पंत मेले - राव चढले

[ पंतांच्या घरीं ]

.... असें काय ? सोड मला ! चिमणे, असें वेडयासारखें काय करावें ! रडतेस काय ? जा ! दार लावून घे - घरांत आपला गोपूबाळ निजला आहे ना ? त्याच्याजवळ जाऊन बैस हं ! रडूं नकोस, जा ! - आई आबासाहेबांकडे भात सडायला गेली आहे, ती आतां इतक्यांत परत येईल ! जाऊं मी ? रडायची नाहींस ना ? भूक लागली आहे म्हणून का तूं रडतेस ? - असें काय ? चिमे, मी येईपर्यंत तूं अगदी गप रहा हो ! - आईनें दळून ठेवलेलें हें पीठ यमुनाबाईच्या घरीं पोंचवितों, आणि तसाच माधुकरी मागून मी लवकरच परत येतों ! मग माझ्या ताईला भात, वरण, भाकरी - माधुकरी म्हणजे काय ? ताई ! माधुकरी मागणें म्हणजे भीक मागणें हो ! - लोक आपल्याला भिकारी म्हणतील ? म्हणूं दे ! बाबा देवाच्या घरीं गेले आहेत; त्यांनी देवाला सांगितलें म्हणजे मग देव आपल्याला श्रीमंत करील ! - बाबा केव्हां येतील ? छे ! ते आतां कुठलें यायला ! हें बघ ताई ! तूं बाबांच्याबद्दल पुनः कधीं आईला विचारुं नकोस हो ! ती किं नाहीं लागलीच रडायला लागते ! कोण आई ! केव्हां आलीस ? हें ग काय ! - आई ! आई !! कां ग अशी एकदम मोठमोठ्यानें रडायला लागलीस ? मी माधुकरी मागायला जातों म्हणून ? होय ? - पण आई ! तूं नाहीं का ग लोकांची भांडी घांशीत - दळण दळीत - धुणें धुवीत ? तसेंच मी - आई ! गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको जाऊं म्हणतेस ? कां बरें ? ऊन फार पडलें आहे, आणि माझे पाय फार पोळतील म्हणून ? असूं दे कीं ! मी पळत पळत जाऊन लवकर परत येतों ! जर आतां मी गेलों नाहीं तर गोपू, चिमी, तूं, मी, सगळे जण आपण भूक लागून रडायला नाहीं कां लागणार ? मग आपल्याला कोण बरें खाऊं घालील ? आई ! मी आत्तां जाऊन येतों, सोड मला !....

[ रावांच्या घरीं ]

.... खाऊ ! अरे पेढे आणले आहेत पेढे ! थांबा, थांबा ! अशी घाई करुं नका ! सगळ्यांना देतों बरें मी ! आधीं देवाला नैवेद्य दाखवूं ! आणि मग - हो, हो ! तुला आधीं देईन सोने मी ! मग तर झालें ! - पाणी आणलेंस ? शाबास ! हं, सोने, बापू, देवाच्या पायां पडा, आणि म्हणा ' जय देवबाप्पा ! असेच सुखाचे दिवस आम्हांला वरचेवर दाखवीत जा !' - अस्सें ! शाबास ! हं, हे घे सोने, तुला चार, आणि हे बापू, तुला चार, झालें ना आतां ? - कोण आहे ? रामभाऊ ? अरे वाः ! तुम्ही तर अगदीं वेळेवर आलांत बुवा ! हं, हे घ्या, - आधी खा मुकाट्यानें ! मग कारण विचारा ! मला पांच रुपये प्रमोशन झालें पगार वाढला, त्याचे हे पेढे ! समजलें ? अरे बापू ! आतां हे आंत घेऊन जा ! आणि इकडे बघ, आपल्या त्या गोविंदरावांना, आपासाहेब कर्व्याना, झालेंच तर माडीवरच्यांना, सगळ्यांचा घरी आतांच्या आतां जाऊं द्या म्हणावे ! समजलें ना ? नको, नको, मला नको ! अहो हपिसांत मीं पुष्कल खाल्ले आहेत ! - मंडळी ऐकेचनात ! तीन रुपयांचे पेढे द्यावे लागले मला ! - म्हटलें जाऊं द्या ! मंडळी आपली आहेत ? आणि पुनः असे आनंदाचे प्रसंग वरचेवर थोडेच येत आहेत ? - बरें झालें चला ! इतके दिवस आशेनें रात्रंदिवस वाट पाह्यल्याचें परमेश्वरानें शेवटीं सार्थक केलें ! अहो, पंधराचे वीस व्हायला सहा वर्षे लागली - सहा वर्षे ! नुकतेच आमचे दिवाकरपंत मेले, आणि त्यांची ही जागा मला मिळाली, बरें ! - असो, ईश्वराची कृपा होती म्हणून हे तरी दिवस दिसले ! हो ! करतां काय ? - बरें आपण आतां मुंबईला कधी जाणार ? - रविवारची ना ? मग हरकत नाहीं ! कारण मी परवांच्या दिवशीं श्रीसत्यनारायणाची पूजा करण्याचें योजले आहे ! तेव्हं म्हणतो, प्रसाद घेऊन मुंबईला जा ! - ठीक आहे ! अहो, परमेश्वरांची कृपा असली तर उत्तरोत्तर आपल्याला आणखीही असेच सुखाचे दिवस येतील ! काय ? म्हणतो तें खरें आहे कीं नाहीं ?....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा