आम्ही कोण?

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- फैजपूर २९ नोव्हेंबर १९०१

तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनी,
फुंकिन मी जो स्वप्राणानें,
भेदुनि टाकित सगळीं गगनें ---
दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें;
अशी तुतारी द्या मजलागुनि,

अवक्राशाच्या ओसाडींतिल
पडसाद मुके जे आजवरी
होतिल ते वाचाल सत्वरी
फुंक मारीतं जीला जबरी ---
कोण तुतारी ती मज देइल ?

सारंगी ती सतार सुन्दर
वीणा, वीनहि, मृदंग, बाजा,
सूरहि, सनई, अलगुज माझ्या ---
कसचीं हीं हो पडतिल काजा ?
एक तुतारी द्या तर सत्वर.

रुढी जुलूम यांची भेसुर
सन्तानें राक्षसी तुम्हांला
फाडुनि खाती, ही हतवेला ---
जल्शाची का ? पुसा मनाला !
तुतारीनें ह्या सावध व्हा तर !

अवडम्बरलीं ढगें कितीतरि,
रविकिरणांचा चूर होतसे,
मोहर सगळा गळुनि जातसे,
कीड पिकांवरि सर्वत्र दिसे !
गाफिलगिरी तरिही जगावरि !

चमत्कार ? ‘ तें पुराण तेथुनि
सुन्दर, सोज्वळ, गोडें, मोठें ? ’
‘ अलिकडलें तें सगळें खोटें ? ’
म्हणती धरुनी ढेरीं पोटें ;
धिक्कार अशा मुर्खांलागुनि ?

जुन्या नभीं या ताजे तारक,
जुन्या भूमिवर नवी टवटवी,
जुना समुद्रहि नव रत्नें वी;
जुन्यांतून जी निष्पत्ति नवी ---
काय नव्हे ती श्रेयस्कारक ?

जुनें जाउं द्या मरणालागुनि,
जाणुनि किंवा पुरुनी टाका,
सडत न एक्या ठायीं ठाका,
सावध ! ऐका पुढल्या हांका ?
खांद्यास चला खांदा भिडवुनि !

प्राप्तकाल हा विशाल भूधर,
सुन्दर लेणीं तयांत खोदा.
निजनामें त्यांवरती नोंदा
बसुनि कां वाढवितां मेदा ?
विक्रम कांहीं करा, चला तर !

अटक कशाची बसलां घालुनि ?
पूर्वज वदले त्यां गमलें तें,
ऐका खुशाल सादर चित्ते;
परंतु सरका विशंका पुढतें ---
निरोप त्यांचा ध्यानीं घेउनि.

निसर्ग निर्घुण त्याला मुर्वत --
नाहीं अगदी पहा कशाची !
कालासह जी क्रीडा त्याची,
ती सकलांला समान जाची ---

त्यांशीं भिडुनी झटुनी झगडत
उठवा अपुले उंच मनोरे,
पुराण पडक्या सदनीं कांरे !
भ्याड बसुनियां रडतां पोरें ?
पुरुषार्य नव्हे पडनें रखडत !

संघशक्तिच्या भुईंत खंदक
रुंद पडुनि शें तुकडे झाले,
स्वार्थानपेक्ष जीवीं अपुलें
पाहिजेंत ते सत्वर भरलें;
ध्या त्यांत उडया तर बेलाशक !

धार धरिलिया प्यार जिवावर
रडतिल रडोत, रांडा पोरें,
गतशतकांचीं पापें घोरें ---
क्षालायाला तुमचीं रुधिरें ---
पाहिजे रे ! स्त्रैण न व्हा तर !

जाऊं बघतों नांव लयाप्रत
तशांत बनला मऊ मेंढरें,
अहह ! घेरिलें आहे तिमिरें,
परंतु होऊं नका बावरे ---
धीराला दे प्रसंग हिंमत !

धर्माचें माजवूनि डम्बर,
नीतीला आणिती अडथळे,
विसरुनियां हें जातात खुळें :---
नीतीचे पद जेथें न ढळें ---
धर्म होतसे तेथेंच स्थिर,

हल्ला करण्या तर दंभावर--तर बंडांवर,
शूरांनो ! या, त्वरा करा रे !
समतेचा घ्वज उंच घरां रे !
नीतीची द्वाही पसरा रे !
तुतारिच्या ह्या सुराबरोबर !

नियमन मनुजासाठीं, मानत्र ---
नसे नियमनासाठीं जाणा,
प्रगतिस जर तें हाणी टोणा,
झुगारूनि तें देउनि, बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव !

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे !
उन्नतिचा ध्वज उंच घरा रे !
वीरांनो ! तर पुढें सरा रे ---
आवेशानें गर्जत ’ हर हर ’ !

पुर्वींपासुनि अजुनि सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती;
सम्प्रति दानव फार माजती,
देवांवर झेंडा मिरविती !
देवांच्या मद्तीस चला तर !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मुंबई २८ मार्च १८९३

रांगोळी घालतांना पाहून

होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!

चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.

आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!

तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!

चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
"जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!"

"आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी."
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.

साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!


कवी - केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले

सतारीचे बोल

काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.... दिड दा, दिड दा, दिड दा .....१

जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....२

सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....३

ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
महटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....४

सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत .... दिड दा, दिड दा, दिड दा .....५

तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा...
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता .... दिड दा, दिड दा .....६

स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ....दिड दा, दिड दा, दिड दा .....७

आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा .....८

वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता .... दिड दा, दिड दा .....९

प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला... मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....१०

शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....११


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- २० मार्च १९००

अनंत

एकदा ऐकले काहींसें असें
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
बांधून राहती कीटक कोळी

तैशीच सारी ही संसाररीती
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!

कांचेच्या गोलांत बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाशधारा
तशीच माझ्या या दिव्याची वात
पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण
अनंत काही जेंत्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र वा सान?


कवी - कुसुमाग्रज

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !

आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !

दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !


कवी - मंगेश पाडगावकर

तुमचं काय गेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?


त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?


कवी - मंगेश पाडगावकर