पोवाडा - दुसरे सयाजीराव गायकवाड

धनी सयाजी महाराज धुरंधर भाग्यवान भूपती । स्त्रिया पुत्रसह वर्तमान ते भोगितात संपती॥ध्रु०॥

प्रौढ प्रतापी शाहु छत्रपती सिंहासनी सुंदर । सभोवतले सरदार शूर मध्ये आपण पुरंदर ।

प्रांत परगणे गाव ज्यांनी सोडविले गिरिकंदर । सरंजाम ते तयास दिधले जहागिर एकंदर ।

फौजबंद गायकवाड सेनापती समशेर बहादर । वंशध्वज त्या वंशी जन्मले हे स्वकर्मी सादर ॥चाल॥

महाराज सयाजी मणी, लालसा ॥ करी प्रकाश कुळी दिनमणी, फारसा ॥ देई चिंतित चिंतामणी, पहा कसा ॥चाल॥

तसा पुरुष ह्या दिसांत पाहता नाही असा अधिपती । जी सुपुत्र प्रसवली धन्य ती जननी धन्य ते पती ॥१॥

निष्कलंक निर्दोष स्वामिनी करून पूर्वार्चन । प्रसन्न केला असेल मागिल जन्मी भाललोचन ॥

पदोपदी तो सांब म्हणुन करी प्रसंगी भय मोचन । धैर्यवान दृढ पिंड न बाधे पदार्थ होई पाचन ।

लेजिम जोड्या जोर कसुन खूप केले बळ सिंचन । सहस्त्रात सौंदर्य गौरपण पीत जसे कांचन ॥चाल॥

पगडीस तुरा वाकडा, काही जरा ॥ जेग्यास जडित आकडा, गोजरा ॥ कानी भिकबाळी चौकडा, साजरा ॥चाल॥

राजबीज फाकडा सुशोभित दिव्य शरिर संपती । गळ्यात कंठ्या हार, कडी करी जडावाची तळपती ॥२॥

मर्जी होइल त्या दिशी स्वारी कुलतमाम श्रृंगारणे । पूर्व कधी पश्चिमेस जाती मृग शिकारी कारणे ।

भरपल्ला फेकून अडचणीत घोडा ललकारणे । स्वता शिस्त बांधून गोळी हटकुन ठीक मारणे ।

भले लोक बोथाटी टाकिता वरचेवर वारणे । मागे पुढे बाजूस हुल दावुन भाला फेरणे ॥चाल॥

सुती हात तिरंदाजिचा, वाणिती ॥ डाव दुसर्‍यावर बाजिचा, आणिती ॥ आला न्याय गरीब गाजीचा, छाणिती ॥चाल॥

खबरदार लिहिण्यात कल्पना इतरांची अल्प ती । समई मुख्य जंद्राल पेचिता न गवसता जल्पती ॥३॥

सर्व गोष्टींचा शोख जातिने हुशार तर कुस्तिस । दंड भुजा आटीव उमररायाची तिसपसतिस ॥

तूप साखर आणि कणीक उस चारुन आणुन मस्तिस । साठमार चहुकडुन खिजविती नित्य नव्या हस्तिस ॥

पहिलवान किती जेठी येउन राहतात तेथे वसतिस । खुराक उत्तम त्यास कारकुन वर बंदोबस्तिस ॥चाल॥

हे जाणुन कवी सागर, धावती ॥ गुण सभेस नट नागर, दाविती ॥ बक्षीस कडी लंगर, पावती ॥चाल॥

ज्याकडे पाहती कृपा दृष्टि तो करतिल लाखोपती । सप्तपिढ्यांचे दरिद्र विच्छिन्न होउन रिपु लोपती ॥४॥

भक्तजनांचे माहेर देशावर श्रीपंढरपुर । याचकांस हे योग्य बडोदे सर्व क्लेश करी दुर ॥

नित्य उठुन वाटितात खिचडी ब्राह्मणही महामुर । स्त्रियापुरुष मुलीमुलांसकट शेर होतो भरपुर ॥

पुण्यवान गायकवाड जगतीतळांत ते महशुर । सर्व कनकमय लोक घरोघर निघे सोन्याचा धुर ॥चाल॥

जे देणे दिले एकदा, योजुन ॥ ते परत न घेती कदा, समजुन ॥ कोणी फंद करील जर कंदा, माजुन ॥चाल॥

दर्शनास तो अयोग्य त्यावर विधिहरिहर कोपती । अशा प्रभूच्या रक्षणार्थ उडी घाली म्हाळसापती ॥५॥

अहारे बडोदे शहर, कोट चौफेर काम मजबुत । चार दरवाजे चार दिशेना वर शिपाई कलबुत ॥

चोहो रस्त्यावर दाट हवेल्या काय सांगिन शाबुत । मांडवीत मोहोरमात जमती सर्व तिथे ताबुत ॥

अजब शहर वसविले गिराशे करून नेस्तनाबुत । बाग बगीचे तलाव साहेब घेति हवा तंबुत ॥चाल॥

महा जागृत राजेश्वर, पावती ॥ संकटी नीळकंठेश्वर, धावती ॥ भुत वाटेस यवतेश्वर, लावती ॥चाल॥

बहुत उग्र नरसिंह समंधादिक थरथर कापती । प्राशन करिता तीर्थ हिमज्वर इतर रोग करपती ॥६॥

विठ्ठलमंदिर सुरेख दुसरे देउळ बालाजिचे । खंडेराव दक्षिणेस उत्तरपंथींबेचराजिचे ॥

भीमनाथ केदार राममंदीर रंगामेजिचे । महाकाली भदरेत लक्ष्मी लक्षणीक मुख जिचे ॥

गोजिरवाण मूर्त नाव नारायण सुंदरजिचे। काही पुढे बाहेर महंमदवाडित घर काजिचे ॥चाल॥

किती धर्म हरीभक्तिचा, होतसे ॥ लल्लूपारख खुष वक्तिचा, दिसतसे ॥ सामळ सौदा नक्तिचा करितसे ॥चाल॥

दैवशाली गोपाळराव मैराळ राखिती पती । खुशाल अंबईदास रतंजी असे कितिक धनपती ॥७॥

महाराजांचे आप्त आवंतर धारकरी बरोबर । एकासारखे एक पांढरे करिती डौलडंबर ॥

घोरपडे उमराव लक्ष्मणराव कसुन कंबर । मागे न फिरती रणात पडल्या तुटुनी जरी अंबर ॥

मानसिंगराव शिर्के आणिक रघुनाथराव धायबर । थोर कुळींचे मर्द राजे मंडळीत असे नंबर ॥चाल॥

मामांची मानमान्यता, चांगली ॥ करवितील दुर दैन्यता, लागली ॥ ही चौघांमध्ये धन्यता, वागली ॥चाल॥

भाऊ पुराणिक पूर्ण कृपेतिल जे कारण स्थापिती । मान्य पडे ते प्रभूस गुरुवर दया करी गोपती ॥

हस्तमुखे खावंद गादीवर बसुन सोपस्कर । रुमाल चौरी वारितात वर भोवते उभे किंकर ॥

नारायणराव दिवाण, भास्कर विठ्ठल जोडुन कर । सदय ह्रदय शास्त्रज्ञ मुतालक मुख्य भिमाशंकर ॥

रामचंद्र विश्वनाथ फडणिस येती पुढे लौकर । मुजुमदार ते नारायणराव, माधव करंदीकर ॥चाल॥

विश्वासुक बक्षी खरे, मर्जिचे ॥ किती शब्द सुचविती बरे, अर्जिचे ॥ गोपाळपंत गुणी पुरे, मर्जिचे ॥चाल॥

कृपावंत सरकार म्हणुन हो श्रम सारे हरपती । चाहती उमाशंकरास बारिक कामकाज सोपती ॥९॥

अशा प्रभूचे उमाकांत कल्याण सदोदित करो । गाई म्हशी गजतुरंग वहनी अपार पांगा भरो ॥

पुत्रपौत्री राज्यलक्ष्मी अशीच अक्षई ठरो । शत्रुपराजय करुन प्रतापे राज्यनिति आचरो ॥

दान दक्षणा धर्मी निरंतर चित्तवृत्ति अनुसरो । गंगु हैबती शीघ्र कवींची प्रपंच चिंता हरो ॥चाल॥

दहा चौकी काम उठवुन, सांगिन ॥ हरजिनसी यकवटउन, रंगिन ॥ गातात गुरु आठवून, चंगन ॥चाल॥

महादेवाचे कवन कमळसर भ्रमर गुणी झेपती । प्रभाकराची नजर हीच करी धन्यास विज्ञप्ति ॥१०॥


कवी/शाहीर - शाहीर प्रभाकर

धर्मादाय वर्णनपर पोवाडा

दामाजी पंतांनि जगविले ब्राह्मण काही दुकळात । गायकवाड तर रक्षिति ब्राह्मण लाखो असल्या काळात ॥ध्रु०॥

तीनशे तिसांवर वर्षे लोटली दुर्गादेविच्या काळाला । फार दिवस पर्जन्यच गेला आन्न मिळेना बाळाला ॥

दामाजीपंताच्या लागले ब्राह्मण द्वारी लोळाला । रक्ष रक्ष महाराज समर्थ सर्वास आला निर्दाळा ॥

त्या समई कथोर फोडुनी पंती जगविले सकळाला । बेदरास कळताच धुतोड शिपाई आले आवळाला ॥

चल बे बम्मन म्हणुन ओढिता अश्रु लागले गाळाला । कैद करून नेताक्षणी पडले संकट त्रिभुवनपाळाला ॥चा०॥

महाराचे सोंग विठोबांनी स्वता घेउनी ॥ धान्याचे द्रव्य त्या बाच्छायास देउनी ॥ पंतांच्या पोथिमधे ती रसिद ठेउनी ॥

राहिले विठोबा पंढरीस येउनी ॥चा०

दामाजीपंताच्या धावण्या असा धावला विपळात । तसा म्हाळसाकांत रक्षितो गायकवाड ह्या भूतळात ॥१॥

सत्राशे चोवोसात दंगा होळकरांनी अति केला । पंचविसामधे दरोबस्त अगदिच पहारे पाउस गेला ।

दीड शेराचा दुकाळ पडला कहर वाटला दुनियेला । दिसंदिवस बेबरकत जहाली सुखोत्पत्ति नाही रयतेला ॥

ब्राह्मण गेले उठुन मजलोमजली खुब ठेला । बडोद्यात पोचला तो जगला न पोचल्या वाटेस मेला ॥

धर्मपुरुष गायकवाड प्रेमळ क्षमा शांतिने भरलेला । तेव्हापसुन प्रारंभ सिध्याला हजारो ब्राह्मण जपलेला ॥चा०॥

चाळीस वर्षे वाटितात खिचडी सदा ॥ म्हणून न जाती ब्राह्मण देशी कदा ॥ दिवसात प्रहरभर पडे मेहनत एकदा ॥

मग सार्वकाळ आनंद हसती गदगदा ॥चा० कुटुंब सुद्धा प्रपंच करती गर्भिणी होति बाळात ।

तिही महिन्याच्या मुलास खिचडी मिळत्ये असे आले आढळात ॥२॥

वेदशास्त्रसंपन्न पुराणिक योग्य ज्योतिषी हर्दास । टाळ विने करताळ मृदंगी त्यात एखादी सुरदास ॥

सार्वकाळ भजनात घालती कदा न शिवती नर्दास । घुंगुर बांधुन पायी नाचती ध्याति पुंडलिकवर्दास ।

चित्रे मूर्ती करण्यात कुशळ जे वैद्य जिंकिती दर्दास । तर्‍हे तर्‍हेच्या करून नकला नकली रिझविती मर्दास ॥

ब्रह्मचारि मांत्रीक तपस्वी घेउन सवे शार्गिदास । मोहरा पुतळ्या रुपये तयांना देति शालजोड्याफर्दास ॥चा०॥

ह्यापरी ब्राह्मण समुदाय फार जगविला ॥ पुरुषार्थ करुन संकटकाळी दाविला ॥ वैकुंठी अचळ हा धर्मध्वज लाविला ॥

वंशास वश मार्तंड करुन ठेविला ॥चा०॥

येवढेच विश्रांतिला राहिले स्थळ पश्चमच्या राहाळात । कीर्तवान खावंद असले नाही मराठे मंडळात ॥३॥

विश्वकुटुंबी श्रीमंत ते तर तूर्त प्रजेला अंतरले । गायकवाड आहेत म्हणुन हे समस्त ब्राह्मण सावरले ॥

तानसेन पंथाचे गवय्ये तेहि प्रभूनि आवरले । कडी तोडे हातात दुपेटे लाल जरीचे पांघरले ॥

पहिलवान पंजाबी ज्यांचे दंड सदा मुंढे फिरले । हरहमेश कुस्त्याच विलोकुन इतर मल्ल जागीच विरले ॥

नायकिणी आणि कसबिणी शाहिर नेहमी बडोद्यामधे ठरले । पावे पगाराशिवाय बक्षिस कसबी लोक ह्याने तरले ॥चा०॥

कल्याण ईश्वरा असेच यांचे असो ॥ आनंदभरित चिरकाळ गादीवर बसो ॥ कधी अलोभ गंगुहैबतीवर नसो ॥

महादेव गुणीचे कवन मनामधे ठसो ॥ चा० प्रभाकर कवी भ्रमर गुंतला पहा कर्जाच्या कमळात ।

द्रव्यकृपेचा प्रकाश पडल्या सुटून जाइल स्वकुळात ॥४॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर 

यशवंतराव होळकरावर पोवाडा

सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥ध्रुवपद॥

वडील नावकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । जे सावध होते परंतु सर्यत केली सरतासरती ।

भाऊ यशवंतराव बहादर ऐकून घ्याया ह्या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दों वर्षांमधिं घ्या गणती ।

बनकस कंपू पठाण कडिये फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देति लढावुन टोपीवाले नाहीं गणती ।

नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बाहेरी ॥सुभे०॥१॥

शहर पुण्याशीं यावें ऐसा विचार ठरला फौजेचा । दरकूच घेउनि आघाडी मुकाम केला फलटणचा ।

मागून दुसरा गोलपठाणशाह आमदखान मीरखानचा । मार्गीं येतां लढाई संग्राम झाला टोपीवाल्याचा ।

उद्यां लढाई दुसरी नेमिली आला हलकारा लष्करचा ।

खाशासुद्धां करुनि तयारी मुकाम केला जेजूरिचा किं मल्हाराचें दर्शन घ्यावें मग निर्दाळावे वैरी ॥सुभे०॥२॥

सोमवारच्या दिवशीं प्रातःकाळीं लढाई नेमिली । फत्तेसिंगमानी यांणीं तल्लख लिहून पाठविली ।

अशी लढाई करा म्हणावें मागें मोहरें नाहीं जाहली । टोपीवाले फार हरामी त्यांनीं बहु धुंद केली ।

सवाई यशवंतराव जाऊन अंगें तरवार चमकविली । दोन लाख फौजेमधिं जाऊन कणसापरि कत्तल केली ।

तमाम कंपू पळ सुटला चहूंकडे गेले हो पेंढारी ॥सुभे०॥३॥

सवाई मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । बेफाम होते परंतु भली केली सरतांसरती ।

सवाई यशवंतराव बहादर ऐकून ध्याव्या या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दोप्रहरांमधिं ध्या गणति ।

बंक कंपु पठाण कडवे फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देती लुढावून टोपीवाले नाहीं गणती ।

फत्तेसिंग मान्या कुलअखत्यारी ऐकुनि घ्या या शूर मूर्ति । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बहिरी ।

जसा कृष्ण अवतार मुरारी गोपिकांवर कृपा करी ॥सुभे०॥४॥

सुभेदार महाराज प्रतापी नामें ऐक एक मोहोरा । कारभारी ऐकुनि घ्यावे हरनाथाचा कुलकल्ला ।

शहर पुण्याची नाकेबंदी वागुं देईना पसारा । खटमार मोठा कठिण नाहीं कुठें ऐकिली तर्‍हा ।

मार देउनि खंडण्या घेतो चौमुलखामधिं दरारा । वडिला वडिलीं पुरुषार्थ महिमा सवाई यशवंतराव जुरा ।

अनंद फंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी । सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी ।

सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥सुभे०॥५॥


कवी - अनंत फंदी

खर्ड्याचे लढाईचा पोवाडा

दैन्य दिवस आज सरले । सवाई माधवराव प्रतापि कलियुगात अवतरले ॥ध्रुपद॥

भूभार सर्व हराया । युगायुगी अवतार धरी हरी दानव संहाराया ॥

कलियुगी धर्म ताराया ॥ ब्राह्मणवंशी जन्म घेतला रिपुनिर्मूळ कराया ॥

सुकिर्ती मागे उराया ॥ सौख्य दिले सर्वास अहारे सवाई माधवराया ॥चाल॥

धन्य धन्य नानाचे शहाणपण । बृहस्पति ते बनले आपण ।

गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हाच केला दुर्धट हा पण ।

आरंभिले मग रक्षण शिंपण । सरदारांचे घालून कुंपण ।

आपल्या अंगी ठेवून निरूपण । हरिपंताना करुनि रवाना ॥

(चाल) दादासाहेब मागे वळविले । लगट करुनि फौजांनी मिळविले ।

अपुल्या राज्यापार पळविले । काही दिवस दुःखात आळविले ।

इतर कारणी भले लोळविले । लोहोलंगर पायात खिळविले ।

ठेवून गडावर चणे दळविले । बंदीवान तेथेच खपविले ॥चाल॥

बंड तोतया सहज मोडिला । एक एक त्याचा मंत्री फोडिला ।

जमाव ठायींच ठायी तोडिला । अडचण जागी मुख्य कोंडिला ।

शहराबाहेर नेऊन झोडिला । जो नानांनी पैसा जोडिला । तोच प्रसंगी हुजुर ओढिला ।

लागेल तितके द्र्व्य पुरविले ॥चाल॥ तळेगावावर इंग्रज हरला ।

इष्टुर साहेब रणीच वीरला । उरला इंग्रज घाट उतरला ।

सरमजाम गलबतात भरला । रातोरात मुंबईत शिरला ।

सवेच गाढर पुढेच सरला । शिकस्त खाउन तोही फिरला ।

फिरुन पुण्याकडे कधी पाहीना ॥चाल॥ अशी रिपूची मस्ती जिरविली ।

शुद्ध बुद्ध पहा त्याची हरली । कारभार्‍यांनी पाठ पुरविली ।

पुण्यामध्ये अमदानी करविली । पुरंदराहुन स्वारी फिरविली ।

पर्वतीस मग मुंज ठरविली । गजराची भिक्षावळ मिरविली ।

कालूकर्णे वाजंत्री वाजती ॥चाल॥ लग्नचिठ्या देशावर लिहिल्या ।

ब्राह्मणांस पालख्याश्व वहिल्या । पाठविल्या बोलाऊ पहिल्या ।

पठाण मोंगलसहित सहिल्या । छत्रपति रोहिले रोहिल्या ।

भोसल्यांच्या मौजा पाहिल्या । आणिक किती नावनिशा राहिल्या ।

कवीश्वराची नजर पुरेना ॥चाल॥ आरशाचे मंडप सजविले ।

चित्रे काढून चौक उजविले । थयथयांत जन सर्व रिझविले ।

गुलाब आणि अत्तरे भिजविले । शिष्ठ शिष्ट शेवटी पुजविले ।

रुपये होन मोहोरांनी बुजविले । श्रीमंत कार्यार्थ देह झिजविले ।

यशस्वी झाली सकल मंडळी ॥चाल॥

सत्राशे सातात बदामी । हल्लयाखाली केली रिकामी ।

एक एक मोहोरे नामी नामी । फार उडाले रणसंग्रामी ।

बाजीपंत अण्णा ते कामी हरीपंत तात्याचे लगामी ।

परशुरामपंत त्या मुक्कामी । स्वामी सेवक बहुत जपले ॥चाल॥

गलीमास काही नव्हते भेऊन । पराक्रमाने किल्ला घेऊन ।

अलिबक्षावर निशाण ठेवून । पुण्यास नानासहित येऊन ।

श्रीमंतांनी वाड्यामध्ये नेऊन । पंचामृती आनंदे जेऊन ।

बहुमानाची वस्त्रे देऊन । बोळविले तयाला ॥चाल॥

सत्राशे तेरावे वरीस । अवघड गेले पहिल्या परीस ।

करनाटकच्या पहा स्वारीस । टोपीकर मोंगल पडले भरीस ।

तरी तो टिपू येइना हारीस । त्यावर तात्या गेले परीस ।

आणुन टिपू खूब जेरीस । साधुनी मतलब हरिपंतांनी ॥चाल पहिली ॥

नंतर मागे फिरले । दरकुच येऊन पुण्यास प्रभुचे चरण मस्तकी धरिले ॥

दैन्य दिवस आज सरले ॥१॥

केवढे भाग्य रायाचे । चहुंकडे सेवक यशस्वी होती हे पुण्य त्या पायांचे ॥

करिता स्मरण जयाचे । काही तरी व्हावा लाभ असे बलवत्तर नाम जयाचे ॥

प्रधानपद मूळ याचे । सत्रशे चवदात मिळाले वजीरपद बाच्छायाचे ॥चाल॥

मुगुटमणी ते पाट्लबावा । कोठवर त्यांचा प्रताप गावा ।

दर्शनमात्रे तापच जावा । नवस नवसिता फळास यावा ।

हर हमेशा शत्रुसि दावा । माहित सगळा मराठी कावा ।

हुशार फौजा लढाई लावा । जिंकुन हिंदुस्थान परतले ॥चाल॥

चवदा वर्षे बहुत भागले । म्हणून शिरस्ते पाहून मागले ।

तरतुदीस कारभारी लागले । उंच उंच पोषाग चांगले ।

देउन फार मर्जीने वागले । भेटीसमयी जंबूर डागले ।

मग तोफांचे बार शिलगले । सूर्यबिंब अगदींच झाकले ॥चाल॥

राव जेव्हा नालकीत बसले । कृष्ण तेव्हा ते जनास दिसले ।

अर्जुन पाटिलबावा भासले । पायपोस पदराने पुसले ।

चरणी मिथी माराया घुसले । कर प्रभुनी बगलेत खुपसले ।

इमानी चाकर नाहीत असले । धन्य धनी आणि धन्य दास ते ॥चाल॥

दोन्ही दळे या सुखात दंग । त्यावर जाला अमोल रंग ।

गुलाल आणि अनिवार पतंग । पळस फुलाचा नाही प्रसंग ।

मस्त चालतीपुढे मातंग । कोतवाल घोडे करिती ढंग ।

राज्य प्रभुचे असो अभंग । अहर्निशि कल्याण चिंतिती ॥चाल॥

गुलाम सोदे बुडवुनि पाजी । पंत प्रधान राखुन राजी ।

लष्कर दुनया करून ताजी । शके सत्राशे पंधरामाजी ।

माघ मासी भली मारून बाजी । पाटिलबावा सुरमर्द गाजी ।

अगोदर गेले विष्णुपदाजी । शरीर वानवडीस ठेवुनी ॥चाल॥

सवाचार महिन्यांचे अन्तर । हरीपंत तात्या गेले नंतर ।

तेथे न चाले तंतर मंतर । वर्तमान हे एक अधिकोत्तर ।

काही न करिती नाना उत्तर । दिलगीर मर्जी सुकले अंतर ।

हिरे हरपले राहिले फत्तर । तरि तो पुरुष बहुत धिराचा ॥चाल॥

दौलतीचे आज खांबच खचले । लाल्होते ते कोठेच पचले ।

शिपायांचे काय चुडेच पिचले । परंतु नाना नाही कचले ।

कडोविकडीचे विकार सुचले । कलमज्यारीचे घटाव मचले ।

मोंगलावर मोर्चे रचले । जिकडे तिकडे झाली तयारी (चाल) पुकार पडला पृथ्वीवरती ।

सैन्य समुद्रा आली भरती । आगाऊ खर्ची मोहरा सुर्ती ।

रात्रंदिवस श्रम नाना करती । कशी ही मोहिम होईल पुरती ।

राव निघाले सुदिनमुहूर्ती । लिंबलोण उतरितात गरती । इडापिडा काढून टाकिती ॥चाल॥

गारपिराच्या मग रोखांना । तमाम रिघला फरासखाना ।

उजव्या बाजुस जामदारखाना । डावेकडे तो जवेरखाना ।

देवढीबराबर सराफखाना । चकचकीत खुब सिलेखाना ।

मध्ये रायाचा तालिमखाना खळ ॥ खळ खळ लेजिमा वाजती ॥चाल॥

वाड्याबाहेर जिन्नसखाना । पदार्थ भरपुर मोदीखाना ।

मागे उतरला उष्टरखाना । डेर्‍यासन्निध नगारखाना ।

तर्‍हतर्‍हेचा शिकारखाना । बाजाराच्या पुढे पिलखाना ।

दिला बिनीवर तोफखाना । मोठमोठ्या पल्ल्याच्या जरबा ॥चाल पहिली॥

चोहोंकडे लोक पसरले । नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले ।

दैन्य दिवस आज सरले० ॥२॥ बहुत शिंदे जमले ।

शिलेपोस पलटणे लाविती पठाण जरीचे समले ॥ रणपंडित ते गमले ।

भले भले पंजाबी ज्वान दक्षिणेत येउन रमले ।

ज्यापुढे शत्रु दमले । त्यांणी शतावधि कोस स्वामिकार्यास्तव लवकर क्रमिले ॥चाल॥

आधीच दौलतराव निघाले । काय दैवाचे शिकंदर ताले ।

फौज सभोवती जमून चाले । खांद्यावरती घेऊन भाले ।

सर्व लढावया तयार झाले । जिवबादादा गर्जत आले ।

हासनभाई उज्जनीवाले । महाराजांचे केवळ कलिजे ॥चाल॥

बाळोबास तर काळिज नाही । धीट रणामध्ये उभाच राही ।

धोंडिबास जगदंबा साही । जय करण्याची चिंता वाही ।

सदाशीव मल्हार काही । मागे पुढे तिळमात्र न पाही ।

देवजी गवळी रिपूस बाही । रणांगणाचा समय साघिती ॥चाल॥

निसंग नारायणराव बक्षी । हटकुन मारी उडता पक्षी ।

बंदुकीला कटपट्यास नक्षी । फत्ते होई तो गौंड न भक्षी ।

रायाजी पाटिल महत्त्व रक्षी । नित्य कल्ल्याण धन्याचे लक्षी ।

पिढीजाद शिंद्याचे पक्षी । केवळ अंतरंग जिवाचे ॥चाल॥

मेरूसाहेब कठिण फिरंगी । कलाकुशलता ज्याचे अंगी ।

सामायन किळकाटा जंगी । मुकीरसाहेब भले बहुरंगी ।

हपिसर पदरी चंगी भंगी । जीनसाहेबाची समशेर नंगी ।

दुर्जन साहेब झटे प्रसंगी । झर झर झर झर बुरुज बांधुनी ॥चाल॥

शाहामतखा सरदार किराणी । बाच्छायजदे थेट इराणी ।

किती काबूल खंदार दुराणी । मुजफरखाची टोळी खोराणी ।

कडकडीत सिंगरूपची राणी । तारीफ करती गोष्ट पुराणी ।

इतरांची ठेविना शिराणी । पंचविशीमधे ज्वान पलटणी ॥ ( चाल ) ॥

येथून सरली शिंदेशाई । होळकराची आली अवाई ।

तुकोजी बावांना गुरमाई । आधीच बळ स्वार शिपाई ।

वारगळ बरोबर फणशे जावाई । लांब हात बुळे वाघ सवाई ।

वाघमारे कुळ धगनगभाई । खेरीज ब्राह्मण नागो जिवाजी ॥चाल॥

शिवाय होळकर खासे खासे । काशीबाजी तर हुंगुन फासे ।

लढाईचे आणून नकाशे । स्वस्थपणे करतात तमाशे ।

बापुसाहेबांना येती उमासे । मल्हारजींनी देउन दिलासे ।

जा जा म्हणती लोक बगासे । जहामर्द तरवारकरांचे ॥चाल॥

हरजी विठूजी आनंदराव । स्वता धनी यशवंतराव ।

संताजीचे प्रसिद्ध नाव । आबाजीचा तिखट स्वभाव ।

दूर नेला साधितात डाव । विचारी मतकर माधवराव ।

भागवतांनी सोडुन गाव । ताबडतोब निघाले ॥चाल॥

महाशूर पटवर्धन सारे । ठाइं ठाइं त्यांचे फार पसारे ।

चिंतामणराव शूर कसारे । केवळ एकांगी वीर जसारे ।

परशुराम रामचंद्र असारे । चहुकडे ज्याचा पूर्ण ठसारे ।

अप्पासाहेब तोही तसारे । थरथर ज्याला शूर कापती ॥चाल॥

रास्ते आनंदराव दादा । पानशांची बहु मर्यादा ।

विंचुरकरांमधि गांडु एखादा । राजाबहाद्दर पुरुष जवादा ।

चौपट खर्च दुप्पट आदा । पुरंधर्‍यांची कदीम इरादा ।

तत्पर पेठे मोगल वादा । ओढेकरही येऊन भेटले ॥ ( चाल पहिली ) ॥

वामोरकर सावरले । आंबेकर आणि बारामतीकर प्रसंगास अनुसरले । दैन्य दिवस आज सरले ॥३॥

खास पतक नानाचे । निवडक माणुस त्यात पुरातन सूचक संधानाचे ॥

पद देऊनि मानाचे । खुष करुनि बाबास काम मग सांगुन सुलतानाचे ॥

बळ विशेष यवनांचे । हे ऐकुनी लोकांनी सोडिले पाणी शीरसदनाचे ॥चाल॥

आपा बळवंतराव सुबुद्ध । बिनिवाले पुरुषार्थी प्रबुद्ध । पवारात मर्दाने शुद्ध ।

वाढविती भापकर विरुद्ध । केवढ्यांना शुष्कवत युद्ध ।

काढिती हांडे रणी अशुद्ध । धायगुडे निर्बाणी कुबुद्ध ।

शेखमिरा फौजेत मिसळले ॥चाल॥

पराक्रमी हिमतीचे दरेकर । तसेच जाधव बुरुजवाडीकर ।

अमीरसिंग जाधव माळेगावकर । सुजाण गोपाळराव तळेगावकर ।

जानराव नाईक नट निंबाळकर । शेकर सोयरे बाळो वडाळकर ।

करारी डफळे अनंतपुरकर । आढोळ्याचे लोक इमानी ॥चाल॥

कामरगावकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले ।

हर्ष वाहिले पुढे सरसावले । रण नवरे दरकुच धावले ।

समाधान राऊत पावले । बन्या बापु जसे नवरे मिरविले ।

शहर पुणे रक्षणार्थ ठेविले । माधवराव रामचंद्र कानडे ॥चाल॥

सरमजामी सरदार संपले । शिलेदार मागे नाही लपले ।

धाराशिवकर लेले खपले । जमेत सुद्धा ते आपापले ।

गोट गणतिला तमाम जपले । सानपदोर्गे निगडे टपले ।

खुळे वाघ आणि बाबर सुपले । भगत बडे डोबाले दिपले ।

जाधव काळे माळशिकारे ॥चाल॥ बाजीराव गोविंद बर्वे ।

लाड शिरोळे धायबर सुर्वे । दाभाड्याचा हात न धरवे ।

भगवंतसिंग बैसे बेपर्वे । वझरकराचा लौकिक मिरवे ।

खंडाळ्याचे पोषाग हिरवे । नलगे भोयते सुंदर सर्व ।

सखाराम हरी बाबुराव ते ॥चाल॥

कडकडीत हुजुरात हुजुरची । वीस सहस्त्र जूट पदरची ।

राउत घोडा बंदुक बरची । केवळ आगच उतरे वरची ।

एक एक पागा अमोल घरची । दाद न देती देशांतरची ।

काय कथा त्या भागा नगरची । रणांगणी काळास जिंकिती ॥चाल॥

दिघे फडतरे बाबरकाठे । तळापीर मानसिंग खलोट ।

मारिती पुढे समोर सपाटे । निलाम कवडे झाले खपाटे ।

देवकात्याचे फार हाकाटे । मुळे गांवढे करिती गल्हाटे ।

जगतापाचे महतर भोयटे । भले मर्तृजा महात थड्याचे ॥चाल॥

गणेश गंगाधर थोरात । निळकंठ रामचंद्र भरात ।

आयतुळे मान्य सकळ शूरात । बेहरे मांजरे योग्य बीरात ।

राघो बापुजी रणघोरात । येसोजी हरी सैन्य पुरात ।

दारकोजीबावा निंबाळकरांत । वीरश्रीत तो धुंद सग्याबा ॥चाल॥

कृष्णसिंग हैबतसिंग तारे । तसेच लक्ष्मणसिंग बारे ।

दावलबावा महात सारे । मिळाले भापकर ते परभारे ।

मैराळजी पायघुडे विचारे । इंदापुरकर नव्हत बिचारे ।

गणेश विठ्ठल वाघमारे । बिडकर खुर्देकर आटीचे ॥चाल॥

गिरजोजी बर्गे फार दमाचे । बहादर बारगिर ते कदमाचे ।

आठवले तर बहु कामाचे । दुर्जनसिंग राठोड श्रमाचे ।

टिळे कपाळी रामनामाचे । बिनीबरोबर ते नेमाचे ।

श्रीमंतस्मरणे काळ क्रमाचे । जसे दूत सांबाचे प्रतापी ॥चाल पहिली॥

प्रपंच वैद्य विसरले । चिलखत बखतर शिलेटोप मल्हारराव पांघरले ॥ दैन्य दिवस आज ते सरले० ॥४॥

लष्कर सगळे गुर्के । जरी पटक्याभोताले घालिती गरर मानकरी गर्के ।

सुंदर गोरे भुर्के । घोरपडे पाटणकर महाडिक खानविलकर शिर्के ।

मुंगी मध्ये ना फिर्के । चव्हाण मोहिते गुजर घाडगे निंबाळकर दे चर्के ॥चाल॥

पुढे पसरले रिसालदार । मुसा मुत्रीम नामदार । सय्यद अहमद जमादार ।

अमीर आबास नव्हे नादार । शहामिरखा ते डौलदार ।

इतक्या वर ते हुकूमदार । राघोपंत ते दौलतदार । तसे काशिबा बल्लाळ रानडे ॥चाल॥

गोरा मुसावास अमोल । मुसानारद तो समतोल ।

विनायकपंताचा गलोल । आबा काळे गुणीच डोल ।

टोपकराचे बोलती बोल । पायदळांचा बांधुनि गोल ।

तंबुर ताशे वाजती ढोल । उठावल्या बैरखा निशाणे ॥चाल॥

संस्थानी याविरहित राजे । सेनासाहेब किताब साजे ।

राघोजीबावा नाव विराजे । बाणांचा भडीमार माजे ।

सरखेलांचा लौकिक गाजे । समशेर बहादर गरीब नवाजे ।

अकलकोटी लोक ताजे । दुर्जनसिंग रजपूत हडोदी ॥चाल॥

दक्षण उत्तर पश्चिम भागी । पसरुन तोफा जागोजागी ।

तमाम गारदी त्याचे मार्गी । स्वार सैन्य त्यामागे झगागी ।

जरी पटका तो दुरुन धगागी । कोणीच नव्हता त्यात अभागी ।

स्वस्ति बक्षिस पावे बिदागी । जासूद सांडणी स्वार धावती ॥चाल॥

काय पलटणच्या फैरा झडती । पर्जन्यापरि गोळ्या झडती ।

शिरकमळे कंदुकवत उडती । छिन्न भिन्न किती होऊन रडती ।

कितीक पाण्याविण तडफडती । कितीक प्रेतामधीच दडती ।

वीर विरांशी निसंग भिडती । सतीसारखे विडे उचलिती ॥चाल॥

पाउल पाउल पुढे सरकती । घाव चुकाउनी शुर थडकती ।

सपुत वाघापरी गुरकती । हत्यार लाउन मागे मुरकती ।

खुणेने शत्रुवर्म तरकती । मोंगल बच्चे मागे सरकती ।

जिवबादादा मनी चरकती । अररररर शाबास बापांनो ॥चाल॥

सुटती तोफा धुंद दणाणत । गुंगत गोळे येती छणाछण ।

सों सों करिती बाण सणासण । खालेले घोडे उडती टणाटण ।

टापा हाणती दुरुन ठणाठण । वाजति पट्टे खांडे खणाखण ।

नौबती झांझा झडती झणाझण । एकच गर्दी झाली धुराची ॥चाल॥

थोर मांडली रणधुमाळ । अगदीच बसली मग काठाळी ।

फौज पसरली रानोमाळी । लाखो लाख तरवारी झळाळी ।

होळकराची फिरती पाळी ॥ जिवबांची मदुमकी निराळी ।

मोंगलाची केली टवाळी । सबळ पुण्य श्रीमंत प्रभूंचे ॥चाल॥

अठरा घटका लाही फुटली । तोफ हजारो हजार सुटली ।

मिरजकरांची मंडळी झटली । भाउबरोबर निःसंग तुटली ।

मोंगल सेना मागे हटली । त्या समयी कैकांची उपटली ।

पेंढार्‍यांनी दौलत लुटली । गबर झाले एका दिसात ॥चाल॥

शके सत्राशे सोळा भरता । आनंद संवत्सरही सरता ।

दहा दिवस शिमग्याचे उरता । वद्य पंचमी सुवेळ ठरता ।

ती प्रहरांचा अंमल फिरता । मोंगलाशी प्रसंग करिता ।

पळाले मोंगल धीर न धरता । चंद्रउदयी खर्ड्यात कोंडिले ॥चाल पहिली॥

गढीत खासे शिरले ।

मराठे मोंगल पठाण पुर्भे इतर घरोभर भरले ॥ दैन्य दिवस हे आज सरले ॥५॥

बहुत खराबी जहाली ।

मोहोर्‍यावरची फौज सैनिका सहित नाहली ॥

त्यात उन्हाची काहाली ।

