रात्र पाचवी : मथुरी

श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तू पडून रहा.'

                            "अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दु:ख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे.' असे म्हणून श्यामने सुरूवात केली.

                            'मित्रांनो! मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्रा असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दु:खे हृदयातील दारिद्रयामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो; परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले.

                            'आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते. घरी असते. हे भात कांडून तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यास येणा-या बायकांना कांडपिणी म्हणतात. घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वंशपरंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात. जणू वतनच ते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा दोनतीन कांडपिणी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता, तो लहान होता. दहाबारा वर्षांचा असेल. 'मथुरी उन्हाळयाच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू, वगैरे आणून द्यावयाची. पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती. अळूसुध्दा गोड फळ आहे. त्याचा तपकिरी रंग असतो. आत जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञताबुध्दीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही.

'का ग गज-ये, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला? ही दुसरी कोण आली?' आईने विचारले.

गजरी म्हणाली, 'मथुरीला ताप आला आहे. मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे.'

आपणास कामावर जाता न आले तर दुस-या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे, ही कर्तव्यबुध्दी त्या गरीब मोलकरणीतही होती.

'बराच आला आहे का ग ताप?' आईने विचारले.

इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, 'श्यामची आई! माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल.'

'बरे हं.' आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली.

दुपारी बाराएक वाजता आमची घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला.

                            'गुरांना पाणी घातलेस का, शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाही तर गुरे पायांनी तुडवितील व त्यातच बसतील; गवत घालून ठेव.' आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, 'सारे केले. आता मी जातो.' 'थांब शिवराम. इकडे ये जरा.' आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणिले. 'शिवराम हे तुझ्या आईला हो. म्हणावं लौकर बरी हो.' असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रूमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला.

                            तिन्हीसांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही. 'गज-ये! ती समई कोंडयाला पुसून नीट लख्ख करून ठेव.' आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. कांडणाच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज असे. भाताच्या कोंडयाला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या.

                            शिवरामाने झाडांना पाणी घातले, गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, 'शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा; त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरूण घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते.' असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला.

मथुरेने शिवरामाला विचारले, 'शिवराम! हे कोणी दिले?'

                            शिवराम म्हणाला, 'श्यामच्या आईने.' मथुरी म्हणाली, 'देवमाणूस आहे माउली. सा-यांची काळजी आहे तिला.' मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही. तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला.

'शिवराम! तुझ्या आईचे कसे आहे?' आईने विचारले.

'कपाळ लई दुखते, सारखे ठणकते; अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोपबी नाही.' त्याने सांगितले.

'बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबरशिंग देईन, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल.' आई म्हणाली.

तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला. शेणाच्या गोव-या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली.

                            दोन प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्याएवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबरशिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबरशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात.

                            काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती. अशक्त झाली होती; परंतु ती कामावर येऊ लागली. पंधरावीस दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली, 'मथु-ये! किती ग वाळलीस तू ! कांडण होईल का तुझ्याकडून?'

                            मथुरी म्हणाली, 'बसत उठत करू कांडण. इतके दिवस अंथरूणावर पडून खाल्ले, पुरे आता; हिंडती फिरती आता झाली आहे. चार दिवसांनी होईन धडधाकट ! तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला ?'

                            आई म्हणाली, 'अग सारी देवाची कृपा. आम्ही किती एकमेकांना पुरणार! बरे पण, मुलांचा भात झाला आहे. तूही चार घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथेच जेव पोटभर, ऐकलेस ना?'

त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळचे जेवली. मथुरीच्या तोंडावर त्या वेळेस केवढी कृतज्ञता होती!

                            ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत. तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, 'अरे हे काय श्याम!' तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, 'श्याम! तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती. तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लौकर. सा-यांवर तिचा लोभ.'

अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती.

********************************************************************************************
 रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंत                  अनुक्रमणिका                       रात्र सहावी : थोर अश्रू
********************************************************************************************

रात्र सहावी : थोर अश्रू

लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.

                            'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते.

                            एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते. संध्याकाळची आंघोळ; तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो.

                            'आई! अंग पूस माझे; पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पूस.' मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुषमंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी.

आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, 'देवाची फुले काढ.'

मी म्हटले, 'माझे तळवे ओले आहेत; त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पूस.'

'तळवे रे ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते?' आई म्हणाली.

'तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा.' मी घट्ट धरून म्हटले.

                            हट्टी आहेस हो श्याम अगदी. एकेक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक! हं ठेवा पाय.' आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही?

मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, 'श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून.'

                            गडयांनो ! किती गोड शब्द! आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत. बूट स्वच्छ रहावे म्हणून बूटपुश्ये आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत. शरीरास व कपडयास मळ लागू नये म्हणून सा-यांचे प्रयत्न आहेत; परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो; परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले, तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळयाजवळ भरलेले आहेत; परंतु मी अजून शुध्द, निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे, असे मनात येऊन कितीकांस वाईट वाटते? मीराबाईने म्हटले आहे.

'असुवन जल सींच प्रेमवेलि बोई ।'

अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो!'


********************************************************************************************
 रात्र पाचवी : मथुरी                             अनुक्रमणिका                       रात्र सातवी : पत्रावळ
********************************************************************************************

रात्र सातवी : पत्रावळ

                            "कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती तरी सुंदरता व स्वच्छता असते . ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासुध्दा त्रास कमी. ताटे घासावयास नकोत. वडील सकाळी शेतावर जावयाचे. इकडे तिकडे फिरून, कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे. वडील मग स्त्रात करून संध्या, पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण.

मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे: "पत्रावळी आधी द्रोणा। तो जावई शहाणा।" पत्रावळ लावण्यापर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे!

                            घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या, असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने , पळसाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढर्‍या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राध्दाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी.

"श्याम! तू पत्रावळ लावावयास शीक. नाही तर आज जेवावयास मिळणार नाही." असे आईने मला बजावले.

"मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही," मीही रागानेच म्हटले.

माझी बहीण माहेरी आलेली होती, ती मला म्हणाली," श्याम! ये तुला मी शिकविते. कठिण का आहे त्यात काही?"

                            "मला नको तू शिकवायला जा." मी उर्मटपणे त्या बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिध्द होते, आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही, वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रेयोजन वगैरे असले की, गावातील मंडळी त्याच्याकडे जमावायाची व पत्रावळी लावीत बसावयाची परंपरा मला शिकणे भाग पडले; परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही.

                            मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही.‘ ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे,’ असे ठरले होते.माझी पत्रावळ नाही. सारीजण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्क रदबदली करू लागली." उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शीक हो माझ्याजवळ.आई,उद्या तो लावील हो. वाढ आज त्याला," असे अक्का म्हणू लागली; परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो." मी नाहीच लावणार जा. नका वाढू मला जेवायला. माझे अडले आहे खेटर. मी तस्सा उपाशी राहीन." असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालावयाला येते का, याची वाट मी पाहात होतो.

                            शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का, तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली,"श्याम! चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेल्ये म्हणजे थोडीच येणार आहे समजवावयास! ऊठ, चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास," तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकाळे म्हणतात. चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळासाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला? "विस्तीर्णपात्र भोजनम"’ "जेवावयास मोठे पान घ्यावे", असे ते म्हणत.

                            अक्कांच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रूसणार्‍या भावाजवळ आली असतो! दोन दिवस ती आली होती,तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळ्यांत पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले." हे खाली आधाराला लाव,’ असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली व टाका लावला; परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना." श्याम! ही दुसरी घे चोय. ही चांगली आहे," असे म्हणून अक्कने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले.

"ही माझी पत्रावळ वाढ मला." मी आईला म्हटले.

"हातपाय धुऊन आलास का पण?" आईने विचारले.

"हो केव्हाच हातपाय धुतले. मी काही घाणरेडा नाही," मी म्हटले.

"घाणरेडा नाहीसे; परंतु सू सू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते."

आई म्हणाली.

मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो.

"पोटभर जेव चांगला. उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे; पण कशी छान लावतो पत्रावळ." आई बोलत होती.

                            मी रागाने भराभर जेवत होतो. पत्रावळ कशीतरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडवला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव . मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव." मी रागाने म्हटले.

"आमच्या घशात नाही जात ते? तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल." आई म्हणाली.

                            मी दुसर्‍या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते,दुमड कशी घालते, ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालावयाची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन. असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो, व शेला विणणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत; टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की, पाहात बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत त्या वेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत; परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटपणा असला पाहिजे . सौंदर्य असले पाहिजे .

                            माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाराच्या घशात टाका जावयाचा! पत्रावळ लावताना मनात म्हट्ले पाहिजे," कोणीही हिच्यावर जेवो त्याला नीट जेवता येईल. घशात जाणार नाही. फटीतून अन्न खाली जाणार नाही." मी चांगला पत्रावळ लावण्यास शिकलो.

एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले," चंद्रये! तुझी का ग पत्रावळ?"

अक्का म्हणाली,"नाही. ती श्यामने लावलेली आहे." वडिल म्हणाले," इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली?"

आई म्हणाली, " त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला."

मी आईला म्हटले," आता मागेच कशाला सांगतेस? भाऊ! आता चांगली येते की नाही मला?"

                            " आता काय सुंदरच लावता येते ; पण द्रोण कुठे लावता येतो?" वडील म्हणाले." द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन." मी सांगितले.

                            माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलास दाखविला." चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत." असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला.

                            " आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात मात्र हवे चंद्रये, याला एक जर्दाळू दे. शिकल्याबद्दल खाऊ. " आईने सांगितल्याप्रेमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला! समुद्रमंथानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसले. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे.


********************************************************************************************
 रात्र सहावी : थोर अश्रू                        अनुक्रमणिका                   रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना
********************************************************************************************

रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना

                            बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना, सारखी चोवीस तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहातच उभा होता. सृष्टिसौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत:-

राहूनी गुप्त मागे करितोसि जादुगारी । रचितोसि रंगलीला प्रभु तू महान् चितारी ।

किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून । शत भावनांनि हृदय येई उचंबळून ॥

या वेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, 'श्याम! सारी मंडळी आली; प्रार्थनेला चल. सर्वजण वाट पहात आहेत.'

'हो. मी आपला पाहातच राहिलो.' असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टीस सुरूवात झाली.

                            मित्रांनो! प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या सा-या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत; परंतु संस्कृतीचे संवर्धन करणा-या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे.

                            आमच्या घरी एक अशी पध्दत होती की, रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत. मोरोपंत, वामनपंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवीत असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळया श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत. आमच्या अंथरूणावर बसत आणि आम्हाला भूपाळया श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरूणातच गोधडया पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकिट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरूण व अंथरूण असावयाचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळया वडील शिकवीत. 'कानी कुंडलाची प्रभा चंद्रसूर्य जैसे नभा' हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय, वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुममंडित जनके, देवी म्हणे अनार्या, ये रथावरि झणी यदुराया, असा येता देखे, मारावे मजला, अंग वक्र अधरी धरि पावा, वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून, तर अर्थही सांगावयाचे. 'सौमित्र म्हणजे कोण?' असे ते विचारीत. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. 'लक्ष्मणाची आई कोण?' आम्ही सांगावे 'सौमित्रा'. मग सौमित्र म्हणजे कोण?' आम्ही सांगावे अंदाजाने 'लक्ष्मण' भले शाबास! अशी मग ते शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारीत. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पध्दतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता.

                            वडिल पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. 'दिव्या दिव्या दीपोत्कार। कानी कुंडल मोतीहार। दिवा देखून नमस्कार।' किंवा 'तिळाचे तेल कापसाची वात। दिवा तेवे मध्यानरात। दिवा तेवे देवापाशी । माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी ॥' वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाचे वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषितर्पणच होत असे.

                            गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असावयाचेच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने, डोळयांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे; परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाटयाने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतर नसे.

                            त्या दिवशी गंगूअप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुस-याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे; परंतु कोणी तरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाही तर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले, असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली.

                            दुपारी स्नान सांगणे आले व थोडया वेळाने मी जेवावयास गेलो. कणेरांगोळया घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळयाचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठया हंडयांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही, याची चवकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व 'हरहर महादेव' होऊन मंडळी जेवावयास बसली.

                            मी मुकाटयाने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरूवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला. कोणकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, 'बंडया! श्लोक म्हटलास का? म्हण आधी.' श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. 'श्याम! श्लोक म्हण ना रे! तुला तर किती तरी चांगले येतात. तो 'चैतन्य सुमनं' नाही तर 'डिडिम डिम्मिन् डिम्मिन्-' म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. 'बायक्या आहेस अगदी!' शेजारचे गोविंदभट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला, त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई.

                            जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्यांने सुपारी, विडा खाऊ नये, अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, 'काय रे होते जेवावयाला? भाज्या कसल्या केल्या होत्या?' मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, 'श्लोक म्हटलास की नाही?'

                            आता काय उत्तर देणार? एका खोटयास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते. दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले, 'श्लोक म्हटला.'

आईने पुन्हा विचारले, 'कोणता म्हटलास?
तो म्हटलेला लोकांना आवडला का?'

पुन्हा मी खोटे सांगितले की, 'नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे' हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का?

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथां सेंदुर पाझरे वरि बरे दूर्वांकुरांचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे ॥
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥


                            मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोडया करावयाच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकांस मार बसवावयाचा, हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंडया, बन्या, वासू सारे आले व आईला म्हणाले, 'यशोदाकाकू! तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते; परंतु याने म्हटलाच नाही.'

'श्यामनेच मला शिकविलेला 'भरूनि गगन-ताटी शुध्द नक्षत्ररत्ने' तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली.' असे वासू म्हणाला.

गोविंदा म्हणाला, 'असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी' हा मी म्हटला व नरसूअण्णांनी मला शाबासकी दिली.'

आई मला म्हणाली, 'श्याम ? मला फसविलेस! खोटे बोललास ! श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस?'

वासू म्हणाला, 'श्याम ! केव्हा रे म्हटलास?

बन्या म्हणाला, 'अरे त्याने मनात म्हटला असेल; तो आपल्याला कसा ऐकू येईल?'

                            बंडया म्हणाला, 'पण देवाने तर ऐकला असेल!' मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांची बिंगे चव्हाटयावर आणणारी वर्तमानपत्रेच ती!

                            मला आई म्हणाली, 'श्याम ! तू श्लोक म्हटला नाहीस. ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक! देवाच्या पाया पड व म्हण मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही.' मी मुखस्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, 'जा, देवाच्या पाया पड. नाही तर घरी येऊ देत, त्यांना सांगेन; मग मार बसेल; बोलणी खावी लागतील.' मी जागचा हललो नाही. मला वाटले, आई वडिलांस सांगणार नाही. ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, 'नाही ना ऐकत? बरं! मी आता बोलत नाही.'

वडील रात्रीसच परगावाहून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भूपाळया सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, 'श्याम! काल कोणता श्लोक म्हटलास?'

                            आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुध्दा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबविले व ती म्हणाली, 'श्यामने काल श्लोक म्हटला नाही; मला मात्र खोटेच येऊन सांगितले की, म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होत्ये की, देवाच्या पाय पड व पुन्हा खोटे बोलणार नाही, असे म्हण; परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच.'

वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, 'होय का रे? ऊठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा रहा. श्लोक म्हटलास का काल?'

                            वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, 'नाही म्हटला.' 'मग खोटं का सांगितलेस? शंभरदा तुला सांगितले आहे की, खोटे बोलू नये म्हणून.' वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, 'आता नाही पुन्हा खोटे बोलणार.'

                            'आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस. आईबापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते? माजलास होय तू?' वडील आता उठून मारणार, असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायांवर डोके ठेवले. माझे कढत कढत अश्रू तिच्या पायांवर पडले. 'आई! मी चुकलो, मला क्षमा कर.' असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्यमूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले; परंतु स्वत:च्या भावना आवरून ती म्हणाली, 'देवाच्या पाया पड. पुन्हा खोटे बोलण्याची बुध्दी देऊ नकोस, असे त्याला प्रार्थून सांग.'

मी देवाजवळ उभा राहिलो. स्फुंदत स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो.

वडिलांचा राग मावळला होता. 'ये इकडे,'असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, 'जा आता, शाळा आहे ना?'

मी म्हटले, 'आज रविवार, आज सुट्टी आहे.'

वडील म्हणाले, 'मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाने पण आणू.' मी होय म्हटले.

