भास

संध्याकाळी किनाऱ्यावर एकाएकी झाला भास
कोण आलं... कोण गेलं? कोणीच नाही जवळपास?

कुठून आली... कुठे गेली? मी पाहिली एवढ खरं
अस येणं अस जाणं तिला दिसलं नाही बरं!

चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली
रेतीवरती पाउलखुणा न ठेवता परत गेली

थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली
गुल्बाक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली!

पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगल का हे पुन्हा येणं?
तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईन देणं !

आयुष्याच्या क्षितीजावर अंधारात बुडले रंग
कशासाठी, कशासाठी आता असा तपोभंग?

समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो
ओल्याचिंब देहांनीच पेटलो होतो, विझलो होतो!

आता असे कोरडे.. जसे जळण्यासाठी उत्सुक सरण
निमित्ताला ठिणगी हवी! एवढ्याकरता दिलं स्मरण?


कवी - वसंत बापट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा