*" चिटी  चावल  ले  चली,*

*बीच  में  मिल  गई  दाल।*

*कहे  कबीर  दो  ना  मिले,*

*इक ले , इक डाल॥"* 👌🏻


अर्थात : 


"मुंगी "तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.


तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'


तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.


माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात. 


साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'


विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.


ती बघून, 'घेशील किती दोन करांनी'  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात. 


पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)


आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.


भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. *नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.*


देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर *एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं,* यासाठी आहेत. *नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.*


म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे "समतोल" तर टिकून राहतोच, माणसाचं "समाधान आणि आनंद"ही त्यामुळे टिकावू बनतो. 

*कबीरांच्या या दोह्यात असा मोठा "अर्थ "दडला आहे.*

*चला तर मग आनंदी जगुया....*

डिडरोट इफेक्ट

*🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥*

*रशियात डेनिस डिडरोट* नावाचा एक अभ्यासू वाचक होता. *इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष* होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. *त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय* होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी *रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या* गरीबीबद्दल कळले. तिने *डिडरोटला* त्याच्याकडील *लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला* देऊ केले. *डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले*.

*डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला*. त्याने त्या पैशातून लगेच *'स्कार्लेट रॉब'*;  म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच *मानस शास्त्रातील 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect)* म्हणतात. 

*भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे?

समजा आपण *महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी.... इ. घेणार*. 

घरात *मोठा टी.व्ही*. आणला की *चांगला टेबल, फर्निचर,टाटा स्काय, HD वाहिन्या सुरु करणार*. घराला *नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार*.

समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी  आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात *'डिडरोट इफेक्ट'* 

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

*सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने वापर करतात. 

एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. *कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत* माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

*आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी*. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच *'spiraling consumption'* म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो *'डिडरोट इफेक्ट'* (Diderot Effect) होय. ही सामान्य *मानवी प्रवृत्ती* (human tendency) आहे.

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण *नकळतपणे अनावश्यक खर्च* करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात. 

माणसाला *खर्च करताना भीती वाटत नाही*; पण नंतर *हिशोब लागत नाही*; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; *या वस्तूची मला कितपत गरज आहे?* असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं *उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा*. असा निर्णय घेतल्यावर त्या *वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां*? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा. 

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो. 


संदर्भ : डिडरोट इफेक्ट

देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ॥ १ ॥

ऐशा संतप्ते हो जाती । घडे साधूची संगती ॥ २ ॥

पूर्ण कृपा भगवंताची । गोरा कुंभार मागे हेंचि ॥ ३ ॥


 - संत गोरा कुंभार

स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं ॥ १ ॥

माझें रूप माझें विरालेसें डोळां । माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां ॥ २ ॥

म्हणे गोरा कुंभार नवल झालें नाम्या । भेटी तुह्मां आह्मां उरली नाहीं ॥ ३ ॥


 - संत गोरा कुंभार

 वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥ १ ॥

नाहीं जया रूप नाहीं जया ठाव । तेंचि व्यालें सर्व सांगतसे ॥ २ ॥

जीवनीं चंद्रबिंब विंबलें पैं साचें । परि नाहीं तें नितंबिलें जवळें जेवीं ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा । आलिंगन देगा मायबापा ॥ ४ ॥

 

- संत गोरा कुंभार

एकमेकांमाजी भाव एकविध । असे एक बोध भेदरहित ॥ १ ॥

तूं मज ओळखी तूं मज ओळखी । मी तुज देखत आत्मवस्तु ॥ २ ॥

आत्म वस्तु देहीं बोलता लाज वाटे । अखंडता बिघडे स्वरूपाची ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा । प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी ॥ ४ ॥

 

- संत गोरा कुंभार

 मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥ १ ॥

तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥

आनंदी आनंद गिळूनि राहणें । अखंडित होणें न होतिया ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें । जग हें करणें शहाणें बापा ॥ ४ ॥


 - संत गोरा कुंभार