असं.. कधी वाटलंच नव्हतं..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..


~ आशिष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा