माझा देव

‘जग हे मंगल
म्हणे मदंतर
‘देव तो दयाळ
म्हणे मदंतर
येताच निराशा
चित्त हे अशांत
जरा येता चिंता
अशांत मानस
‘लहरी हा देव
जीवन भेसूर’
‘जग हे वाईट
असे म्हणे मनी
श्रद्धा जी ठेविली
क्षणात ती जात
निराशेत आहे
निराशा ही लोटी

जग हे सुंदर’
आशेमाजी
देव परमोदार’
आशेमाजी
जरा जीवनात
परी होई
जरा होता त्रास
माझे होई
कठोर निष्ठुर
म्हणू लागे
अमांगल्य-खनी’
संतापोनी
होती अंतरात
मरोनिया
सदगुण-कसोटी
दुर्मार्गात

श्रद्धेचा चंद्रमा
हृदयाकाशात
दु:ख-संकटात
गोड जो हासत
ईश्वराची कृपा
जीवन पवित्र
सदा श्रद्धावंत
सदा सेवारत
मंगलाच्यावर
सुखाची हा सृष्टी
अवघाची संसार
मनी हे ठेवून
तोची माझा देव
हृदयायी ठेवीन

निराशानिशेत
शोभे ज्याच्या
घोर विपत्तीत
तोची धन्य
पाही जो सर्वत्र
त्याचे धन्य
सदा आशावंत
धन्य तोची
सदा ठेवी दृष्टी
करु पाहे
सुखाचा करीन
झटे सदा
त्याला मी पूजीन
भक्तिप्रेमे


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३४

प्रभु मम हृदयि आज येणार!

प्रभु मम हृदयि आज येणार!
मम जीवन-मरुभूमीत अता शत पाझर फुटणार
परम शांतिचे परम सुखाचे अमित मळे पिकणार।। प्रभु....।।

मुक्या बिचा-या जीवपिकाला कंठ आज फुटणार
हृदयमंदिरी नवगीतांचा मधुरध्वनि उठणार।। प्रभु....।।

प्रभु- करुणेचा वसंतवारा जीवनवनि सुटणार
वठलेल्या मत्सदवृत्तींना नव अंकुर फुटणार।। प्रभु....।।

मालिन्याची कार्पण्याची मग वस्त्रे गळणार
पोषाख मला नवतेजाचा नवरंगी मिळणार।। प्रभु....।।

भ्रम मम जातिल संशय शंका आज सकल फिटणार
शतजन्मांची चिरचिर माझी कायमची मिटणार।। प्रभु....।।

सकल बंधने आज तटातट तुटुन धुळित पडणार
मन्नयनांतुन भावभक्तिची गंगा घळघळणार।। प्रभु....।।

म्लान असा मद्वदनचंद्रमा सकल आज खुलणार
सुकलेले मम बागबगीचे सहज सरस फुलणार।। प्रभु....।।

कुविचारांचे धुके सकल ते आज उडुन जाणार
हृदयमंदिरी चित्सूर्य अता चिर मंगल जळणार।। प्रभु....।।

जीवात्माचे शतजन्माचे ग्रहण आज सुटणार
चिदंबरी मज उंच उडाया पंख दिव्य फुटणार।। प्रभु....।।

दैन्य दुराशा निराशा सकल आज हटणार
अभिनव- मंगल- मधुर- मनोहर तेजे मी नटणार।। प्रभु....।।

अमित युगांची येरझार मम आज सकल खुटणार
परमैक्याच्या परमानंदा अगणित मी लुटणार।। प्रभु....।।

परमैक्याच्या झोल्यावरती प्रभुसह मी झुलणार
प्रेमसमाधी लागुन माझी परममुदे डुलणार।। प्रभु....।।

शब्द अंबरी तडित अंबुदी प्रभा रवित शिरणार
तरंग अंभोधीत तसा मज्जीव शिवी मिळणार।। प्रभु....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२

फुलाची आत्मकथा

फुलापरी या जगात सुंदर एक हासरे मुल
दुसरे सज्जनमन कोमल
फुलापरी साजिरे गोजिरे तिसरे तारक वरी
चौथे स्मित सतिवदनावरी
इतुकी पवित्रता कोठली
इतुकी सुंदरता कोठली
इतुकी परिमलता कोठली
निष्पाप अशी फुले शोभती पवित्र आत्म्यापरी
पसरिति मोद धरित्रीवरी।।

फुला पाहुनी सदैव माझे जळते पापी मन
भरती पाण्याने लोचन
स्पर्श कराया धैर्य नसे मज थरथरती मत्कर
लज्जित मेल्यापरि अंतर
माझा स्पर्श विषारी असे
माझी दृष्टी विषारी असे
लावू हात फुलाला कसे
मलिन होउनी जाइल जळुनी हात लागला तरी
ऐसे वाटे मज अंतरी।।

एके दिवशी प्रात:काळी माझ्या मार्गावर
फुलले होते सुम सुंदर
दंवबिंदूंनी न्हाले होते मधुर गंध दरवळे
रविने शतकिरणी चुंबिले
माझी दृष्टि तयावर बसे
वाटे पुढे न जावे असे
पाहुन मज सुम जणु ते हसे
गंगायमुना मन्नयनांतुन आल्या गालांवरी
लज्जा भरली माझ्या उरी।।

फुला पाहुनी मदीय हृदयी विचार शत उसळती
थरथर मदगात्रे कापती
मज्जीवन मज दिसे दिसे ते फूलहि दृष्टीपुढे
भेसुर विरोध आणी रडे
मत्कर सुमना मी जोडिले
खाली निज शिर मी नमविले
भक्तिप्रेमे मग विनविले
‘सुंदर सुमना! सखा, सदगुरु, परब्रह्म तू मम
माझा दूर करी हृत्तम।।

तुला कशाने अशी लाभली सुंदर जीवनकळा
सांगे मजला तू निर्मळा
लहानशा या तुझ्या जीवनी इतुकी निर्दोषता
आली कोठुन वद तत्त्वता
आचरलासी तप कोणते
केले अखंड जप कोणते
सांग स्वकीय जीवनकथे
त्वदीय जीवनरहस्य मजला कळेल बापा जरी
जाइन मीहि तरोनी तरी’।।

बहुत दिसांनी मूल आइला पाडस वा गायिला
भेटे, तैसे होइ फुला
पुलकित झाले, डोलु लागले, प्रेमे वदले मला
“ये ये जवळी माझ्या मुला!
माझा हृदयसिंधु हा अता
करितो तुझ्यापुढे मी रिता
परिसावी मज्जीवन-कथा”
तद्वच ऐकुन कर जोडुन मी स्थिर झालो अंतरी
बोले सुमन बानरीपरी।।

“होतो प्रभुच्या पायांपाशी सदैव मी अंबरी
त्याची कृपा सदा मजवरी
सूर्याच्या सोनेरी करावर बसुनी एके दिनी
आलो प्रभुपद मी सोडुनी
पृथ्वी पाहू आहे कशी
ऐसा मोह धरुन मानसी
सोडुनी आलो मी स्वामिसी
झरझर सरसर नाचत नाचत रविकिरणांचेवरी
उतरु लागे धरणीवरी।।

खाली खाली जो जो बाळा! येऊ लागलो
तो तो अंध होउ लागलो
विकास गेला, सुगंध सरला, सुंदरता संपली
शंपाहपशी तनु कंपली
तारा अस्मानातुन तुटे
त्याचे तेज उरते का कुठे?
माझा धीर सकळही सुटे
दयासुंदरा वसुंधरेने निजकर केले वरी
झेलुन ठेवी पर्णांतरी।।

अंध जाहलो, बंधी पडलो, अंधार सभोवती
न कळे काय असे मदगती
हाय! हाय! मज मोह कशाला शिवला बोलुन असे
रात्रंदिन मी किति रडतसे
बोले मनात तुज कुणितरी,
‘आता रडुन काय रे परी
तप तू थोर अता आचरी
प्रभुचरणच्युत फुला! विकसास्तव तप तू आदरी
त्याविण गति ना या भूवरी’।।

अश्रु पुसुन मग गंभीर असा निश्चय केला मनी
झालो ध्यानस्थ जसा मुनी
दिव्य असे प्रभुचरण अंतरी दृष्टिपुढे आणुन
गेलो ध्यानमग्न होउन
सगळी बाह्य सृष्टी विसरत
केवळ चिंतनात रंगत
जणु मी प्रभुसिंधुत डुंबत
अशा प्रकारे मुला! तपस्यासमारंभ मी करी
करुनी रडगाणे निज दुरी।।

कधी कधी गज किरणी भास्कर भाजुन तो काढित
कधि ती थंडी गारठवित
मारुन मारुन गाल कोवळे लाल करित मारत
पाउस कधि भिजवुन रडवित
दु:खे हीची हासवतिल
रविकर हेची रंगवतिल
वारे हेची डोलवतिल
प्रभुप्रसादे थबथबलेले दु:ख दु:ख ते वरी
धरिला धीर असा अंतरी।।

जशी तपस्या वाढु लागली विकासही वाढला
तप सद्विकासजननी, मुला!
मंद मधुरसा गंध मदंगी लागे रे यावया
लागे लावण्य फुलावया
वारे देती कधि बातमी
‘सतत बसशिल न असा तमी
वेळ तुझा तू मोदे क्रमी’
तिकडे माझे लक्षच नव्हते, ध्यास एक अंतरी
होवो स्वीय तपस्या पुरी।।
किति दिन रात्री ऐशा नेल्या ध्यानरसी रंगुन
मजला काळाचे भान न
तपस्या करी, आपोआप प्रकटेल विकास तो;
फसतो जो ना विश्वासतो
श्रद्धा अमर असावी मनी
आशा अमर असावी मनी
श्रद्धा जीवन- संजीवनी
श्रद्धा, बाळा! जिवा नाचवी चमत्कारसागरी
देई मौक्तिक अंती करी।।

घाली प्रिय भूमाय सदोदित माझ्या वदनी रस
मज मत्तपस्येत सौरस
सुंदर मज निज पर्णांचा ती आश्रम दे बांधुन
गेलो ध्यानी मी रंगुन
माझी तहानभूकच हरे
माझे भानच मजला नुरे
चिंतन एक मात्र ते उरे
सौंदर्याच्या महान सागरी तन्मय झालो जणू
माझा अहं न उरला अणु।।

सुगंध मग तो भरुन राहिला सा-या मज्जीवनी
पाहे प्रकटायालागुनी
सुंदरता रंगली अंतरी आत कळा लागती
प्रभुची सृष्टि पहायाप्रति
तरि मी आवरीत मानसा
उल्लू होउन जाइन कसा
होता प्रभुवर मम भरवंसा
अधीर होता कार्य बिघडते, अधीर होणे अंध
न कधी अधीर होई बघ।।

अधीर होउन अंडे फोडी विनता, मग पांगळा
लाभे अरुण तिला तो लुळा
सहस्त्र वर्षे वाट बघोमी दुसरे फोडी मग
प्रकटे गरुत्मान् सदा बघ
कर्मी रंगावे माणसे
फळ ते चिंतु नये मानसे
लाभेल परी भरले रसे
कष्ट संकटे सोसुन सतत सेवाकर्मी रमा
येइल चरण चुराया रमा।।

बाळ घालितो रुजत बी, बघे उकरुनिया सत्वर
येइल कैसा वरि अंकुर?
जरा जाहली नाही तुमची थोडी जी चळवळ
तोची मूर्ख विचारिति फळ
घालित जावे बीजा जळ
सेवेमध्ये न पडो खळ
सुंदर डोलेल वरी फळ
अधीर म्हणुनी मी ना झालो फुलविल परमेश्वर
होते सश्रद्ध मदंतर।।

रविकर आता प्रेमे स्नेहे मजलागी चुंबिती
वारे प्रदक्षिणा घालिती
अधीर जणु मज बघावयाला झाल्या दिशा
सरली जणु मज्जीवन-निशा
तरिही शांत राहिलो मनी
अधिकचि तपस्येत रंगुनी
बाळा! तपचि सुखाची खनी
तरस्येतची आनंद खरा तत्त्व धरावे उरी
फळ ते वांछु नये लौकरी।।

एके दिवशी सायंकाळी किरण वदति कोमळ
‘उदयिक विकास तव होइल’
ऐसे सांगुन, मोदे चुंबुन, गेले निघुनी कर
उत्सुक पवन करी भिरभिर
हळुहळु उषा जवळ येतसे
माझी पाकळी ती खुलतसे
दुसरी फुलते, तिसरी हसे
निशा संपली, अमृतत्वाची उषा झळकली वरी
अमृतसिंचन मजवर करी।।

उषा देविने मला चुंबिले धरणीमांडीवरी
भास्कर माझे जातक करी
आनंदाने कृतज्ञतेने मुके मदीयांतर
विश्वी देखे विश्वंभर
करुणा सकळ तयाची असे
प्रभु मदरुपे दावि जगा निज पवित्रता माधुरी
माझा हक्क नसे त्यावरी।।

सुगंध माझा सुंदरता मम त्याची ही देणगी
म्हणुनी ठेवित उघडी जगी
मला कशाला संचय- मति ती? माझे काहिच नसे
प्रभुचे प्रभुस समर्पीतसे
माझे लुटोत सारे धन
हेची वांछी माझे मन
त्यागे परमेश्वर पूजिन
सेवा करुनी सुकुनी जाइन, जाइन प्रभुच्या पदी
मग ती पतनभीति ना कधी।।

अशी मुला ही ऐकिलीस का माझी जीवनकथा
रुचेल तरि आदर मत्पथा
कल्याण तुझे होवो बाळा! अश्रु आपुले पुस
बेटा रडत असा ना बस
करि तू मुका पाहुन श्रम
साहुन दु:खे संकट तम
न शिवो मना निराशा भ्रम
पुरी तपस्या होता ठेवी प्रभु फळ हातावरी
न कधी अधीर हो अंतरी”।।

पवित्र सुमना नमना करुनी, सदगद साश्रू असा
होतो कापत मी वेलसा
सतेज सुंदर गंभीर मंगल विमल भावनाबुधि
हेलावे मम हृदयामधी
‘ही मम शेवटची आसवे
आता रमेन कर्मासवे
लागे विवाह श्रद्धेसवे
कर्म करावे सदा तपावे’ निश्चय धरिला उरी
‘आहे जगदंबा मग वरी’।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३०

मयसभा राहिली भरुन

मम दृष्टीला भेसुर दिसते भुवन
मयसभा राहिली भरुन।।

जे दिसते असे रुप वस्तुचे वरुन
जे आत न येते दिसुन
मम डोळे हे निशिदिन जाती फसुन
त्यामुळे जात मी खचुन
जे वाटतसे जाउ उराशी लावू
ते बघ प्राण मम घेऊ
दंभ हा जगाचा धर्म
उलटेच जगाचे कर्म
मग मिळेल केवी शर्म
मन्मन होई खिन्न वर्म हे बघुन
मयसभा राहिली भरुन।।

मज ओलावा वरुन मनोहर दिसला
जाताच जीव परि फसला
मद्दग्ध जणु प्राण तिथे मी नेले
येईल टवटवी गमले
मज्जीवन जे म्लान फुलापरि होते
ते तेथे नेले होते
तो आग अधिकची उठली
जीवाची तगमग झाली
वंचना रक्तांची कळली
जे आर्द्र दिसे, टाकि तेच करपवुन
मयसभा राहिली भरुन।।

कुणी मज दिसला दिव्यज्ञानांभोधी
वाटले करिल निर्मळ धी
मज मोक्षाचा दाविल वाटे पंथ
वाटले हरिल हा खंत
नव चक्षु मला देइल हा गुरु गमले
जाऊन चरण मी धरिले
तो गुलामगिरिगुरु ठरला
मज अंधचि करिता झाला
अघपंथ दाविता झाला
मम आशेचे अंकुर गेले जळुन
मयसभा राहिली भरुन।।

जे सुधारले ऐसे वाटत होते
जे भाग्यगिरिवर रमते
जे निजतेजे दिपवित होते डोळे
अभिनव नवसंस्कृतिवाले
जे कैवारी स्वातंत्र्याचे दिसती
जे समत्वगीते गाती
परि जवळ तयांच्या गेलो
तो दचकुन मागे सरलो
वृक व्याघ्र बरे मी वदलो
ते करिति सदा समतादींचा खून
मयसभा राहिली भरुन।।

ते शांतीची सूक्ते गाती ओठी
परि काळकूट ते पोटी
ते एकिकडे तोफा ओतित नविन
परि वरुन शांतीचे गान
ते एकिकडे दास्यी दुनिया नेती
स्वातंत्र्यभक्त म्हणवीती
चराचरा चिरुन इतरगळे
ते स्वतंत्रतेचे पुतळे
उभविती कसे मज न कळे
हा दंभ कसा प्रभुवर करितो सहन
मयसभा राहिली भरुन।।

जे पावन, ते जगती ठरती पतित
परि पतित, पूतसे गणित
यत्स्पर्शाने श्रीशिव होइल पूत
अस्पृश्य ते जगी ठरत
जे आलस्ये दंभे दर्पे भरले
ते स्पृश्य पूज्य परि झाले
दुनियेचा उलटा गाडा
जे सत्य म्हणति ते गाडा
जे थोर म्हणति ते पाडा
हे दंभाला पूजिति धर्मच म्हणुन
मयसभा राहिली भरुन।।

मज दीप गमे आहे तेथे भव्य
दावील पंथ मज दिव्य
त्या दीपाचा पंथ सरळ लक्षून
चाललो धीट होऊन
मज दीप अता दिसेल सुंदर छान
पडतील पदे ना चुकुन
परि तिथे भयद अंधार
ना अंत नसे तो पार
ना पंथ नसे आधार
या अंधारा भजति दीप मानून
मयसभा राहिली भरुन।।

मृदू शीतलसे सुंदर दिसले हार
सर्प ते प्राण घेणार
किति सुंदरशी सुखसरिता ती दिसत
परि आत भोवरे भ्रमत
जे अमृत मला जीवनदायी दिसले
ते गरल मृतिप्रद ठरले
मृगजळे सकळ संसारी
होतसे निराशा भारी
ही किमर्थ धडपड सारी
ते कांचन ना कांत दिसे जे वरुन
मयसभा राहिली भरुन।।

जे जगताला जीवन अंबुद देती
त्यामाजी विजा लखलखती
या जगति जणू जीवनगर्भी मरण
परि देइ जीवनामरण
ज्या मखमाली त्यातच कंटक रुतती
परी कंटक कोमल फुलती
हे कसे सकल निवडावे
परमहंस केवी व्हावे
जलरहित पय कसे प्यावे
हे कोण मला देइल समजावून
मयसभा राहिली भरुन।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, फेब्रुवारी १९३३

खरा धर्म

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे। जगाला....।।

जयांना कोणी ना जगती
सदा जे अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे। जगाला....।।

समस्ता धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे। जगाला....।।

सदा जे आर्त अति विकळ
जयांना गांजिती सकळ
तया जाऊन हसवावे। जगाला....।।

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला....।।

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला....।।

जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य
प्रकाशा तेथ नव न्यावे। जगाला....।।

असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे। जगाला....।।

भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे। जगाला....।।

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थ प्राणही द्यावे। जगाला....।।

जयाला धर्म तो प्यारा
जयाला देव तो प्यारा!
तयाने प्रेममय व्हावे। जगाला....।।

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

कशासाठी जगावे?

असे का जीवनी अर्थ?
असे रे, जो जगी चिंता
असे, जो आपदा व्याधी
असे, जो दुर्दशाभूता।।

असे, जो गोरगरिबांच्या
न गेले ज्ञान झोपडीत
असे, जो गोरगरिबांची
मुले थंडीत कुडकुडत।।

असे, अज्ञान जो जगती
असे, जो अश्रु या जगती
असे, जो बंधु लाखो हे
उपाशी नित्य रे मरती।।

असे, जो त्रास मत्तांचा
असे, जो राजकी जुलुम
असे, जो दीन दुबळ्यांचा
जगी उच्छेद रे परम।।

असे, जो दु:ख या जगती
असे, जो खिन्नसे वदन
समीप प्रीतिने जाता
हसे जे जेवि ते सुमन।।

असे, जो जाणण्या काही
असे, जो कार्य करण्याला
असे, स्वातंत्र जो जगती
कृतीला आणि रे मतिला।।

असे, जो दुष्ट त्या रुढी
असे, जो जाच धर्माचा
असे, जो घाण सर्वत्र
असे, जो सूर शोकाचा।।

असा हा जीवनी अर्थ
असा हा जीवनी हेतू
विपददु:खाब्धि- तरणाला
जगाला होइ तू सेतू।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२७

जीवनातील दिव्यता

आयुष्याच्या पथावर। सुखा न तोटा खरोखर
दृष्टी असावी मात्र भली। तरिच सापडे सुखस्थली
सुंदर दृष्टी ती ज्याला। जिकडे तिकडे सुख त्याला
आशा ज्याच्या मनामध्ये। श्रद्धाही मंगल नांदे
सदैव सुंदरता त्याला। फुलेच दिसतील दृष्टीला

प्रचंड वादळ उठे जरी। गगन भरे जरि मेघभरी
तरी न आशा त्यागावी। दृष्टी वर निज लावावी
वारं शमतिल, घन वितळे। नभ मग डोकावेल निळे
निशेविना ना येत उषा। असो भरंवसा हा खासा
दयासागर प्रभुराजा। सकलहि जीवांच्या काजा
आयुष्याच्या पथावरी। रत्नांची राशी पसरी
दृष्टी असावी परि विमला। फुलेच दिसतील दृष्टीला

माणिकमोती अमोलिक। होती आपण परि विमुख
संसाराच्या पथावरी। माणिकमोती प्रभु विखरी
मुलावरिल ते प्रेम किती। मातेचे त्या नसे मिती
मायलेकरांचे प्रेम। बहीणभावांचे प्रेम
मित्रामित्रांचे प्रेम। पतिपत्नीचे ते प्रेमे
गुरुशिष्यांचे ते प्रेम। स्वामिसेवकांचे प्रेम
माणिकमोती हीच खरी। डोळे उघडुन पहा तरी

तृषार्तास जरि दिले जल। शीतल पेलाभर विमल
क्षुधार्तास जरि दिला कण। हृदयी प्रेमे विरघळून
ज्ञान असे आपणाजवळ। दिले कुणा जरि ते सढळ
कृतज्ञता त्या सकळांचे। वदनी सुंदर किति नाचे
कृतज्ञतेचे वच वदती। तेच खरे माणिकमोती

कृतज्ञतेसम सुंदरसे। जगात दुसरे काहि नसे
रत्ने अशि ही अमोलिक। मागत आपण परि भीक
आयुष्याचे हे स्थान। माणिकमोत्यांची खाण
रत्नजडित मुकुटाहून। त्रिभुवनसंपत्तीहून
अधिक मोलवान हा खजिना। रिता कधिहि तो होईना
कुणास चोराया ये ना। कुणास पळवाया ये ना
माणिकमोती ही जमवा। जीवन सुंदर हे सजवा
प्रभु- हेतुस पुरवा जगती। करी करोनी शुभा कृती
सत्य मंगला पाहून। संसार करु सुखखाण
हृदयी ठेवु या सुविचारी। विश्व भरु या सुखपूरी
काट्यावरि ना दृष्टी वळो। काटे पाहून मन न जळो
आशा अपुली कधि न ढळो। फुलावरिच ती दृष्टि खिळो
सोडून हा मंगल मार्ग। उगीच पेटविती आग
चिंध्या पाहुन ओरडती। आतिल रत्ना ना बघती
उगीच रडती धडपडती। बोटे मोडिति कडकड ती
रागे खाती दात किती। डोळे फाडुन किति बघती
जीवनपट विसकटवून। सुंदर तंतू तोडून
कशास चिंध्या या म्हणती। खोटी दुनिया ते वदती
असे नसे परि जीवन हे। सुखसरिता मधुरा वाहे
सुखास नाही मुळि तोटा। संसार नसे हा खोटा
दृष्टी करावी निज पूत। निराळेच मग जग दिसत
दिसतील मग माणिकमोती। मिळेल सकळा श्रीमंती
ही श्रीमंती सर्वांना। सदैव देतो प्रभुराणा
तत्त्व असे हे मनि आणा। नांदा मोदे ना गाना।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२८