बाजू उलटली !

मनीं भोळया चोरटा भाव नाहीं.,

मुग्ध आणि निर्व्याज तुझ्या ठायीं.

प्रणयचंचल तुज ठावुक्या न लीला

कसलि नाही दरकार तव मनाला !

आजवेरी पाहिल्या खूप बाला,

नजर कितीकींच्या लाविली मुखाला,

लाजलाजुनी आरक्त किती झाल्या

आणि हरिणीसम पळुनि किती गेल्या !

लोचनांना भिडवून लोचनांशीं

धीट मजला पाहून अशी घेशी!

तुझी कांही न्यारीच रीत बाई,

मींच गेलों लाजून तुझ्यापायीं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ११ ऑक्टोबर १९२४

चटका

तंद्री लागुनि गुंग मी हळुहळू होतों पथीं चालत,

तुंही मग्न विचारिं चालत पुढें आलीस सामोरुनी.

देहाला मम देह लागत तुझा-दोघांसही ना कळे !

दोघेही चमकून पाहत क्षणी त्या एकमेकांस कीं !

होवोनी मनि बावरा बघतसें मी तेथ वेडयागत,

वेड्याला मज वाटलें सहजची तूं शाप देशीलसा ।

कांही धीर करोनी शब्द तुटके ओंठांवरी नाचले,

डोळे मात्र गयावया करुनिया होते तुला सांगत ।

तुंही अस्फुट कांहिसें वदुनियां माझ्याकडे पाहिलें,

तों डोळांत तुझ्या मला चमक ती न्यारीच कांहीं दिसे !

ओंठानी कितिही जरी अडविलें आलें तरी बाहीर-

-तें मंदस्मित- आणि तूं निसटुनी गेलीस केव्हाच गे ।

एका दिव्य क्षणात खेळ सगळा हा गोड आटोपला ,

जों जों आठवतो मनास चटका लागे कसासा मला !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १७ नोव्हेंबर १९२४

प्रेम आणि पतन

कुठ्ल्याशा जागी देख

बिल्डिंग मोड्की एक । पसरली.

चाळीत अशा वसणारी।

पोरगी कुणी्शी होती छबकडी !

जाताना नटुनी थटुनी

कुणी तरुण पाही ती तरुणी । एकला.

त्या क्षणी

त्याचिया मनी,

तरड:ति झणीं,

गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी । नकळतां.

तो ठसा मनावर ठसला ।

तो घाव जिव्हारी बसला । त्याचिया

वेड पुरे लावी त्याला ।

चाळीतिल चंचल बाला बापडया !

अकलेचा बंधही सुटला ।

संबंध जगाशीं तुटला । त्यापुढें.

आशाहि,

कोणती कांहि,

राहिली नाहिं.

सारखा जाळी । ध्यास त्यास तिन्ही काळी । एक तो.

ही त्याची स्थिति पाहुनियां,।

चाळींतिल सारी दुनिया बडबडे.

इष्काचा जहरी प्याला।

नशिबाला ज्याच्या आला । हा असा.

धडपडत चाळिंतुनि फिरणें ।

तें त्याचें होतें जगणें । सारखें !

लोकांना नकळत बघणें ।

पिउनिया चहाला जगणें । गरमशा.

पटत ना,

त्याचिया मना,

जगीं जगपणा,

डाव तो टाकी । मनुजांतुनि दगडची बाकी । राहतो.

यापरी तपश्चर्या ती

किति झाली न तिला गणती । राहिली.

सांगती हिताच्या गोष्टी।

हातांत घेउनी काठी । लोक त्या

तो हंसे जरा उपहासें ।

मग सवेंच वदला त्रासें । चिडुनियां

'निष्प्रेम चिरंजीवन तें।

जगिं दगडालाही मिळ्तें । धिक तया'



निग्रहें,

वदुनि शब्द हे,

अधिक आग्रहें,

सोडिना चाळे । चाळीचे चढला माळे । तरुण तो.

पोरगी आलि मग तेथ ।

जोड्यांना धरुनि करांत । फाटक्या.

धांवली उताविळ होत ।

जोडा झणिं थोबाडांत । मारिला.

तिरमिरुनी खालीं पडला ।

परि पडतां पडतां हंसला । एकदां !

तो योग ।

खरा हटयोग ।

प्रीतिचा रोग ।

लागला ज्याला । लागतें पडावें त्याला । हें असें !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ डिसेंबर १९२४

स्मृती माझी परि नसे तुला बाई '

मंद अनिलावरि वाहतो सुगंध,

सुवासानें मी होत असें धुंद.

तुझ्या प्रीतीनें ह्रुदय भरुनि जाई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

रोज फुलती गोजिरीं फुलें येथें

खुडुनि त्यांना आणितों मी गृहातें;

गमे ओतावीं सर्व तुझ्या पायीं

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

निशादेवीचें हास्य जणूं कांत,

खुले जेव्हां चांदणें शुभ्र शांत

ह्रुदय तळ्मळतें--स्मृती तुझी होई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

नील गगनीं चमकती रम्य तारा;

मधुर गुंगीनें देह भरे सारा !

नयन दिसती तव-विध्द जीव होई ;

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

खिन्न होउनि बागेंत भटकतांना,

गुलाबांचा हो स्पर्श कपोलांना;

ह्रुदय दचके-तनु कंटकिता होई ,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

ध्वनी मंजुळ कधिं कर्णपथीं येती

तुझी हांकच जणुं !---गोड पडे भ्रांती.

निराशेनें मम ह्रुदय भग्न होई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ सप्टेंबर १९२४

थांब थांब, बाले आतां

थांब, थांब बाले आतां, ठेव दिलरुब्याला !

सूरसागराच्या लाटा बुडविती जिवाला !

विश्व शांत, रजनी शांत, चांदणेंहि फुललें शांत,

शांतिचेंच घुमतें का हें गीत दिलरुब्यांत ?

दिव्य तुझ्या संगीताची साथ आणि त्यांत !

देहभान सुटलें आतां, ठेव दिलरुब्याला !

ह्रुदयाच्या तारा माझ्या होति एकतान !

एकसुरीं लागुनि गेलें सृष्टिंचेंहि गान !

जीव उडे दिव्यीं करुनी नादमय विमान !

धराखर्ग मिळुनी गेलीं सूर सागराला !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २४ ऑक्टोबर १९२४

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

'तूं माझी अन्‌ तुझा मीच,' ही खातर ना जोंवरी,

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

गालाला पडते खळी मला पाहुनी,

ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी !

भयभीत प्रीत थरकते लीन लोचनीं,

ऒंठाची थरथरत पाकळी,----बोल गडे, झडकरी !

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

जिवाजिवाची अभंग जडली जोड असे ही जरी,

भिति मग कोणाची अंतरीं ?

ही गांठ भिडेची तांत गळ्या लाविल ;

हिरव्याचीं पिवळीं पानें हीं होतिल !

प्रीतिच्या फुलाचा वास उडुन जाइल ;

फसाल पुरत्या, बसाल गाळित घळ्घळ अश्रू-झरी !

प्रीतिची हूल फुकट ना तरी !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

३१ डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र

 रातकाळची पसरे शांती,

मुलें माणसें स्वस्थ घोरती;

धूम्रदीप रस्त्यांत तेवतो;

फ़िकट पांढरी दीप्ति पसरितो.

मध्यरात्रिचा निर्जन रस्ता,

प्रकाशांत त्या वितरि विकटता.

दचकचुनी तों-बारा ठणठण

घडयाळ साङ्गे स्पष्ट वाजवुन,

" वर्षाची या सरती घटिका,

पहा,चालली सोडुनि लोकां !"

वर्ष बिचारें गेलें, गेलें

करपलों जणूं वियोगानलें !

अन्त:करणीं ये कालवुनी,

विषादतमिं मी गेलों बुडुनी !

अगणित वर्षे आली गेलीं,

कितीक लोकें जन्मा आलीं;

हंसली, रडली, म्हुनी गेलीं,

'उदो' 'उदो' हो त्या त्या कालीं ,

स्मृतिहि न त्या अमरांची उरली !

आजहि अगणित जगती मरती,

त्यांत कुणी अजरामर होती !

किति अमरत्वा परि पचवोनी,

काळ बसे हा ' आ ' वासोनी !

उदास असले विचार येती,

लाज परी मज वाटे चित्ती.

असेल काळाहाती मरणें,

परी आमुच्या हाती जगणें !

कां नच मग वीरोचित जगणें,

अभिमानाने हांसत मरणे ?

विचार असले जो मनिं आले,

अंत:करणहि पार निवळलें,

दिव्य कांहि तरि मनि आठवुनी,

झोंपी गेलों अश्रू पुसुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात