चालचलाऊ गीता

पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी

बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !

धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही

समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके

काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला

पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी

या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग

लेकांनो! होऊनिया रोग | मराना का!

लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी

कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'

कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?

पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया

मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला!

मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा?

तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला;

परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी!

अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;

बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!

कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप;

घरी डाराडूर झोप | घेत पडले असते!

नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;

म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?

अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड?

लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?'

अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;

दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?

आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई!

ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.'

ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,

खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |

इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः 


- जयकृष्ण केशव उपाध्ये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा