तुला विसरण्यासाठी

तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
अकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

दिला उधळुन डाव
आणि निघाले कुठेही
जिथे तुझे असें…
तुजे असे कांही नाही!

द्रुष्टी ठेविली समोर,
चालले मी ’कुठेही’त;
कुठेही च्या टोकापाशी
उभी मात्र तुझी मुर्त!

वाट टाकली मोडुन
आणि गाठला मी डोह;
एक तोच कनवाळु
माझे जाणिल ह्रुदय!

नांव तुझे येण्याआधी
दिला झोकुन मी तोल;
डोह लागला मिटाया
तुझी होऊन ओंजळ!!


कवियत्री - इंदिरा संत

पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी

अजूनही तिन्ही सांज

चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण

समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - निराकार

“ऐक जरा ना”

ऐक जरा ना…….
अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलावर;
एकाकीपण आले पसरत
दिशादिशातुन.

घेरायास्तव…..
एकटीच मी
पडते निपचित मिटुन डोळे.

हळुच येते दार घराचे
अंधारातुन;
उभे रहाते बाजुला.

“ऐक जरा ना….”
आठवते मज ती… टकटक
त्या बोटांची;
शहारते अन रंगरोगणाखाली
एक आठवण,
गतजन्मीची;
आभाळातुन पडणार्या त्या थेंबाची

“ऐक जरा ना”
दंडावरती हात ठेवुनी
कुजबुजते आरामखुर्ची.

“आठवते का अजुन तुला ती
कातरवेळा.
माहित नव्हते तुजला,
वाट तुझी तो पहात होता
मिटून डॊळे.
होते दाटुन असह्य ओझे;
होती धुमसत विद्युत काळी;
अजुन होते मजला जाणिव
निबिड वनांतिल….
मध्यरात्रिच्या वावटळीची
-झपाटल्याची”

“ऐक जरा ना “
कौलारांतुन थेंब ठिबकला
ऒठांवरती.

“ऐक ना जरा….एक आठवण.
ज्येष्ठामधल्या – त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षित से
तया कोंडले जलधारांनी
तुझ्याच पाशी.

ऊठला जेंव्हा बंद कराया
उघडी खीडकी,
कसे म्हणाला…….
मीच ऐकले शब्द तयाचे…
’या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय’

-धडपडले मी, उठले तेथुन;
सुटले धावत
त्या वस्तुतुन , त्या पाण्यातुन,
दिशादिशातुन,
हात ठेवुनी कानावरती;
ऐकु न यावे शब्द कुणाचे;
“ऐक जरा ना”
“ऐक जरा ना”
“ऐक जरा ना”


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - म्रुगजळ

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा

   
    कवियत्री  – इंदिरा संत
    संगीत     – कमलाकर भागवत
    स्वर        – सुमन कल्याणपूर

आई

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.

आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.

ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.

किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.



कवियत्री -  इंदिरा संत

बाहुली

एक बाहुली हरवते तेव्हा
दुसरई साठी हटुन बसते;
नवी मिळता,नाचतं नाचतां
ती ही कुठे हरवून जाते.
किती किती नि कसल्या कसल्या
बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या;

पिवळी रंगीत लाकडाची ठकी,
तांबुस काळी चंदनाची कंकी,
आवाज काढणारी रबराची पिंपी,
उघड मीट डोळ्यांची कचकड्यांची चंपी,
मण्यांच्या झग्याची काचेची सोनी,
बिंदी बिजवऱ्यांची कापडाची राणी
किती किती नी कसल्या कसल्या
बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या.

खेळाचा पेटारा उघडुन पाहिला,
संसार सारा धुंडुन पाहिला,
ढगात धुक्यात शोध गेतला,
स्वप्नांचा ढीग उपसुन झाला…
किती किती नी कसल्या कसल्या
माझ्या मी हरवुन बसल्या.


 कवियत्री - इंदिरा संत