आत्म्याची हाक

प्रभाकरने आपल्यापुढे करियरीस्ट हाण्याचे ध्येय कधीच ठेवले नव्हते. त्याचे नाव यामुळे पहिल्या दहा किंवा पाचात कधी झळकले नव्हते. परंतु हायस्कूलपासून तो एक आनंदी परंतु तत्त्वनिष्ठ मुलगा म्हणून सर्वांना ठाऊक होता. देशप्रेम, समाजसुधारणेविषयी आस्था आणि समाजातील अन्याय, विषमता यामुळे त्याचे रक्त उसळे. यामुळेच तो विद्यार्थी जीवनातही अनेक चळवळींत भाग घेत असे. त्याच्या वक्तृत्वांत आणि लेखनात एकप्रकारची धार असे. कॉलेजात गेल्यावर त्याला थोडे व्यापक क्षेत्र मिळाले. त्याच्या बहुमुखी प्रतिभेला मोठे क्षेत्र मिळाले. कॉलेजच्या आवाराबाहेरही प्रभाकर दिसू लागला. वृत्तपत्रांतून त्योच लेख मधून मधून झळकू लागले. त्याला सर्वांत चीड कसली असेल तर सर्वत्र बोकाळलेल्या दांभिकतेची. धर्मात, राजकारणात, एवढेच नव्हे तर शिक्षणक्षेत्रांतही दांभिकता पाहून त्याला वाईट वाटे आणि त्याचा आत्मा बंड करून उठे. समाजाच्या दु:खाचे सर्वांत मूळ कारण म्हणजे दांभिकता असे तो म्हणे आणि समाजाला जर थोडे अधिक सुख मिळवून द्यावयाचे असेल तर ही दांभिकतेची प्रतिष्ठा समाजातून नाहीशी केली पाहिजे असे त्याचे म्हणणे. त्याच्या ह्या नवविचाराने तो कोठल्याच चौकटीत बसत नव्हता.

आपली कॉलेजची चार वर्षे त्याने पुरी केली. घरची गरिबी होती. प्रभारची चार वर्षे कधी पूर्ण होतात याकडे त्याचे वडील डोळे लावून होते. प्रभाकर परीक्षा देऊन घरी आला. वडिलांच्या त्याच्याबद्दल मोठमोठया अपेक्षा होत्या. तो मोठा पगारदार अधिकारी होईल असे त्यांना वाटे. तो परत आला आणि त्यांनी त्याच्यामागे नोकरीचे टुमणे लावले. निकाल लागेपर्यंत थांबायलाही ते तयार नव्हते. त्यांच्या आग्रहाला कंटाळून मग प्रभाकर एकाद दुसरा अर्ज रोज पाठवी. अर्ज पाठविताना त्याच्या मनाला वेदना होत. आपण कॉलेजात समजत होतो तितका जीवनसंग्राम सोपा नाही हे त्याला दिसले. अर्ज करता करता त्याचा रिझल्ट लागला. तो पास झाला. परंतु त्याच्या अर्जाला समाधानकारक उत्तर कोठेच नव्हते. त्याच्याबरोबर मॅट्रिकला बसलेली मुले कुठे कुठे चिकटली होती. वरच्या जागा काहींना मिळाल्या होत्या. काहींनी मायाही बरीच जमा केली होती. प्रभाकरच्या वडिलांच्या समोर ही दृश्ये दिसत.
प्रभाकरच्या निकालाच्याच दिवशी वर्तमानपत्रात एक जाहिरात होती. संपादकाच्या जागेसाठी अर्ज मागविले होते. 'नवसमाज' मासिक निघायचे होते. संपादकाला तीनशे रुपये पगार मिळावयाचा होता. प्रभाकरने अर्ज केला. त्याच्या डोळयांसमोर 'नवसमाज'चे आपण संपादक झाल्याची दृश्ये तरळू लागली. परंतु मनात वाटे, ''माझ्यापेक्षा कितीतरी अनुभवी लोकांचे अर्ज येतील. तीनशे रुपये पगार म्हणजे मामुली गोष्ट नव्हे. कसची आपल्याला ती जागा मिळते.'' आणि जेव्हा पंधरा दिवस वाट पाहून उत्तर आले नाही तेव्हा तर तो निराशच झाला. पुन्हा दुस-या जाहिरातील शोधू लागला.

पण इतक्यात एक तारवाला आला. 'नवसमाज'चे मालक दीनदयालजी यांची तार होती. आणि प्रभाकरला भेटीसाठी पाचारण केले होते. प्रभाकर लगेच निघाला. जाताना गाडीत त्याने 'नवसमाज' कसे सजवायचे, कोणती सदरे द्यायची, याचा आराखडा तयार केला. सहज एका कागदावर त्याने लिहिले प्रभाकर भारती, बी.ए. संपादक नवसमाज. तो कागद हातात खेळवीत होता. पण मग लाज वाटली. अजून कशाला पत्ता नाही. जर कोणी आपल्याला पाहिले तर काय म्हणेल! त्याने तो कागद लगेच खिशात कोंबला. त्याचे उतरायचे स्टेशन आले. दीनदयालजींचा मनुष्य स्टेशनवर आला होताच. प्रभाकरला त्याने लगेच हुडकून काढले. घरी जाताच दीनदयालजींची मुलाखत झाली. म्हणाले, ''तुमचा स्पष्टवक्तेपणा मला आवडला. इतरांनी अर्जात समाजसेवेची इच्छा आहे वगैरे हजार भानगडी लिहिल्या. पण तुम्ही स्पष्ट लिहिले की, मला नोकरीची गरज आहे. समाजसेवा नोकरी करताना करता आली तर हवी आहे. तुमची कात्रणे पाहिली. चांगले लिहिता तुम्ही. तुमच्या लेखणीत जोश आहे.''

''तसे काही नाही. आपली कृपा आहे.''

''मी उगाच स्तुति नाही करीत. तुम्हीच नवसमाज सांभाळा. पहिला अंक कधी काढायचा? आज आहे जुलैची पहिली तारीख.''

''१५ ऑगस्टला काढू. स्वातंत्र्य दिनापासून 'नवसमाज' सुरू होऊ दे.''

''ठीक. पण जमेल एवढयांत?''
प्रभाकरची निवड झाली. प्रभाकर कंबर बांधून कामाला लागला. १५ ऑगस्टला नवसमाजाचा पहिला अंक निघाला आणि वाचकांच्या नुसत्या उडया पडल्या त्याच्यावर. लेख, गोष्टी, कविता उच्च प्रकारच्या आणि मुखपृष्ठ सुरेख आणि अंतरंगाची कल्पना देणारे होते. वृत्तपत्रांतून उत्कृष्ट अभिप्राय आले. एकजात सर्वांनी 'नवसमाज'ची पाठ थोपटली होती. दीनदयालजीही खूश होते. अंक एकापेक्षा एक सरस निघत होते.

सात आठ अंक निघाले असतील नसतील. गावात नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली. दीनदयालजी उभे राहिले. त्यांच्या विरूध्द एक पेन्शनर हेडमास्तर उभे होते. हे हेडमास्तर फार लोकप्रिय होते. समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रांत अग्रभागी असत. गावातले कुठलेही सेवाकार्य असो तेथे ते असायचेच.

