प्रार्थना

या इथें, झाडांना उदासीन करणाऱ्या संधिप्रकाशांत 
मी जेव्हां ईश्वरी करुणांचीं स्तोत्रे म्हणूं लागतों 
मावळतीला, शेवटच्या किरणांची फुलें समुद्राच्या 
दिशाहीन पाण्यांत बुडून जातात...कुठे जातात ? 
क्षितिजाच्या अमूर्त बनांत पारिजाताचे वणवे 
उत्कर्षानं पेटूं लागतात....

या इथें, शिल्प-गांधाराच्या शून्य नगरींत
मी जेव्हां अंतिम वासनांच्या प्रार्थना म्हणूं लागतों, 
आत्मलीन पाचोळ्याच्या साक्षीनें;
-तेव्हां तुझ्या लोचनांतील अतर्क्य दुःखांतून, 
चंद्रकालीन शिवालयांचीं बर्फाच्छादित शिखरें 
प्रार्थनांच्या अंधारांत शिरत असतात.

सावली

समुद्र-जळ फोडतां तुटुन लाट ये जांभळी 
तिच्या अमित बिंदूंच्या कितिक बांधिल्या ओंजळी 
उभे पिउन शिल्प हे ढळत नेत्र माझे पुढें 
उदास वर माड, तूं खिळुन झावळ्यांच्या तळीं ....

मला मरण येउं दे फिटत जाउं दे वर्तुळें 
जशा मिटत पापण्या फुलत आसवांचे मळे 
उभा अढळ मुक्तिचा प्रलयगंध प्राणांवरी 
तुझे चरण मेंदिचे गगन जान्हवीच्या जळीं ....

असा कधिं न पाहिला प्रहर भव्य स्पर्शातला 
जसा मिठित वांकला सजल मेघ स्वातींतला 
उभी व्यथित मग्न ही अचल पर्वतांची सभा 
तुझी स्मरुन नग्नता क्षितिज पांघरे सावली....

वाराणसी

कथेंत निजल्यापरी चढत रात्र आली कशी 
सकंप शरिरांतली प्रहरवेल की स्निग्धशी 
तुझ्या हृदयशक्तिची मिठित मृण्मयी धूळ ही 
तमांत शिरल्यावरी दुरुन हाक येते जशी ..... 
उदास मन येइना थकुनि झोपलेले झरे 
अनाम असल्यापरी तुजसि जन्म गेला स्मरे.... 
किती तरल सूक्ष्म ही तम-समर्पणाची तऱ्हा
नदीत बुडली जणूं लहर चांदण्यांची अशी.... 
तमास कुणीही नसे मरण अमृताचें जसें 
तशांत तुज स्वमिंचें अटळ लागलेलें पिसें 
सजून मन भाविनी दिसशी हंसगीतापरी 
विराट तननिर्मळा बघत आर्त वाराणसी....

शाप

संधिप्रकाशांतिल रेषेवर स्तब्ध थांबली गुरें 
घाटापासुन घाट तुटे की अरण्य हृदयी भरे.... 
गांवगांव रस्त्यांत ढळे अन् तशा तन्मयी वाटा 
एकाकी प्राणांच्या उठती लाटांवरती लाटा.... 
या दुःखाचा कलश सावरे तुझ्या कटीची आण 
कीं हातानें हळु स्पर्शावे मीच आपुले प्राण.... 
उभ्या घनांच्या शिखरांमध्ये तुटे जशी चांदणी 
मळवट भरल्या केसांवरचें फूल तसें साजणी 
संध्याकाळी मुका उभा मी मला सतीचा शाप 
कुठें पाहतो ? अस्थावरती सरसर चढती साप....

गाणें

सांज हंबरे पिशी तुझीं धुळींत पैंजणें 
धुळीस पाय लागतां धुळींत गोंदलें जिणें. 
गोंदणें कसें निनाद कोरल्या धुक्यांवरी 
कलंडल्या दिशा तमांत वांसरें उभीं घरीं.... 
तुझ्या मिठींत मी ढळें तशींच वांसरें मला 
वनांत गाय शोधतां कसा सुगंध लागला.... 
सुदीर्घ दूर सावल्या तसें क्षितीज भासलें 
कुण्या फुलांस पांघरूं तरूंस मेघ लागले.... 
सशिल्प दुःख मंदिरीं धुळींत रेखतां तुला 
उभ्या निजेंत जागणें दिसे न गांव आपुला.

भूल

प्रकाश गळतो हळू हळू की चंद्र जसा उगवे 
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे.... 
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका 
दुःख- सुरांचा क्षितिजांपाशी मेघ दिसे परका.... 
हिमनगरांतिल बर्फ-धुळींचे उत्सव भरले नवे 
धुक्यांत तुटल्या शिखरांवरती पक्ष्यांचेहि थवे .... 
मंदिर-मंदिर पाणी.... पाणी शिल्प कुठें वितळे 
दुःखाच्या तंद्रींतुन जैसें अमृत ठिबकत निळें..... 
माझ्या हातुन मुठभर माती अवकाशावर पडे 
घरांघरांना मरणफुलांची गंधित भूल जडे....

नाद

वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा 
या फुलांत या सुरांत चंद्र घालतो गळा 
पावलें अशीं सलील नादती कुठून नाद ? 
मी क्षितीज वाहतों तरी जुळे न शब्द, गीत. 
दुःख एक पांगळे जशी तरूंत सावली 
या उरांत पेटलीस, कां उन्हास काहिली ? 
असें कसें सुनें सुनें मला उदास वाटतें 
जशीं उडून पांखरें नभांत चाललीं कुठें.