शांता शेळके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शांता शेळके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एक शेत आहे, एक नदी आहे

 दोघे जोडीजोडीने राहतात... वाहतात...

 शेतकरी आहेत, नावाडी आहेत, सारे नोकर चाकर आहेत!




 तिथे दिसतो आहे तसा नाहीच मुळी

 आरशावर उमटला आहे तो चेहरा!

 एकूण काय, आरशातले प्रतिबिंब खरे नाही!

  बसमध्ये बसल्याबरोबर शोधू लागलो मान वळवून

 का कोण जाणे, वाटले, तू आहेस जवळच कुठेतरी

 तुझ्या आवडीचा सेंट फवारला होता कुणी अंगभर!

  देह आणि प्राण धुंडाळून पाहू या

 हे गाठोडेही नीट उघडून पाहू या जरा

 तुटका फुटका ईश्वर त्यातून बाहेर येईल कदाचित!

  काटेरी तारेवर वाळत टाकले आहेत कुणी ओले कपडे

 ठिबकते आहे थेंब थेंब रक्त, वाहून जाते आहे मोरीतून

 काय त्या जवानाची विधवा रोज धुते त्याचा सैनिकी वेष इथे?

 साऱ्या प्रवासात माझी जाणीव असते माझ्याबरोबर

 परत फिरावेसे वाटते, पण प्रवृत्ती होते पुढे पुढेच जाण्याची!

 रस्ते पावलात रस्सीसारखे गुरफटत राहतात...


 दगडी भिंत, लाकडी फ्रेम, काचेच्या आड ठेवलेली फुले जपून

 एक सुगंधी कल्पना किती आच्छादनात बंद!

 प्रेमाला तर हृदयाचे एक आवरण पुरेसे, आणखी किती वेष चढवायचे?

  जिंदगी काय आहे ते जाणण्यासाठी

 जिवंत राहाणे आवश्यक आहे

 पण आजवर जगलाच नाही ना कुणी!

  माझ्या काचेच्या दरवाजाबाहेर चिमण्या उडताहेत

 उन्हाच्या नाचणाऱ्या ठिणग्या सजीव झाल्या आहेत

 मी मात्र चिंतांचे एक गाठोडे बनून पडलो आहे घरात!

  तुझे ओठ हल्ली किती कोरडे भावशून्य वाटतात!

 एकेकाळी या ओठांवर सुंदर कविता उमटायच्या!

 आता त्याच ओठांनी कोरडे वर्तमान लिहायला कधी सुरुवात केली? 

 दिवस ढळला आणि डोळ्यातल्या पाण्यात एक चेहरा झळझळत उठला

 ताज्या ओल्या जखमेसारखा प्रकाश सर्वत्र पसरला

 जळणाऱ्या ज्योतीमधून किती ठिणग्या विरघळून खाली पडल्या!

 अशा रणरणत्या उन्हातही एकटा नव्हतो मी

 एक सावली माझ्या आगेमागे धावत होती सारखी

 तुझ्या आठवणीने एकटे राहूच दिले नाही मला!

 एक घर सगळ्यांचे, सारे एकाच ठिकाणचे रहिवासी

 या परक्या शहरात कुणीच नाही परके वाटत

 साऱ्यांची एक व्यथा, सारे एकाच नात्याने बांधलेले!

  कोपऱ्यातल्या सीटवर आणखी दोघे बसले आहेत

 गेले काही महिने तेही आपापसात झगडा करताहेत!

 वाटते आहे, आता कारकून सुद्धा बहुधा लग्न करणार!

  दिवस रात्र असे विखुरले आहेत

 जसा तुटला आहे मोत्यांचा हार

 जो घातला होतास तूच एकदा माझ्या गळ्यात

  काय सांगू? कशी आठवण मरुन गेली?

 पाण्यात बुडून प्रतिबिंबेही मृत झाली...

 स्थिर पाणी सुद्धा किती खोल असते?

  चला ना, बसू या गोंगाटातच, जिथे काही ऐकायला येत नाही,

 या शांततेत तर विचारही कानात सारखे आवाज करतात

 हे कंटाळवाणे पुरातन एकाकीपण सतत बडबडत असते!

 तुझ्या गावात कधीच येऊन पोहोचलो असतो –

 पण वाटेत किती नद्या आडव्या पडल्या आहेत!

 मधले पूल तूच जाळून टाकले आहेत!



 झाडे तोडल्यामुळे नाराज झाली आहेत पाखर 

आता तर दाणे टिपण्यासाठीही येत नाहीत घरात 

कोणी बुलबुलसुद्धा वळचणीला बसत नाहीत येऊन!

  मी आपले सारे सामान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे

 माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच –

 माझ्यापासून अलग होणे रुचले नसावे तिला कदाचित!