देवा, स्त्रीहृदयीं

देवा, स्त्रीहृदयीं मनोरमपणा केव्हा कुणीं ओतिला ?
गङगौघापरि भूवरी वरुनि ये ओढाळ ओढा कसा !
भूमीतें पहिल्या रसें सजवितां हा सार्थ होऊ रसा;
हा दिव्याभिमुखी करी ऊजळुनी चेतोभवज्योतिला.
नेत्रें तीं वळतां ऊठे प्रथम त्या वृष्टींतलें वादळ,
गालींचीं अरुण स्मितें झळकतां प्रीति त्वरें अङकुरे,
ऐकाकी फुलतांच वाक्सुमन तें वेडा पतङग स्फुरे,
त्या आलिङगनचुम्बनांत पहिली ऐकी पटे मङ्गल.
कैशी घेत अनेक रम्य वळणें जाऊ वरी हा पथ,
भासे मन्दिर न्हाणिलें गिरिशिरीं की सोनियाच्या रसें !
प्रीतीची अधिदेवताच वसशी तू त्या स्थळीं राजसे,
देवी, अन्तर तोडुनी तव पदीं आलोंच मी धावत.
म्हतारीं म्हणुं, देत की भवपथीं काटेकुटे मातले -
काटयांची क्षिति कां गुलाब फुलतां हे ध्येयलोकांतले ?


कवी - माधव ज्युलियन
१ फेब्रुवारी १९१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा