रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन

                            "मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो; परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल, तो मात्र मला सांगणे भाग आहे.
                            पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वांत धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला, असे आम्हां सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हांला सोडून गेला! "दत्तगुरू, दत्तगुरू" म्हणत गेला. "ते पाहा मला बोलावीत आहेत, मी जातो!" असे म्हणत तो गेला.
                            मी औंधला होतो, तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा; तेथेही प्लेग आहे, हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले, तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे, तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते.
                            प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे, असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली. काही चांगली पुस्तके विकली. पाच रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. दोन-तीन महिने शाळा बंद राहील, असा अंदाज होता.
                            मी हर्णे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुडपक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भूपाळ्या, कोठे वेदपठन ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल, अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे-
"गोकुळात खाशी तू दही दूध लोणी
परब्रम्ह होतासि नेणे परि कोणी
एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी
पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी"
हे गाणे म्हणत होती.
मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना. परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लकटले. थाप मारली,
"कोण?" आईने विचारले.
"मी. श्याम." असे उत्तर दिले.
"श्याम! आला रे माझा बाळ; आल्ये, हो!" असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले.
आईने मला पोटाशी धरिले. "देवांना नमस्कार कर. मी त्यांना गूळ ठेवत्ये. हो, आधी, बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लाविले होते! त्याला देवाने नेले, म्हटले दुसरा दृष्टीस पडतो, की नाही?" असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो.
                            वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली "म्हटलं, श्याम आला, हो, आपला, आताच आला!" ते पाय धुऊन घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. "श्याम! गणपतीवर आवर्तने करीत होतो. आलास शेवटी, खुशाल आहेस ना? सदानंद गेला!" असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले.
"नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज." आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे, असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या त्या पांघरुणात निजणे, ते अजून मला आठवते आहे. किती तरी वेळा रात्री असताना "मी माझ्या आईच्या कुशीत आहे," हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत, असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो.
                            घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली, ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, "तुला कवठ आवडते, रे?" मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर, सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले.
                            आता जवळजवळ महिना होऊन गेला होता तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही. म्हणून हात हलवीत परत आलो, असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेविले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली.
परंतु एकदम दचकून जागा झालो. कुठून तरी उंचावरून पडलो, असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो, तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला.
                            आई गोवाऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवाऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती.
"त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल, म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल?" असे वडील म्हणाले.
"तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात; तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही." असे आई माझी बाजू घेऊन बोलत होती.
"त्या वेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसांत नोकरी तरी कोठे आहे? परंतु तुम्हां मायलेकरांना पसंत पडले नाही." वडील पुन्हा म्हणाले.
"पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल. तो येथून जाईल, हो. तो घरबशा होणार नाही, खायला काळ व भुईला भार होणार नाही." आई म्हणाली.
"तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल, म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल." वडील आपलेच म्हणणे पुढे चालवीत होते.
शेवटी माझ्याने राहवेना; मी अंथरुणात उठून बसलो व म्हणालो, "भाऊ! मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो. माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही, तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशा मारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता, तरी मी तेथेच राहणार होतो, जाण्यायेण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यांस तेथे राहू देत ना, म्हणून आलो, मी उद्याच जातो. आई! उद्याच मी निघतो."
"त्यांचे नको रे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे. मग जा हो श्याम! माझे वेडीचे ऐक." आई म्हणाली.
"मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ पुन्हा एकदा दहा रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढे कृपा करून द्या. आई! चिंता करू नको. देव तारी, त्याला कोण मारी? ज्याला जगवावयाचे, त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवील, अफाट समुद्रातही तारील!" मी म्हटले.
"तू तरी त्यांचाच ना मुलगा! तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल! जा, बाबांनो! कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले-माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही, काही समजत नाही, चांगली सोन्यासारखी पोरे नेतो. आम्हांला रडावयाला राखतो!" असे आई रडत म्हणाली.
                            रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, "माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही, तर महिन्याभराने जावेच लागणार ना? तू परवानगी दे." शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका कधी धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते. स्वातंत्र्य देणारे होते.
                            वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार! बापलेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती.
मी आईच्या पाया पडलो. वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला.
मी गाडीत बसलो. गड्यांनो! आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन! त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात मी पाहिली! आईला मी त्या वेळेस कायमची सोडीत आहे, तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे, अशी मला कल्पनाही नव्हती.
परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवावयाचे होते. दुसरे काय!



********************************************************************************************
 रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी           अनुक्रमणिका         रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही!
********************************************************************************************

रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही!

"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस?" भिकाने विचारले.
"आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले." गोविंदा म्हणाला.
इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. "अलिकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे." राम म्हणाला.
"सर्व सिद्धीचे कारण
मन करा रे प्रसन्न"
 असा तुकारामाचा चरण आहे.
"श्याम कोठे गेला आहे, गोविंदा?" रामने विचारले.
"ते मघा तर वरती होते." भिका म्हणाला.
"ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे, म्हणतात." गोविंदा म्हणाला.
"काय एकेक नाव? ऐलाबाई हे काय रे नाव?" भिकाने विचारले. "अरे, ऐलाबाई, म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो." राम म्हणाला.
त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला.
"काय रे करता गोविंदा?" श्यामने विचारले.
"काही नाही. ती ऐलाबाई कशी आहे?" त्याने विचारले.
"तिला गावाला पाठविली त्यांनी." श्याम म्हणाला.
"बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत." भिका म्हणाला.
"कोणाला माहीत? आपण तरी काय करणार?" श्याम म्हणाला.
"भिका! आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते." भांड्याकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला.
"जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते." भिका म्हणाला.
"का? आजचे पेळू चांगले नाही का झाले?" श्यामने विचारले.
"त्यांत पुष्कळ कचरा राहिला आहे." गोविंदा म्हणाला.
"माझे तर सूत तुटत नव्हते." श्याम म्हणाला.
"तुमचे पेळू पहिले असतील." भिका म्हणाला.
"नाही, रे; आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविलेले पेळू मी माझ्या पुडीत ठेवले होते."
"मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूंचे मी सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल, म्हणून बदलले होते." गोविंदा म्हणाला.
"श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही." राम म्हणाला.
"झोप येत नाही, तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो." श्याम म्हणाला.
"झोप न यायला काय झाले? आम्हांला बरी झोप येते?" राम म्हणाला.
"तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसा तप करावे लागते. शरीर झिजवावे लागते." श्याम म्हणाला.
"तू नाही वाटते काम करीत? सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास." राम म्हणाला.
"परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये, असे तुम्हांला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ?" श्यामने विचारले.
"तुला बरे वाटत नव्हते, म्हणून काम करू दिले नाही, त्यांनी." राम म्हणाला.
"लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे." गोविंदा म्हणाला.
                            घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात साऱ्याचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारळ्यात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणीसुद्धा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे. काय करील बिचारी! अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या-मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी.
त्या वेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते. परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राम्हणवस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता.
                            आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीणबाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखादे वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, "राधाताई! तुमच्याकडे काही काम असले, तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन. मला थोडी मदत होईल." राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय? परंतु करील काय? वडील पहाटे उठून बाहेर गेले, की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण दळून टाकी. "श्याम असता येथे तर सारे दळून टाकता." असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो, हे आठवून ती रडू लागे. दळता-दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत, त्यांतून आई तेल, मीठ आणी व क्षणाचा संसार सुखाने करी.
                            दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना! एक काळ असा होता, की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्या वेळेस लागत असत; परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करावयाची? आई त्या पेन्शनरीणबाईला म्हणाली, "तुमचे धुणेबिणे सुद्धा मी धुऊन दिले, तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा."
                            त्या पेन्शनरीणबाईची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, "आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलीला न्हाऊमाखू घालीत जाल का?"
आई म्हणाली, "हो. आनंदाने करीन. मला हो काम आवडते. मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे."
                            आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावावयाला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठरविली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे, असे आईला वाटे. त्या लहान मुलाला न्हाऊ घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल, लुबलुबीत टाळूवर तेल घालून "तो तो तो! बाळाची बायको यो यो यो!" असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई न्हाऊमाखू घालू लागल्यापासून त्या मुलाला बाळसे धरले; ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडाथोडा तजेला येऊ लागला.
                            राधाताईची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले. "दोन कशाला? एक पुरे, हो!" आई म्हणाली.
"घ्या, हो, यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो."
आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. "देवा! माझी लाज सारी तुला!" असे ती म्हणाली. दोन रुपयांतून तिने थोडे तेल, थोडे तूप आणविले, एक नारळ आणविला. थोड्या करंज्या व चार अनरसे तिने केले. दिवाळीच्या चार दिवसांत बाहेर दोन दिवल्या लाविल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळिले. चार आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटुकनळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली, तर पारिंग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही.
                            परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली-गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे. तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमाने घोरिवड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले, तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदीकुंकू वाहताना आई म्हणाली, "तुळसादेवी! माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा."

रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे

रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे

श्यामने आरंभ केला.

                            शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा, असा निकाल देण्यात आला.
त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती! आईला दोन दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. "आई जगदंबे! शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना? या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची! माझे प्राण ने ना ग आई! नको हा जीव!" अशी ती प्रार्थना करीत होती.
पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती.
                            सकाळी नऊ वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून "आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे," वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी. दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते.
                            महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत.
                            "पुर्षाच्या घराची जप्ती होणार, ढुमढुमढुम!" असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, "मी घरी जाऊ का?"
मास्तर म्हणाले, "कोठे चाललास? बस खाली! अर्ध्या तासाने शाळाच सुटेल." मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयातील कालवाकालव समजली का नाही?
                            दहा वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या "ढुमढुमढुम" करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला.
                            "आई! सारी मुले मला चिडवतात! का ग असे? म्हणतात, "तुझ्या घराची जप्ती होणार. शेणाचे दिवे लागणार." आई! सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणांस येथून बाहेर काढणार का ग? आई! काय ग झाले?" असे आईला विचारू लागला.
                            "बाळ! देवाची मर्जी; मी तरी काय सांगू तुला?" असे म्हणून पडल्यापडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. मायलेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, "जा बाळ; हातपाय धू; आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे."
लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला.
                            त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले. देवाची पूजा केली. लाज वाटत होती, तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारीत नव्हते! ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली, तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसेबसे अब्रूने दिवस काढले होते; परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या, आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छीत होता. संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत. अमावस्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती.
                            दुपारी पोलिस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकविली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणिमंगळसूत्र काय ते राहिले होते. होते नव्हते, ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले. सील केले. आम्हांला राहावयाला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या.
                            ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप! आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली. "आई आई!" असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, "ज्याला भीत होत्ये, ते शेवटी झाले! आता जगणे व मरणे सारखेच आहे!"

रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार

श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता.
"श्याम! पाय चेपू का?" गोविंदाने विचारले.
"नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार! राम राम म्हणत मी शांत पडून राहीन." श्याम म्हणाला.
"श्याम! कोणी आजारी पडले, तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला, तर त्याच्याजवळ नको का बसायला?" रामाने विचारले.
"अरे, इतका का मी आजारी आहे! तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो, तरी पोटभर जेवलो, असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे, असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात, काही वातबीत झाला, तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात, तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा!" श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले.
सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता.
सुचो रुचो ना तुजवीण काही
जडो सदा जीव तुझ्याच पायी
तुझाच लागो मज एक छंद
मुखात गोविंद हरे मुकुंद
तुझाच लागो मज एक नाद
सरोत सारेच वितंडवाद
तुझा असो प्रेमळ एक बंध
मुखात गोविंद हरे मुकुंद
"काय रे? आतासे आलात?" श्यामने विचरले.
"तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट?" एका लहान मुलाने विचारले.
"हो, सांगेन. तुम्ही या." श्याम म्हणाला.
"पाहा, तुम्हांला छानछान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो." एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले.
"खरेच, किती सुंदर आहेत हे! या, आपण त्यांची चित्रे करू. मी पोपट करतो हां!" असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला.
मुले एकेक खडा देत होती.
"आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा," श्याम म्हणाला.
"हा घ्या, हा पाहा चांगला आहे." एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लाविला व सुंदर राघू तयार झाला.
"आता मोर बनवा मोर." दुसरा एक मुलगा म्हणाला.
"तुम्हीच बनवा मोर." श्याम म्हणाला.
"आम्हांला चांगला येत नाही." तो म्हणाला.
"पण आता तुम्ही घरी जा. लौकर जेवून या." श्यामने सांगितले.
"चला, रे, जेवण करून येऊ." एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली.
श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला. या लहान खड्यांत किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती.
गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले.
"श्याम! काय आहे तुझ्या हातांत? फूल का?" रामने विचारले.
"अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो." श्याम म्हणाला.
"मग काय आहे हातांत?" नामदेवाने विचारले.
"देवाच्या मूर्ती." श्याम म्हणाला.
"तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला?" भिकाने विचारले.
"हो, पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहेत." श्याम म्हणाला.
"पाहू दे, कसली आहे?" असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक-मोत्ये बाहेर पडली.
"हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात, समुद्राच्या तळाशी मोत्ये असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोत्ये दिसतात. पाहा रंग कसे आहेत!" असे म्हणून श्याम दाखवू लागला.
"श्याम, आज बोलणार ना तू?" रामने विचारले.
"हो, त्या मुलांना मी सांगितले आहे, जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता दोन ताससुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना?" श्यामने विचारले.
प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरूण घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला.
जप्तीच्या वेळी आमची दूर्वांची आजी घरी नव्हती. ती कोठे गावाला गेली होती, ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार! आजीला होईल तेवढं आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत. कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकीवयनी, नमूमावशी वगैरे येत असत.
परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार? आई जे दोन रुपये मिळवीत होती, ते आता बंद झाले. वडील आले, म्हणजे दूर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे.
"मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा? चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचे खांड नाही; भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही. का नुसता भाजीभात उकडून वाढू?" दूर्वांची आजी बोलत होती.
माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, "नुसते तांदूळ उकडून आम्हांला वाढ, द्वारकाकाकू! आमची अब्रू गेलीच आहे. ती आणखी दवडू नका."
                            त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली, "पुरुषोत्तम! तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये; नाहीतर इंदूलाच मी बोलावत्ये, म्हणून सांग. तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण."
पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली.
"यशोदाबाई! जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा?" ती प्रेमळ मुलगी म्हणाली.
"नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला. तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे, म्हणून लिही. कसे लिहावे, ते तुलाच चांगले समजेल." आई म्हणाली.
इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली.
"बाळ, पाणी दे रे!" आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. "चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर." असे आईने सांगितले. आईने सांगितले, तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले.
"या जानकीबाई, या हो, बसा." जानकीबाई समाचाराला आल्या होत्या.
"पाय चेपू का जरा?" त्यांनी विचारले.
"चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले." आई म्हणाली.
"आवळ्याची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल." जानकीबाईंनी विचारले.
"द्या तुकडा आणून." क्षीण स्वरात आई म्हणाली.
"चल पुरुषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो आईला आणून दे." असे म्हणून जानकीवयनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता.
"जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?" असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली.
पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला.
                            तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी-बोरखड्याने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती. एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिलासुद्धा मधूनमधून बरे नसे.
"ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आहे?" आईने नमूला विचारले.
"बरे आहे. चाफ्याच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण, तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला?" नमूमावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली.
"नमू, तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल, त्याच्या बरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारकाकाकू ओरडते. तुला सारे समजते. मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले." आई म्हणाली.
"बरे हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर." नमू म्हणाली.
"आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहाळे तेवढे पुरेत." आई म्हणाली.
"तिन्हीसांजचे असे नको ग बोलू. उद्या की नाही, तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन. खाशील ना?" नमूमावशीने विचारले.
"नमू! डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजिरवाणे हे जिणे!" आई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली.
"हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का?" नमूने विचारले.
"महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रुपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रुपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल." आई सांगत होती.
"श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे?" नमूने विचारले. "त्याला कळवू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ? येथे आला, म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे; परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो, म्हणजे झाले. माझे काय?" आई म्हणाली.
                            नमूमावशी निघाली. "कुंकू लाव, ग. तेथे कोनाड्यात करंडा आहे." आईने सांगितले. नमूमावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली.
"आई! हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले. वाचू मी?" असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली.
"इंदू! उद्या येणार हो सखू. तू पत्र लिहिले होतेस ना! हे बघ तिचे पत्र. दे रे इंदूताईला." आई पुरुषोत्तमास म्हणाली.
इंदुताईने पत्र वाचले व ती म्हणाली, "मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे, की केव्हा त्यांना बघेन." इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. "पुरुषोत्तम! चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल." इंदू म्हणाली.
"जा बाळ, त्या परक्या नाहीत, हो." असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला.
"माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला-प्यायलाही मला देता येत नाही. मी अभागी आहे, काय करू मी तरी?" वडील आईजवळ बसून म्हणत होते.
"हे काय असे? तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलेत, तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे? पुरुषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. तुमच्या जिवावर मी पूर्वी उड्या मारल्या. सारी सुखे भोगली. वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत चार कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही, तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहा. तुमच्या डोळ्यांत मी येऊन बसेन हो." असे आई बोलत होती.
"तू सुद्धा बरी होशील. सखू येत आहे, ती तुला बरी करील." वडील म्हणाले.
"कशाला खोटी आशा आता! आतून झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हातांनी मी जाईन. सुवासिनी मी जाईन. तुम्हांला कोण? म्हणून फक्त वाईट वाटते; नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात." असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता.
"पाणी, थोडे पाणी द्याना तुमच्या हाताने." आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले.
"तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा; अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ नका कोठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो." असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन, आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे, पावन असे ते दृश्य होते.
इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या.
"या. इंदूच्या आई, या." म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरविला. केस जरा सारखे केले. "पहाटे येणार वाटतं तुमची बहीण?" त्यांनी विचारले. "हो पत्र आले आहे. इंदूने वाचले." आई म्हणाली.
"तिनेच सांगितले. बरे होईल. प्रेमाचे माणूस जवळ असले, म्हणजे बरे वाटते." राधाताई म्हणाल्या.
"सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहेत, तुमचा शेजार आहे, आणखी काय पाहिजे?" आई म्हणाली.
थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या.
                            मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली, असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही. परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली.
"आपल्याच बेड्याशी थांबली रे!" आजी म्हणाली. दूर्वांची आजी पोतेरे घालीत होती. पुरुषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय. मावशीच आली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला.
"आई, मावशी आली ना! ही बघ, खरेच आली." आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला, पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते.
"आली? माझी वाट मोकळी झाली!" असे आई म्हणाली. अर्धवट शुद्ध, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती! आईची दशा पाहून, तो अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले.
"अक्का!" मावशीने हाक मीरली. त्या हाकेत, त्या दोन अक्षरांत मावशीचे प्रेमळ व उदार अंतःकरण ओतलेले होते.
"आलीस सखू, बस. तुझीच वाट पाहत होत्ये. म्हटले, केव्हा येतेस! पण आलीस लौकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं, तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन. सखू!" आई रडू लागली.
"अक्का! हे काय वेड्यासारखे. मी आल्ये आहे. आता बरी होशील हो. तुला बरे वाटू दे; मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन. आता मला नोकरी लागली आहे." मावशी म्हणाली.
"नको हो आता कोठे येणे-जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे. या मठीतच कुडी पडू दे. मी आग्रह करकरून झोपडी बांधविली. ही स्वतंत्र झोपडी बांधविली. येथेच, माझ्या राजवाड्यातच देह पडू दे. त्यांच्या मांडीवर, तू जवळ असता, मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगो, असे म्हणतात, ते खरे ठरो. सखू! तुला ना मूल, ना बाळ. तुझा संसार देवाने आटपला; जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो!" आई बोलत होती.
"अक्का! हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पड. मी थोपटते हं." असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लअँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते.
मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते.

रात्र एकोणचाळिसावी : सारी प्रेमाने नांदा

                            श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती. "सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी, ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला, तर कोलनवॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेणकापडावर कागद घालून त्यावरच आईला शौच करावयास ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई व दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणे शक्य होते, तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ते गाळून घेई; नाहीतर लोणी यावयाचे. असे ते अदमुरे ताक मावशी आईला द्यावयाची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून पुरवून त्यांचा रसही ती देत असे. साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती, अशी मावशीने ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले; परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ व सेवा! अत्यंत निरलस व व्यवस्थित.
"ती मथी सारखी म्यांव म्यांव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास?" आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते. मथी दुधाणीला कधी तोंड लावीत नसे. तिला थेंबभर दूध घातले, म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे.

                            "अक्का, तिला भात घातला; परंतु ती नुसते तोंड लावी. दुधा-तुपाचा भात; परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीरबिंदीर." मावशी म्हणाली.
"नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुकी बिचारी! बोलता येत नाही; सांगता येत नाही." आई म्हणाली.
आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून माझा मोठा भाऊ चार दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीने चार दिवसांची रजा मिळाली.
                            आईला पाहून त्याला भडभडून आले. "आई! काय, ग, ही तुझी दशा! तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई! आम्ही तिकडे खुशाल खात होतो; परंतु तुला घास मिळत नव्हता!" असे म्हणून तो रडू लागला. धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पिटली, ते सारे त्याने सांगितले. दादाचे हृदय दुभंग झाले.
                            आई म्हणाली, "चाललेच आहे. बाळांनो, या देहाला चांगले दिले काय, वाईट दिले काय, जोपर्यंत देवाला यंत्र चालवावयाचे आहे, तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतो. तू पाच रुपये पाठविलेस, मला धन्य वाटले. तू एकोणीस रुपयांतून त्यांना पाच रुपये पाठविलेस-खरेच मूठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनीऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हांला तयार करणे एवढेच माझे काम! तुम्ही गुणी निघालात-चांगले झाले. तुम्हांला पैसे मिळोत वा न मिळोत; तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे-आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे; ह्या पुरुषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या. परस्परांस विसरू नका." आई जणू निरवानिरव करीत होती.
                            "आई! मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची ती नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल, तर नोकरी कशाला? आई! मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई! तुझे पाय, तुझी सेवा यांतच माझे कल्याण, माझे भाग्य, माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई! तू सांगशील, तसे मी करीन. राजीनामा मी लिहून आणला आहे. देऊ का पाठवून?" दादा गहिवरून बोलत होता.

                            आई विचार करून हळूच म्हणाली, "गजू! सध्या सखूमावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव. त्यांना पाच रुपये पाठवीत जा. दोन पाठविलेस, तरी चालतील. परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही. तितके माझे भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले, तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ."
दादा परत मुंबईस जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन, अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून, डोक्यावरून आपला कृश हात, प्रेमाने थबथबलेला हात फिरविला, तो मंगल हात फिरवला. "जा, बाळ; काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे, असेच पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकांस कधी अंतर देऊ नका!" आईने संदेश दिला.
जड अंतःकरणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला, संसार मोठा कठीण, हेच खरे.

रात्र चाळिसावी : शेवटची निरवानिरव

                            "त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला." आई वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक्त होती, तरी त्या झाडांना ती पुरण घाली. त्यांना पाणी घाली. त्यांची पाने किडे खातात की काय, ते पाही. आईच्या हातची किती तरी झाडे परसात होती! मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते. इतर सारे मेले; पण आईने लावलेला तेवढाच जगला होता. प्रेअमाने लावलेला म्हणून का तो जगला?
पहाटेची वेळ होती. वातात आई बोलत होती. त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात "झाडांना पाणी घाला" म्हणे; तर क्षणात "ती पहा दवंडी देताहेत, मला कानांत बोटे घालू दे." असे म्हणे. पुरुषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती; म्लान झाली होती. जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता!
"तो पाहा, त्या खुंटीवर श्याम बसला आहे. खाली ये रे गुलामा. लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला-ये, मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचा, तर कुणाजवळ-पण आता पुरे. ये, मला भेट!" आईचे वातात बोलणे चालले होते.
"अक्का! अक्का!" मावशी आईला हाक मारीत होती; शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती.
"नमू! तुझे तेल परत नाही केले. रागवू नको हो. श्याम! ये रे तुझे थंड हात ठेव कपाळावर!" आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते. कोणी बोलेना. सारे स्तब्ध.
"तुमची मांडी हीच माझी अब्रू; दवंडी देतात. द्या, म्हणावं-तुमचे पाय आहेत ना मला, कुंकू आहे ना कपाळाला, कोण माझी अब्रू नेणार? कोणता सावकार अब्रू नेईल? माझी अब्रू-ती का दागदागिन्यांत, घरादारांत, शेताभातांत आहे? त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचे प्रेम यांत माझी अब्रू! द्या रे त्यांची मांडी द्या!" असे म्हणून आई उठू लागली. ती कोणाला आवरेना. साऱ्यांनी तिला निजविले.
वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले. "पाणी, पाणी!" आई म्हणाली. मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातले.
"अक्का!" मावशीने हाक मारली. आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही, काही नाही, असे हात हलवून दाखविले. थोडा वेळ आई शांत होती. "घेतलंय् माझं डोकं मांडीवर?" आईने विचारले.
"होय हो. हा पाहा, मी तुझ्याजवळ आहे. बोलू नको." असे वडील म्हणाले.
काही वेळ गेला. "मला का रे भेटायला आलास? चंद्री पण आली? या सारी. पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास? तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस. आलास, तर मग ये-असा रुसू नको, श्याम! मी दळायला लाविले म्हणून रुसलास? आता नाही हो दळायला लावणार. आता संपले. ये श्याम! नाही काय म्हणता! तो पाहा, मला दिसतो आहे समोर-श्यामच तो-तुम्हांला ओळखता नाही आला, म्हणून आईला का नाही ओळखता येणार?"
                            अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरुषोत्तमला मावशी म्हणाली, "राधाताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव. जा." हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात. दोन मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते.
त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. वडिलांना उपवास असे. परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्यफराळ करीत. सोजी खात. आई त्यांना म्हणाली, "आज चतुर्थी ना? जा, स्नान करा. थोडी सोजी खाऊन घ्या. असे हाल नका करू हो स्वतःचे. जा, खाऊन घ्या." तुटक-तुटक मोठ्या कष्टाने बोलत होती. वडील उठले. स्नान करून देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले.
                            आईने धाकट्या पुरुषोत्तमला जवळ घेतले. त्याच्या तोंडावरून हात फिरविला. अत्यंत क्षीण स्वराने ती म्हणाली, "बाळ, चांगला राहा. हट्ट नको करू. दादा, अण्णा आहेत तुला. मावशी आहे. चांगला नीट वाग!" पुरुषोत्तम रडू लागला. आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती.
"सखू! साऱ्यांनी खाल्लेत का?" आईने विचारले.
"होय हो अक्का." मावशी म्हणाली.
"सखू! सारी तुझी हो. माय मरो, मावशी जगो. पुरुषोत्तम, श्याम, सारी तुझी. चंद्री, गजू सारी तुझी." आई शेवटची निरवानिरव करीत होती.
"होय हो अक्का." मावशी म्हणाली. "श्याम गरीब, गुणांचा. चंद्री, गजू देव आहे साऱ्यांना तो!" आई तुटक बोले. किती तरी वेळाने एकेक शब्द बोले.
सारी आईच्या भोवती बसली होती. दूर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली, "क्षमा-बोलल्ये चालल्ये विसरा!" आजी विरघळून गेली. किती तरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी.
"सखू! नानांना म्हणावं, क्षमा करा. त्यांची मी मुलगीच आहे. बयोला, म्हणावे, क्षमा करा." पुन्हा शांत. मध्येच आई डोळे गरगर फिरवी; मध्येच डोळे मिटी.
"श्याम!" एकच शब्द.
"अक्का! त्याला आज बोलावत्ये, हो." मावशी म्हणाली. मावशी भाऊंना म्हणाली, "भटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा."
मरताना गाय दान द्यावी, असे आहे. गाय नसेल, तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात. आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली.
                            आईला बोलता येईना, वाणी गेली. ती नुसती पाही. पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी. मध्येच बोट वर करी. देवाकडे जात्ये, असे सुचवी. बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली, "तुम्ही जपा, हाल करू नका. मी सुखाने या मांडीवर-" जास्त बोलवेना.
सारे शांत होते. आईला ऊर्ध्व लागला. गावातील वैद्य कशाआप्पा आले. त्यांनी नाडी पाहिला. 'अर्धी घटका' ते खिन्नपणे म्हणाले व गेले. शेजारच्या जानकीवयनी व राधाताई आल्या होत्या. नमूमावशी बसली होती. इंदू होती.
तेथे स्मशानशांती होती. आई आता जाणार, कोणाला शंका नव्हती.
"तिला श्याम व चंद्री भेटली नाहीत; गजू भेटून गेला." वडील म्हणाले.
"त्यांची आठवण काढीत असतील ना?" जानकीवयनींनी विचारले.
                            आईचे ओठ हलले, असे वाटले. काही बोलावयाचे का होते? काही सांगावयाचे का होते? परंतु बोलवत नव्हते. ते ओठ राम म्हणत होते, की श्याम म्हणत होते? राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली. खाली जाणाऱ्या जिभेला त्यांनी चटका दिला. "सारी जपा!" आई म्हणाली.
"काही सांगावयाचे आहे का?" राधाताईंनी मोठ्याने कानात विचारले. आईने 'नाही!' अशी खूण केली.
घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता. शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता. पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले- "सारे सांभाळा. देव आहे!"
                            शेवटची क्षणे दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. वेळ आली. देवाघरी जाण्याची वेळ आली; मंगल वेळ आली. राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले; तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले. आईला घोंगडीवर घेण्यात आले. देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते.
                            थोडा वेळ गेला. "राम" ऐकू आले. आईने राम म्हटला! साऱ्यांना अथांग सागरात लोटून आई गेली. बोलावणे आले; ती गेली. ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली; पुरुषोत्तमवरचे कृपाछत्र गेले. श्याम व गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तिदात्री देवता, प्रेममय देवता गेली! चंद्रीचे माहेर गेले! नाना, आजी यांची आवडी गेली! गडीमाणसे यांची बयो गेली; जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळाली म्हणून गेली!

रात्र एकेचाळिसावी : भस्ममय मूर्ती


                            आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, "का, रे, नाही भेटायला आलास? तुला त्यांनी कळविले नाही का? त्या दिवशी रागावून गेलास. अजून नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लौकर जातो; मग तुझा रे कसा नाही जात? ये, मला भेट." सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसेसेच होई. आज आई फार आजारी नसेल ना, असे मनात येई. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो, असे वाटे. परंतु किती दूर जावयाचे! दोन दिवस जावयाला लागले असते. आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास!
                            मला वाईट वाटत होते. जिवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावे, असे वाटे. परंतु पैसे? मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचे नाव नामदेवच होते. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम व जितकी भक्ती होती, तितकेच प्रेम व भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझाच झाला होता व मी त्याचा. "यूयं वयं वयं यूयं" असे आम्ही कितीदा म्हणावयाचे! माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, "अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपाया" देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दुःख न बोलताही समजते. नामदेवाला माझे सुखदुःख समजे. माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचीत असे. जणू आम्ही एकमेकांची रूपे होतो. जणू दोन कुडींत एक मन होते, एक हृदय होते. जणू मनाने व हृदयाने आम्ही जुळे होतो.
"नामदेव! मला घरी जावेसे वाटत आहे. आई फार आजारी आहे, असे वाटते. सारखी हुरहुर लागली आहे." मी म्हटले.
"मग जा, भेटून ये." तो म्हणाला.
"आईला डोळे भरून पाहून येईन! पण पैसे?" मी म्हटले.
"काल नाही का माझी मनीऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे. दहा रुपये आहेत. तुला पुरतील? आईला भेटून ये, माझा नमस्कार सांग. जा." नामदेव म्हणाला.
थोडेसे सामान घेऊन मी निघालो. स्टेशनवर नामदेव पोचवावयास आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले होते.
"पत्र लगेच पाठव बरे, श्याम." नामदेव म्हणाला.
"होय." मी म्हटले.
"तुझ्याबरोबर मी आलो असतो. पण पैसे नाहीत." तो म्हणाला.
"तू माझ्याबरोबर आहेसच." मी म्हटले.
गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्यांआड झाला. गाडी सुटली व डोळ्यांतून पाझर सुटले-शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रुसिंचन करीत मी जात होतो.
बोरीबंदरवर उतरून तसाच परभा मी बोटीवर गेलो. कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो, तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदयही शतभावनांनी नाचत होते. रवींद्रनाथांची गीतांजली माझ्या हातात होती.
                            "आई! माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षःस्थळावर रुळेल." हे मी वाचीत होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळही अश्रुंशिवाय द्यावयास दुसरे काही नव्हते. मध्येच मी गीतांजली मिटीत असे व समोरच्या उचंबळणाऱ्या सागराकडे बघे. या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदयसागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसऱ्या स्मृतीस जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग-दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टीत, स्मृतिसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रमून गेलो. रंगून गेलो. आईच्या स्मृतिसागरात हा श्याममत्स्य डुंबत होता, पोहत होता, नाचत होता.
                            हर्णे बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हर्णे हर्णे खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकट्या बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडे बांधले. आणखी सात-आठ तासांनी आईचे पाय पाहीन, प्रेमाने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन, असे मनात मी म्हणत होतो.
हर्णे बंदर आले. पडाव बोटीजवळ आले. त्यांत माणसे उतरली.
मीही पडावात उतरलो. बंदरावरून कोणी तरी माझ्याकडे पाहात होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची ती मूर्ती होती?
पडाव उभा राहिला. मी पटकन् उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपझप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडले? मावशी! माझ्या दृष्टीस माझी मावशी पडली.
"मावशी! तू इकडे कोठे? परत जातेस होय पुण्याला? आईचे बरे आहे वाटते?" असे मी विचारले. मावशीच्या गंगा-यमुनांनी उत्तर दिले.
"मावशी! बोलत का नाहीस?" मी काकुळतीने विचारले.
"श्याम! तुझी आई, माझी अक्का, देवाजवळ गेली!" ती म्हणाली.
माझा शोकसागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हते.
"मला बोलावलेत ग का नाही? मला स्वप्न पडले, म्हणून मी निघालो. स्वप्नात आई मला हाक मारी. परंतु आता कोठची आई? कायमची अंतरली आई!" असे म्हणून मी रडू लागलो.
"श्याम! त्या दिवशी तुझीच सारखी आठवण ती काढीत होती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे, अजून हट्टीच आहे. श्याम! दोन दिवसांत अक्का जाईल, असे वाटले नव्हते. मी तुला बोलवावयाचे ठरविले; परंतु त्याच दिवशी अक्का गेली! सारे प्रयत्न केले. तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हांला. अक्काने तुम्हांला माझ्या पदरात घातले आहे. मी तुम्हांला आईची आठवण होऊ देणार नाही. उगी, किती रडशील!" मावशी मला समजावीत होती.
"मावशी! माझे केवढाले मनोरथ! माझ्या आईला सुख देईन. तिला फुलासारखी ठेवीन, असे मी मनात म्हणे. परंतु आता कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला शिकू?" मी म्हणालो.
"तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शीक; आमच्यासाठी शीक. जगासाठी शीक. आईला प्रेम देणार होतास, ते जगाला दे. जगातील दुःखी मातांना दे." मावशी नवीन दृष्टी देत म्हणाली.
"मावशी! तू परत निघालीस?" मी विचारले.
"होय. तेथे माझ्याने राहवेना. तू घरी जा. उद्या तिसरा दिवस. अस्थिसिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका; म्हणून उत्तरक्रियेला आलास. येताना अस्थी घेऊन ये. गंगेत नेऊन टाकू." मावशी म्हणाली. "मावशी! मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ?" मी म्हटले.
"त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला, तरी वडिलांचा तारा आहे. तुझ्या भावाचा तारा आहे. तेथे सारा अंधार नाही. तेथे प्रेम आहे. जा घरी, त्यांना धीर दे. तू शहाणा, विचार करणारा, गीतांजली, गीता वाचणारा," मावशी म्हणाली.
"श्याम! आलास का, थांब, हो, देवाला गूळ ठेवते, असे आता मावशी कोण म्हणेल?" मी म्हणालो."श्याम! या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली, तरी प्रेमरूप आई-स्मृतिरूप आई-तुझ्याजवळ आहे. जेथे जाशील, तेथे आहे. चल, तुझ्यासाठी गाडी ठरवू." असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरविली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली.
                            मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवनसमुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटांतून वर येत आहे, असे मला दिसे. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. कारुण्यमूर्ती माता! तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली.
                            शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्या वेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणे कोठले? तेथे हाय हाय होती! घरात एक मिणमिणा दिवा जळत होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावर बसलेले होते.
                            "श्याम! दोन दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून, बाळ!" ते म्हणाले.
पुरुषोत्तम जागा झाला. "अण्णा, अण्णा," असे म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हांला कोणासही बोलवत नव्हते.
                            दूर्वांची आजी म्हणाली, "तुझीच आठवण काढीत होती हो श्याम! तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तरक्रियेला तरी आलास. रडू नको. आता उपाय का आहे? तुम्ही मोठे होईतो हवी होती ती जगायला. परंतु नाही त्याची इच्छा." मी ऐकत होतो.
                            अस्थिसंचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजी बरोबर होते. नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात् करण्यात आला होता, तेथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जसाच्या तसा भस्ममय देह होता. वाऱ्याने इवली देखील मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केले. सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. अत्यंत शुद्ध असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्येने आधीच देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्माइतकाच पवित्र झाला होता. मनाने तर ती पवित्र होतीच होती.
                            लावला, मी हात लावला. भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणास अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढे भाग्य? मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले, ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले, स्वतःच्या पत्नीच्या गळ्यात घालण्यासाठी नेले.
                            सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एकेक दिवस जात होता. पुरुषोत्तमाच्या तोंडून एकेक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणीचे पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम मजजवळ वाचीत असे व मी ऐकत असे. शेजारच्या इंदू, राधाताई यांनीसुद्धा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत.
                            आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असे म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळ्यांना आमंत्रण दिले. "आला, एक कावळा आला, तो दुसराही आला," चुलते म्हणाले. आम्हांला बरे वाटले. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडाजवळ बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरट्या घालीत; परंतु स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले, मी म्हटले, "आई! तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही." तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, "आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर, वयनी, प्रेम करू." तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीस आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाला कावळा करून शिववितात; परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, "पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एवढ्यात दर्भाचा नका करू."
                            नदीवरून जड अंतःकरणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळीशेजारी पिंड ठेविले. भोवती कावळे जमले; परंतु एकही शिवेना!
                            शेवटी माझी दूर्वांची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, "यशोदे, काही काळजी नको करू. पुरुषोत्तमला मी आहे. त्याचे सारे मी करीन." काय चमत्कार! आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन् कावळा शिवला.
                            माझ्या डोळ्यांत पाणी आले. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरुषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खोड्याळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई! केवढे तुझे प्रेम! तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे व समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल ह्याची कल्पना ह्या संसारातील आईवरून येईल. स्वतःच्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठीच ह्या छोट्या आईला ती जगन्माऊली पाठवीत असते.
                            गड्यांनो! माझी आई मेली. तिचे जीवन सरले तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाहीत तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहेत, त्याच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, जोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊभाऊ सारे प्रेमाने परस्परांस मदत करतील, श्रेष्ठकनिष्ठ मानणार नाहीत, एकमेकांस वाढवतील, पाळतील, पोसतील, हसवतील, ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार! तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार!"


********************************************************************************************
 रात्र चाळिसावी : शेवटची निरवानिरव     अनुक्रमणिका      रात्र बेचाळिसावी : आईचे स्मृतिश्राद्ध
********************************************************************************************