आला पाऊस

आला पह्यला पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परमय

माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस

आतां सरीवर सरी

शेतं शिवारं भिजले

नदी नाले गेले भरी

आला पाऊस पाऊस

आतां धूमधडाख्यानं

घरं लागले गयाले

खारी गेली वाहीसन

आला पाऊस पाऊस

आला लल्‌करी ठोकत

पोरं निंघाले भिजत

दारीं चिल्लाया मारत

आला पाऊस पाऊस

गडगडाट करत

धडधड करे छाती

पोरं दडाले घरांत

आतां उगूं दे रे शेतं

आला पाऊस पाऊस

वर्‍हे येऊं दे रे रोपं

आतां फिटली हाऊस

येतां पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी

आतां खा रे वडे भजे

घरांमधी बसा दडी

देवा, पाऊस पाऊस

तुझ्या डोयांतले आंस

दैवा, तुझा रे हारास

जीवा, तुझी रे मिरास


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

देशभक्ताची विनवणी!

सन्मित्रांनो! सुबांधवांनो! परिसावी मदगिरा
यथार्था परिसवी मदगिरा
गारगोटीच्या परी न व्हावे, व्हावे सुंदर हिरा
धवळावे निज-यश:सुरंगे विश्व सकल सुंदर
उठा रे, विश्व सकल सुंदर
मुकुंद पूजुन निजान्तरंगी करा यत्न दुर्धर
यत्नास यश प्रभु देई
श्रद्धेस यश प्रभु देई
आशेस फळ प्रभु देई
कर्तव्याचे कंकण बांधुन करी, न उदरंभर
बनावे, केवळ उदरंभर
महायशाते बलविभवाते संपादा सत्वर।।

ज्ञान नको, बळ नको, नको ते शील, नको ते धन
आम्हाला नको नको ते धन
निरस्तविक्रम होउन दुर्बल ऐसे म्हणती जन
खरे न हे वैराग्य, बंधुंनो! खरे तपस्वी बना
तुम्ही रे खरे तपस्वी बना
देण्यासाठी मिळवा ज्ञाना मिळवा दौलत धना
भाग्यास जगी मिरवावे
वैभवी राष्ट्र चढवावे
कीर्तिने विश्व वेधावे
स्वाभिमानधन अनंत सतत संचवून अंतरी
सख्यांनो, संचवून अंतरी
स्वर्गसुखाते संपादावे राहोनी भूवरी।।

मेंढ्यापरि ना पडा बापुडे, मरण त्याहुनी बरे
खरोखर मरण त्याहुनी बरे
मेल्यापरि हे जीवन कंठुन कोण जगी या तरे
लोखंडाची कांब त्यापरी देह करा कणखर
अगोदर देह करा कणखर
देहाहुन निज मग उत्साही करा धीरगंभिर
आकाश कोसळो वरी
पदतळी भूमि हो दुरी
मज फिकीर नाही परी
ध्येयोन्मुख मी सदैव जाइन पतंग दीपावरी
जसा तो पतंग दीपावरी
ऐसा निश्चय करा, भस्म हो, जाउ न मागे परि।।

स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये जीवात्मा रंगवा
बंधुंनो! जीवात्मा रंगवा
पारतंत्र्यशृंखला कडाकड बलतेजे भंगवा
निजांतरंगी अखंड अशादीप पाजळोनिया
गडे हो दीप पाजळोनिया
नैराश्याची निशा नाशकर सत्वर न्यावी लया
तर उठा झडकरी अता
लावा न मुळि विलंबता
द्या धीर दुर्बला हता
विजयाचा जयनाद घोषवा दुमदुमोन अंबर
जाऊ दे दुमदुमोन अंबर
स्वर्गी गातिल युष्मन्महिमा मग नारद-तुंबर।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

मातृभूमिगान

हे शुभकीर्ते जगद्विश्रुते भारतमाते विमलतरे
मंगलमूर्ते मानसपूर्ते त्वन्नमने जन सकल तरे।।
अतिकमनीये शुभ रमणीये नमनीये स्तवनीयवरे
विद्यानंदे वैभवकंदे वंदेऽहं त्वां प्रेम-भरे।।
जगदभूषणे मनस्तोषणे विपच्छोषणे मधुरतरे
सकलपावने अघविनाशने कलिमलदहने पुण्यपरे।।
तत्त्वपंडिते सुमुनिमंडिते वाङमयसरिते विजयवरे
शुभगिरिभूषित सुसरित्-पूरित सुवनालंकृत अतिरुचिरे।।
सदय-मानसे वात्सल्यरसे प्रसादपूर्णे दैन्यहरे
अजरे विश्वंभरे देवते कविस्तुते परमार्थपरे।।
अन्नदायिनी ज्ञानदायिनी जगन्मोहीनी प्रभुप्रिये
तपोभूमि तू, कर्मभूमि तू, निस्तुल निरुपम निरंतरे।।
त्वदगुणगायन, त्वत्पदवंदन, त्वत्सेवन, मत्कर्म खरे
त्वत्सुत हे मदभूषण माते! परमोदारे स्नेहसरे।। हे शुभ...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

गाऊ मी कसले गाणे?

हे जीवन केविलवाणे।
गाऊ मी कसले गाणे?।।

जगि झालो आम्ही दीन
जीवनावीण जणु मीन
ही अमुची स्थिति किति हीन
मन जळते मम अपमाने।। गाऊ..।।

आमुचे असे ना काही
सत्तेची वस्तू नाही
सुतळीचा तोडा नाही
दुर्दशा देखणे नयने।। गाऊ..।।

ना गायिगुरे ती दिसती
वासरे न ती बागडती
दूध तूप शब्दची उरती
दुर्मिळ ते झाले खाणे।। गाऊ..।।

जी अन्न जगाला देई
ती उदार भारता मायी
किति रडते धायीधायी
मिळती ना चारहि दाणे।। गाऊ..।।

अन्नास माय मोताद
घेई न तिची कुणि दाद
सुत घालित बसती वाद
पोट का भरे वादाने।। गाऊ..।।

उद्योग सकलही गेले
बेकार सर्वही झाले
जगताती अर्धे मेले
श्रेयस्कर याहुन मरणे।। गाऊ..।।

देण्यास नाहि तो कवळ
यासाठी माता विकळ
अर्पिती नद्यांना बाळ
जळतोच ऐकुनी काने।। गाऊ..।।

उपजली न मरती तोची
प्रिय बाळे भारतभूची
मेजवानि मृत्युस साची
मांडिला खेळ मरणाने।। गाऊ..।।

ना वस्त्रहि अंगी घ्याया
ना मीठहि थोडे खाया
ना तेल दिवा लावाया
मृति येना म्हणुनी जगणे।। गाऊ..।।

लागल्या शेकडो जळवा
संपत्ती नेती सर्वा
आमुची न कोणा पर्वा
आम्हि हताश होउन रडणे।। गाऊ..।।

जाहलो लोक फटफटित
नि:सत्त्व भुतांसम दिसत
पावले सर्वही अस्त
किति दिवस असे हे पडणे।। गाऊ..।।

भारतीय जनता रोड
नि:सत्त्व करित काबाड
मोजुन घ्या हाडन् हाड
पोटभरी न मिळे खाणे।। गाऊ..।।

तेजस्वी विद्या गेली
ती पोपटपंची उरली
जी गोष्ट पश्चिमे लिहिली
ती आम्हां श्रुतिसम माने।। गाऊ..।।

सत्कला मावळे सारी
सच्छस्त्रे मेली सारी
अनुकरणे करित भिकारी
शेणात सदा हो सडणे।। गाऊ..।।

ती थोर संस्कृती गेली
ती गजान्त लक्ष्मी गेली
पुरुषार्थ सत्त्वता गेली
उरली ती स्मृतिची चिन्हे।। गाऊ..।।

सोन्याचा जेथे धूर
द्रव्याचा जेथे पूर
ती चिंतेमाजी चूर
भारतभू कैशी बघणे।। गाऊ..।।

भरलेली होती बाग
भरलेले होते भाग्य
ते गेले परि सौभाग्य
अपमाने आता जगणे।। गाऊ..।।

तो बाग मनोहर गेला
हा मसणवटा हो झाला
दैवाची भेसुर लीला
आम्हि गुलाम म्हणुनी जगणे।। गाऊ..।।

कुणि उंदिर आम्हां म्हणत
ती मेयो निंदा करित
जग अस्पृश्य आम्हां गणित
किति निंदा ऐकू काने।। गाऊ..।।

अज्ञानपंकगत लोक
आढळे घरोघर शोक
नांदतात साथि अनेक
ठाण दिले दृढ रोगाने।। गाऊ..।।

शेतकरी मागे भीक
शिकलेला मागे भीक
तो भिकारी मागे भीक
धंदा ना भिक्षेवीणे।। गाऊ..।।

हृदयाची होई होळी
आपदा सदा ही पोळी
खाऊ का अफुची गोळी
मज सहन होइ ना जगणे।। गाऊ..।।

खाऊन अफू परि काय?
ही रडेल सतत माय
बंधूंची न हरे हाय
काय मिळे मज मरणाने।। गाऊ..।।

हा हिमालय दिसे खिन्न
या सरिता दिसती दीन
पशूपक्षिवनस्पती हीन
सोडिती श्वास दु:खाने।। गाऊ..।।

हे परात्परा भगवंता
हे अनंत करुणावंता
हे जगदीशा बलवंता
ऐकावे हे रडगाणे।। गाऊ..।।

वाजवी मनोहर पावा
मोहांधतिमिर हा जावा
खडबडुनी लोक उठावा
उघडावी अस्मन्नयने।। गाऊ..।।

दे स्फूर्ति आम्हाला दिव्य
कृति करु दे उत्कट भव्य
स्वातंत्र्य येउ दे नव्य
हलवावी अस्मद्वदने।। गाऊ..।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

स्वातंत्र्य

प्राण अर्पावे। स्वातंत्र्यसौख्य मिळवावे।।

केवळ बडबड ना कामाची
गरज असे निशिदिन कष्टांची
कष्टत जावे।। स्वातंत्र्य....।।

विलास-सुखभोगांना सोडा
मोह सकळ ते मारक तोडा
स्वार्थांकुर चित्तातील मोडा
निर्मळ व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

देशभक्तिचा मनात काम
भारतभूचे वदनी नाम
दृष्टि दिसावी तेजोधाम
निर्भय व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

द्वेष कलह ते विसरुन जावे
बंधुबंधुचेपरि सजावे
हाती हात प्रेमे घ्यावे
पुढे दौडावे ।। स्वातंत्र्य....।।

उचंबळोनी वृत्ती जावी
उचंबळोनी हृदये जावी
वेडावुन जणु मति ती जावी
तन्मय व्हावे ।। स्वातंत्र्य....।।

गुलामगिरिवर हाणा घाव
दास्या देशी नुरोच ठाव
प्रयत्नावरी ठेवुन भाव
सदा झुंजावे ।। स्वातंत्र्य....।।

स्वातंत्र्याची जया तहान
धावून जाऊ घेऊ ठाण
गाठू ध्येया देऊ प्राण
व्रत हे घ्यावे ।। स्वातंत्र्य....।।

परवशतेचे तोडा पाश
तोडा तोडा हरपो त्रास
चीड न येते काय तुम्हांस
चला चमकावे ।। स्वातंत्र्य....।।

परदास्याच्या पंकी कीट
असणे याचा येवो वीट
होउन सावध नीट सुधीट
निजपद घ्यावे ।। स्वातंत्र्य....।।

स्वातंत्र्याचा ईश्वरदत्त
हक्क करोनी घेऊ प्राप्त
करु यत्नाची अपूर्व शर्थ
मरुनी जावे ।। स्वातंत्र्य....।।

निज मरणाने मंगल येइल
निज मरणाने वैभव येइल
निज मरणाने मोक्ष मिळेल
मरण वरावे ।। स्वातंत्र्य....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, जानेवारी १९३०

स्वातंत्र्यदेवीचे शुभ आगमन

आनंदाचा।
उगवला दिवस सोन्याचा।।

मालिन्यरात्र लोपली
सौभाग्यउषा उजळली
सत्कीर्तिगुढी उभविली
चला रे नाचा।। उगवला....।।

गंभीर भेरिगर्जन
शंखादि मंगलस्वर
देवता येतसे दुरुन
मांगल्याचा।। उगवला....।।

ते पहा मराठी भाले
चपळेपरि चमकत आले
मंदील पाठिवर खेळे
तच्छौर्याचा।। उगवला....।।

शत्रुच्या पिऊन रक्ताला
यज्जीव निरंतर घाला
तो आला रजपुत भाला
तत्तेजाचा।। उगवला....।।

ते पहा शिवाजी राजे
तो प्रतापसिंहही साजे
पृथ्विराजहि तेथ विराजे
धन्यत्वाचा।। उगवला....।।

ती जिजा तुम्हां दिसली का
ती उमा तुम्हां दिसली का
लक्ष्मीहि तुम्हां दिसली का
पावित्र्याचा।। उगवला....।।

दुंदुभी नभी दुमदुमली
माणिकमोती उधळिली
स्वातंत्र्यदेवता आली
जयघोषाचा।। उगवला....।।

सर्वैक्य-सुंदरासन
मांडिले बहुत सजवून
देवता दिसतसे खुलुन
मोक्षश्रीचा।। उगवला....।।

सुखसिंधु किति उचंबळे
भाग्यात चित्त दंगले
मोदात विश्व रंगले
कैवल्याचा।। उगवला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

स्वातंत्र्यानंदाचे गाणे

(लाहोरला स्वातंत्र्याचा ठराव पास झाला ती वार्ता ऐकून केलेले गाणे.)

मंगल मंगल त्रिवार मंगल पावन दिन हा धन्य अहो
भारत प्यारा स्वतंत्र झाला जय बोला जय बोला हो।।

मेवाडाच्या रणशार्दूला उठा, उठा शिवराया हो
माता अपुली स्वतंत्र झाली जय बोला जय बोला हो।।

दिशा आज का प्रसन्न दिसती निर्मळ दिसती सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पवन आजचा पावन वाटे कारण मजला सांगा हो
भारतमाता मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पाषाणांची फुले जाहली का ते मजसी सांगा हो
गतबंधन भू झाली म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

मातीची ही माणिकमोती झाली का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

काट्यांची मखमल मृदू झाली चमत्कार का झाला हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

सतेज आजी अधिकच दिसतो दिनमणि का मज सांगा हो
आई झाली मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पर्वतातुनी खो-यांतूनिही दुर्गांतुन का गाणी हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

नद्या आज का तुडुंब भरल्या वाहावयाचे विसरुन हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

उचंबळे का अपार सागर सीमा सोडुनी आज अहो
भारत झाला मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

गगनमंडपी विमानगर्दी झाली का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

स्वर्गातून सुमवृष्टि होतसे अपार का मज सांगा हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

नारद तुंबर गाणी गाती सुरमुनि हर्षित ते का हो
भारत झाला मुक्त म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

कैलासावर डमरु वाजतो नाचे शिवशंकर का हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

चार मुखांनी चतुरानन की सामगायना करितो हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

सृष्टी नाचते विश्व हासते चराचर भरे मोदे हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

पाहा पाहा ते विश्वजन बघा, भेट घेउनी आले हो
भारत झाला स्वतंत्र म्हणुनी जय बोला जय बोला हो।।

चिनी जपानी अमेरिकन ते आले वंदन करण्या हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

तार्तर मोगल अफगाणादी शेजारी ते आले हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

युरोपातले सारे गोरे सविनय साश्रू आले हो
‘भारतजननि! क्षमस्व’ म्हणती जय बोला जय बोला हो।।

भारतमाता अनाथनाथा प्रेमे कुरवाळीत अहो
आपपर तिला नाही ठावे जय बोला जय बोला हो।।

आज जगाचे भाग्य उदेले वैभव फुलले अगणित हो
उचंबळे सुखसागर मंगल जय बोला जय बोला हो।।

दैन्य पळाले दु:ख गळाले कलहद्रोह दुरावति हो
नव्या मनूचा उदय जाहला जय बोला जय बोला हो।।

चुकली माकली जगातील ती राष्ट्रे जवळी घेउन हो
प्रेमे न्हाणी त्यांना भारत जय बोला जय बोला हो।।

पिवळी ढवळी काळी सारी भुवनामधली बाळे हो
भारतमातेजवळ नाचती जय बोला जय बोला हो।।

“भलेपणाने खरेपणाने प्रेमे सकळहि वागा हो
सुखास निर्मा” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“शांति नांदु दे अता अखंडित आनंद सहा नांदो हो
विसरा मागिल” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“परमेशाची सकळ लेकरे सुखेन भुवनी खेळू हो
स्वर्ग निर्मु या” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“परस्परांचे हात धरु या फेर धरुनी नाचू हो
शांतिगीत गा” बोले भारत जय बोला जय बोला हो।।

“थोर भारता! मार्गदर्शका! तूच आमुचा सदगुरु हो”
वदती सारी राष्ट्रे सदगद जय बोला जय बोला हो।।

अनंत झाली सुपुष्पवृष्टी गगनामधुनी तेव्हा हो
थै थै थै थै नाचु लागले गाउ लागले जय जय हो।।
जयजय भारत प्रियतम भारत जयजय भारत बोला हो
जयजय जयजय जयजय जयजय जय भारत जय बोला हो।।

आनंदाने डोला हो
आनंदाश्रू ढाळा हो
जयजय भारत जयजय भारत जयजय भारत बोला हो।।

हृदय कपाटे खोला हो
बांधा चित्सुखझोला हो
नाचा त्यावर नाचत बोला जयजय भारत बोला हो।।

जय बोला जय बोला हो।।
जय भारत जय बोला हो।।
जयशब्दाने अंबर कोंदे जय भारत जय बोला हो।।

भारत प्यारा स्वतंत्र झाला जयजय म्हणुनी बोला हो
सृष्टी सकलही स्वतंत्र झाली जयजय म्हणुनी बोला हो।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, २६ जानेवारी १९३०