बा.सी.मर्ढेकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बा.सी.मर्ढेकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 सचिंत पारध गोड तत्वतः

सोडुनि देतों अता सुखाने !


सावज मागे, पुढे शिकारी !

गति-धुंदी ही भरे शरीरी;

नसानसातुंन वेग चढे शिरिं;

वळुनी बघणें आता कसले !


पाय लागले डोंगर-माथां,

गतिमत्वाने एकतानता,

प्रभू-पावलें लांब तेजतां –

अंधुक, पारध तिथे संपणें

 चंद्रकिरणांनो, तुम्हां

वाजते का कधी थंडी

स्वतःची ? मध्यरात्री

हिवाळ्यांत हुडहुडी !


नाही ना ? मीं म्हणुनीच

लांबवले मरणाला;

गारठून जाल जेव्हा –

चिता हवी शेगोटीला.



पिपांत मेले ओल्या उंदिर

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!


कवी - बा.सी.मर्ढेकर

ह्या गंगेमधि गगन वितळले

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा

विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप
अन् चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप

सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी

अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती

इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन् जरा 'अहम्'ता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा


कवी - बा.सी.मर्ढेकर

झोपली गं खुळी बाळे

झोपली गं खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी ह्या रित्या वेळी

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वाऱयाच्या धमन्या
धुकल्या गं अंतराळी

शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणें
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे

चैत्र चालला चाटून
वेड्या सपाट पृथ्वीला
आणि कोठेतरी दूर
खुजा तारा काळा झाला

आता भ्यांवे कोणी कोणा
भले होवो होणाऱ्याचे
तिरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे

चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती
चाळणीत चाळणी अन
विचारांत तरी माती

चैत्रबाप्पा उद्या या हो
घेऊनीया वैशाखाला
आंबोणीच्या मागे का गं
तुझा माझा चंद्र गेला?

आंबोणीच्या मागे का गं
अवेळी का चंद्र गेला?


कवी - बा.सी.मर्ढेकर

ह्या दु:खाच्या कढईची गा

ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.


कवी  - बा.सी.मर्ढेकर

रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!

ओठांवर आली पूजा, भरे मनांत कापरें
ओल्या पापांची वाळून, झालीं वातड खापरें
पापांतून पापाकडे , जाई पाप्याचा विचार
आणि पुण्याचीं किरणें, लोळतात भुईवर
माथीं घेतलें गा ऊन, कटींखांदीं काळेंबेरें
तुझ्या आवडीचा क्षण, डोळ्यांतून मागे फिरे
गढूळला तोही क्षण, मतलबाच्या मातीने
कैसें पोसावे त्यांवर, आर्द्र स्वप्नांना स्वातीने
घडय़ाळांत आता फक्त, एक मिनिट बाराला
रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!



कवी  - बा.सी.मर्ढेकर

दवांत आलीस भल्या पहाटे

दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.


कवी - बा सी मर्ढेकर

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे

जाऊ दे 'कार्पण्य' 'मी' चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी


कवी - बा.सी.मर्ढेकर

पोरसवदा होतीस

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
होता पायातही वारा
काल-परवापावेतो.

आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी.

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायांचे घेतो.


कवी - बा.सी.मर्ढेकर

जशि धोब्याची मऊ इस्तरी

जशि धोब्याची मऊ इस्तरी
तलम फिरावी सुतावरूनी
फाल्गुनातली चन्द्रकोर तशि
मलिन मनाच्या धाग्यांवरुनी

शिणेल धोबी यदाकदाचित,
पडेल खाली चन्द्रकोर अन्
सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना
पुनश्च कोठे भट्टी भगवन्


कवी - बा.सी.मर्ढेकर

पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा


कवी - बा. सी. मर्ढेकर

गणपत वाणी

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भूवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!


कवी - बा. सी. मर्ढेकर

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.


कवी - बा. सी. मर्ढेकर

बा. सी. मर्ढेकर

बाळ सीताराम मर्ढेकर (जन्म-डिसेंबर १, १९०९ मृत्यू- मार्च २०, १९५६) हे युगप्रवर्तक कवी; त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते. 

त्यांचा जन्म खानदेश जिल्ह्यातील फैजापूर येथे झाला. मर्ढेकरांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. मूळ आडनाव गोसावी असले तरी गावाच्या नावावरून मर्ढेकर हे आडनाव रूढ झाले. मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरूड हायस्कूल- मध्येही त्यांचे शिक्षण झाले.

बा.सी. मर्ढेकरांचे मूळ नाव ‘रमेश’ होते. घरी त्यांना ‘बाळ’ या नावाने संबोधले जात असे; त्यामुळे तेच नाव पुढे सर्वतोमुखी झाले. शाळेत असताना मर्ढेकरांनी त्यामुळेच ‘रमेश-बाळ’ या टोपणनावाने लेखन केले.

बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

‘शिशिरागम’ हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘कांही कविता’ (१९४७), ‘आणखी काही कविता’ (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह निघाले. या तिन्ही संग्रहांतील एकूण १२६ कविता व कवितासंग्रहांत समाविष्ट न झालेल्या सहा कविता, अशा एकूण १३२ कविता मर्ढेकरांच्या नावावर आहेत.


मर्ढेकरांच्या ‘कांही कविता’ या संग्रहातील नवकवितांवर अश्‍लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला (१९४८). तो त्या काळात खूपच गाजला. मर्ढेकरांनी त्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले व त्यातून ते निर्दोष ठरले. परंतु या खटल्याचा मानसिक त्रास मर्ढेकरांना खूप झाला. त्याचा परिणाम मर्ढेकरांच्या सर्जनशीलतेवरही झाला. १९४८ ते १९५६ या काळात त्यामुळेच मर्ढेकरांच्या प्रतिभेचा पूर्वीचा बहर पाहायला मिळत नाही.

मर्ढेकर यांना १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार "सौंदर्य आणि साहित्य" साठी प्रदान करण्यात आला.

मर्ढेकरांचे प्रकाशित साहित्य असे : 
कवितासंग्रह −शिशिरागम(१९३९), काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१) 
कांदबऱ्‍या− रात्रीचा दिवस (१९४२), तांबडी माती (१९४३), पाणी (१९४८) 
नाटक−नटश्रेष्ठ (१९४४) 
संगीतिका−कर्ण (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७) 
समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय−आर्ट्‌स अँड मॅन (१९३७), वाङ्मयीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन ॲन इंस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्या आणि साहित्य (१९५५). 

जन्म

नाही कोणी का कुणाचा । बाप-लेक, मामा-भाचा,
मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री? ॥

आई गोंजारते मुला । कासया हा बाप-लळा,
बाईलप्रीतीच्याही कळा । कशास्तव? ॥

येतें ऊर कां भरून । जाती आतडीं तुटून,
कुणी कुणाचा लागून । नाही जर? ॥

कैसा बांधला देखावा । जननमरणांतून देवा,
कुशीकुशींत गिलावा । रक्तमांसीं? ॥

का हें बांधकाम सुंदर । फक्त नश्वरतेचेंच मखर
अथवा दर्शनी महाद्वार । मिथ्यत्वाचें? ॥

मग कोठे रे इमारत । जिचें शिल्पकाम अद्भुत,
जींत चिरंतनाचा पूत । वावरें की? ॥

जरी कुठे ऐसें धाम । ज्याच्या पायऱ्याही अनुपम
आणि चुना-विटा परम । चिरस्थायी ॥

तरी मग रोकडा सवाल । कोरिसी हाडांचा महाल,
ठेविशी त्यांत हरिचा लाल । नाशवंत ॥

वास्तुशास्त्र कां बिलोरी । योजिशी येथेच मुरारी,
घडसी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच?


कवी - बा. सी. मर्ढेकर

अस्थाई

अस्थाईवर स्थायिक झालों,
चुकून गेला पहा अंतरा
ओरडून का अता लागणे
ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा!

नशेत झुकला निशापती अन्
अस्मानाच्या कलल्या तारा;
अंधारावर विझून गेला
रात्रीचा या वीज-पिसारा

क्लिन्न मनोगत मोटारींचें
कुशींत शिरले काळोखाच्या;
नालबंद अन् घोड्याची ये
टाप समेवर जिवंततेच्या.

शांत जगाच्या घामावरला
उडून काळा गेला वास;
बेटाबेटांतुनी मनांच्या
जराच हलला श्वासोच्छ्वास.

अस्थाईवर पुन्हा परतलों,
चुकून गेला पहा अंतरा;
ढिल्या गळ्यावर षड्ज बांधणें
अता खालचा परंतु हसरा.


कवी - बा.सी.मर्ढेकर

सकाळी उठोनी

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुणाच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||


कवी - बा. सी. मर्ढेकर.

किती तरी दिवसांत

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा


– बा.सी.मर्ढेकर

किती पायी लागू तुझ्या

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !