निर्वाणीचे सांगणे

नाशी मोह प्रभुजि अथवा प्राण घेऊन जाई
नेई देह त्वरित अथवा ही अहंता हरावी
माझे चित्त स्थिर करि न वा थांबव श्वास देवा
पाशां तोडी सकळ, धरवे धीर ना, मृत्यु देवा।।

आनंदाने हृदयि धरु का बदबुदांचे पसारे?
मृत्युंजा का परम- रतिने पूजु सोडून तारे?
पीयूषाची प्रभुजि मजला लागलीसे पिपासा
कांजी लावू कशि मग मुखा? सिद्ध मी सर्वनाशा।।

माते प्रेमामृतजलनिधे मंगले हे उदारे
दृश्यादृश्या सृजिशि सगळे हे तुझे खेळ सारे
मच्चित्तांतर्गत तम हरी, दे प्रकाशांशु एक
आहे मी क्षुद्विकल बहुता जन्मिचा काहि फेक।।

मच्चित्ती जी सतत उठती वादळे शांत व्हावी
विध्वंसावी मम मदगृहे सर्व आसक्ति जावी
येवो चित्ती स्मरण न कधी कामिनीकांचनांचे
माते! हे दे मजसि, अथवा प्राण फेकीन साचे।।

त्वत्कारुण्यांबुधिमधिल ना बिंदू लाभे जरासा
माते! माते जरि, तरि गळ्यालागि लावीन फासा
आई होशी कृपण कशि तू बाळ जाई सुकून
त्वत्कारुण्ये जलद भरले पाठवी बिंदु दोन।।

विश्वाधारे। अगतिक तुला बाळ हा हाक मारी
दारी आला सहृदये! तारि वा त्यास मारी
हे प्रेमाब्धे! परमकरुणालंकृते! हे अनंते!
दे आधारा मज न रडवी वत्सले! स्नेहमृत!।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

कधि येशिल हृदयि रघुराया

कधि येशिल हृदयि रघुराया
कधि करुणेची करिशिल छाया।। हृदयि....।।

मोह न मजला मळि आवरती
अगतिक मी अति
पडतो पाया।। हृदयि....।।

बहुमोलाचे हे मम जीवन
हे करुणाधन
जाई वाया।। हृदयि....।।

होइल सदया जरि व दया तव
ठेवु कशास्तव
तरि मम काया।। हृदयि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२

का मजला देता प्रेम?

मम हातांनी काहि न होइल काम
का मजला देता प्रेम?
मी वांझ असे, कसलि न राखा आस
ती आशा होइल खाक
जगि दु:ख नसे आशा-भंगासारे
ते प्रेम म्हणुनि ना द्या रे
प्रेमाला लायक नाही
करुणेला लायक नाही
साहाय्या लायक नाही
तुम्हि सोडुन द्या माझे सकळहि नाद
का बसता घालित वाद।।

तो प्रेमाचा पाउस मजवर होई
परि दु:ख हेच मज दाही
त्या प्रेमाला लायक मुळि नसताना
का देती मजसि कळेना
ते जो जो हे दाखवितात प्रेम
हृदयात भकता किति शरम
मी काय तयांना देऊ
मी काय तयांना दावू
मी काय तत्पदी वाहू
मद्दैन्याने डोळे ओले माझे
हृदयावर दुर्धर ओझे।।

मज्जीवन हे निष्फळ दीन दरिद्र
गतसार अतीव क्षुद्र
किति सांगु तुम्हां अश्रु न दिसती काय
ती ऐकु व ये का हाय
मम सुसकारे कानि न का ते पडले
दिसती का न डोळे भरले
जा सकळ तुम्हि माघारे
मजकडे न कुणिहि बघा रे
तुम्हि थोर कर्मकर सारे
परि मी न असे, मी न करितसे काही
मरतो ना म्हणुनी राही।।

त्या दगडाला काय घालुनी पाणी
येईल कधी ना फुलुनी
त्या मेलेल्या खोडा घालुन पाणी
येईल काय भरभरुनी
मृत देहाला अर्पुन वस्त्रे अन्ने
तो उठेल का चैतन्ये
हे व्यर्थ सर्व सायास
हा अनाठायि हो त्रास
येतील कधि न कामास
तो बंधूंनो विकाससंभव जेथे
अर्पिजे सकलही तेथे।।

मी जगती या कर्मशून्य हत जीव
का करिता माझी कीव
ना कधि काळी अंकुर मज फुटतील
ना फुलेफळे धरतील
ना छायाही देइल जीवन माझे
वदताना मन्मन भाजे
का उगाच येता प्रेम
मी निराश निष्क्रिय अधम
मी मत हत निपतित परम
का लाजविता प्रेम समर्पुन माते
हे प्रेम जाळि हृदयाते।।

ते प्रेमाचे तुमचे सदलंकार
परि मजला मारक गरल
ती प्रेमाने अर्पितसा जी मदत
मज सदैव ती रडवीत
मी प्रेम कशाला घेऊ
जगतास काय मी देऊ
मी मदत कशाला घेऊ
मी घेत असे देउन शके काही
हा विचार हृदया दाही।।

 मी तुम्हाला काय देउ परतून
मी काय देउ हो खूण
मी जगताच्या पासुन घेतो भारी
परि अजुनी रडत भिकारी
मज घालाया येईना हो भर ती
म्हणुनी हे लोचन रडती
मज किती मरावे वाटे
ते भवत्प्रेम मज काटे
मति दाटे अंतर फाटे
हा पोळितसे विचार माझ्या हृदया
म्हणुनि ना प्रेम द्या न दया।।

मजपासोनी अपेक्षा तुम्हां असती
प्रेमाची म्हणुनी वृष्टि
हा उपयोगा येइल तुम्हां वाटे
प्रेमाचे म्हणुनी नाते
मज निर्लोभी पवित्र पावन गणुनी
देतसा प्रेम आणोनी
परि तुम्हां सांगतो सत्य
करु नका अपेक्षा व्यर्थ
मी हताश दुर्बळ पतित
हा उपयोगी नाही, येइल दिसुनी
मग जाल सकलही फसुनी।।

ते पुत्राला मायबाप वाढविती
करितात किती ते प्रीती
मनि आशा की होइल मोठा पुत्र
वार्धक्यी देइल हात
हा येइल की पुत्र आमुच्या कामा
मनि इच्छुन देती प्रेमा
जरि उनाड मुलगा झाला
किति दु:ख आईबापाला
केवढा ढका आशेला
त्या हृदयीच्या खेळविलेल्या आशा
जातात सर्वही नाशा।।

तुम्हि काहिच का अपेक्षा न ठेवून
देतसा प्रेम आणून
तुम्हि काहिच का आशा ना राखून
देतसा प्रेम वाढून
मजवरि तुमचे प्रेम सदा जे दिसते
निरपेक्ष काय ते असते
प्रेमास न का फलवास
प्रेमा न कसलि का आस
जे देत असा तुम्हि द्यास
ते निरपेक्ष प्रेम असे जरि जवळ
मज त्याचा द्यावा कवळ।।

मज गंध नसे रंग नसे ना शुभ्रता
पावित्र्य नसे ना मधता
मी दुर्गंधे भरलेले हे फूल
ते विषमय फळ लागेल
या सगळ्याला असाल जरि का सिद्ध
तरि करा प्रीतिने बद्ध
होवो न निराशा तुमची
मागून थोर हृदयाची
म्हणुन ही कथा मम साची
मी सांगतसे तुमच्या चरणांपाशी
आणून अश्रू नयनांसी।।

जो पाप्याला हृदयापाशी धरिल
प्रेमाने त्या न्हाणील
ज्यापासोनी इवलिहि नाही आस
जो त्यासहि दे प्रेमास
ते प्रेम असे दुर्मिळ दुर्मिळ जगती
या भुवनि नसे तत्पाप्ति
प्रेमाच्या पाठीमागे
आशांचे असती लागे
ते प्रेम हेतुने जागे
मग रडती की प्रेम व्यर्थची केले
ते सारे मातित गेले।।

कधि केलेले प्रेम न जाई व्यर्थ
ज्याला ही श्रद्धा सत्य
तो पडलेला पर्जन्याचा थेंब
कधि तरि वरि आणिल कोंब
तो टाकीचा पडलेला जो घाव
दगडास करीलचि देव
ही आशा जरि हो अमरा
ते प्रेम तरिच तुम्हि वितरा
ना सोडा कधिही धीरा
मम जीवन हे फुलेल शतजन्मांनी
हे ठेवुनि मनि द्या पाणी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, जानेवारी १९३५

अश्रु

नको माझे अश्रु
हाचि थोर ठेवा
बाकी सारे नेई
परी हे लोचन
माझे रुप मज
हेचि तातमात
अश्रू माझे थोर
अश्रू कल्पतरु
अश्रू माझे मला
अश्रू भेटवतिल

अश्रू माझा जीव
देवा त्याच्यावीण
अश्रू वाचवीविती
माझा फुलवीती
अश्रुच्या बिंदुत
नको तो गोविंदु
सगळे हे जग
सखा माझा परी
अश्रुस पूजीन
मनी साठवून

कधी नेऊ देवा
माझा एक
धन, सुख, मान
राखी ओले
अश्रू दावितात
प्राणदाते
ज्ञानदाते गुरुवार
माझे खरे
गोड हासवतिल
माझे ध्येय

अश्रु माझा प्राण
न जगेन
अश्रू हासवीती
जीवनतरु
माझा सुखसिंधु
नेऊ कधी
तिरस्कार करी
अश्रु एक
अश्रुस ठेवीन
अहोरात्र

इवलासा अश्रु
जीवाला चढवी
इवलासा अश्रु
पाषाणाचे करी
इवलासा अश्रु
निर्मीत अवीट
इवलासा अश्रु
अमित पिकती
इवलासा अश्रु
कोट्यावधि गोष्टी
इवलासा अश्रु
देवी सरस्वती

इवलासा अश्रु
संसारी महोच्च
इवलासा तारा
परी तो मोजून
बाळकृष्णाचे ते
यशोदा ब्रह्मांड
इवलीशी मूर्ति
परी त्रैलोक्याची
इवलेसे पान
स्वामी तृप्त होत
इवलेसे पान 
लीलेने तुळीत
इवलासा अश्रु
सारे त्यात राहे

पर्वत बुडवी
मोक्षपदी
परी वज्रा चुरी
नवनीत
खारट आंबट
सुधासिंधु
ओलावा तो किती
माझे मळे
परी त्याच्या पोटी
साठलेल्या
परी बोले किती
तेथे मूक

नका मानू तुच्छ
स्थान त्याचे
दिसतो दुरुन
कोण येई?
इवलेसे तोंड
देखे त्यात
बटु वामनाची
केली मिती
पांचाळी अर्पित
ब्रह्मांडाचा
रुक्मिणी ठेवीत
विश्वंभरा
तसा माझा आहे
भाग्य माझे

इवलासा अश्रु
करीतसे तूर्ण
इवलासा अश्रु
जीवनग्रंथाला
इवलासा अश्रु
वियोग तो नसो
इवलासा अश्रु
तोवरी सकळ

अश्रु माझी आशा
अश्रु हा निर्मळ
अश्रु हा लहान
अश्रू नारायण
पोटात ठेवीन
मी ना विसंबेन

अपूर्णाला पूर्ण
सांगू काय
पूर्ण विरामाला
गोड देई
माझा मज असो
त्याचा कधी
जो माझ्याजवळ
भाग्य माझे

अश्रु माझे बाळ
जवळ असो
अश्रु हा महान
आहे माझा
डोळ्यांत ठेवीन
त्याला कधी


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मार्च १९३३

माझा देव

‘जग हे मंगल
म्हणे मदंतर
‘देव तो दयाळ
म्हणे मदंतर
येताच निराशा
चित्त हे अशांत
जरा येता चिंता
अशांत मानस
‘लहरी हा देव
जीवन भेसूर’
‘जग हे वाईट
असे म्हणे मनी
श्रद्धा जी ठेविली
क्षणात ती जात
निराशेत आहे
निराशा ही लोटी

जग हे सुंदर’
आशेमाजी
देव परमोदार’
आशेमाजी
जरा जीवनात
परी होई
जरा होता त्रास
माझे होई
कठोर निष्ठुर
म्हणू लागे
अमांगल्य-खनी’
संतापोनी
होती अंतरात
मरोनिया
सदगुण-कसोटी
दुर्मार्गात

श्रद्धेचा चंद्रमा
हृदयाकाशात
दु:ख-संकटात
गोड जो हासत
ईश्वराची कृपा
जीवन पवित्र
सदा श्रद्धावंत
सदा सेवारत
मंगलाच्यावर
सुखाची हा सृष्टी
अवघाची संसार
मनी हे ठेवून
तोची माझा देव
हृदयायी ठेवीन

निराशानिशेत
शोभे ज्याच्या
घोर विपत्तीत
तोची धन्य
पाही जो सर्वत्र
त्याचे धन्य
सदा आशावंत
धन्य तोची
सदा ठेवी दृष्टी
करु पाहे
सुखाचा करीन
झटे सदा
त्याला मी पूजीन
भक्तिप्रेमे


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, ऑगस्ट १९३४

प्रभु मम हृदयि आज येणार!

प्रभु मम हृदयि आज येणार!
मम जीवन-मरुभूमीत अता शत पाझर फुटणार
परम शांतिचे परम सुखाचे अमित मळे पिकणार।। प्रभु....।।

मुक्या बिचा-या जीवपिकाला कंठ आज फुटणार
हृदयमंदिरी नवगीतांचा मधुरध्वनि उठणार।। प्रभु....।।

प्रभु- करुणेचा वसंतवारा जीवनवनि सुटणार
वठलेल्या मत्सदवृत्तींना नव अंकुर फुटणार।। प्रभु....।।

मालिन्याची कार्पण्याची मग वस्त्रे गळणार
पोषाख मला नवतेजाचा नवरंगी मिळणार।। प्रभु....।।

भ्रम मम जातिल संशय शंका आज सकल फिटणार
शतजन्मांची चिरचिर माझी कायमची मिटणार।। प्रभु....।।

सकल बंधने आज तटातट तुटुन धुळित पडणार
मन्नयनांतुन भावभक्तिची गंगा घळघळणार।। प्रभु....।।

म्लान असा मद्वदनचंद्रमा सकल आज खुलणार
सुकलेले मम बागबगीचे सहज सरस फुलणार।। प्रभु....।।

कुविचारांचे धुके सकल ते आज उडुन जाणार
हृदयमंदिरी चित्सूर्य अता चिर मंगल जळणार।। प्रभु....।।

जीवात्माचे शतजन्माचे ग्रहण आज सुटणार
चिदंबरी मज उंच उडाया पंख दिव्य फुटणार।। प्रभु....।।

दैन्य दुराशा निराशा सकल आज हटणार
अभिनव- मंगल- मधुर- मनोहर तेजे मी नटणार।। प्रभु....।।

अमित युगांची येरझार मम आज सकल खुटणार
परमैक्याच्या परमानंदा अगणित मी लुटणार।। प्रभु....।।

परमैक्याच्या झोल्यावरती प्रभुसह मी झुलणार
प्रेमसमाधी लागुन माझी परममुदे डुलणार।। प्रभु....।।

शब्द अंबरी तडित अंबुदी प्रभा रवित शिरणार
तरंग अंभोधीत तसा मज्जीव शिवी मिळणार।। प्रभु....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२

फुलाची आत्मकथा

फुलापरी या जगात सुंदर एक हासरे मुल
दुसरे सज्जनमन कोमल
फुलापरी साजिरे गोजिरे तिसरे तारक वरी
चौथे स्मित सतिवदनावरी
इतुकी पवित्रता कोठली
इतुकी सुंदरता कोठली
इतुकी परिमलता कोठली
निष्पाप अशी फुले शोभती पवित्र आत्म्यापरी
पसरिति मोद धरित्रीवरी।।

फुला पाहुनी सदैव माझे जळते पापी मन
भरती पाण्याने लोचन
स्पर्श कराया धैर्य नसे मज थरथरती मत्कर
लज्जित मेल्यापरि अंतर
माझा स्पर्श विषारी असे
माझी दृष्टी विषारी असे
लावू हात फुलाला कसे
मलिन होउनी जाइल जळुनी हात लागला तरी
ऐसे वाटे मज अंतरी।।

एके दिवशी प्रात:काळी माझ्या मार्गावर
फुलले होते सुम सुंदर
दंवबिंदूंनी न्हाले होते मधुर गंध दरवळे
रविने शतकिरणी चुंबिले
माझी दृष्टि तयावर बसे
वाटे पुढे न जावे असे
पाहुन मज सुम जणु ते हसे
गंगायमुना मन्नयनांतुन आल्या गालांवरी
लज्जा भरली माझ्या उरी।।

फुला पाहुनी मदीय हृदयी विचार शत उसळती
थरथर मदगात्रे कापती
मज्जीवन मज दिसे दिसे ते फूलहि दृष्टीपुढे
भेसुर विरोध आणी रडे
मत्कर सुमना मी जोडिले
खाली निज शिर मी नमविले
भक्तिप्रेमे मग विनविले
‘सुंदर सुमना! सखा, सदगुरु, परब्रह्म तू मम
माझा दूर करी हृत्तम।।

तुला कशाने अशी लाभली सुंदर जीवनकळा
सांगे मजला तू निर्मळा
लहानशा या तुझ्या जीवनी इतुकी निर्दोषता
आली कोठुन वद तत्त्वता
आचरलासी तप कोणते
केले अखंड जप कोणते
सांग स्वकीय जीवनकथे
त्वदीय जीवनरहस्य मजला कळेल बापा जरी
जाइन मीहि तरोनी तरी’।।

बहुत दिसांनी मूल आइला पाडस वा गायिला
भेटे, तैसे होइ फुला
पुलकित झाले, डोलु लागले, प्रेमे वदले मला
“ये ये जवळी माझ्या मुला!
माझा हृदयसिंधु हा अता
करितो तुझ्यापुढे मी रिता
परिसावी मज्जीवन-कथा”
तद्वच ऐकुन कर जोडुन मी स्थिर झालो अंतरी
बोले सुमन बानरीपरी।।

“होतो प्रभुच्या पायांपाशी सदैव मी अंबरी
त्याची कृपा सदा मजवरी
सूर्याच्या सोनेरी करावर बसुनी एके दिनी
आलो प्रभुपद मी सोडुनी
पृथ्वी पाहू आहे कशी
ऐसा मोह धरुन मानसी
सोडुनी आलो मी स्वामिसी
झरझर सरसर नाचत नाचत रविकिरणांचेवरी
उतरु लागे धरणीवरी।।

खाली खाली जो जो बाळा! येऊ लागलो
तो तो अंध होउ लागलो
विकास गेला, सुगंध सरला, सुंदरता संपली
शंपाहपशी तनु कंपली
तारा अस्मानातुन तुटे
त्याचे तेज उरते का कुठे?
माझा धीर सकळही सुटे
दयासुंदरा वसुंधरेने निजकर केले वरी
झेलुन ठेवी पर्णांतरी।।

अंध जाहलो, बंधी पडलो, अंधार सभोवती
न कळे काय असे मदगती
हाय! हाय! मज मोह कशाला शिवला बोलुन असे
रात्रंदिन मी किति रडतसे
बोले मनात तुज कुणितरी,
‘आता रडुन काय रे परी
तप तू थोर अता आचरी
प्रभुचरणच्युत फुला! विकसास्तव तप तू आदरी
त्याविण गति ना या भूवरी’।।

अश्रु पुसुन मग गंभीर असा निश्चय केला मनी
झालो ध्यानस्थ जसा मुनी
दिव्य असे प्रभुचरण अंतरी दृष्टिपुढे आणुन
गेलो ध्यानमग्न होउन
सगळी बाह्य सृष्टी विसरत
केवळ चिंतनात रंगत
जणु मी प्रभुसिंधुत डुंबत
अशा प्रकारे मुला! तपस्यासमारंभ मी करी
करुनी रडगाणे निज दुरी।।

कधी कधी गज किरणी भास्कर भाजुन तो काढित
कधि ती थंडी गारठवित
मारुन मारुन गाल कोवळे लाल करित मारत
पाउस कधि भिजवुन रडवित
दु:खे हीची हासवतिल
रविकर हेची रंगवतिल
वारे हेची डोलवतिल
प्रभुप्रसादे थबथबलेले दु:ख दु:ख ते वरी
धरिला धीर असा अंतरी।।

जशी तपस्या वाढु लागली विकासही वाढला
तप सद्विकासजननी, मुला!
मंद मधुरसा गंध मदंगी लागे रे यावया
लागे लावण्य फुलावया
वारे देती कधि बातमी
‘सतत बसशिल न असा तमी
वेळ तुझा तू मोदे क्रमी’
तिकडे माझे लक्षच नव्हते, ध्यास एक अंतरी
होवो स्वीय तपस्या पुरी।।
किति दिन रात्री ऐशा नेल्या ध्यानरसी रंगुन
मजला काळाचे भान न
तपस्या करी, आपोआप प्रकटेल विकास तो;
फसतो जो ना विश्वासतो
श्रद्धा अमर असावी मनी
आशा अमर असावी मनी
श्रद्धा जीवन- संजीवनी
श्रद्धा, बाळा! जिवा नाचवी चमत्कारसागरी
देई मौक्तिक अंती करी।।

घाली प्रिय भूमाय सदोदित माझ्या वदनी रस
मज मत्तपस्येत सौरस
सुंदर मज निज पर्णांचा ती आश्रम दे बांधुन
गेलो ध्यानी मी रंगुन
माझी तहानभूकच हरे
माझे भानच मजला नुरे
चिंतन एक मात्र ते उरे
सौंदर्याच्या महान सागरी तन्मय झालो जणू
माझा अहं न उरला अणु।।

सुगंध मग तो भरुन राहिला सा-या मज्जीवनी
पाहे प्रकटायालागुनी
सुंदरता रंगली अंतरी आत कळा लागती
प्रभुची सृष्टि पहायाप्रति
तरि मी आवरीत मानसा
उल्लू होउन जाइन कसा
होता प्रभुवर मम भरवंसा
अधीर होता कार्य बिघडते, अधीर होणे अंध
न कधी अधीर होई बघ।।

अधीर होउन अंडे फोडी विनता, मग पांगळा
लाभे अरुण तिला तो लुळा
सहस्त्र वर्षे वाट बघोमी दुसरे फोडी मग
प्रकटे गरुत्मान् सदा बघ
कर्मी रंगावे माणसे
फळ ते चिंतु नये मानसे
लाभेल परी भरले रसे
कष्ट संकटे सोसुन सतत सेवाकर्मी रमा
येइल चरण चुराया रमा।।

बाळ घालितो रुजत बी, बघे उकरुनिया सत्वर
येइल कैसा वरि अंकुर?
जरा जाहली नाही तुमची थोडी जी चळवळ
तोची मूर्ख विचारिति फळ
घालित जावे बीजा जळ
सेवेमध्ये न पडो खळ
सुंदर डोलेल वरी फळ
अधीर म्हणुनी मी ना झालो फुलविल परमेश्वर
होते सश्रद्ध मदंतर।।

रविकर आता प्रेमे स्नेहे मजलागी चुंबिती
वारे प्रदक्षिणा घालिती
अधीर जणु मज बघावयाला झाल्या दिशा
सरली जणु मज्जीवन-निशा
तरिही शांत राहिलो मनी
अधिकचि तपस्येत रंगुनी
बाळा! तपचि सुखाची खनी
तरस्येतची आनंद खरा तत्त्व धरावे उरी
फळ ते वांछु नये लौकरी।।

एके दिवशी सायंकाळी किरण वदति कोमळ
‘उदयिक विकास तव होइल’
ऐसे सांगुन, मोदे चुंबुन, गेले निघुनी कर
उत्सुक पवन करी भिरभिर
हळुहळु उषा जवळ येतसे
माझी पाकळी ती खुलतसे
दुसरी फुलते, तिसरी हसे
निशा संपली, अमृतत्वाची उषा झळकली वरी
अमृतसिंचन मजवर करी।।

उषा देविने मला चुंबिले धरणीमांडीवरी
भास्कर माझे जातक करी
आनंदाने कृतज्ञतेने मुके मदीयांतर
विश्वी देखे विश्वंभर
करुणा सकळ तयाची असे
प्रभु मदरुपे दावि जगा निज पवित्रता माधुरी
माझा हक्क नसे त्यावरी।।

सुगंध माझा सुंदरता मम त्याची ही देणगी
म्हणुनी ठेवित उघडी जगी
मला कशाला संचय- मति ती? माझे काहिच नसे
प्रभुचे प्रभुस समर्पीतसे
माझे लुटोत सारे धन
हेची वांछी माझे मन
त्यागे परमेश्वर पूजिन
सेवा करुनी सुकुनी जाइन, जाइन प्रभुच्या पदी
मग ती पतनभीति ना कधी।।

अशी मुला ही ऐकिलीस का माझी जीवनकथा
रुचेल तरि आदर मत्पथा
कल्याण तुझे होवो बाळा! अश्रु आपुले पुस
बेटा रडत असा ना बस
करि तू मुका पाहुन श्रम
साहुन दु:खे संकट तम
न शिवो मना निराशा भ्रम
पुरी तपस्या होता ठेवी प्रभु फळ हातावरी
न कधी अधीर हो अंतरी”।।

पवित्र सुमना नमना करुनी, सदगद साश्रू असा
होतो कापत मी वेलसा
सतेज सुंदर गंभीर मंगल विमल भावनाबुधि
हेलावे मम हृदयामधी
‘ही मम शेवटची आसवे
आता रमेन कर्मासवे
लागे विवाह श्रद्धेसवे
कर्म करावे सदा तपावे’ निश्चय धरिला उरी
‘आहे जगदंबा मग वरी’।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३०