मृत्युमित्र

( कोलेरिज कवीने एका अर्भकाच्या मृत्युप्रसंगी चारच ओळींचा श्लोक लिहिला, त्याचा अनुवाद.)

अद्याप पातकाने। नाहीच स्पर्शिलेली
अद्याप दु:खदैन्ये। नाहीच भाजिलेली
तो येइ मृत्युमित्र। कळि गोड ही खुडीत
फुलली न पूर्ण तोची। देवासमीप नेत
‘देवासमीप आता। कलिके फुले सुखाने
येथे किडी न खाती’। मृत्यू वदे मुखाने


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर १९२८

शांति कोण आणते?

(जगात मोठमोठ्या लढाया होताता. शेवटी तह होतात. शांती येते. परंतु हे तह, ही शांति कोण घडवून आणते? सतीचे अश्रू व संतांची प्रार्थना. एका इंग्रची कवितेच्या आधारे.)

शस्त्रास्त्रांनी सुटती न कधी प्रश्न ते जीवनाचे
ना केव्हाही मिटतिल लढे संगराने रणाचे
शांती येते भुवनि न कधी बाँबतोफादिकांनी
अर्की निर्मी अमृतरस हे ऐकिले काय कोणी?।।

युद्धी जाई पति मरुनिया होइ पत्नी अनाथा
बाळा घेई जवळि रडते फोडूनी स्वीय माथा
शोकावेगे अगतिक अशी सोडिते अश्रुधार
त्या अश्रूंनी सकल जगती शांतिचा येइ पूर।।

“येवो देवा! सकल भुवनी प्रेम, दावी सुपंथ
मद्वंधना, सतत चुकती, तू क्षमा मूर्तिमंत”
ऐशी अंत:करणि करि जी प्रार्थना नित्य संत
आणी तीच प्रशमुनि रणे शांततेचा वसंत।।

जे कारुण्ये कढत कढत श्वास तो संत सोडी
त्यांच्यामध्ये अभिनव असे तेच त्याला न जोडी;
धर्मग्रंथांमधिल सगळे सार ते मूर्तिमंत
सत्यश्रू तो उभय मिळुनी होतसे आपदंत।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

गायीची करुण कहाणी

रवि मावळला, निशा पातली, शांत दिसे हे जग
संपुन कामाची भगभग
तमे हळुहळु पहा पसरिले पट काळेसावळे
त्यात त्रिभुवन गुरफटविले
गगनी लुकलुकती तारका
अवलोकनास सुखकारका
न परी अंधकार-हारिका
चांदोबा बालकानंदकर आज दिसेना वरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

“वियेल आजी गाय आपुली, बाबा! सोडू नका
कोणी लाविल तिजला ढका
भरलेले गोजिचे दिवस तिज पाडस होइल नवे
आम्ही खेळू मग त्यासवे
गोजी दूध बहुत देइल
खर्वस, आई! तू करिशिल
आम्हां नाही ना म्हणशिल
गंमत होइशल मोठीच करु मजा अता लौकरी”
प्रभु तव कठोर करणी खरी।।

बाप म्हणे निज मुलांस “मजला विचार करणे पडे
गोजिस उपवास घरी घडे
दोन चार दिन जातिल अजुनी चिंता काहि न करा
देवा हृदयामाजी स्मरा
जाइल जर गाय फिरावया
तृण तिज मिळेल ते खावया
काडी एक न घरि द्यावया”
ऐसे बोलुन विचारपूर्वक दावे करि तो दुरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

मंद मंद पाउले टाकिते धेनु सुखाने चरे
पोटी गर्भ वाटले फिरे
प्रसवसमय ये जवळ तिचा मग तृण खाणे संपले
पोटी कळा, अंग तापले
पुढती तदगति ती खुंटली
तेथे गरिब गाय थबकली
पथ गाडिया असे पदतळी
विचार तो न, प्रसववेदना तिजला कष्ट करी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

दहा वाजुनी गेले होते रात्रीचा समय तो
अधिकचि अंधकार दाटतो
त्या मार्गाने गाडी जाई वेळ तिची ती असे
परि ते धेनुमानसी नसे
पुढचे कोणाला कळतसे
मी मी म्हणणारा चुकतसे
ही तर गाय बिचारी असे
या मार्गाने जाइल गाडी विचार न तदंतरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

रागाने फणफणे भगभगे गाडी येई जवे
येणे जाहिर करि निजरवे
उशीर झाला जणु जायाला बेफामपणा दिसे
स्वैरिणि धावपळ करीतसे
‘मार्गातून दूर हो सरा
जरि परिसाल न होइल चुरा
जावे लागे मग यमपुरा’
प्रचंड ऐसा घोष करित ये, घसा न बसतो परी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

हाकेवरती गाडी आली शब्द तिचा ऐकला
धेनुस टाकवे न पाउला
सर्व गर्भ बाहेर न आला प्रसवसमयवेदना
होत्या होत तिला दारुणा
जो जो निकट गाडि येतसे
तो तो चित्त तिचे उलतसे
बळ हलण्यास जागचे नसे
मरणाचा अति दु:खद आला विचार धेन्वंतरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

मृत्युभयाने धेना दचकली, खचली, थरके मन
मानस मृदुल निघे पोळून
बहुतेक तिचा गर्भ येत चो बाहेरी भितिने
तो तिज गाठिलेच गाडिने
विलंब पळभर तेथे नसे
करुणा दया न काही वसे
झरझर गाडी ती जातसे
जसा विजेया लोळ कोसळे गदारोळ ती करी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

दीन गायिने मरणकाळचा हंबरडा फोडिला
गगनी विलयाला पावला
जवळ न कोणी करुणासागर म्हणती परमेश्वर
परि ते कठिण तदीयांतर
अंग च्छिन्नभिन्न जाहले
चेंदुन जाइ वत्स कोवळे
तेथे रक्त-तळे तुंबले
क्रूर गाडिने बळी घेतला घेइ असे कितितरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

वज्रालाही पत्थरासही पाझर फुटते तदा
पाहुन धेनूची आपदा
प्रात:काळी करुण दृश्य ते पाहुन पुलकित जन
भरती पाण्याने लोचन
हळहळताती नारीनर
करिती गमन मग घरोघर
वदती किती एक परस्पर
सुखदु:खाच्या द्वंद्वामधुनी सुटली ही लौकरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।

केविलवाणी करुण कहाणी धन्यास जेव्हा कळे
मानस त्याचे शोके जळे
म्हणे मनी “निज बाळाचे नच हितवच मी ऐकिले
कटु हे फळ मज देवे दिले”
येती अश्रू डोळ्यांतुन
स्फुंदस्फुंदत बाळकगण
घरात रडती नारीजन
असे कोण तारिता, मारणे त्याच्या चित्ती जरी
प्रभु तव कठोर करणी खरी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर,१९२८

जीवनमित्रास!

(मरण ज्याच्या जवळ आले आहे, परंतु जो जगू इच्छित आहे, असा एक तरुण आपल्या जीवनास उद्देशून म्हणतो. इंग्रजीत अशी एक लहान कविता मी वाचली होती. ती कल्पना मनात येउन ही मी मराठीत लिहिली आहे.)

“चिरमित्र सखा सहोदर
मम तू मित्र उदार सुंदर
सहसा निघतोस सोडुनी
मम माया सगळीच तोडुनी।।

वदु काय कसे कळेच ना
वच कंठातुन ते निघेच ना
सगळे स्वचरित्र आठवे
हृदयी शोक अपार साठवे।।

सदया सखया! मनोहरा!
वद केवी उघडू मदंतरा
मज सोडुन ना गड्या निघे
मम आशा मम हेता तू बघे।।

किति येता विचार मोहना!
प्रिय मित्रा मम गोड जीवना
सखया! मज एक ठाउक
घडली भेट तुझी, न आणिक।।

जमली तव नित्य संगती
परि केव्हा कधि वा किमर्थ ती
न कळे न वळे मला लव
सगळे त्या प्रभुचेच लाघव।।

धरिली तव फार आवडी
किति माझी जमली तुझी गडी
दिनरात्र सदैव सन्निधी
तुझी माझी नव्हती तुटी कधी।।

हसलो रडलो कितीकदा
परि देशी मज धीर तू सदा
सुखदु:खरसी सखा खरा
मज देशी न कधीहि अंतरा।।

रडवीत अनंत आपदा
परि तू मन्निकटी उभा सदा
पुशिशी स्वकरे मदश्रुते
प्रियबंधो किति केवि वर्ण ते।।

सखया! सकला मदंतर
स्थिति तू जाणिशि जेवि ईश्वर
सदसत् मम जे तुजप्रती
कळलेले तुज सांगु मी किती।।

विहरून अभिन्न आपण
भुवनी जो मिळाला कधी कण
कटु गोड तसाच चाखिला
न दुजा भाव मनात राखिला।।

बघता तरि तू अमूर्तसा
हृदयी राहुन निर्मिशी रसा
तव रूप न देखिले जरी़
तव तो वास सदा मदंतरी।।

नयने नयनांत पाहणे
तुज बाहेर तसे विलोकणे
वरिशी मशि एकरूपता
असशी व्यापुन पूर्ण हृतस्थिता।।

कधि शुभ्र सुरेख चांगले
कधि काळे तुज रंग मी दिले
सजवीत तुला जसे सुचे
नटशी तूही तसा, तुला रुचे।।

न कधी तुज रुष्ट देखिले
किति तू प्रेम मला सदा दिले
चढशी पडशी बरोबर
बसशी वा पळशी भराभर।।

प्रगती अथवा अधोगती
त्यजिली तू न मदीय संगती
गगनी चढवूनिया वरी
तुज मी दाखविली पुन्हा दरी।।

कधि वैभवता तुला दिली
कधि कष्टस्थिति तीहि दाविली
तुज ना कुरकूर माहिती
तव निष्ठा तरि वर्णु मी किती।।

कधि रम्य विलास मांडिले
झणि सारे परि ते झुगारिले
वदशी परि एक शब्द ना
करु मित्रा तव केवि वर्णना।।

मम बाल्य तसेच यौवन
बघुनी जाशिल काय सोडुन
न मदीय विकास जोवरी
सखया तू न वियोग आदरी।।

मज सोडुन घोर या तमी
नच जाई, वरती चढेन मी
तुजला नटवीन मी बघ
पसरीन त्रिजगात सौरभ।।

घसरेन न मी अत:पर
मम कर्तृत्व दिसेल सुंदर
धवलोज्वल कांति देइन
तुजला जाउ नकोच सोडुन।।

पुरवीन गड्या तुझे लळे
पिकवीतो बघ मुक्तिचे मळे
बघ हे दिसती मुके कळे
न फुलावे वद का? तुला कळे।।

कसुनी खपुनी किती बरे
बघ केली मृदु शुद्ध भूमि रे
झणि येइल खास पाउस
सखया जाइ न तू, न रे रुस।।

जरि मी फिरलो इतस्तता
क्षण मी ना दवडीन रे अता
घडली जरि हातुनी अघे
मज कंटाळुन जाइ ना, बघे।।

करितो अध- मार्जनाप्रती
सखया! नित्य करीन सत्कृती
अजिपासुन नूतना दिशा
मज लागे, मग सोडिशी कसा?।।

अपुले रमणीय गोड ते
स्मरणीय स्मर तू प्रसंगी ते
भरसागरि तू न सोडिले
दिसते तीर न सो, ना भले।।

किति रे अनुरक्त आपण
कधि झालो न वियुक्त रे क्षण
अशनी शयनी जिथे तिथे
अविभक्त, स्मर, अंतरंगि ते।।

जरि वृंत गळून जातसे
जगती या जगणे फुले कसे?
जरि नीर समग्र आटले
तरि ते नीरज केवि रे फुले?।।

रुसुनी जरि जाइ अंबर
च्युत नक्षत्रतीहि सुंदर
तरुला जरु मळ ना धरी
तरि कैसे फळफूल ते वरी?।।

खुडिता स्पृहणीय अंकुरा
मिळते ते न कणीस ना तुरा
जरि निर्झर बंद होइल
तरि वापी सुकुनीच जाईल।।

करिता दुरि जीवनाश्रया
मग पावे झणि वस्तु ती लया
न तुझ्यावर का विसंबून?
करि, मित्रा! न कठोर रे मन।।

तुज निष्ठुरता न शोभते
तवठायी मम दृष्टि लोभते
तुजवीण जगी न मी उरे
मज आधार तुझाच एक रे।।

जगी होइन नीट चांगला
मग सारे म्हणतील हा भला
जगतास सुखास देइन
न जगाला मुळि भार होइन।।

मम गोड फुलेल जीवन
मग तदगंध सुटेल पावन
जगता वितरीन मी रस
जगता या नटवीन नीरस।।

फुलवी सुमनांस भास्कर
नटवी जीववि सृष्टि सुंदर
फुलवीन तशी जनांतरे
मनि माझ्या किति ये असे बरे।।

किति खेळवितो मनी अशा
मधु आशा, परि मारिशी कशा?
मम हेतु अपूर्ण राहती
किति वाटे मनि खेद ना मिति।।

न तुला दिसली सरस्वती
मम संगे, न तशी रमा सती
दिसली न उमाहि चिन्मया
म्हणुनी काय अधीर जावया?।।

मजला जगि मित्र ना कुणी
मज गेले सगळेच सोडुनी
मजला तव आस होति रे
परि तूहि त्यजिशी कसा बरे?।।

गळले सगळे मनोरथ
मम आशा सगळ्या पदच्युत
पुरवी न जगात एकही
मम सद्धेतु कठोर देवहि।।

सगळा मम धीर मावळे
किति नेत्रांतुन नीर हे गळे
दिधले मम सर्व मी तुला
परि जाशी अजि सोडुनी मला।।

जगि जन्म मदीय जाहला
तव मी स्नेह तदैव जोडला
तुज मी दिनरात्र पूजिले
परि माते अजि तूच टाकिले।।

रडण्यास्तव मात्र जन्मलो
जगता केवळ भार जाहलो
मज सोडुन जाशि, जीवना!
किति जाळी, बघ, शोक मन्मना।।

मज सोडु नयेच ती, असे
जरि वाटे बहु, ते घडे कसे?
मजपासुन जाशि जै दुरी
पहुडोन क्षितिला हतापरी।।

जगतास समीप ओढले
परि माते जगतेच सोडिले
अपवाद तुझा तरी कसा?
नशिबाता मम खेळ हा असा।।

करु मी तरि काय हाय रे!
मम उदध्वस्त समस्त हाय रे
पुरला मम हेतु एक ना
मज जाशी रडवून, जीवना!।।

किति रे हुरहूर मानसी
हृदयी क्रंदन धीर ना मशी
मम स्वप्न समस्त संपले
जणु शंपाहत चित्त कंपले”।।

विनवून सुदीन जाहलो
सखयाच्या किति कंठि झोंबलो
करुणा नुपजे मनामधी
मम हेलावुन ये हृदंबुधी।।

फिरुनी वदलो सगदगद
“मम मित्रा! धरितो तुझे पद”
परु तो न बघेहि निष्ठुर
अति झाला गमनार्थ आतूर।।

वच ऐक सख्या मदंतिम
परम प्रेम तुझ्यावरी मम
न मज, त्यज मत्सवे रहा
बघशी मन्मुखही न रे अहा।।

सकल प्रियबंध लोपले
तव माझ्यावर नेत्र कोपले
तुटते अजि भावबंधन
गळते मदहृदयावलंबन।।

सखया! जरि जाशि जा परी
वदतो एकच, ठेव अंतरी
तुजला पकडीन मी पुन्हा
करुनी जाशि मदीय तू गुन्हा।।

किति देख अनंत काळ हा
तुजला ओढिन मी पहा पहा
जगता वितरीन मी सुख
मग आझे करिशील कौतुक।।

करुनी जगदापदा दुरी
भरु सारी धरणी सुखस्वरी
वितरुन मुदा शुभा जनी
कलहद्वेष समूळ मारुनी।।

जगतात समस्त बंधुसे
बघ, नांदू अम्ही सर्व सौरसे
सकळा समता स्वतंत्रता
करु भूमीवर स्वर्ग नांदता।।

करुनी निज-कार्यपूर्णता
तुजलाही वितरीन धन्यता
तरि जाइ, विलंब ना करी
स्थिर मी शांत विकंप अंतरी।।

मज सोडिशि तू, न मी तुला
जननी सोडुन जातसे मुला
न फिकीर, पुन:पुन्हा परी
तुज भेटेन रवींदु जो वरी।।

शतवारहि जन्म घेइन
मम हेतूप्रति पूर्ण पाहिन
तुज खेचिन मी पुन:पुन्हा
दमवी कोण बघूच ये कुणा।।

तरि ये, मम रामराम घे
हृदयी स्नेह धरून तू निघे
परतून तुलो विलोकिन
अविलंबे, हृदयासि लाविन।।

जरि जाशि विशंक जा परी
वितरी हा मज आशि अंतरी
तुज शेवटचेच मागणे
करि ते पूर्ण गड्या न ना म्हणे।।

‘घृतिचा न झरा सुको, झरो;
मरताही तम ना मनि शिरो’
मज दे सखया असा वर
मग जाई तुज जायचे जर।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

कसे तरी मग जग दिसते?

नसती जगी या जरी मुले
नसती जगी या जरी फुले
नसते अंबरि वरि तारे
नसते गाणारे वारे
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

जरी जगती या जल नसते
रविचे तेज जरी नसते
नसते जरि ते तरुवेल
नतसे दिनरजनी- खेळ
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

नसती जरि ही वसुंधरा
धनधान्यवती मनोहरा
विहंगम जरी हो नसते
गाय बैल हे जरि नसते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

नसत्या प्रेमळ जरी माता
प्रेमसुधेच्या त्या सरिता
परोपकारी जन नसते
परदु:खे यन्मन जळते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

कृतज्ञता जरि ती नसती
प्रेमबंधुता जरि नसती
अश्रु जगी या जरि नसते
हास्य जगी या जरि नसते
कसे तरी मग जग दिसते।
हे मन्मतिला ना कळते।।

सुंदर सकळहि या वस्तु
मधुर मनोहर या वस्तु
जगणे म्हणुनी धरेवर
सह्य होतसे खरोखर
हे वैभव हे सुख नसते।
कसे तरी मग जग दिसते।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२७

प्रेमाचे गाणे

(भूतकाळ भविष्यकाळाला उद्देशून गाणे म्हणतो)

बा नीज, सख्या! नीज गड्या लडिवाळा!
राजसा परम वेल्हाळा।।

या सकळ जगी उठले विषमय वारे
द्वेषाचे उडत फवारे
ही अखिल मही सूडबुद्धिने भरली
हृदयेच जणु कुणा नुरली
जगि झाला रे सुळसुळाट कामाचा
क्रोधाचा मात्सर्याचा
परि भिऊ नको तू, बाळ!
धरि प्रेमवृत्ति तू अढळ
प्रेम हेच तव दिव्य बळ
या प्रेमाच्या सामर्थ्ये जगताला
देशील वळण नव, बाळा।। बा नीज....।।

सत्प्रेमाची आहे अदभुत शक्ती
प्रेम हीच खरि चिच्छक्ती
या प्रेमाचे वर्णन कोण करील
तोकडे शब्द पडतील
तू प्रेमाचा सागर हृदयी जमवी
सुकलेले जग हे फुलवी
शमवाया विश्वद्वेष
ये घेउन तू प्रेमास
भरपूर वाटि जगतास
तू देशील प्रेम जरी जगताला
बदलशिल आजच्या काळा।। बा नीज....।।

ना जगति कधी प्रेम दिल्याने सरते
हे प्रेम कधी ना मरते
ते दिधल्याने वाढतसे, जागविते
परहृदयि सुप्त जे असते
परहृदयाचा विकास करिते प्रेम
प्रेम एक जगदभिराम
बाळ तू नजोनी आज
प्रेमाने हृदयी साज
हो सज्ज पुढे किति काज
तू नीज अता येइल तव कृतिवेला
करि तेव्हा प्रेम-सुकाळा।। बा नीज....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, डिसेंबर १९३०

आत्मा ओत रे ओत

आत्मा ओत रे ओत
निर्मावा दिव्य तेजाचा झोत।। आत्मा....।।

फुलवी रे फुलवी
सुकला फुलवी
हलवी रे हसवी
विद्या हसवी
राष्ट्रात पेटव निर्मळ ज्योत।। आत्मा....।।

होऊ दे होऊ हो
राष्ट्रविकास
होऊ दे होऊ हो
शास्त्रविकास
वाहु दे शतमुख संस्कृतिस्त्रोत।। आत्मा....।।

प्रकट करी रे
अंतरिचा देव
प्रकट करी रे
अंतरिचा भाव
असशी तू दिव्य रे वतनाचा खोत।। आत्मा....।।

परमात्म्याचा
पुत्र तू अभिनव
बळवंताचा
पुत्र तू अभिनव
निर्भय असशी तू केसरिपोत।। आत्मा....।।

स्वातंत्र्याचे
मंदिर सुंदर
शास्त्रकलांचे
कळस मनोहर
दैदीप्यमान त्याला झळकोत।। आत्मा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, फेब्रुवारी