हरे राम ! किती पाहिला मी अंत !

"पिस्तुलाने मला दिला हा इशारा

विश्रांति शरीरा, हवी तुला

दरिद्री दलित झाला मायदेश

दिले तुला क्लेश त्याचेसाठी

सत्याग्रहास्तव तुला बंदिवास

सोशीले उपास निर्वाणीचे

मायबहिणींची पुसाया आसवे

तुला हिंडवीले आगीतून

हरे राम ! किती पाहिला मी अंत !

जा रे पंचत्वात विलीन हो"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराचे दान

अरे हिंदपुत्रा, सांग कशासाठी

तुझी ही हाकाटी रात्रंदिस ?

कोणता तू केला आजवरी त्याग

जीवनाचा याग मातेसाठी ?

तुझा हा कलह, क्षुद्र तुझा मोह

तुझा मातृद्रोह ख्यात जगी

काय ही पायीच्या तोडतील बेडया ?

कल्पना ही वेडया सोड खुळी

स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराचे दान

याचकाची दीन भिक्षा नोहे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

फार मोठी आम्हा लागलीसे भूक

फार मोठी आम्हा लागलीसे भूक

आता नाही भूक राहणार !

यापुढे आमचा रोज क्रांतिदिन

नाही हीनदीन राहणार

पेटविली आम्ही एकदा मशाल

आता सर्वकाल पेटणार

प्रचंड आमचा सुरु झाला यज्ञ

त्याला कोण विघ्न आणणार ?

चाळीस कोटींचे घोर आक्रंदन

कोण समाधान करणार ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी !

मंगल मंगल उजळे प्रभात

कुजबुजे वात कानी माझ्या

उगवत्या सूर्या कराया वंदन

फिरवी वदन पूर्वेला मी

काय मी पाहिले ? काय मी ऐकिले ?

मस्तक जाहले सुन्न माझे

नव्हता तो रम्य अरुणाचा राग

होती आग आग पेटलेली

नव्हत्या प्रेमळ प्रसन्न भूपाळ्या

आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आता हवे बंड करावया

केवळ आमुची केली समजूत

चांद आरशात दाखवीला

पुरा वीट आला, नको ती याचना

केवळ वंचना-मृगजळ

पुरे झाल्या थापा, होते ते थोतांड

आता हवे बंड करावया

माघारी आणाया हरपले श्रेय

आता हवे दिव्य करावया

उचलीला विडा, लाविला भंडार

आता हा निर्धार शेवटला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोटि कोटि आम्ही उभे अंधारात

नाही का आमुचे संपले ग्रहण ?

कधी मोक्षक्षण यावयाचा

क्षितिजी लागले कधीचे नयन

कुठे तो अरुण ? कुठे उषा ?

येणार येणार म्हणती उदया

कधी सूर्यराया येणार तो ?

तेजस्वी तयाच्या प्रकाशाचे कडे

कधी पूर्वेकडे दिसणार ?

कोटि कोटि आम्ही उभे अंधारात

कधी काळरात जाणार ही ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हिरीताचं देनं घेनं

नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं

हिरीताचं देनं घेनं नही पोटासाठीं

उभे शेतामधी पिकं

ऊन वारा खात खात

तरसती 'कव्हां जाऊं

देवा, भुकेल्या पोटांत'

पेटवा रे चुल्हा आता, मांडा थाटवाटी

नको लागूं सदा जीवा, मतलबापाठी

पाहीसनी रे लोकाचे

यवहार खोटे नाटे

तव्हां बोरी बाभयीच्या

आले आंगावर कांटे

राखोयीच्यासाठीं झाल्या शेताले कुपाटी

नको लागूं जीवा, आतां मतलबापाठी

किती भरला कनगा

भरल्यानं होतो रिता

हिरीताचं देनं घेनं

नहीं डाडोराकरतां

गेली देही निंघीसनी नांव रे शेवटीं

नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं


कवयित्री – बहिणाबाई चौधरी