मरणही ये तरी वरिन मोदे

मरणही ये तरी वरिन मोदे
जननिचे परि जगी यश भरु दे।। मरणही....।।

वीट वन्हित पडे
दृढ तरी ती घडे
तेज कष्टे चढे
हे कळू दे।। मरणही....।।

हाल होवोत ते
चित्त ना मुळि भिते
दास्य जे जाळते
नष्ट करु दे।। मरणही....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

दिव्य मी स्वर्ग निर्मीन

ध्येय देईन
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
सचिंत सगळे दिसती लोक
जिकडे तिकडे भरला शोक
करुन तयांवर अमृतसेक
तया उठवीन।। दिव्य....।।

मेल्यापरि हे दिसती बंधू
उरला न दिसे जीवनबिंदु
निर्मुन मी संजीवनसिंधु
तया जिववीन।। दिव्य....।।

गुलामवृत्ती जिकडे तिकडे
दुबळी वृत्ती जिकडे तिकडे
चैतन्याचे भरभरुन घडे
तया पाजीन।। दिव्य....।।

स्वातंत्र्याची लाविन ज्योत
स्फूर्तीचा मी निर्मिन स्त्रोत
तेजाचा मी सोडिन झोत
दैन्य दवडीन।। दिव्य....।।

भेदभाव मी जाळिन सारे
ऐक्याचे मी सोडिन वारे
दिव्यबळाच्या जयजयकारे
राष्ट्र उठवीन।। दिव्य....।।

करिन त्यागा ते उद्युक्त
निर्भयतेचे शिकविन मंत्र
नि:शस्त्राचे देइन शस्त्र
पंथ दावीन।। दिव्य....।।

आळस दवडून सेवा देइन
विलास दवडून विकास देइन
खेदा दवडून बोध देइन
भाग्य देईन।। दिव्य....।।

कळकळ शिकविन तळमळ शिकविन
सदगुण संघटना मी वितरिन
सत्याचा सत्त्वाचा शोभन
ध्वज उभवीन।। दिव्य....।।

रुढी जाळुन विचार देइन
हृदयमतीला निर्मळ करिन
श्रद्धा सद्धर्माला देइन
मोक्ष देईन।। दिव्य....।।

मंगल उज्वल ते देइन
पावन निर्मळ ते देइन
सुंदर सत्य शिवा देइन
देव देईन।। दिव्य....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

देशासाठी मरु!

देश आमुचा वैभवशाली वाली सकलहि जगताचा
तद्ध्यानामधि रंगुन जाऊ गाऊ त्याला निज वाचा
पराक्रमाने निजमातेला मिरवू सा-या जगतात
कीर्तिध्वज विश्वात उभारु निजतेजाने दुर्दांत

वीरापरि तरि उठा झणी
दिगंत जिंकू चला क्षणी
निजमातेला स्मरुनि मनी
मुकुंदपादांबुज वंदुनिया प्राणांवर हाणू लाथ
कोण करी जगी विरोध आता करु सर्वांचा नि:पात।।

धन्य मावळे पावन झाले देशासाठी निज-मरणे
जगणे भूषण आम्हां कायसे भीति कशाला मनि धरणे
दों दिवसांची तनु तर साची वाचवुनी तरि काय मिळे
देशासाठी उदार होऊ मृत्यु कुणाला जगी टळे

हसू यमाचा फास जरी
हसू जगाचा जाच जरी
हसू सदोदित निजांतरी
धैर्य हासत तेजे तळपत निजमातेचा सन्महिमा
त्रिभुवनि अवघ्या पसरु दावू मातेचा वैभवगरिमा।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२७

तेव्हा घडे उन्नती!

उत्साही मुखमंडले भुजगसे दोर्दंड दिव्याकृती
नानापत्ति पथी जरी दिसती ना लोपे यदीया धृती
मोठे कार्य करावयास बघते दिव्या सदा यन्मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

स्नेहाने भरले परस्पर सदा विश्वास जे दाविती
सर्वांची सहकार थोर करण्यासाठी असे संमती
ऐक्याचे कळुनी महत्त्व न कधी जे मत्सरे भांडती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

ज्यांच्या निर्भय अंतरी सतत जो सत्स्वाभिमान स्फुरे
ज्यांच्या दृष्टिसमोर जाच जुलमी दुष्ट जनांचा नुरे
भीती एक जगत्पतीस, न दुजा कोणाहि, जे सुव्रती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

तेजाला कवटाळिती परि सदा जे शिस्त सांभाळिती
अन्याला सुखवावया स्वसुखही नि:शंक जे होमिती
चित्ती उज्वल भावना परि विचाराला न जे सोडिती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

देशाची अतुला निरंतर वसे भक्ती यदीयांतरी
देशाचे हित ज्यात तीच करिती कार्ये सदा जे करी
भूमातेस्तव जे सदा झिजविती वाणी, वपु, श्री, मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती।।

देशासाठि सचिंत अन्य कसली चिंता न ज्यांना असे
देशासाठि फकीर नित्य हृदयी ती मातृमूर्ती वसे
सेवा नित्य रुचे, सुचे न दुसरे सेवेत जे रंगती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती।।

जेव्हा ऐक्य सहानुभूती उदया येतील आम्हांमध्ये
त्यागी उद्यममग्न होतिल यदा, बंधुत्व चित्ति जडे
जेव्हा स्वार्थ असेल दूर, हृदया वाटेल सत्यीं रती
जेव्हा निर्भयता दिसेल नयनी, तेव्हाच राष्ट्रोन्नती।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२६

तुफान झालो!

नाही आता क्षणहि जगणे भारती या गुलाम
मारु सारे भय हृदयिचे निर्मू स्वातंत्र्यधाम
नाही एक क्षणहि खपते दास्य विश्वंभराला
स्वातंत्र्याला मिळउन चला जाउन तत्पूजनाला।।

जो या आहे क्षणिक शरिरी अंतिम श्वास एक
भूमातेला सुखविन सुखे होउ मद्रक्तसेक
माता आता क्षणभरिहि ना बंधनी ह्या बसू दे
जावो माझी तनु परि मम म्लान माता हसू दे।।

कैसे साहू? सतत जरि ते आइला नागवीती
कैसे पाहू? सतत जरि ते बंधुंना गांजिताती
बैसावे का विलपत? न का पौरुषाचा स्फुल्लिंग
न श्वानाचे वरु हत जीण, होउ या धीरधिंग।।

झालो का हो सकळ इतुके श्वान पस्तीस कोटी
कैसे दास्यी सतत पिचतो नाहि का त्वेष पोटी
आहो का हो हृदयि बघणे मेष मानूष वा ते
सारे तुम्हां जग भरडिते धान्य ते जेवि जाते।।

आता ओठी मधुरतम त्या गाउ या मातगीता
आता सारे उठुन करु या बंधमुक्त स्वमाता
ना लावावे क्षणहि पळहि भारते मुक्त व्हावे
लोकी आता वर करुनिया मस्तकाते जगावे।।

या रे सारे मिळून करु या आधि ऐक्यावलंब
स्पृश्यास्पृश्ये सकळ उडवू जाळु हे भेददंभ
हालक्लेशा मुळिहि न भिणे स्वीय स्वातंत्र्य घेणे
तेजे पेटू अनलसम ही वैभवी माय नेणे।।

या देहाचे करिल तुकडे राईराईसमान
कोणी क्रोधे तरि सतत मी उंच राखीन मान
ओठी माझ्या प्रियजननिचे दिव्य नाचेल गान
माझ्या मातेस्तव करित हो मी मुदे देहदान।।

मारी माते कुणि जरि न ती मन्मनोमातृमूर्ती
कंठा कापी कुणि जननिचि ती न कंठस्थकीर्ती
हालांची ना लवहि उरली आज आम्हां गुमान
आता गेलो खवळून खरे आम्हि झालो तुफान।।

केला विरोध जरि या सगळ्या जगाने
ना गांगरुन मुळि जाउ आता भयाने
मोक्षार्थ जे ज्वलित राष्ट्र उभे असेल
त्याच्यापुढे न जगती कुणिही टिकेल।।

या भारतास हसवू करुनि स्वतंत्र
ते देशभक्तिमय या म्हणु दिव्यमंत्र
सर्वस्व-होम करणे सगळे उठा रे
वारे पहा प्रबळ, हे झडती नगारे।।

ही वेळ बंधु न असे तुमच्या निजेची
ही वेळ बंधु न विलास-विनोदनाची
स्वातंत्र्य वेळ शुभ दिव्य अपूर्व आली
आता उठा सकळही झणि याच काळी।।

आली घडी पुनरपि परतोन ये ना
जो जातसे क्षण कधी फिरुनी मिळेना
ना आळशी तुम्हि बना न बना उदास
या आइचे सकळही झणि तोडु पाश।।

उत्साहसागर बना दृढ धैर्यमूर्ती
स्फूर्ति प्रचंड उसळो मिळवा सुकीर्ती
होईल माय अपुली शतबंधमुक्त
तेजे उठाल सगळे जरि रे सुपुत्र।।

हे राष्ट्रतेज सगळे भडके उफाळे
हे देशभक्तिस पाहा शतपूर आले
हे ठेउनी निज सुखावरती निखारे
दास्या पदी तुडविण्या सुत सिद्ध सारे।।

झालो तुफान सगळे न अता गुमान
झालो तुफान सगळे नच देहभान
झालो तुफान करु हासत देहदान
स्वातंत्र्य आणु अथवा मरु हीच आण।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

प्रिय भारता सुंदरा!

प्रिय भारता सुंदरा!।।
ज्ञानविहारा! परम उदारा!
कुदशा जाइल तव कधि दूरा?।। भारता....।।

सत्त्व कुठे तव? त्याग कुठे तव?
तोडी कवण तव सुयशो-हारा?।। भारता....।।

पुत्र न दिसती, वैरी गमती
जे तुज लोटिति दुर्गति-दारा।। भारता....।।

शोक न करि तू प्रभुला प्रिय तू
अवतरुन तुला तारिल, मधुरा!।। भारता....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१

दुबळी मम भारतमाता!

दुबळी मम भारतमाता
दीन विकल दिसते अनाथा।। दुबळी....।।

कोट्यावधि हे पुत्र असोनी, येति न कोणी ते धावोनी
आज तिला कुणि देइ न हाता।। दुबळी....।।

ये करुणाकर, ये मुरलीधर, भारतभूमी तुज ही प्रियकर
ये नतनाथ! खरोखर आता।। दुबळी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३१