रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन

                            सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुध्दा कोमल भावना दिल्या आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात, मग माणसांनी भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीय व हा गुजराती, हा बंगाली व हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेशी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो! परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मीलन करता येते. गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे, ही पूर्वजांची थोर दृष्टी होती.

                            त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री-पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून कित्ती दूर! परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून किती तरी लोक जात होते. माझे एक चुलत आजोबा-माझ्या आईचे चुलते-त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते. चांगल्या दहा-बारा गाड्या एकदम निघणार होत्या. पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठलेभात करावा, जेवावे व पुढे जावे, असे करीत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मजा येते. मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टिमाईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद! आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे. यातील सुख, त्याचे वर्णन का करता येईल? निसर्गही आपली माताच. त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ? तिच्याजवळ घटका घटका राहू या. या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद. शांत वेळ असते. झाडांमधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात. बैलांच्या गळ्यांतील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो! आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे, ताऱ्यांसारखे डोळे! हाकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात.

                            लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले, की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो; परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, "आई! जाऊ दे ना मला! मी वाटेत हट्ट करणार नाही. खोल पाण्यात जाणार नाही. तात्या (माझे चुलत आजोबा) सांगतील तसा वागेन. भाऊंना (वडिलांना) सांग, म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत. आई! त्या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे म्हणून मी माघस्नान, कार्तिकस्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करून येऊन दे. तुझा मुलगा पुण्यावान नको का व्हायला?"

                            आई म्हणाली, "श्याम! अरे, आजच्याने काय झाले? तू पुढे मोठा हो व जा गंगा-गोदांना भेटायला. आज आपण गरीब आहोत. नाही म्हटले, तरी पाच-सहा रुपये तुझ्याकरिता द्यावे लागतील. कोठून आणायचे, बाळ, पैसे? आईबापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा, हीच गंगा. पुंडलीक आईबापाचे पाय सोडून, समोर देव आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला. खरं ना?"

                            परंतु मी म्हटले, "आई! ध्रुव तर आईबापांना सोडून गेला. पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई! पुढचे कोणी पाहिले आहे? चांगले करावयाचे मनात आले, की लगेच करावे. त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का? आई, जाऊ का? तात्यांना सांगितले, तर ते मला फुकटसुद्धा नेतील. ते का पैसे मागतील?"

                            आई म्हणाली, "अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा; परंतु असे आपण ओशाळवाणे जीवे का? दुसऱ्यावर बोजा घालावा का? दुसऱ्यांच्या जिवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वतः श्रमावे, स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असेल, तर पायी जा. आहे ताकद?"

                            मी म्हटले, "आई! मी दमून जाईन. सहा कोस चालेन. परंतु पुढे? आणि गाड्या पुढे निघून जातील. मला सोबत? मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे, हे कळता कामा नये. परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस-पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे?"

                            आई म्हणाली, "ध्रुवाच्या गप्पाच सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जावयास निघाला, त्याला कोणाची आली आहे भीती? साप-वाघ त्याला मार्ग दाखवितील. खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला, तर साप त्याच्यावर फणा धरील. त्याला तहान लागली, तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला भूक लागली, तर गाय-माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला, त्याला सारे मित्र, सारे सखे. त्याचे सारे गडी, सीरे साहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा? त्याचा तो भाव? वेडा! हे काय? रडावयास काय झाले? अरे, आपण लहान माणसे. अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा हट्ट घेऊ नकोस."

                            मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. त्या गाड्यांच्या पाठोपाठ त्याना न दिसू, अशा रीतीने आपण जावे, असे मनात येत होते. आपण दमू, थकू, आपणांस भूक लागेल, खायला काय? नाना शंका मनात येत होत्या; पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबाडून खावा, बकरी पानांवर जगते, आपण जगू. चिंचेची, करवंदीची कोवळी पाने खाऊ, असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली, ते कळलेही नाही. मी उठलो, तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन परसाकडे, तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली. संध्या केली. नमस्कार घातले. तुळशीला पाणी घातले. पाटी-दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो.

आई म्हणाली, "अरे इतकी घाई का? मी पानगी करत्ये, ती खा व मग जा शाळेत. बन्या, बापू कोठे अजून गेले आहेत? बस जरा."

मी रागाने म्हटले, "मला नको जा पानगीबिनगी. खायला देतेस; पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. मी आपला शाळेत जाऊन बसतो."

                            आई जरा रागाने म्हणाली, "पुन्हा माग तर खरे खायला. बघ देईन का. सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे. मोठा राजाच की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचे होते. भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ऐट रे कशी चालणार? चांगली पानगी देत्ये, ती नको म्हणतो, दुपारी पण नको जेवूस. खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी, ते तरी बघत्ये. श्याम, मागे फीर, आईचे ऐकावे हो सांगितलेले."

                            परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व "देवा! माझा निश्चय तू टिकव. तू माझा साहाय्यकारी हो." अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो, तेव्हा एकसुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडलीही नव्हती.

                            माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये, म्हणून मी झपाट्याने जात होतो. मी गावाबाहेर आलो. गावची नदी ओलांडली व पुढे चाललो. तिठ्ठ्यावर आलो. जेथे तीन रस्ते फुटतात, त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या किती तरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्या दहा-अकरा वर्षांचा मुलगा कशा गाठणार? मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाचे, तर कोठे जावयाचे? रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार?

                            मी माघारी वळलो, माझ्या गावाकडे पावले वळविली. डोळ्यांतून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशीत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, "गावात जाऊ नको. परत घरी जाऊ नकोस." पोट म्हणे, "घरी जा." घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई-बापांशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे.

                            गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी बाळंतपणातून उठल्या, की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणानारळांनी ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो.

                            परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलज्जा सोडली. स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणी तरी धरले! "अरे, आहेस तरी तू कोठे? तुला शोधायचे तरी किती? गळ्याला फास लावायचास एखाद्या वेळी!" असे शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते. शाळेतील मुलांनी पाटीदप्तर घरी आणून दिले; तेव्हा कळले की, मी हरवलो.

                            आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती, म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो, त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित, म्हणून गेलो असेन, असे हेडमास्तरांस वाटले. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठ्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीनेसुद्धा मुलांच्या उपड्या हातावर, बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी, म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो, म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला, असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरले. या श्यामने विहिरीत जीवबीव तर नाही ना दिला, अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले, तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले, की माराला भिऊन श्याम पळाला. वडील पहाटे उठवून मला घरी खर्डे घासायला व कित्ता गिरवायला लावीत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. "मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले. पोरगा कोठे गेला? आता काही कमीजास्त झाले, तर; न व्हावे ते झाले, तर!" असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले.

                            हेडमास्तर म्हणाले, "आजपासून तुमच्या मुलाला चार बोटेही लावणार नाही. म्हणजे तर झाले ना? तुमची मुले चांगली व्हावी, म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे, भाऊराव!"

परंतु वडील म्हणाले, "पुन्हा लावणार नाही. परंतु आधी सापडू दे तर खरा!"

                            घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो, अशी शंका आली; परंतु तिने ती बोलून दाखविली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणिले. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहावयास जसे लोक जमतात, तसे मला पाहावयास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. "जा रे आपापल्या घरी. का तमाशा आहे?" वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली.

वडील माझ्यावर रागवले नाहीत, काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो.

                            थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले, "श्याम! ऊठ बाळ. पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे, मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत व वर छड्या मारीत. माराला भिऊन कसे चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही, तो कसला मास्तर? ऊठ. हातपाय धू. तोंड बघ कसे झाले आहे कोकंब्यासारखे लाल. वाढ ग त्याचे पान आधी."

                            मी उठलो. हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले! मारण्याचे आता कमी करतील, असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेच, तर बेताने मारतील, असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला, असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील, असे वाटले. बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य, अगदी पूर्ण जरी नाही, तरी वसाहतीचे तरी मिळाले! आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसताही!

                            मी का पळून गेलो होतो, हे तीन जणांना माहीत होते. मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते. तिन्हीसांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली, तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, "श्याम!" मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, "श्याम, बरे नाही का वाटत? अंग दुखते? मी सांगितले, तरी ऐकले नाहीस!" असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेविले व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, "आई! मी तुझे ऐकले नाही. असा पळून गेलो, म्हणून तू रागावलीस होय? मास्तरांनी मारले, म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखादे वेळेस मारीत! म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले, की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस, "जायचे, तर पायी जा. आहे ताकद?" आई! मी पायी जाऊ पाहत होतो. परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो. कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम! आई, तुझ्या श्यामवर रागावू नकोस. तुझा श्याम आततायी व हट्टी आहे. मनात येईल, ते तो करू बघतो. मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागावलीस? तुझे न ऐकता व न सांगता पळून गेलो, म्हणून नाही ना रागावलीस. सांग, आई सांग. नाही म्हण."

                            माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, "श्याम मी का रागावेन? मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान, तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलल्ये, माझेच शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते. परंतु तू पळून गेलास, हे फार वाईट केलेस, असे मनात येऊन सुद्धाही वाईट वाटले नाही. श्याम, तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास? परवा गावातला कुणाचासा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास. गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागावू? बाळ, तुझा मला अभिमानच वाटेल. माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला, असे मी अभिमानाने म्हणेन. श्याम! एक लक्षात ठेव, तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव- "चोरी-चहाडी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा. अशी मी प्रार्थनाही करीन!"



********************************************************************************************
 रात्र पंधरावी : रघुपती राघव राजाराम      अनुक्रमणिका     रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण
********************************************************************************************

रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण

                            "मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं,... अनन्तं वासुकिं शेषं,... अच्युतं केशवं विष्णु..., अशी दोन-चार लहान लहान स्तोत्रेच येत होती. 'अनन्तं वासुकिं' हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णुसहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे. त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती; परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये, याचे मला वाईट वाटे."

                            आमच्या शेजारी गोविंदभटजी परांजपे राहात होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज एक-दोन श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली, म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला राग वाटे व भास्करचा राग येई. आपला अहंकार दुखावला गेला की, आपणांस राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणारांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो, तर आपणाला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबैंगण असतो, त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे, असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते, याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवचा, स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्तच चीड येई. हा आपणांस मुद्दाम चिडविण्यास ऐटीने येतो, असे पाहून मी फार संतापे.

                            एके दिवशी भास्कर मला म्हणाला, "श्याम! आता दहाच श्लोक माझे राहिले. आणखी पाच-सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कोठे येते?" मी एकदम संतापलो व चिरडीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो, "भाश्या! पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हांस येते ते आहे माहीत आम्हांला. एवढी ऐट नको. तुझ्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्याआधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी. येऊ नको आमच्याकडे. मी मारीन नाही तर." आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, "काय रे झाले भास्कर? श्यामने का तुला मारले?" भास्कर म्हणाला, "श्यामच्या आई! मी नुसते म्हटले, की आणखी पाच-सहा दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारीन, नाही तर चालता हो." आई माझ्याकडे वळून म्हणाली, "होय का रे श्याम? असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच चारदा त्यांच्याकडे जाशील." मी रागातच म्हटले, "तो मला मुद्दाम हिणवायला येतो. "तुला कोठे येते रामरक्षा?" असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसा अगदी साळसूद. स्वतःचे काही सांगत नाही. खोटारडा कुठला."

                            आई म्हणाली, "मला रामरक्षा येते व तुला येत नाही, असे त्याने म्हटले, यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय, हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत?" मी म्हणालो, "भाऊ शिकवीत नाहीत व मजजवळ पुस्तक नाही." आई म्हणाली, "भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा. नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर."

                            भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावयाची, असे मी ठरविले. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली. लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहात बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही, म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दांत म्हटले, "भीमाताई! भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयाला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे. मला पाठ करावयाची आहे. आज सुट्टी आहे. मी सबंध दिवसभर लिहून काढीन."

भीमाताईंनी भास्करला हाक मारिली व त्या म्हणाल्या, "भास्कर! श्याम एवढा मागतो आहे, तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम! शाईचे डाग वगैरे नको, हो, पाडू. नीट जपून वापर. दे रे त्याला." परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, "आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करावयाचे राहील."

                            भीमाताई भास्करला रागावल्या, "तुझे अगदी आजच अडले आहे, नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम ना? त्याच्याजवळ, कसली अढी दाखवितोस? दे त्याला, नाही तर बघ." भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले.

                            मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा, म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो! गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही, सारे सामान सिद्ध होते. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले, त्या वेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा! माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदादिकांच्या हस्तलिखित पोथ्या किती तरी होत्या. ठळक, वळणदार अक्षर, कोठे डाग नाही, अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या-पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर, त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील किती तरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतःसाठी स्वतः लिहून घेतले होते, ते दिले आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता. छापखाने नव्हते. पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत! समर्थांच्या मठांतून ग्रंथालये असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचा सुकाळ आहे; तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले, असे दिसत नाही. परंतु ते जाऊ दे.

                            मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले. "काय, रे श्याम! इतक्या लवकर लिहून झाले?" भीमाताईने विचारले. मी म्हटले, "हो! ही पाहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे, म्हणून मी सारखा लिहितच होतो." "वा! छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर, म्हणजे भास्कर चिडवणार नाही." ती म्हणाली.

                            मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचीत होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची, असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे, असे मनात मी योजिले. रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो, देवच जाणे. परंतु वेळ मिळताच वही हातांत घेत असे, मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता.

                            शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवितो, असे मला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले व हात-पाय धुऊन घरात गेले.

                            त्यांनी विचारले, "काय, श्याम! परवचा, स्तोत्र वगैरे झाले का सारे?" मी एकदम म्हटले, "हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का?" ते एकदम म्हणाले, "तू कधी शिकलास? आणि कोणी शिकविली?" मी सांगितले, "भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली." "बघू दे तुझी रामरक्षेची वही." ते कौतुकाने म्हणाले.

                            मी माझी वही त्यांच्यापुढे ठेविली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हता. परंतु अक्षर किरटे होते. वडील म्हणाले, "शाबास, अक्षर नीट आहे; परंतु जरा लांबट काढावे. असे बुटके काढू नये. म्हण पाहू आता." मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला. त्यातील आनंद-तो कसा वर्णन करून सांगता येईल? जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. "आई, बघ; कशी आहे माझी वही? मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागावलो होतो." असे प्रेमाने म्हटले. आई म्हणाली, "तू उतरून घेतलेस, हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे, म्हणून कितीदा मनात येत होते. परंतु तू आपण होऊन दाखविशील, अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस! आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागावेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील, तितके कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे, याचा आनंद आईला किती होत असेल? तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास. रोज वाटे, श्याम आज आपली वही मला दाखवील व मी त्याला पोटाशी धरीन. परंतु आईवर रागावलास! होय ना! आईला वही दाखविली नाहीस. बरे, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही, म्हणून रडत बसला असता, तर झाली असती का? अरे, आपल्याला हात, पाय, डोळे सारे आहे. स्वतःच्या पायांवर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे." असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला. कृतार्थता वाटली. "या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले, की झाली खरी रामरक्षा! तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील, हो श्याम! कारण तू स्वतः कष्ट करून, सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस!"



********************************************************************************************
 रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन          अनुक्रमणिका         रात्र अठरावी : अळणी भाजी ********************************************************************************************

रात्र अठरावी : अळणी भाजी

                            राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, "राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वांत मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात." राम म्हणाला, "त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी; व्याख्याने म्हणावी; का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते." राजा म्हणाला, "श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो." "अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो." राम म्हणाला. "माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू हसशील." राजाने विचारले. "सांग, मी हसणार नाही. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही." राम म्हणाला. "श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर? मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील; आईबापांस त्या उपयोगी पडतील; श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे. नाही?" राजाने विचारले. "परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य, भडक पाहिजे. "त्यांना 'लैला-मजनू'च्या गोष्टी पाहिजेत." असे तो म्हणतो." राम म्हणाला. त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली. प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पाहात होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. "आज मला नाही रे हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात?" श्यामने विचारले. "तू वाचीत होतास, म्हणून नाही बोलाविले. दिवसभर इतर काम असते, थोडा वेळ वाचीत होतास तर अडथळा करू नये, असे वाटले." राजा म्हणाला. "अरे, मला तरी कोठे फारसे वाचावयास आवडते? विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्यांची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का?" श्याम म्हणाला. "श्याम, तू भरपूर वाचले आहेस, म्हणून असे म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावे लागते. शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात; परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही. कारण त्याला ती दृष्टी नसते." राजा म्हणला.

                            इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली: "मित्रांनो! प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते, ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दांहूनही हे मुके परिणामकारक असते."

                            कसे जेवावे याचीसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगावयाचे, "आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील, तेव्हा आपणांसही मिळेल. हावरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये. पानातील पदार्थांवर टीका करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले, तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये. कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे." या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे; परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे, तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही, हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावयाचा नाही. माझ्या पानाभोवती जर शिते दिसली, तर रागावत व म्हणत, "मथुरीचे एक कोंबडे जेवेल, इतकी शिते सांडली आहेस. कर गोळा सारी." "अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही." वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे. "राजमान्य!" त्यांना कोणी विचारावे, "भाजी कशी झाली आहे?" त्यांचे उत्तर ठरलेले असे. "राजमान्य." जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती.

                            एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले, म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. "आई, भाऊ आले. भाऊ आले. भात उकर." वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले, म्हणजे जेवणे सुरू होत.

                            त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणावयाची, "तिखट, मीठ व तेलाची फोडणी दिली, की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारेच गोड लागे. जणू तिच्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे.

                            परंतु त्या दिवशी मजा आली. भाजी झाली होती मुळी अळणी! भाजीत मीठ घालावयाला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले घालावयाचे. परंतु वडील बोलत ना, म्हणून आम्हीही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वादव्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे, "काय फाकडो झाली आहे भाजी!" पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही. कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते, म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, "तुला नाही का रे आवडली भाजी? खात नाहीस रोजच्यासारखी?" मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, "तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील?" मी म्हटले, "असे नाही काही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेन, तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता?" वडील म्हणाले, "अरे, तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते, होय ना ग? उद्या पाटीलवाडीहून आणीन हो. जून मिळाला तर उकडगरेच करा." आई म्हणाली, "आणावा. पुष्कळ दिवसांत फणसाची भाजी केली नाही." बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व विष्णुसहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे, असा दंडक होता.

                            पसारा आटोपून आई जेवावयास बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी! मीठ नाही मुळी तीत. मी जवळच होतो. आई म्हणाली, "काय, रे, श्याम! भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम, सांगावे की नाही रे! अळणी कशी रे भाजी खाल्लीत?" मी म्हटले, "भाऊ बोलले नाहीत, म्हणून आम्हीही बोललो नाही!"

                            आईला वाईट वाटले. "मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी." ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, "तरीच तू खाल्ली नाहीस. नाही तर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा, भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून?"

                            आपली मोठी चूक झाली, असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची, ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो, की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही, असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली.

बरे, आईला वाईट वाटू नये, म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी.

                            मित्रांनो! दुसऱ्याचे मन दुखवू नये, म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजीही मिटक्या मारून खाणीरे माझे वडील श्रेष्ठ, का अळणी भाजी कशी हातून झाली, का, रे, तुम्ही कोणी सांगितले नाही, असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही, म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी, माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती, संयम व समाधान यांवर उभारलेली आहे; त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते.


********************************************************************************************
 रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण          अनुक्रमणिका         रात्र एकोणीसावी : पुनर्जन्म
********************************************************************************************

रात्र एकोणीसावी : पुनर्जन्म

                            "माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथेच शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी दोन-तीन वेळा पळून गेलो. नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या. शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा. उगीच स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखादे वेळेस फास लावावयाचा, असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले.

                            त्या वेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. त्यांची प्रकृती फार अशक्त होती. म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली; परंतु ती फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा होता. घरात दुसरे बाईमाणूस त्या वेळेस नव्हते. बहीण फार आजारी होती. अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले. माझ्याकडे कोणीच लक्ष देईना, मी सर्वांना नावडता झालो होतो. माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचे प्रेम होते. तिची अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्या वेळेस फार हाल होत. कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे. अक्काला विषमज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता. कारण ते दूध विषारी झालेले. यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे.

                            एके दिवशी अक्काला वात झाला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते. परंतु मनात साठविलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती. तिला शुद्ध नव्हती. त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्चून लग्न केले, तरी सासरी जाच का असावा, असे तिला वाटे.

                            ज्याप्रमाणे भाऊबंदकी, त्याप्रमाणे सासुरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसऱ्या घरातील आलेली मुलगी. तिचे आईबाप व्हावयाचे, हे खरे म्हटले तर सासूसासऱ्यांचे कर्तव्य. परंतु त्यांना वाटते, की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील, तो सुदिन. सासुरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात. त्यांत पाहा सासुरवासाचे कसे वर्णन केलेले आहे.

सासरचे बोल जसे कारल्याचे वेल
गोड कसे लागतील काही केल्या
सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी
रात्रंदिन रडविती धायी धायी

 वगैरे ओव्यांत हे करुण चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे दीनहीन वर्णन केलेले आहे. कार्ल्याचे कडू वेल, रेशमाच्या गाठी-या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिकावयाची आहे. सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली, म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे, अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे. आम्हांला मारीत असत, म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुले-मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासूसुनेचा खेळ करीत असतील, तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील. मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात! "करशील गडबड, का मारू आणखी!" वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे. लहान आहे पाच-सहा वर्षांचा. तो मला म्हणतो, "अण्णा, मला मास्तर व्हायचे आहे, नाही तर शिपाई व्हायचे आहे." मी त्याला जर विचारले, "हे दोन धंदेच तू का पसंत केलेस?" तर तो म्हणतो, "म्हणजे सर्वांना मारता येईल. सगळ्यांना झोडपून काढीन!" मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे, बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कोठे तरी बहकत चाललो, असे म्हणाल; परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यांत नसावी! पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यांवरही प्रेम करावयास शिकविणारी माझी थोर संस्कृती-त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही कसे विसरले आहेत, हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते, परंतु जाऊ दे.

                            दुपाची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसलो होतो. ताम्हनात थंड पाणी घालून ते ताम्हन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या? कोठले कोलन वॉटर? आई ताम्हन धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या काय मनात एकदम आले, कोणास माहीत. परंतु ताम्हन मला धरावयास सांगून ती उठली. आई उठली, ती देवाजवळ गेली. देवघरीत जाऊन ती देवास म्हणाली, "देवा, शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दहीभाताने लिंपीन, पोरीला गुण येऊ दे. उतार पडू दे. अंगाची तलखी कमी होऊ दे. ताप उतरू दे." प्रयत्न चालले होते. प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थना ही चालली होती. आईचा देवावर भरवसा होता; परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती. आपल्या प्रयत्नांत आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे.

                            "रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा. येथे रडवू नकोस." असे आई मला म्हणाली. मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो. तिन्हीसांजची वेळ होत आली होती. बाहेर कांडपिणींना कांडप घातलेले होते. ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावयाचे होते. गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती. गुराखी 'गुरे आली, हो' एवढे ओरडून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईच्या प्रेमाने थबथबलेला हात अंगाला लागावा, म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे, म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर! लहान, दुबळा जीव! तिची आई अंथरुणात तळमळत होती, वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवसांत होत नव्हते. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता? आक्रोश करीत होता? "माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा. मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हपापलेली नाही, तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल." असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्शी रडू लागली. टाहो फोडू लागली. कळवळली.

                            माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे, का दिवा लावावा आणि देवातुळशीस दाखवावा, का गुरे बांधावी, का धार काढावी, का काढा करावा, का भाजीभात करावा, का रंगूला खेळवावे, का अक्काजवळ बसावे? तिला काय हजार हात होते? आई! धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच. त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेचीच उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात, ती मला राउळे, देवाची मंदिरेच वाटतात. त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवळे मला माहीत नाहीत.

                            माझी आई संतापली. रागावलीही. तिच्या क्षमेला सोशिकपणालाही काही सीमा होती. मर्यादा होती. "कोठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला! इकडची काडी तिकडे करायला नको! तिकडे लावलेन् दिवे, आता येथे आला आइशिला छळायला. जरा पोरीला खेळव म्हटलं, तर फुगला नुसता एरंड. तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला. रिंडोजी नुसता. श्याम्या, अरे कार्ट्या! उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर. श्वास धरलंन् वाटते. तू मरत नाहीस. तू मात्र छळायला उरला आहेस." आई रागावून दुःखसंतापाने वेडी होऊन बोलत होती.

                            आईचे शब्द मी ऐकत होतो. परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली.

                            आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे, हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवाहवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही, आपले जीवन म्हणजे सर्वांना भार! सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात, ते खोटे नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली, "देवा! आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर!"

                            त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला, एवढे खरे. माझी अक्का पुढे चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली, मी मनाने बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळाले, मला नवीन हृदय मिळाले.


********************************************************************************************
 रात्र अठरावी : अळणी भाजी          अनुक्रमणिका         रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक
********************************************************************************************

रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक

                            "काय, सुरुवात करू ना, रे, गोविंदा?" श्यामने विचारले. "थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते." गोविंदा म्हाणाला. "इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले." श्याम म्हणाला. “तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले, असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल?" भिकाने विचारले. “शिवाय लोकांची श्रद्धा असते, तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात." गोविंदा म्हणाला. “हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा." राम म्हणाला. “इकडेच बरे आहे. असा येथे बसतो." ते म्हातारबाबा म्हणाले. “श्याम, कर सुरुवात आता." राजा म्हणाला.

सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरु झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली.

                            मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो. परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. एक-दोन यत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते.

                            दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र चार कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती; म्हणून दापोलीस कअँप दापोली असेही म्हणतात. या कअँपनंतर 'काप' असा अपभ्रंश झाला व हल्ली कापदापोली असे म्हणतात. तसे पाहिले, तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजीमहाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते; परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव. हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून तो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती; परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे सांगणारे "केसरी"चे संपादक, गीतारहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड उभारणारे, तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलीक व गणितविशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील.

                            दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा लागू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत; उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंड्या-झुंबरांसारखे डोलत असतात! दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टिसौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्या वेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एके वेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले.

                            दापोलीहून माझा गाव सहा-साडेसहा कोस होता. पायाने मी एवढे चालून जाईन की नाही, याचा मला आत्मविश्वास नव्हता; परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार-रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की, मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाचा व सोमवारी पहाटेस उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा.

                            एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही, असे त्या दिवशी वाटत हेते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते, की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात? हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे, असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू! कोणा झाडाचे पान! क्षणात वाळून जाणार, पडून जाणार! असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या दोन वस्तू शेकडो जन्मांत मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो! मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल; पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्याफांद्यांत, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडावॉटरची बाटली फोडली, की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे; परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही.

                            त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, "मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो. दोन महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते!" माझीही जणू तशीच स्थिती होती. दर आठा दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहावयाचे व पुन्हा घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की, प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बाळपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो, तेच देतो.

                            मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यांतून अश्रू येत होते. या, साडेसहा कोसांच्या रस्त्यावर वाटेत किती तरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते, असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीघ तर नाही येणार! मी त्या वेळेस बारातेरा वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली, म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोडविहिर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल, अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच! मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल, म्हणून झपझप पावले टाकीत चाललो.

                            शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली, तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल, त्याच्या कपाळाला लावावयाची!

                            मी अंगणात दिसताच "अण्णा आला, अण्णा आला," असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, "उशिरा का निघालास? जरा लौकर निघावे, की नाही? बाहेर रात्र झाली." मी म्हणालो, "माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे वाटत होते." “मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस यावयाचे." आई म्हणाली. “आई! मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस, की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन." असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. “हे कढत पाणी घे व पाय धू. थांब, थोडे तेल लावत्ये. मग वर कढत पाणी घे." असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावीत होती व मी तिच्याकडे पाहात होतो. मला त्या वेळेस किती आनंद होत होता! त्या वेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छीत नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. "अण्णा, गोष्ट सांग, नाही तर एक नवीन श्लोक शिकव." असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुऊन आले व संध्येला बसले. “का, रे, संध्या वगैरे झाली का तुझी?" त्यांनी मला विचारले. त्या वेळेस मी संध्या करीत असे, संध्येचा अर्थ मला समजत नसे. तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. "नाही केली, करतो." मी म्हटले. “तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? ऊठ. संध्या वगैरे करायची." ते रागाने बोलले. आई म्हणाली, "आताच तो आला. दमला आहे अगदी. गळून गेल्यासारखे वाटते, म्हणाला. जरा बसला आहे. श्याम! जा, संध्या वगैरे कर." मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यांतील पाण्याची देवाला शतर्ध्ये सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, "तिकडे संध्या वगैरे करतोस, की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे? हजाम मिळत नाही, वाटते? नुसता कावळा झाला आहे! मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले, की डोके करून घे, म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाही तर लख्या न्हाव्याला, बोलावून आण व डोके तासटून घे. नाही तर येथे राहू नकोस. निघून जा." मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो, मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. "झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी." वडील म्हणाले. “पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केले. तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे. श्याम! उगी हो! संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील." आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा व पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता.

                            आरती झाली. पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही, असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्या वेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते, तर चटकन पाणीच बाहेर आले असते. जणू अश्रूमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील; परंतु त्या रात्री ते जे दही दिले, त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती ती पैशाअडक्यात नव्हती.

                            आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली; परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती.

कृष्ण यशोदेचा बाळ। सुकुमार लडिवाळ
कृष्ण यशोदेचा तान्हा। त्यासी पाजी प्रेमपान्हा
कृष्ण बाळ मेघश्याम। यशोदेचे प्राशी प्रेम

मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजीत होती, मला प्रेमपान्हा पाजीत होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. "आई, तू मला कुशीत घेऊन निजव. तुझी चौघडी घाल. चल, मला निजव; थोडा वेळ थोपट. राहू दे पोतेरे." मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्या वेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या.

पहाटेची वेळ
दूर कोंबडा आरवे
परी बाळा झोपी जावे
लहान तू
अंगाई
पहाटेची वेळ
वाजू लागती रहाट
बाळा तू रे पाळण्यात
झोप घेई
अंगाई
पहाटेची वेळ
का का करितो कावळा
झोपे परि माझ्या बाळा
उठू नको
अंगाई
पहाटेची वेळ
कामाची आहे घाई
बाळा, तू झोप घेई
आई म्हणे
अंगाई

                            मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, "आई! मी आपला निघून जातो. मी येथे राहात नाही. मी आलो, तर भाऊ किती रागे भरले! ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे." आई म्हणाली, "असे नको हो, श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील, म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे. तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यानी आजपर्यंत तुम्हांला वाढविले, तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हांला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून, स्वतः फाटकी धोतरे नेसून, ते पैसे देतात. ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे, म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात, म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे, म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नयेत, म्हणून इतकेही तू करू नयेस का?" आई मला समजावीत होती.

                            “केसांत कसला आहे, ग, धर्म?" मी म्हटले. आई म्हणाली, "धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे, यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म." मित्रांनो! माझ्या आईला त्या वेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल; परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे, ही गोष्ट आपणां आश्रमवासीयांस सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यांसाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे, सर्वांत धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जिवास धर्माची हवा, कोठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो, ते मी सुंदर दिसावे, म्हणून! खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे.

त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो; परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई. परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते.

                            आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो. न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठरावीक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत. परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. "काय, श्याम! लईशी डोई वाडविलीस?" असे त्याने विचारले.

                            मी त्याला म्हटले, "गोविंदा! तुझा हात हल्का आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात." माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तंवसे आणले होते. तंवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तंवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. चार चार महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तंवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले, म्हणजे ती टिकणार नाहीत, अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, "हे तंवसे आणले आहे. पातोळे कर. श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते? श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळास जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादशणी करीत असतो."

                            वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम! माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा, म्हणून ते देवास आळवीत! मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तंवसे घेऊन आले? त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो! मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो, असे आल्यावर त्यांनी पाहिले असते, तर त्यांची केवढी निराशा झाली असती! त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते! हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत! दोन शब्दांनीच ती मरून जावीत, असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे, म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती, त्यांतील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दूर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेविली. कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेविले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली.


                            वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती खिसली. हळदीची पाने पुसली. कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदुळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात. त्यत गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरावयाचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घावावयाचे, वाफेवर हे उकडावयाचे, उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो.

                            वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने नीरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोळू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धि करून घेतात! कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खवावयाचा; मग तो खोवलेला नारळ थोडे कढत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा; नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस. त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. “श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ." वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हांस कधीही केली नाही. दहा उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवांना दहा नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखादे वेळेस रागाने बोलत; परंतु मारीत नसत.

                            आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वांत लहान पाचसहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, "आई, जाऊ?" “कुठे रे बाबुल्या?" मी म्हटले. “आईला आहे माहीत. जाऊ का?" त्याने विचारले. आई म्हणाली, "जा. पण तेथे श्लोकबीक म्हणत बसू नको." हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याच नावाचे त्याला हाक मारीत, आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, "आई! करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला?" आई म्हणाली, "नाही, रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो! एरव्ही कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा. लबाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ!" मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, "श्याम! तू आज गेला असतास, तर त्यांना किती वाईट वाटले असते! त्यांना अन्न नसते गोड लागले. घास नसता गिळवला. एखादे वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला, तर म्हणतात, "कोणी आठवण काढली? गजूने, की श्यामने?" त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे, श्याम! अरे, मी अशी आजारी. मी नाही हो फार दिवस जगायची! आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊबहिणी कोणी पुशीत नाही. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे-तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख!" असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, "श्याम! ते नेहमी म्हणतात, की "असतील बाळ, तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ." तुम्ही काळ नका होऊ, जर काळ आला, तर त्याला हाकलून द्या. त्यांना सुख द्या." आईचे जेवण झाले. मी ही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते, म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे सारी उपकरणी जमविली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची, दह्याची विरजणे कढत पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. तीत त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुऊन तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाणीखाली विस्तव हवा का, तिने पाहिले. याप्रमाणे आईची निरवानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फर्यामर्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला.

आईने, माझे धोतर फाटले होते, ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती. ती आम्ही प्यालो.

                            पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेविला होता. उडदाचा पापड व मेतकूट तिने वाढले. भातात दोन तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात, म्हणून शेजारच्या जानकीवयनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. "आता संक्रांतीस ये, हो. पाय फार दुखत असले, तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे दोन आणे आणि यावे. जप हो." असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. "श्याम! मी बोललो, म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग. अभ्यास कर." ते म्हणाले. नंतर मी दोघां धाकट्या भावांस कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळ्यापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते, तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो.

                            आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो, तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू! वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, "का रे मुला, रडतोस? तुला कोणी नाही का?" मी त्याला म्हटले, "माझे आईबाप आहेत." “ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत, तुला घालवून लाविले का त्यांनी?" “नाही. ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही, म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ? खरेच कसा बरे उतराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे!" विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जलदीने चालू लागलो.


********************************************************************************************
 रात्र एकोणीसावी : पुनर्जन्म          अनुक्रमणिका         रात्र एकविसावी : दूर्वांची आजी
********************************************************************************************

रात्र एकविसावी : दूर्वांची आजी

                            'आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे; तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही 'दूर्वांची आजी' असे पाडले होते. चातुर्मास्यात बायका देवाला दूर्वांची लाखोली वाहतात, कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोण बटमोगऱ्याची लाखोली वाहतात, असे चालते. जिला दूर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते, ती इतर बायकांना दूर्वा तोडावयास बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. 'तुका म्हणे व्हावे सत्यधर्मा साह्य' चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. 'घातलीया भय नरका जाणे' हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल, अशी भीती जो घालतो, तो नरकास जातो. सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दूर्वा खुडायच्या असोत, तेथे हजर. आम्हांस जर कोणी विचारले, 'आजी कोठे आहे', तर आम्ही सांगावे, 'गेली दूर्वांना.' असे करता करता त्या आजीचे नावच मुळी 'दूर्वांची आजी' असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दूर्वांची आजी असेच म्हणत असू.

                            दूर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले, तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते! तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देतनाशी झाली, तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या, तर दृष्ट फार वाईट पडली, असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणीत. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस वा गाईस खावयास द्यावयाचा. दूर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असले, पोट दुखत असले, पाठीत कळा येत असल्या, तर दूर्वांच्या आजीस तेल लावावयास बोलावणे यावयाचे. तिने चोळले, की गुण यावयाचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते, तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भराभर ते जिरवीत असे.

                            दूर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी-बियाणे असावयाचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इ. सर्व प्रकारचे बी असावयाचे. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असावयाच्या. मंगळागौर वगैरे असली, म्हणजे दूर्वांची आजी तेथे असावयाची. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावावयाची. आगीनपासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपवावयाची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपविलेली आहेत, त्यांची नावे सांगावयाची. आजी आम्हांला लपवावयाची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगावयाची "जरा लहान हो. अंग चोरून घे." लपणारा लहान असला, तर त्याला ती सांगे, "जरा मोठा हो!" हेतू हा, की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दूर्वांच्या आजीला देवादिकांची, तशीच देवावरची किती तरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक किती तरी गाणी तिला येत.

                            दूर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली, तर ती खेळवावयाची, हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावील, ह्या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरविले होते; परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, "उद्या करू हो भाजणी." परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव-आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलावीत असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला "येत्ये. तू जा" असे सांगून पाठविले.

                            आईला राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार? आई आजीला म्हणाली, "तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल?" "मी काय पत्कर घेतला आहे, की काय, तुझ्या कामाचा? वाहवा, ग! म्हणे, भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस." आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही चेव आला, संतापली ती. "म्हणे, ओढवत नाही! तुम्हांला लोकांकडे काम करायला शक्ती आहे. घरी तेवढे हात मोडतात! साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना; परंतु येथे हात लावतील तर शपथ! येथे काम कराल, तर बाटाल जशा! येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी अयाई ग, बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल! ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग." "हो, करणार लोकांकडे काम, करणार. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते आहे? माझे शेत आहे. तू मला, येश्वदे, असे बोलत जाऊ नकोस. ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे, लोकांकडे काम करतात. तुम्हांला असतील लोक, मला नाही कुणी लोक. जशी तुम्ही; तशीच खऱ्यांकडचीही. ढोंगी-कोणाला, गं, म्हणतेस ढोंगी! असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे! फारच शेफारलीस तू." आजी भांडू लागली. "मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी, म्हणून? मी तयारी केली, जाते धुऊन ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच! दुसऱ्याला तोंडघशी पाडता येते तुम्हांला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का?" आई म्हणाली. "मी का हात लावीत नाही? शर्थ आहे बाई, तुझ्या बोलण्याची! नाही जात खऱ्यांकडे, हो. तुझ्या डोळ्यांत खुपत असेल, तर नाही जात! जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापल्ये, होय? बाई, तू चांगले म्हण." मित्रांनो! पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील; परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला, मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते, तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते. परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते, जे शांत होण्यासाठी येते. रोग येतात, ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते, ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते. माझी आई शांत झाली. बोलेनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. "लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात, मी वाटेल तेथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलावतात, तर तुला का मत्सर?"

                            आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, "मी चुकल्ये, हो. बोलू नये ते बोलल्ये. तुम्हांला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या! परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगल्ये आहे. मला नाही राहात मग सुमार. भान जणू मी विसरत्ये. मी मग कोणाला बोलत्ये, याची शुद्धही मला राहात नाही. मेले, असले जगून तरी काय करायचे? चुकल्ये हो." "जगून काय करायचे, असले अभद्र काय ग बोलतेस? तुझी पोरेबाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्ने होऊ देत. सुना घरात येऊ देत, वेडेविद्रे नको बाई मनात आणू! अग, तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते." आजी म्हणाली. "तुम्ही जा खऱ्यांकडे. येत्ये म्हणून कळविले आहेत तुम्ही, तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेविले, म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही, की झाले. तुम्हांला आज चहा देत्ये करून; म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार." आई गोड बोलली.

                            अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला, तर आई करून देई. आईने दूर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, "जात्ये, ग, यश्वदे. रागावू बिगावू नकोस, हो. मनात धरू नकोस."

                            "तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठ्या. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी, माझे बोलणे पोटात घालीत जा." आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो! माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत? चुका कोण करीत नाही? निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन्माऊलीसमोर जावयाचे आहे! चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी; पण सावरून घेई. चुका करण्यातच ती ऐट मिरवीत नसे."


********************************************************************************************
 रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक          अनुक्रमणिका         रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी
********************************************************************************************

रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी

                            दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती सतरांदा शिवली होती. सतरा ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती, की शिवणे कठीण झाले होते. आम्हां मुलांना त्यांनी नवीन कपडे केले; परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाहीत.

                            आईला वाईट वाटत होते. परंतु ती काय करणार? तिच्याजवळ थोडेच पैसे होते? किती तरी दिवसांत तिला सुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते. परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग निऱ्यांमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत.

                            मुंबई पुण्याकडे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता. परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्या बरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे तीन रुपये पाठविले होते. आमच्यासाठीही खाऊ पाठविला होता.

ते तीन रुपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. "मामीने खाऊ पाठविला. आम्हांला दे." आम्ही तिच्या पाठीस लागलो. जर्दाळू व पेपरमिंटच्या वड्या होत्या. आईने एकेक जर्दाळू व दोन दोन वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ 'दोन जर्दाळू पाहिजेत' म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, "अरे, तो तुमच्यासाठीच आहे. आज का एकदम संपवावयाचा आहे? पुरवून खाल्लात, तर तुम्हांलाच बरेच दिवस पुरेल." तो म्हणाला, "तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे." आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्यांचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो.

                            आईने खाऊ फडताळात, मुंग्या न येतील, अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोड्या वेळाने तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, "श्याम, अमृतशेटजींकडे जाऊन नवीन धोतरजोड्यास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवा आहे, म्हणून सांग. घरात आहेत का, म्हणून त्याने विचारले, तर गावाला गेले आहेत, उद्या येतील, असे सांग. चौकशी करून येण्याला मला सांगितले, म्हणून आलो, असे सांग. जा."
मी अमृतशेटजींच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, "काय, रे, श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील, म्हणून आलास होय ना?"
मी त्याला म्हटले, "चित्रे देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही. परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो आहे."
"कोणाला धोतरजोडा? तुला?" त्याने विचारले.
"नाही, भाऊंसाठी. चांगला लांब-रुंद हवा. पोत चांगले हवे. किंमत काय, ते विचारावयास मी आलो आहे. दोन-तीन नमुने दे. ते मी घरी दाखवून आणतो." असे मी सांगितले.
मोहन्या मारवाड्याने दोन-तीन प्रकारचे धोतर दिले. अमृतशेट म्हणाले, "दाखवून लौकर आण हो, श्याम."
"आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले, तर पैसे देऊ." असे मी अभिमानाने म्हटले.
"तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे? बापाजवळ तर फद्या नाही!" अमृतशेट म्हणाले.
मला ते शब्द ऐकून वाईट वाटले. अमृतशेटांचे आम्हांला कर्ज होते, म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे; परंतु कर्ज कधी काढू नये.
मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखविले. त्यांतील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. तीन, साडेतीन रुपये काही तरी होती. आईने मजजवळ पैसे दिले व म्हणाली, "हा घेऊन ये. बाकीचे परत कर." मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले.
वडील गावाहून परत आले, तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसावयास देणार होती. आम्ही मुले होतो, तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो.

                            उद्याची दिवाळी. आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यांतले इंद्रजव काढिले; ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठहवले. पायाखाली नरकासुर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटे आम्ही गोळा करून ठेवली. अंगण झाडून स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासुर मारणे. नरक हाच असुर आहे. नरक म्हणजे घाण. ह्या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षस शंभर माणसे खाईल; परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो, तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसापाण्यात सर्वत्र घाण होते. विष्ठा, शेण सारे आजूबाजूला पडले असते. ही घाण दूर करावयाची, म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी गंमत आहे. सत्यभामेने नरकासुराला मारले. ती कृष्णाला म्हणाली, "तुमच्याने हा मरणार नाही, याला शेवटी मीच मारीन." घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरुष घरात घाण करतात; परंतु बायका स्वच्छ ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातांत घर असते. ते धड केर काढणार नाहीत, चूल सारवणार नाहीत, शेण नीट लावणार नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत! चार दिवसांत घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करून टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात. नरकासुर सत्यभामाच मारील. घाण स्त्रियाच दूर करतील. परंतु अलिकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात! राक्षस रस्त्यात ठेवला, तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. म्युनिसिपालिटीच्या पेट्या असतील, त्यांत जवळ जाऊन घाण टाकावी.

                            आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आईने पणत्या पुसून तयार केल्या. वाती तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठावयाचे, म्हणून आम्ही मुले लौकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती. उटणी वगैरे तयार करीत होती.

                            मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वतः आपले न्हाणे आटोपले व मग आम्हां एकेकाला ती उठवू लागली. अंगाला उटणे, तेल चोळू लागली. आधी तेलाचे पाच ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले.
आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातून सुद्धा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांनासुद्धा कढत पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे! परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवांची पूजा केली. करंजी-अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भुत्ये भिक्षेसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते, पै-पैसा, पोहे, करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हांला हाक मारली व देवांचा नैवेद्य त्यांनी आम्हांला दिला. रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने ते परत आले.

"माझे धोतर, ग, कुठे आहे आज? दिसत नाही ते." त्यांनी आईला विचारले.
"त्याची दोन अंगपुसणी केली. किती फाटले होते ते?" आई म्हणाली.
"अग, मग नेसू काय आज? आणखी महिनाभर ते गेले असते." ते म्हणाले.
"त्याचा अंत तरी किती पाहावयाचा? ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते." आई म्हणाली.
"अग, मला नेसायला सुद्धा वाटत होती. परंतु करायचे काय? लाज वाटली, म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत." ते म्हणाले.
"हे धोतर नेसा आज." आईने धोतर पुढे केले.
"हे कोठले? कोणी आणले?" त्यांनी विचारले.
"अमृतशेठकडून मी आणविले." आई म्हणाली.
"अग, तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही? परंतु तो उधार देईना. 'माझी पूर्वीची बाकीच कशी वसूल होईल, हीच मला काळजी आहे. तुम्हांला उधार देऊन फसलो,' असे तो मला म्हणाला. तू घेऊन आलीस वाटते? का मोहन्याला बोलावून त्याला गळ घातलीस?" वडील चौकशी करू लागले.
"मी ते विकत आणले आहे. श्यामने जाऊन आणले." आई म्हणाली.
"श्यामजवळ कोठले पैसे?" त्यांनी विचारले.
"मी दिले." आई म्हणाली.
"तुझ्याजवळ कोठले?" त्यांनी विचारले.
"पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठविले." आईने सांगितले.
"केव्हा आला काळा कृष्णा?" त्यांनी विचारले.
"झाले दोन दिवस." आई म्हणाली.
"तुझे लुगडे फाटले आहे, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठविलेली ओवाळणी-तुझा त्यावर हक्क. ते आम्हांला घ्यावयाचा हक्क नाही." भाऊ म्हणाले.
"तुम्ही व मी निराळी का आहोत? इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला; सुखदुःखे पाहिली; नाना बरेवाईट अनुभव घेतले; अजून का आपण निराळी आहोत? माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे. आहे तरी काय आपणांजवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे. त्यातच माझा आनंद आहे. नेसा, मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे." आई म्हणाली.
"मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे, याचे मला नाही का वाईट वाटणार? तुला आनंद होत आहे; परंतु मला दुःख होत आहे! तू आपल्याला आनंद मिळविलास आणि मला?" त्यांच्याने बोलवेना.
"माझा आनंद तो तुमचाच आहे. तुम्हांला बाहेर चारचौघांत जावयाचे असते. गंगूअप्पांकडे आज सोंगट्या खेळायला बोलावतील, गेले पाहिजे. मला आज कोठे जायचे आहे बाहेर? पुढे सवड झाली, की आधी मला लुगडे घ्यावे. असे उगीच मनाला लावून घेऊन नये. आज दिवाळी; आज साऱ्यांनी हसायचे, आनंदात राहायचे, आम्हांला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा." आई म्हणाली.
"तुझ्यासारखी जन्माची सोबतीण व अशी गोड व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंतांहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही, का सुखी होणार नाही? आण ते धोतर." असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला.

                            वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हांलाही आनंद झाला; परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वतःच अनुभवून पाहावा लागतो. प्रेम-पूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे.


********************************************************************************************
 रात्र एकविसावी : दूर्वांची आजी          अनुक्रमणिका         रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर
********************************************************************************************