                            वडिलांचा स्वभाव मोठा हुषार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते. खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला, आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी; तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेढब व ऐदी गोळयाला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे :-

करूनि माता अनुराग राग । विकासवी बाळ-मना-विभाग
फुले तरू सेवुनि उष्ण शीत । जगी असे हीच विकास-रीत ॥



********************************************************************************************
 रात्र सातवी : पत्रावळ                             अनुक्रमणिका                       रात्र नववी : मोरी गाय
********************************************************************************************

रात्र नववी : मोरी गाय

                            "बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुस-याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला.

"तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो आहे.' शिवा म्हणाला.

                            श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, 'बारकू! तू मला आवडतोस, म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे.'

श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारीजणे वाट पाहात होती. श्यामने सुरूवात केली:

                            "आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळयासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही, असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती. गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे.'

                            माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठयात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे; परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंडदेखली गोपूजा आहे, देखल्या देवा दंडवत, असा प्रकार आहे. पूर्वी दुस-याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत. मूठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की, त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठया. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वत:च्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात, गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणांवर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल.

                            माझी आई मधून गोठयात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाचे वेळेत एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गाईसाठी, असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मो-या गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी, तसतशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मो-या गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुस-या कोणाला काढू देत नसे.

                            ज्याने द्यावे त्याने घ्यावे, असा जणू तिचा निश्चय होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. 'गंधेन गाव: पश्यन्ति.' गाई वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणाऱयाला ती लाथ मारी. 'पाप्या! माझ्या कासेला तू हात लावू नकोस; माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, 'असे जणू ती सांगत असे.

                            ती मोरी गाय भाग्यवान होती, असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यांत किडे होतात. एक दोन दिवसांत ढोर मरते.

                            मो-या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले; परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले; परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हास सोडून गेली! मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू! जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दु:ख कळते! इतरांस काय समज? मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदकुंकू व फुले वाहात असे.

                            कधी कधी बोलताना आई म्हणे, 'मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली. ज्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दु:ख, रोग, दारिद्रय, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्यदेवता, आधारदेवता, या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गो-पूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहो. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो; परंतु तिला खायला प्यायला देत नाही; तिचे दूधही मिळत नाही; मिळाले तर रूचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱयाला नरक सांगितला आहे. दास्य सांगितले आहे.'


********************************************************************************************
 रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना                      अनुक्रमणिका                     रात्र दहावी : पर्णकुटी
********************************************************************************************

रात्र दहावी : पर्णकुटी


"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.

'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.

'ने रे तिलासुध्दा, तीही ऐकेल. चांगले असेल ते सा-यांनी ऐकावे. मी सुध्दा आले असते; पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर.' भाऊची आई म्हणाली.

'शेजारची भिमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ?' वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती.

'चल, तेथे मग 'मला झोप येते, चल घरी' अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र!' असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले.

आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकावयास मुलेमुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत.

वच्छी व तिचा भाऊ आली ती गोष्ट सुरूही झाली होती.

                            'शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी! या भारतवर्षात भाऊबंदकी फार! कौरवपांडवांच्या वेळेपासून आहे. ती अजून आहे. भावाभावांत जेथे प्रेम नाही, तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात तीस वर्षे बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही-दूध दिले, परंतु स्वत: चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावाबहिणींची लग्ने केली, त्यांच्या हौशी पुरविल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले! घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्या वेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळयांत पाणी आणून कधी कधी सांगत असे.

                            तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपति-उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्या वेळेस अभ्यंकर हे प्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री नऊदहाच्या सुमारास आईने आम्हास उठवले. माझे आईबाप त्या वेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळयांतून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मो-या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले, ज्या घरात एके काळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले; त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाटयाने जात होतो! कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्या वेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता; परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात.

                            नवीन घरी आता सवय झाली; परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होईतो आजीजवळ मिळते घेई. कारण स्वत:ची परिस्थिती ती ओळखून होती.

                            आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे. नव-यासह माहेरी राहणे, त्यातून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमाखर्च लिहीत होते. आई ओटीवर गेली व म्हणाली 'माझ्याच्याने येथे अत:पर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणेपिणे म्हणजे जिवावर येते.'

वडील म्हणाले, 'अगं, आपण आपलेच भात खातो ना? फक्त येथे राहातो. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हांला काय माहीत?'

आई एकदम संतापून म्हणाली, 'तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी.'

                            माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, 'आम्हाला स्वाभिमानच नाही! आम्ही माणसेच नाही जणू! दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर. तूही वाटेल तसे बोल!'

वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. 'तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काही तरी मनास लावून घ्यावयाचे; पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही.'

                            'मलाही का राहावे असे वाटते? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना? कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधावयाचे? कसे तरी गुरांच्या गोठयासारखे नाही ना घर बांधावयाचे? त्यात राहणे म्हणजे अपमानच तो.' वडील आईची समजूत करीत म्हणाले.

                            'गुरांचा गोठाही चालेल; परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही; परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादे वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठया कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातीतील पाटल्या घ्या, या पुरल्या नाहीत तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळयात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला?' असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या.

वडील स्तंभितच झाले. 'तुला इतके दु:ख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लौकरच लहानसे घर बांधतो.' असे वडिलांनी आश्वासन दिले.

माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे, स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय.

                            आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या. कच्च्या विटा. त्यात कोकणात मापे असतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारिले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठ मोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई; परंतु पुन्हा ती म्हणे, 'काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी 'ऊठ' म्हणणार नाही.'

                            झोपडीवजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेविले. मग सामान नेले. नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, 'तात्पुरते बांधले आहे. पुढे मोठे बांधू.'

                            परंतु आई आम्हास म्हणे, 'यांच्या हातून मोठे घर आता केव्हा, कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल; परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठभाकर अमृताप्रमाणे लागेल; परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको.'

                            त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केंव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते; परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, 'श्याम! नवे घर तुला आवडले का?'

मी म्हटले, 'हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल.'

                            माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले? जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर! नाही, आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, 'होय, मथुरी गरीब आहे; परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊ या. मनाने श्रीमंत होऊ या.'

'होय, आपण मनाने श्रीमंत होऊ. खरंच होऊ.' मी म्हटले.

इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, 'आई! केवढा ग तारा होता!'

                            आई गंभीरच होती. ती म्हणाली, 'श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लौकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत? ते वरचे मोठे, मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत? मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो वारा?'

                            'नाही हो आई! तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शितकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत, असे त्या हरिविजयात नाही का? तसे हे घर पाहावयास ते तारेही येती. कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस.' मी म्हटले.

                            माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, 'श्याम! कोणी रे तुला असे बोलावयास शिकविले? किती गोड व सुंदर बोलतोस? खरेच आपले हे साधे, सुंदर घर ता-यांनाही आवडेल, सा-यांना आवडेल!'


********************************************************************************************
 रात्र नववी : मोरी गाय                              अनुक्रमणिका                        रात्र अकरावी : भूतदया
********************************************************************************************

रात्र अकरावी : भूतदया

"राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको.' श्याम म्हणाला.

                            आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूस करू लागला; परंतु भिका कसचा ऐकतो! 'इथे दिवा असला, म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हांला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळयांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते, तर नाटक अंधारातही करता आले असते.' भिका म्हणाला.

'मी काही नाटक नाही करीत; माझ्या हृदयातील बोल तुम्हांला सांगत आहे.' श्याम म्हणाला.

                            'आम्ही नाटक नाही म्हणत. परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत; परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावयास जात. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत.' नामदेव म्हणाला.

'बरे असू दे दिवा. तुम्हाला ज्यात आनंद, त्यातच मला,' असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरूवात केली:

                            एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहेळयाचे झाड होते. एकाएकी टप् असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला, ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडपडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळागोळा झाला होता. अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते. डोळेसुध्दा ते नीट उघडीत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो, त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एक सारखे हलत होते, खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाणे ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरविले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघे होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेविले. आम्हीही लहान होतो. आम्ही तरी काय करणार? बालबुध्दीला जे जे सुचेल, ते ते करू लागलो. त्या पिलाला दाणापाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्याला पिलाला खाता येत होते, की नाही, त्या आमच्या काळजीनेच, आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना याचा आम्ही विचारच केला नाही.

                            या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरूरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ; ज्ञानहीन प्रेम तेही फुकट; प्रेमज्ञानहीन शक्ति व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली; परंतु दुस-यावर प्रेम नसेल, तर त्या शक्तीचा दुरूपयोग व्हावयाचा. मजजवळ ज्ञान आहे; परंतु दुस-यावर प्रेम नसेल, तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुस-यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल, तर ते प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे; परंतु त्या मुलांची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी, याचे ज्ञान जर तिला नसेल, तर त्या आंधळया प्रेमाने जे खावयास देऊ नये, तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल! समजा, आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे; परंतु ती जर स्वत: अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा, प्रेम म्हणजे हृदयाचा विकास; ज्ञान म्हणजे बुध्दीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुध्दी या तिहींची वाढ जीवनात हवी.

                            आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो. परंतु आम्हांला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले! गरीब बिचारे! आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली ! मी त्याला म्हटले, 'आम्ही तुला पिंज-यात कोंडून नाही हो ठेवणार! तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो, तुझ्या आईसाठी तरी नको, रे मरू! ती केविलवाणी ओरडत असेल. घिरटया घालीत असेल.'

आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटले, 'आई! हे पिलू बघ ग कसे करते आहे! अगदी मान वर करीत नाही. त्याला काय खावयास देऊ?'

                            आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, 'श्याम! हे जगणार नाही, हो. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका. त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले; गरीब बिचारे!' असे म्हणून आईने ते पिलू खाली कापसावर ठेविले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वासून ते मरून पडले. गेले, त्याचे प्राण गेले! त्याचे आईबाप, भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हांला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरावयाचे, असे आम्ही ठरविले.

                            आईला जाऊन विचारले, 'आई! या पिलाला आम्ही कोठे पुरू? चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, 'त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोग-याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील, मोग-याची फुले अधिकच तजेलदार दिसतील. कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिलू विसरणार नाही. त्या फुलांत तुमच्यासाठी ते येईल व तुम्हांला गोड वास देईल.'

मी म्हटले, 'त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं, होय ना? सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले, त्यावर डाळिंबाचे झाड लाविले; परंतु सोनसाखळी बापाला भेटावयाला डाळिंबात आली. तसेच हे पिलू येईल, हो ना? मग शेवंतीची फुले किती छान दिसतील? फारच वास येईल, नाही का ग आई?'

आई म्हणाली, 'जा लौकर पुरा त्याला. मेलेले फार वेळ ठेवू नये.'

                            'त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना.' मी म्हटले. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले. जेथे फुलझाडे होती, तेथे गेलो. शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळयांतून पाणी गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेविला; परंतु त्यावर माती ढकलवेना! लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये, म्हणून वरती सुंदरसा दगड ठेविला व आम्ही घरी आलो. माजघरात बाजूला बसलो व रडत होतो.

'का, रे बाजूला बसलास?' आईने विचारले.

'आई! मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे!' मी म्हटले.

आई हसली व म्हणाली, 'अरे वेडया, सुतक नको हो धरावयाला.'

मी म्हटले, 'आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो, ते?'

आई म्हणाली, 'माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, यासाठी त्याच्या जवळ असणा-या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे; म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत. म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता! बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले!'

आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. 'आई ! तुला कोणी हे सांगितले?' मी विचारले.

                            आई म्हणाली, 'मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते व ते मला खरे वाटले. जा, हातपाय धुऊन ये, म्हणजे झाले. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिलेत, चांगले केलेत. देवही तुमच्यावर प्रेम करील. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली, तरी दुस-या मित्रास उभे करील. देवाच्या लेकरास, कीड-मुंगी, पशुपक्षी, यांना जे द्याल, ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम! तुम्ही पाखरावर प्रेम केलेत, तसे पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल; परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल. तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका; तिला भरपूर प्रेम द्या.'

                            आई हे सांगत असता गहिवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले, हे का तिच्या डोळयांसमोर होते? का ती नेहमी आजारी असे, तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधी नेले नाही, म्हणून तिला वाईट वाटत होते? तिच्या भावना काही असोत; परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात; परंतु माणसांच्या मुंडया मुरगळतात! मांजरे, पोपट यांवर प्रेम करतात; परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करीत नाहीत, हे आपण पाहत नाही का?


********************************************************************************************
 रात्र दहावी : पर्णकुटी                          अनुक्रमणिका                     रात्र बारावी : श्यामचे पोहणे
********************************************************************************************