अरे रडता रडता

अरे रडता रडता डोळे भरले भरले
आसू सरले सरले आता हुंदके उरले
आसू सरले सरले माझा मलेच इसावा
असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा

सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
 झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली
देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा
डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं
आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव
कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन
तेच देइल देइल नशिबले आवतन

जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत
नका नका आया बाया नका करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझा मले जिव



कवियत्री - बहिणाबाई चौधरी

आई वडिल

न्हाननी माझा घर,

सप्या लोट्यांनी दिसे थोर.

कापसाच्या गादयेवर

पटी वाचिता माझो बाळ.

दारातले केळी,

वाकडा तुझा बौण

नेणता तान्हा बाळ

शिरी कंबाळ त्याचा तौण

जायेच्या झाडाखाली,

कोण निजलो मुशाफिर,

त्याच्या नि मस्तकावर,

जायो गळती थंडगार, 

परिपक्व झाडे

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत…


 कवी - द. भा धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

निळा पारवा

वसुंधरेच्या माथ्यावरती
घुमतो आहे
आभाळाचा निळा पारवा.

डोळ्यावरती राखी ढापण,
लक्ष सदाचें धनिणीपाशी
अन धनिणीच्या पायामधल्या
रुणझुणणाऱ्या नादापाशी.

-अवचित काही घडलें
आणि दचकला निळा पारवा;
टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.

जाती त्याच्या अगदी जवळून
किलबिलणारे कुणी मुशाफिर
रंगित पक्षी…
कुणी घासली चोच तयावर;
कुणी घातली शिळ तयाला;
ऐकवैली…पंखाची फडफड;
दाखविले चित्रांकित वैभव
पंखावरचे.
गिरकी घालुन त्याच्या भवती
निघुन गेले.. धुंद मुशाफिर;
झुलवित अपुले पंखे,
झुलवित त्याला.

पुन्हा दचकला निळा पारवा’
मनात भरले वारे
पिसा पिसातुन थरथरणारे;
फुगली पंखे;
उचलुन धरला पोटापाशी
पाउ एकुटा;
मान ताठली जरा खालती
झेंप भाराया…

तोच वरी ये वसुंधरेचा
तांबुस गोरा कोमलसा कर.
भरवई त्याच्या टोची मध्ये
एकच मोती
शुभ्र टपोरा,
एकच माणिक , झगमगणारे.

पुन्हा टेकले पाउल खाली;
नितळाई ये पुन्हा पिसांवर
-आणि लागला पुन्हा घुमाया
आभाळाचा……. निळा पारवा.


कवियत्री - इंदिरा संत

दगड

किती दिवस मी मानित होतें
ह्या दगडापरी व्हावे जीवन;
पडो उन वा पाउस त्यावर
थिजलेलें अवधें संवेदन…

किळवुन ज्याच्या वरती डोळे
मनात यावे असले कांही
तोच एकदा हसुन म्हणाला-
दगडालाही चुकले नाही.

चुकले नाही… चढते त्यावर
शेवाळाचे जलमी गोंदण;
चुकले नाही .. केविलवाणें
दगडफुलाचे त्यास प्रसाधन…

थिजलेल्याचे असले कांही
त्याहुन वाते, हवे तुझे मन
सळसळणारे अन जळणारे
पशापशाने जाया भडकुन


कवियत्री – इंदिरा संत

रक्तामध्ये ओढ मातीची

रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे


कवियत्री - इंदिरा संत

जशी ती

तो कधी येईल, कधी न येईलकधी भेटेल, कधी न भेटेल
कधी लिहिल, कधी न लिहिल
कधी आठवण काढील, कधी न काढील
असा तो. एक अनिश्चिती…………..
बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी.
म्रूत्युसारखी.

त्या अनिश्चितीच्या ताणांच्या धाग्यात
तिचे पाय गुंतणार, काचणार……..
कोलमडणार….
पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक
पीळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर
उभी राहून ती झोके घेऊ लागली
या अस्मानापासुन त्या अस्मानापर्यंत
अशी ती एक मूक्ता
वार्यासारखी. जीवनासारखी.

कवियत्री - इंदिरा संत