कुब्जा

अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ ॥ १ ॥

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकून आपुले तनमन ॥ २ ॥

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डॊळ्यामधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ॥ ३ ॥


कवियत्री : इंदिरा संत (१९७५)
गायिका: सुमन कल्याणपूर
संगीतकार: दशरथ पुजारी

तवंग

शेतावरती इथे नाचणी कशी बिलगते पायाभवती;
थरथरणारी नाजुक पाती इतुके कसले गूज सांगती

इवली इवली ही कारंजी, उडती ज्यांतुन हिरव्या धारा;
हिरवे शिंपण अंगावरती, रंग उजळतो त्यांतुन न्यारा

त्या रंगाची हिरवी भाषा, अजाण मी मज मुळि न कळे तर;
तरंगतो परि मनोमनावर त्या रंगाचा तवंग सुंदर….!!


कवियत्री - इंदिरा संत

आक्रोश

दिसु नको, दिसु नको,
नवी रीत मांडु नकॊ
येउ नको, येउ नको,
प्राण माझा कोंडू नको…

नवे अनोखे बेट,
नवे रेशमाचे फास
आणि मनाच्या तळाशी
नको नको चा आक्रोश..


कवियत्री - इंदिरा संत

तिचे स्वप्न

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्य़ांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे . गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.

पण ते पडण्यापुर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.


कवियत्री - इंदिरा संत

थेंबाथेंबी

तारेवरती असती थांबुन
थेंब दवाचे;
मनांत ज्यांच्या,
इवले काही, हिरवे पिवळे
चमचमणारे……
सतारीवरी असती थांबुन
थेंब सुरांचे;
मनांत ज्यांच्या ,
इवले कांही, निळे- जांभळे
झनझनणारे…….
मनोमनावर असती थांबुन
थेंब विजेचे;
छेडुन तारा करांगुलीने.
ऒठ करावे पुढती
टिपायला ती थेंबाथेंबी.

कवियत्री - इंदिरा संत

वेदना

इथे वेदना लालतांबडी;
इथे बधिरताअ संगमरवरी;
इथे उकळते रक्त तापुनी,
बेहोषी अन येथे काळी.
दुखणे बसले चिंध्या फाडित.
गर गर फिरती त्याचे डोळे
नसांनसातुन.
घुमते त्याचे हास्य भयानक
उरल्या सुरल्या रक्त कणांतुन
समोर त्याच्या
करते नर्तन …..एक आठवण
त्या प्रलयाची.
हे कथ्थक…त्या मुद्रा…..
अन ते खर्जातले कंपन.


कवियत्री – इंदिरा संत

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली….



कवियत्री - इंदिरा संत