चाफेकळी

"गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी!
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?"

ती वनमाला म्हणे "नृपाळा, हें तर माझे घ्रर;
पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे--
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें"

"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी! तुला;
तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.
तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी!
क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं."

सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं धडें;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनबाला म्हणे नृपाळा "सुंदर मी हो खरी,--


(हि कविता बालकवींच्या देहान्तामुळे अपूर्णच राहिली )

कवी - बालकवी 

शून्य मनाचा घुमट

शून्य मनाच्या घुमटांत
कसलें तरि घुमतें गीत;
अर्थ कळेना कसलाही,
विश्रांती परि त्या नाहीं;
      वारा वाही,
      निर्झर गाई,
      मर्मर होई.

परि त्याचे भीषण भूत
घोंघावत फिरतें येथ.
दिव्यरूपिणी सृष्टी जरी
भीषण रूपा एथ धरी;
जग सगळे भीषण होतें
नांदाया मग ये येथें;
      न कळे असला,
      घुमट बनविला,
      कुणीं कशाला?--


कवी - बालकवी


आत्मारामाची भूपाळी

उठा प्रातःकाळ झाला । आत्माराम पाहूं चला ।
हा समयो जरिं टळला । तरि अंतरला श्रीराम ॥ध्रु०॥

जीव-शिव दोघेजण । भरत आणि शत्रुघन ।
आला बंधु लक्षुमण । मन उन्मन होऊनी ॥१॥

विवेक वसिष्ठ सद‌गुरु । संतसज्जन मुनीश्वरु ।
करिती नामाचा गजरु । हर्षनिर्भर होउनियां ॥२॥

सात्त्विक सुमंत प्रधान । नगरवासी अवघे जन ।
आला वायूला नंदन । श्रीचरण पाहावया ॥३॥ 

कोठुनि येते मला कळेना

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !


कवी - बालकवी

मधुयामिनी

मधुयामिनि नील-लता
हो गगनीं कुसुमयुता
धवलित करि पवनपथा
कौमुदि मधु मंगला--

दिव्य शांति चंद्रकरीं
आंदोलित नील सरीं
गिरिगिरिवरि, तरुतरुवरि
पसरे नव भूतिला--

सुप्रसन्न, पुण्य, शांत
रामण्यकभरित धौत
या मंगल मोहनांत
विश्वगोल रंगला.


कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविलें ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबरही | साम गायन करी || २ ||

प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें |
रामा जनार्दनी | पायीं मस्तक ठेविलें || ३ ||


रचनाकर्ते - समर्थ रामदास स्वामी

लपे करमाची रेखा

लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला

बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन

नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ


कवियत्री - बहिणाबाई चौधरी