सिद्धांत आसवांचा

आरंभही मी जीवनाचा, रडण्यातुनी केला सुरू
अंतावरी रहील वाटे, कार्य हे माझे सुरू

आता जसा निःशंक रडण्या, सरसावलो थोडा पुढे
आले स्वये भगवान, आणि टाकली गीता पुढे

याही जरी जन्मात आम्हा देइल ना कोणी रडू
मी तरी सांगा अता कोठे रडू, केव्हा रडू

बोललो रडलास तूही, हरवता सीता तुझी
रडता अम्ही आम्हापुढे, टाकसी गीता तुझी?

ओशाळला ऐकून आली, सारी स्मृती त्याला पुन्हा
भगवानही मी काय सांगू, माझ्या पुढे रडला पुन्हा

आसवे आम्हीच पुसली, नयनातली आम्ही स्वये
प्रार्थुनी म्हणतो कसा, सांगू नको कोणास हे

बोललो कि व्यर्थ आहे, परमेश्वरा शंका तुझी
राखायची आहे मलाही, परमेश्वरा अब्रू तुझी

रडण्यातही सौंदर्य माझ्या, ना जरी बघते कुणी
भगवन अरे, ही शायरीही ऐकली नसती कुणी

सिद्धांत ऐसा आसवांचा, त्यालाच मी सांगितला
होता जसा युद्धात त्याने, कुंतीसुता सांगितला

बोलला, साक्षात अविध्यानाथ आम्ही पहिला
पार्थाहुनीही मूर्ख आम्ही, अद्याप नव्हता पाहिला.


कवी/शायर - भाऊसाहेब पाटणकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा