बघ तिला सांगुन

कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही
असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल…
शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच…
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
“थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

घरटा

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

कवी - बालकवी

उंट

क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, ’नाही, नाही.’
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला, ’करीन काही.’
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच ’जागी’.
रूप असे पाहुनी अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.


उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’
...खय्यामाने भरले पेले;
महंमदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधित जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
...खूण तयाची एकच साधी...
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.

कवी - विंदा करंदीकर

आधीच ठरले होते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते

तू

तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

तुझे नाम मुखी

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

किती पायी लागू तुझ्या

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !