यक्षरात्र

पाण्यासारखेच, वाहते सदाचे
आयुष्य नावाचे, खुळे गाणे

किनारे धरुन, अखंड चालला
दुःखांचा काफिला, मस्तपणे

सुखाचेही तळ, जाताना घासून
अस्तित्वाची खूण, कळे मला

दिव्यापरी आता, प्राक्तन जोडून
प्रवाही सोडून, श्‍वास दिला

आणि रंगगर्द, क्षितिज पेटले
रात्री उजाडले, क्षणमात्र

तमाने टाकली प्रकाशाची कात
झाली काळजात, यक्षरात्र !


कवियत्री - अरुणा ढेरे

लेणी

समोर, धुकं पांघरुन,
कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड
रोज पहातो माझ्याकडे रोखून,
आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस ?
आपणच उत्तर देतो, हो विसरणारच.
मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड !
असं सगळं विसरता येत असतं,
तर तुझी ही भाषा कळली असती का मला ?
अन हे भोळं मन भळभळलं असतं का असं
वेळीअवेळी ? तुझ्या शेजारीच लेणी आहेत की !
मग तुला कसं कळत नाही वेड्या !
की माणसाच्याही मनात
काही सुंदर लेणी असतात म्हणून !


कवियत्री - पद्मा गोळे

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून.
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा आळता लावलेली तुझी पावले.
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता.

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न कण
प्रेमाच्या चेहर्‍यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो !


कवियत्री - अरुणा ढेरे

खंत नाही,खेद नाही ....

नजरेतून श्वासात,
श्वासातून हृदयात,
हृदयातून स्पंदनात,
स्पंदनातून नसानसात
उतरलीस तू तरी तुला
खंत नाही,खेद नाही ....

तुझं गोड गोड बोलणं ,
पद्धतशीर विसरणं,
आशेला तडा देणं ,
हृदयास घायाळ करणं,
जशी तू त्या गावचीच नाही,
खंत नाही,खेद नाही ....

डोळ्यांनी तुला पहावं,
कानांनी तुला ऐकावं,
ओठांनी तुज गुणगुणावं,
मनाने विरघळून जावं
तुला याचा गंधच नाही,
खंत नाही,खेद नाही ....


कवी - अरविंद

श्रावणमासी - विडंबन


श्रावणमासी, विरस मानसी, हळहळ दाटे चोहिकडे
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे.

भवती बघता भाविक नवरे पत्नी भयाने मौनव्रती
“श्रावण-श्रावण” जपता जपता गलितगात्र हे महारथी

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो आठवे-
“सध्या श्रावण!” हळूच पाउल घराकडे अपुल्याच वळे.

उठती बसती कामे करती, अंगी नाही त्राण पहा
सर्व जगावर हाय! पसरले विषण्णतेचे रुप महा.

“गलास” साधा फुटता भासे, न पिता ही कशी चढे?
श्रावण म्हणूनी त्राण न हाती, हातामधुनी खाली पडे.

बडबड करुनी उगीच आपुले, दिवस जुने ते आठवती
सुंदर साकी, मैफल, मस्ती, मनात अपुल्या साठवती.

“उदास”* गझला पडता कानी, पाउल शोधत वाट फिरे
परि आठवता श्रावणमहिमा, मुकाट मंदिरात शिरे.

वाट असे ही जरी नित्याची कोण बेवडा अडखळला?
दारी आपुल्या अचूक येऊनी कोण नेमका गोंधळला?

पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती.

शून्यामध्ये लावून डोळे बसून राहे तासन्‌तास
वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावा, भुका-तहाना श्रावणमास.

कवी - (हालकवी) अविनाश ओगले

मातीची दर्पोक्ति

घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,
उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती
थरथरा कापली वर दर्भाची पाती
ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात-
अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात
वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात
पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत

ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती,
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
पाहून हासु ये तुमचे ताजमहाल
अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी
कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी
इकडेच वाहते सर्वांची रहदारी
हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति

स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति
लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति
त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !


कवी - कुसुमाग्रज
 कवितासंग्रह - विशाखा

सरणार कधी रण

सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी


कवी - कुसुमाग्रज