आरती प्रभु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आरती प्रभु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दिवेलागण

१. ये रे घना
२. नुक्ता प्रारंभ
३. व्यथा गात गात
४. दिशा…व्योम…तारे
५. अर्थ
६. अनुप्रासलो मरणे
७. मीं श्वास पेरिले होते
८. मन
९. शिशीरामधल्या
१०. व्रत
११. राजा
१२. नादली दुरांत घंटा
१३. चंद्र
१४. अंगाई
१५. एक इच्छा
१६. अश्रु दे तुं
१७. शुभ्र रुमाल इवला
१८.सज्जन
१९. वाट
२०. एक
२१. एक पक्षी
२२. ह्ट्ट
२३. उंट
२४. पाणी
२५. गाणें
२६. उत्सव
२७. नातें
२८. छोटे
२९. तू नको
३०. आम्ही पुण्यवंत
३१. पूजा
३२. अहेवपण
३३. विमानउतुंग
३४. देहत्व
३५. वेचुं ये गोवऱ्या
३६. विजेच्या वितींनी
३७. दुभंगता ऊर
३८. मूळ भिंतिंचे
३९. जन्म नि मृत्यू
४०. कधी तो कधी मी
४१. पूर
४२. केवळ वास
४३. नुस्ती
४४. पाषाण
४५. मायदुधउष्ठे ओठ
४६. पान पडतांच
४७. ऊर भरू येतां खोल
४८. घर
४९. मन
५०. झरा
५१. कडेलोट
५२. पावरी
५३. शांताकार
५४. मी आणी मी  
५५. चंद्र : सोहळा
५६. चंद्र : व्यथा
५७. नुस्तीं नुस्तीं रहातात
५८. सूर
५९. स्वगत
६०. जुनें गाणें
६१. एकाचा मृत्यु
६२. चौफेर बंद

ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ’नाही’, ’हो’, ही म्हणते

येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते

कळ्याफुलांच्या मागे येते
कोमट सायंचेहरा घेते
उदी उदासी पानी भरते
"मी येऊ रे ?" ऐकू येते
मध्यरात्रभर तेच तेच प्रतिध्वनि ते


कवी /गीतकार : आरती प्रभू
गायक : महेंद्र कपूर
संगीत : हृदयनाथ मंगेशकर

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना


गीतकार - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 
गायक - आशा भोसले
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर

आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

                     मराठी साहित्यविश्वाला `नक्षत्रांचे देणे' देणारे प्रतिभासंपन्न कवी!


वेंगुर्ला तालुक्यातील ‘बागलांची राई’ या ठिकाणी चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. एस.एस.सी. पर्यंतच शिक्षण होऊ शकले. ते बुद्धीने अत्यंत तल्लख पण थोड्या विक्षिप्त स्वभावाचे होते. कोकणात नित्यनेमाने चवीने चघळल्या जाणार्‍या भुताखेतांच्या कथा, एकूणच कोकणातील निसर्ग, गूढरम्यता, माणसांच्या मनाचा कसून शोध यांकडे त्यांचे लिखाण जास्त झुके.
साधारणपणे १९५० मध्ये त्यांनी लेखनास सुरुवात केली. सत्यकथेच्या १९५४ च्या फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘शून्य शृंगारते’ या कवितेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर विंदा करंदीकर व पाडगावकरांच्या ओळखीने मुंबईला १९५९ साली ते आले. आकाशवाणीवर र्स्टों आर्टिस्ट म्हणून ते नोकरीस लागले. पण काही कारणांमुळे १९६१ मध्ये त्यांना नोकरी सोडावी लागली.

खानोलकर हे अतिशय प्रतिभासंपन्न लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होते. त्यांच्या लेखनाचा झपाटा दांडगा होता. त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा काळ लक्षात घेतला, तर त्यांच्या लेखनाचा वेग किती प्रचंड होता हे सहज लक्षात येईल. तरीही त्यांच्या लेखनातील वेधकता व गुणवत्ता वादातीत आहे.

घरचे दारिद्रय, आप्तस्वकीयांचा मृत्यू, उपेक्षा, त्यांच्या स्वभावामुळे होत जाणारे गैरसमज, घरची -दारची आजारपणे, नियतीने कधी कधी केलेली कुतरओढ या सगळ्या पसार्‍यात अडकूनही खानोलकरांच्या लिखाणात कधी खंड पडला नाही. त्यांच्या सगळ्याच यशस्वी लेखनाला एक प्रकारचा पारलौकिकाचा संजीवक स्पर्श झालेला आढळतो.

काही लेखन करायचे असले की, खानोलकर जणू कसल्यातरी भावसमाधीत जात आणि एका विलक्षण अवस्थेत देहभान विसरून लिहीत राहत, झपाटल्यासारखे... आणि ती भावसमाधी उतरली, की त्यांचे लेखन थांबे. मग त्या अवस्थेत जे काही लेखन होई, ते स्वयंभू, स्वयंपूर्ण अशी अनुभूती देणारे असे.

त्यांच्या कवितेने सौंदर्यवादी जाणिवेकडून अस्तित्ववादी जाणिवेकडे केलेली प्रगल्भ वाटचाल, त्यांच्या कथांमधून प्रकट झालेले जीवनाच्या शोकात्मतेचे विविधरूपी आकार, माणूस व विश्व यांच्यातील अनेकविध ताण, काम, प्रेम, द्वेष, हिंसा, सूड, निष्ठा, मत्सर इ. वृत्तीप्रवृत्तींनी भरलेले त्यांच्या कादंबरीमधले गुंतागुंतीचे जग - या सार्‍यांमुळे खानोलकरांचे लेखन वाचकांना व समीक्षकांना गूढ आव्हान देत राहते. विश्वाच्या अफाट पसार्‍यात आणि नियतीच्या निर्विकार दृष्टीसमोर माणूस अगदी नगण्य, शून्य आहे, हा बोध त्यांच्या सर्वच लेखनातून येतो.

अनाकलनीय, अतर्क्य दैवी शक्ती, पापपुण्याच्या संकल्पना, धार्मिक श्रद्धा, माणसाला कोणत्याही पातळीवर नेऊ शकणारी काम प्रेरणा, निसर्गाचे कोमल तसेच उग्रकठोर रूप, वासनांचे विखारी फुत्कार ही सूत्रे खानोलकरांच्या आशयबंधातून फिरून फिरून वेगवेगळे आकार घेताना दिसतात. या आशय सूत्रांची सामर्थ्याने व सहज अभिव्यक्ती करू शकणारी प्रतिमांकित भाषाशैली हे त्यांना लाभलेले वरदानच होते.

त्यांचा ‘जोगवा’ हा पहिला काव्यसंग्रह १९५९ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर १९६२ मध्ये ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दोन्ही काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या व्याकूळ, दु:खविव्हल अवस्थेतल्या कविता जास्त आढळतात. स्मृतिजन्य व्याकुळता हा त्यांच्या पूर्वार्धातील निर्मितीचा ठळकपणे जाणवणारा विशेष वाटतो. इतर समकालीन कवींप्रमाणे तपशीलवार प्रेयसी चित्रण त्यांच्या कवितेत येत नाही. प्रेयसीचे वर्णन करता करताच त्यांना दु:खाची जाणीव इतक्या तीव्रतेने होते, की पुढची कविता त्या अनामिक दु:खाचा अविष्कार होते.

जराच फिरली किनखाबीची सुई, जुईचा उसवित शेला,
आणि ठणकला गतस्मृतीचा , काळोखाने कापूर पेला -

अशी त्यांची वेदना अधिकाधिक तीव्र होत जाते.

त्यामानाने १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहात ते जास्त प्रसन्न वाटतात. आपल्या वेदनाकोशातून बाहेर आल्यासारखे वाटतात. यातील कविता संवादात्मक व नाट्यनिष्ठ आहेत. यातली एक नितांत सुंदर कविता-‘आड येते रीत’.
    ‘नाही कशी म्हणू तुला पहाटमाणगी,  परि घालायचे आहे तुळशीस पाणी
    नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परि सारे हलक्याने आड येते रीत...

या कवितेमधे पती-पत्नीमधील सूचक शृंगार हळुवारपणे व्यक्त झालेला आहे. यातील शृंगारभाव उत्कट असला तरी त्यातील कलात्मक संयम त्यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देतो.

आरती प्रभूंच्या संपूर्ण कवितेला सतत निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेली आढळते. नेमके आणि नीटस शब्द हे त्यांच्या निसर्गकवितेचे वैशिष्ट्य.
    हिरव्याशा गवतात हळदिवी फुले, हलकेच केसरात दूध भरु आले,
    उभ्या उभ्या शेतांमधे सर कोसळली, केवड्याची सोनकडा गंधे ओथंबली ..
अशा सुंदर रंग-गंध भरल्या शब्दांनी, प्रतिमांनी त्यांची निसर्गकविता नटलेली आहे.

कोणताही लेखक हा कवितेमधे आत्मप्रकटीकरण करतो. कादंबरीमधे मात्र लेखक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने आत्मप्रकटीकरण करण्याची संधी घेतो. म्हणून तर त्यांना गद्यलेखनाकडे वळावे लागले. माणसामधील व समाजामधील विकृतीचे चित्रण जे कवितेला कदाचित पेलले नसते, ते त्यांनी कादंबरी, नाटक व कथांमधून मांडले. त्यांनी उसवलेल्या माणसांचे विश्र्व आणि त्यांच्या आदिम वासना, प्रेरणांचा शोध आपल्या जाज्वल्य लेखणीद्वारे घेतला.

१९६६ मधे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक रंगभूमीवर आले. झाडे नग्न झाली, पाठमोरी या कथांमुळे ते लेखक म्हणूनही प्रतिष्ठित झाले. त्यांच्या चानी, कोंडूरा या कादंबरींवर चित्रपटही निघाले.

नियतीने त्यांना पुरे जीवन जगू दिले नाही. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षीच त्यांची प्राणज्योत मालवली, अन्यथा मराठी साहित्यात आणखी काही मोलाची भर त्यांनी निश्चितपणे घातली असती.

खानोलकरांची प्रतिमांकित भाषा ही मराठी वाङ्‌मयाला मिळालेली एक अमोल देणगी आहे. अशा प्रकारची गद्य काव्यसदृश भाषा मराठी कादंबरी, नाटकांमधून दुर्मीळ होत चालली आहे. त्यांच्या यशस्वीतेचे रहस्य आणि लौकिक अपयशाची कारणे पुन: पुन्हा शोधावी असे आव्हान ज्यांच्या कलाकृतींनी वारंवार समीक्षकांपुढे ठेवले अशा अनोख्या प्रवृत्तीचा कलावंत म्हणून खानोलकर वेगळे व महत्त्वाचे ठरतात.

सांगेल राख माझी

संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण
सांगेल राख माझी गेल्यावरी जळून.

खोटी खरी दुधाची होती कशी बिजे ती,
बरसून मेघ जाता येईल 'ते' रुजून.

रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?
वेळूत संध्यावेळी येईल ते कळून.

लागे मला कशाची केव्हा कशी तहान :
चर्चा कशास? नाव काठास की अजून.

कोणा फुले दिली मी, माळून कोण गेले?
शेल्यावरी कुणाच्या असतील स्पर्श ऊन?

का ते कशास सांगू मांडून मी दुकान?
शब्दास गंध सारे असतील की जडून.

काठास हा तरू अन विस्तीर्ण दूर पात्र
केव्हातरी पिकून गळणे नगण्य पर्ण.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

ही निकामी आढ्यता का?

ही निकामी आढ्यता का? दाद द्या आणि शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरीतो का? चोरीता का व्हाहवा

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किवा पाकळी

दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवांचे आणि वायूचे घट

नम्र व्हा अन सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा

चांदणे पाण्य्तले की वेचीत येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही

ना परंतु सूर कोण लावीत ये दिपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा


कवि - आरती प्रभू

आसवांचा येतो वास

कसे कसे हसायाचे
हसायाचे आहे मला

हासतच वेड्या जीवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे आणि कुणापास?
इथे भोळया कळयांनाही
आसवांचा येतो वास

गीतकार :आरती प्रभू
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

नक्षत्रांचे देणे

गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निमार्ल्य, आणि पानांचा पाचोळा


कवी / गीतकार : आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
गायिका  : आशा भोसले
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर

सप्रेम द्या निरोप

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगय्राचा पानी मिटून आहे
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे
वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी निश्वास टाकताहे
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे
बोले अखेरचे तो: आलो ईथे रिकामा
"सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे"


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

नाही कशी म्हणू तुला

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परी पाया खडे कांटे, लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी


गीतकार :आरती प्रभू
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर.

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

गीत – आरती प्रभू
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट – निवडूंग (१९८९)

तू

तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें