थकलेल्या भटकणाराचें गाणें

किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धरवे !
गेलें गेलें वय हें वायां ! --- मरणहि तें वाटे बरवें !

काय करावें मज न सुचे,
मुळीं न मजला किमपि रुचे,
ह्रदयी सगळें धैर्य खचे;

भणभण वणवण करित अधिक मज आढयींहि जगीं नच फिरवे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धरवे !

कितिक योजिले यत्न यावया तुजशीं मी उत्सुकतेनें !
व्यर्थ जाहले अवघे ! दुर्धर कसें न व्हावें मग जगणें !

पुष्णांनो ! तर दूर सरा !
कष्टक हो ! मार्गीं पसरा !
प्रकाश नलगे---तिमिर बरा !

सर्व चांगलें व्हावें होतें तुजसाठीं---पण लभ्य नव्हे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला श्रण धरवे !

शूळ कपाळीं, कंडन ह्रदयीं, कम्प शरीरीं भरलासे,
सलिल लोचनीं, शीण अवयवीं, हाय ! निराशा मनीं वसे;

तरि, माझी ती भेटेल का ?
पांग मनींचा फिटेल का ?
अलिंगूं ती झटेल का ?

क्षमा करील का मला चुक्यांची ? --- पुसतों मी माझे बरचे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धरवे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मुंबई २८ सष्टेंबर १८९३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा