस, म्हणजे आम्हांला रडू येते. आई! तू सांगशील, ते काम आम्ही करू. रडू नकोस, आई!"

लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती! फुले झाडाला आधार देत होती! करुण असे ते दृश्य होते.


********************************************************************************************
 रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ           अनुक्रमणिका         रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ
********************************************************************************************

रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ

                            श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!
"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत?" रामने विचारले.
"राम! आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते, रे! हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे! जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग! लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत! कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले! पारतंत्र्य सर्वभक्षक आहे. सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही; शोक आहे, आनंद नाही; कृतघ्नता आहे, कृतज्ञता नाही; लोभ आहे, प्रेम नाही; पशुत्व आहे, माणुसकी नाही; अंधार आहे, उजेड नाही; अधर्म आहे, धर्म नाही; भीती आहे, निर्भयता नाही; बंधने आहेत, मोकळेपणा नाही; रूढी आहेत, विचार नाही. हे विराण दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये, तर काय करू?"
श्याम बोलेना. "श्याम! दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे; अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे, बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक." राम म्हणाला.
"परंतु मी वीर नाही; तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे, असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो; माझी ऐट उसनी असते; ती जिवंत आशा नसते." श्याम म्हणाला.
"निराश होणे म्हणजे देवाला विसरणे, निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल. अंधारातून उजेड येईल, असे मानणे म्हणजेच आस्तिक्यभाव." राम म्हणाला.
"परंतु निशा संपून आलेल्या उषेची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे, ते मला समजत नाही. जाऊ दे. फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल, ते करावे. दगड उचलावा; काटा फेकावा! फूलझाड लावावे; रस्ता झाडावा; कोणाजवळ गोड बोलावे; गोड हसावे; आजाऱ्याजवळ बसावे; रडणाऱ्याचे अश्रू पुसावे. दोन दिवस जगात राहणे! माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार!"
"अरे, आपण संघटना करू. नवविचार फैलावू; दैन्य हरू; भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे." राम म्हणाला.
                            प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थनामंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते. परंतु हा दिव्य, अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता? श्याम म्हणजे आशा-निराशांच्या द्वंद्वयुद्धाचे स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल. आज उड्या मारील व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते.
                            प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला-
"गड्यांनो! दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काही तरी बोलण्यासाठी मी गेलो होतो."
"आई! या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, 'अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली.' आई! आपण एकदा श्रीमंत होतो, ते लोकांना माहीत आहे; परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही; सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो."
"श्याम! तू आता शाळा सोडून दिली पाहिजे." आई शांतपणे म्हणाली.
"आई! आताशी तर पाचवी इयत्ता माझी पास झाली. एवढ्यात शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमावता येणार आहे?" असे मी आईला विचारले.
"तुला कोठेतरी रेल्वेत लावून देऊ, असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठे नोकरी, मिळाली, तर." आई म्हणाली.
"आई! एव्हापासूनच का नोकरी करावयास लागू? या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ? आई! माझ्या केवढाल्या उड्या, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने! मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन! आई! साऱ्या आशांवर पाणी ओतावयाचे? सारे मनोरथ मातीत लोटावयाचे?" मी जणू कवी होऊनच बोलत होतो; भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती.
"श्याम! गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात!" आई म्हणाली.
"आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे, असे तुला वाटते! मी मोठा व्हावे, असे तुला नाही वाटत?" मी आईला विचारले.
"माझ्या मुलाने मोठे व्हावे; परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे; पित्यावर विसंबून रहावयाचे तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे." आई म्हणाली.
"आई! मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकविलेस, या वेळेस काय करू? ते तूच सांग." मी आईला म्हटले.
"आईबाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले, तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा, उपासतापास काढ, आयाससायास कर, विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास, तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू?" आईने स्वावलंबनाचा उपदेश केला.
"आई! मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस! माझ्या हृदयात तू आहेस, म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई! तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे, तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे? तेथे कोणाला माहीत आहे? कोणाचे काही काम करीन; तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना?" आईला मी विचारले.
"जा. माधुकरी मागणे पाप नाही; विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नको, पाप करू नको. सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल, ती मदत देत जा. गोड बोलावे. हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको, हृदये दुखवू नको, अभ्यास झटून कर, आईबापांची आठवण ठेव; बहीणभावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील. सन्मार्गावर ठेवील. जा. माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर." आई प्रेरक मंत्र सांगत होती. तारक मंत्र देत होती.
"आई! तू भाऊंची परवानगी मिळव; त्यांची समजूत घाल." मी सांगितले.
"मी तुला ती मिळवून देईन. निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते." असे आईने आश्वासन दिले.
रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते. कुळिथांचे पिठले होते. "म्हटले, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला." आई वडिलांना म्हणाली.
"कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रुपये मोजले; परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालली नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये, असे का मला वाटते? आपल्या होतकरू, बुद्धिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये, असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय?" असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले.
"तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण, म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे, म्हणजे झाले." आई म्हणाली.
"काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर, असे काही माझे सांगणे नाही. फक्त, मी शिकवायला असमर्थ आहे, एवढेच. माझा आशीर्वाद आहे." वडील म्हणाले.
आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. "आई! मग अण्णा जाणार वाटते? लांब जाणार, लौकर परत नाही येणार?" धाकटा पुरुषोत्तम आईला विचारीत होता.
"हो, बाळ; तो शिकेल व मग तुम्हांला शिकवील. तुम्हांला शिकविता यावे, म्हणून तो लांब जात आहे." आई त्याची समजूत घालीत होती.
                            शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले.
वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता, तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो! इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुर्रकन आईजवळ उडून येत होते; परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे-जाणे थोडेच होणार! प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार! मला दहा रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो; पुढे आईबापांस सुख देता यावे म्हणून जात होतो; आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो; हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यांतील पाण्याला थांबवीत होतो. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? "श्याम! तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव, रे, माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही होत आहे." असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे, म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? "आई! मी थारोळे भरून ठेवतो." म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागरकळशी कोण भरून आणील? मी घरी गेलो, की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईन, याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण? मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई; तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया. साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच; एक तोच.
                            माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावयाची होती. आज रात्री जाणार, हो जाणार; आईला सोडून जाणार! आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या. एक घोंगडी काढली. मी आईला म्हटले, "घोंगडी कशाला मला? एक तरट खाली घालीन; त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे. मला नको."
"अरे तू परक्या मुलखात चाललास. तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले, तर असू दे आपली. बाळ! आमचे येथे कसेही होईल. माझे ऐक."
असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसांत ओठ फुटू नयेत, म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला; आगबोट लागू नये, म्हणून चार आवळ्याच्या वड्या दिल्या, चार बिब्बेही बरोबर असू देत, असे म्हणाली व लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणिले. माझी ममताळू, कष्टाळू आई! बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते.
                            रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटले, "आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो, बाळ. आईला आता तू!" असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली, ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरविला. ते काही बोलू शकले नाहीत. आणि आईच्या पायांवर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकीवयनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, "माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा." "जा, हो, श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू" त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. "सांभाळ!" ती म्हणाली. मी मानेने हूं म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळंबला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते. कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचे होते. तिठ्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लाविले. त्याच्या चरणींचा शेंदूर कपाळी लावला. "माझ्या मायबापांना जप!" असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलाच्या पाया पडलो. "जप, हो, बाळ. सांभाळ." ते म्हणाले.
मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन-समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार? ह्या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील? तारू कोठे रुतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. "ध्रुवाप्रमाणे जा" आई म्हणाली! कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेंबडालेंबडा, पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम! मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई! तिची कृपादृष्टी असली, म्हणजे झाले. मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडले होती. ती लेवून मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो; कधी चिखलात रुतलो; कधी वाळूत पडलो; कधी लाटांनी बुडविले; परंतु पुनः पुनः मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत, असे नाही. अजूनही धोके आहेत. परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही, तरी तिची कृपा आहेच. आई मेली, तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणांस नेहमी आतून मिळतच असतो.


********************************************************************************************
 रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक           अनुक्रमणिका         रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी
********************************************************************************************