आणि एक दिवस निवडणुकीनिमित्त सभा झाली. म्युनिसिपल निवडणूक हा विषय होता. प्रभाकर बोलणार होता. लोकांची अफाट गर्दी झाली. प्रभाकरचे प्रवाही आणि प्रभावी भाषण सुरू झाले. कॉलेजमधला दांभिकतेविरूध्दचा सारा जोश त्याच्या अंगात संचारला. म्हणाला, ''नगरपालिका सुधारल्यावाचून स्वराज्य झोपडयांपर्यंत पोचणार नाही. सर्व लोभ, भय सोडून त्यागी समाजसेवकांना निवडून देण्याची हिम्मत मतदारांनी बाळगल्यावाचून नगरपालिका कशा सुधारणार? उद्याच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी दाखविले पाहिजे की, खरे खोटे तुम्ही ओळखता. आपला हितकर्ता कोण ते तुम्हांला समजते. तुम्ही मते कोणाला देणार? तुमच्या सेवेसाठी अखंड तळमळणा-या ह्या हेडमास्तरांना - ज्यांनी लोकशिक्षणाचे कार्य सतत तीस वर्षे केले आहे त्यांना, की केवळ पैसा आहे म्हणून नगरपालिकेचे राजकारण करू पाहणा-या दीनदयालजींना?''

प्रभाकरच्या वक्तृत्वाचा परिणाम जनतेवर झाला आणि दीनदयालजींवरही. दुस-या दिवशी दीनदयालजींनी त्याला बोलाविले व सभेतील भाषणाविषयी विचारले.

ते म्हणाले, ''मी तुमचे काय घोडे मारले होते माझ्याविरूध्द प्रचार केलात!''

''मी नोकरी पत्करली म्हणजे माझी मते विकलीत असे नाही. मला जे खरे वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.''
एवढे बोलून तो तडक घरी आला आणि त्याने राजीनामा पाठवून दिला. तसे न करण्याबद्दल त्याला अनेकांनी सल्ला दिला. हेडमास्तर तर म्हणाले, ''मी आपले नावच मागे घेतो.'' पण प्रभाकरने निश्चय पार पाडला. ज्या स्पष्टवक्तेपणामुळे तो संपादक झाला त्यामुळेच त्याला नोकरी सोडावी लागली.

निवडणुका झाल्या. शेटजींना विजयाची खात्री वाटत होती. आपल्या पैशाचा आणि पुढे पुढे करणा-यांचा त्यांना फार भरवसा होता. पण निवडणुकीत हेडमास्तर निवडून आले. इकडे प्रभाकर राजीनामा देऊन बाहर पडला. त्याला त्याच्याजोगती नोकरी मिळाली नाही. शेवटी तो आपल्या गावी आला. एक छोटेसे दुकान त्याने घातले पण व्यापारी कौशल्य त्याच्यात नव्हते. दुकानातून घरखर्च चालत नसे. शेतीवाडीतही प्रभाकर लक्ष घाली. त्याचे जीवन कसे तरी चालले होते. लोक त्याच्याबद्दल हळहळत होते.

आणि एकदिवस त्याच्या त्या खेडयांतल्या दुकानापुढे एक मोटर उभी राहिले. दीनदयालजींनी विचारले, ''कसे काय चालले आहे दुकान?''

प्रभाकरला वाटले जखमेवर मीठ चोळण्यासाठी हे आले आहेत. चांगले चालले आहे, द्यावे दडपून असा विचारही डोकावून गेला. पण त्याने स्वत:ला सावरले. म्हणाला, ''कसा तरी संसार रेटतो आहे.''

दीनदयालजींनी प्रभाकरला मिठी मारली. ते म्हणाले, ''जीवनाशी खरा प्रामाणिक आहेस. 'नवसमाज' तुझ्यावाचून पोरका आहे. आजही उत्तम साहित्य त्यात आहे. पण ते तेज आज तेथे नाही, आत्मा तेथे नाही. तूच 'नवसमाज' सांभाळ. आत्म्याची हाक ऐकणारा प्रामाणिक, निर्दंभ मनुष्य तू आहेस. 'नवसमाज' चालवायला तूच लायक. माझी चूक झाली. तुझी आत्म्याची हाक दडपून टाकायला मी चुकीने सांगत होतो. तू आपल्या आत्म्याच्या हाकेचा अपमान केला नाहीस. 'नवसमाजा'ला तू लायक आहेस. माझ्या विनंतीचा अव्हेर करू नकोस.''

दुस-या महिन्यापासून पुन्हा प्रभाकरच्या संपादकात्वाखाली 'नवसमाज' निघू लागला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा