वैदू

मच्छाई यो शंकासूर मारुनी चार्‍ही वेद लाईये । ब्रह्मासी सुख केलीये ।

तुझ्या रूपाची थोरी काय वर्णू ये । बुरगुंडये माये बुरगुंडाये ॥ १ ॥

कच्छाई वो समुद्रमंथन केलीये । पाठन देउन महा मेरू तारियेले ।

दैत्यासी मारिलीये । देवासी रक्षिलीये । ऐसी तुझी थोरवी जग वाखाणिये ।

तुझे स्वरूपाची ऐकून बहु सुख पाविलिये । माये बुरगुंडाये ॥ २ ॥

वर्‍हाई वो पृथ्वी बुडिये । ते दाढे धरीये । विश्वजनासी तारिये ।

तुझे स्वरूपासी ब्रह्म वाखाणिये । न कळे तया सीमाई वो ॥ ३ ॥

नरसीमीयो प्रल्हादाकारणें । वैकुंठींहुनी प्रल्हाद रक्षिलीयो ।

तारिले भवभक्त तारिले प्रल्हादासी । हिरण्यकश्यपाकारणें आईयो ॥ ४ ॥

बळीराम दैत्य पृथ्वी माजलियो । त्या कारणें कैसी धावलीसे वामनरूप धरूनियो ।

तीन पाऊल पृथ्वी दान मागितलीयो । तिसरे पाउलीये बळी घालोनी पाताळीयो ।

तयाचे द्वारीं द्वारपाळ होउनी राहिलीयो । भक्तिकारणें देणें तुझी थोरी झालीयो । आईयो बुरगुंडे ॥ ५ ॥

परशरामाईयो । पित्याचे वचना धांवलीयो । रेणूकें मातेचें शीर उडविलीयो ।

पहा तिचें नवल केवळ थोरीयो । पित्याचे वचनें चौघे उठविलीयो । भक्तिभाव देखोनी निक्षेत्रीं पृथ्वी केलीयो ॥ ६ ॥

रामाईयो सीतकारणें रामें रावण वधिलीयो । देवगणा सोडून सुखी केलीयो । धन्य तुझी एक वृत्ती सकळ धर्म तारीयो ॥ ७ ॥

कृष्णाबाईयो । देवकी बंदीशाळे त्याकारणें धांवलीयो ।

धरून कृष्णलीला कंससामासी मारलीयो । भक्ति कुबजेची देखोनी तिसी भावें उद्धरलीयो ॥ ८ ॥

बोधाईयो भक्तिभाव देखुनी तिष्ठत भीमातिरींयो । पुंडलिकाकारणें सकळ जग उद्धरीलीयो ॥ ९ ॥

कलंकी अवतार धरुनी सकळ पृथ्वी बुडविलीयो । वटपत्रीं राहिलीयो ।

एका जनार्दनीं देखिलीयो । आई वैदीण प्रसन्न झालीयो । सकळ सुख देखिलीयो ॥ १० ॥


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

त्याला इलाज नाही

धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

                    
कवी - विंदा करंदीकर

हीच दैना

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.

आकाशाची निळी भाषा
ऍकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध

अर्धीच रात्र वेडी

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी


गीत – विं. दा. करंदीकर
कवितासंग्रह - जातक
संगीत – यशवंत देव
स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

ऋणाईत

स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...


कवी - केशव तानाजी मेश्राम

ते देशासाठी लढले

ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !


कवी - वि. म. कुलकर्णी

पिंपळाचे पान

वसंतात गळतात पिंपळाची पाने,

रंग संपून हिरवा, पान पान होते जुने...

प्रेम वाटले पानाला... काही दिवस लोटले,

’जाळीदार’ पानामुळे बालमन आनंदले...

पुन्हा फुटेल पालवी - पिंपळाच्या फांदयांतून,

पान पुस्तकामधले पाहील हो डोकावून....

एका शहाण्या मुलाने एक पान उचलले,

आणि नव्या पुस्तकात हळू जपून ठेवले...

’जुन्या-नव्याचा हा खेळ’ कधीपासून चालला,

दोन्हींवर प्रेम करु - पाहू आपण सोहळा !


कवी - वि.म. कुलकर्णी