एकदा काही कवी मंडळींबरोबर गडकरी सिंहगड पाहायला गेले. तेथे डोणागिरीच्या कड्यावर उभे असताना पुष्कळशा कवींना काव्य रचण्याची स्फूर्ती आली आणि जो तो ‘उद्धवा शांतवन कर जा’ या चालीवर ऐतिहासिक कविता लिहू लागला. गडकरी शांतपणे उभे होते. तेव्हा कोणीतरी त्यांना विचारले की‚ ‘‘काय हो गडकरी‚ डोणागिरीचा कडा पाहून तुम्हाला एखादी कल्पना कशी सुचत नाही?’’ त्यावर गडकरी म्हणाले‚ ‘‘हा कडा बघून एक उत्तम कविकल्पना या क्षणी माझ्या मनात आली आहे की‚ साऱ्या कवींना एका पोत्यात घालून खाली ढकलून देण्यासाठी डोणागिरीसारखा दुसरा सोईस्कर कडा नसेल या महाराष्ट्रात!’’
राज्यकर्त्यांना अंदाजपत्रकाची जुळवणी करताना कर लादण्यासाठी नवी नवी क्षेत्रे शोधावी लागतात. विवाहित जोडपी ही विविध खर्चाखाली भरडली गेलेली असतात. ‘एकटा जीव सदाशिव’ अशा ब्रह्मचाऱ्यांना त्या मानाने खर्च कमी असतो. हा विचार जर्मनीमध्ये केलेला आढळतो. महायुद्धाच्या काळात नव्या कराच्या यादीत ‘ब्रह्मचाऱ्यावर कर’ लादण्याची कल्पना पुढे आली.
त्याबाबत खुलासा मागताना हिटलरने विचारले‚ ‘जनतेला हा कर झेपेल का?’
त्यावर एका अविवाहित नागरिकाने विनंती केली‚
‘तंगीच्या काळात कच्च्या मालावर जकात बसवू नये.’
तिघे कोण
एका तरुणीने आपला हात वेगवेगळ्या वेळी तीन पुरुषांच्या हातात दिला. एकदा तिचा चेहरा हसरा दिसला. दुसऱ्या वेळी काळजीयुक्त दिसला‚ तर तिसऱ्या वेळी रडवेला झाला.
तर हे तिघे कोण असावेत?
उत्तर - अनुक्रमे नवरा‚ डॉक्टर व कासार
तीन जणांनी तरुणीची चुंबने घेतली. त्या वेळी कधी कधी ती रडे‚ तर कधी रागवे‚ कधी कधी लाजेही!
तर या चुंबन घेणाऱ्या व्यक्ती कोण असाव्यात?
उत्तर - अनुक्रमे आई‚ मैत्रीण आणि नवरा