रुपयाचे दिड शेर पाणी अशा कठीण वेळा वाहाली ॥

ती सर्व जनांनी पाहिली ।

जिवबादादा परशुरामपंतांची दिसंदिस बहाली ॥चाल॥

निजाम अल्लीखान नव्हे सामान्य । बाच्छाई सुलतानात मान्य ।

जुनाट पुरुषात राजमान्य । अपार पदरीमण धनधान्य ।

कोण बरोबरी करील अन्य । दैव धन्याचे मुळी प्राधान्य ।

तशात झाले अनुकुळ दैन्य । नाही तर घेते खबर पुण्याची ॥चाल॥

जेव्हा मारिती यवन मुसंडी । तेव्हाच होईती फौज दुखंडी ।

साठ सहस्त्र पठाण बुडी । तिनशे तोफा खंडी ।

असे असुनिया दबली लंडी । धरून मश्रुल्मुलूख आणिला ॥चाल॥

झाला जन्म त्या कुळात माझ्या बाई राजेंद्राचा ।

केवळ माघव मूर्ति म्हसोबा नव्हेच शेंदराची ॥

अणीक मंत्री मर्द मराठा बंद्रोबंद्रांचा ।

ऐरावत बांधून आणतिल प्रसंगी इंद्राचा ॥

येथे न चाले यत्‍न ब्रहस्पती भार्गव चंद्राचा ।

उपाय असता तरी न मरता बापू रामचंद्राचा ॥

चा० हरहर जगन्निवासा, अता काय करू ॥

पोटी जरी एक झाले असते राजबीज लेकरू ॥

राज्य न बुडते मी मात्र मरत्ये शोक सदा कर शकू ॥

चा० पुढे काळ सख्यांनो कसा मी घालवू ॥

हिरकणी कुटुन जाऊ पाण्यामधे कालवू ॥

ती पिउन पौढत्ये नका ग मज हालवू ॥

चा० जा समया मालवून आपल्या घरास न्हायाला ।

जिवंत मी असल्यास उद्या मी नेत्र पुसायाला ॥ कमि नव्हते० ॥१५॥

धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले ।

शत वर्षे द्विज पक्षी आनंदे त्या तरुवर टिकले ।

जलचर हैदर नबाब सन्मुख रण करिता थकले ।

ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपतिला मुकले ।

असे प्रभु कसे अमर कराया ब्रह्मदेव चुकले ।

गहन गती कर्माची सर्वजण पूर्वी फळ विकले ॥चाल॥

संपविला अवतार धन्यांनी म्हणे गंगुहैबती ।

ध्वज पडले उलथुनी थडकल्या सुरु साहेब नौबती ।

कोण करिल प्रतिपाळ तुर्त मुलुखास लागली बती ॥चाल॥

महादेव गुणीराज श्रुती गादिचे ।

नवे नुतन नव्हती शाईर जदिप वादिचे ।

पीळ पेच अर्थ अक्षरात वस्तादिए ॥चालपहिले॥

प्रभाकराचे कवन प्रतिष्ठित सभेत गायाला ।

अशा कवीची बुज नाही कोणि करायाला ॥

कमि नव्हते० ॥१६॥


कवी - अनंत फंदी

रावबाजीवर पोवाडा

उटया केशरी टिळा कस्तुरी कमालखानी हार गजरे । गहेनाजी बहेनाजी अक्षयीं जवळ पालखिच्या हुजरे ।

जुनी माणसें तीं कणसाला महाग गैर त्याची बुजरे । चार चटारी भटारी हलके जाणुनिगे अलबत हुजरे ।

सुंदर स्त्री दुसर्‍याची तिसरा दे बैल गुतुन अवता । शाल्योदन मिष्‍टान्न भोगता सवा शेर ज्याचा सवता ।

चोवीस वर्षें चैन भोगिली राज्यकांति जाणुन नवता ॥धृ०॥१॥

जो नीचकर्मी लइशी गुर्मीं कुटुंब दाखल नजराणा । प्रभु फार संतोष न किमपी दोष निजा इजजवळ जाणा ।

असें अवश्य घडवी अडवी तिडवी चार प्रहर दम द्या ताणा । दौलतीस बाजीराय करिल अपाय म्हणत होते नाना ।

खेळ करुनि उफराटा वरंटा पाटा रयतेच्या भवता ॥शाल्यो०॥२॥

कुलकल्ला त्रिंबकजी डेंगुळ अगदिं राहिले दिडबोट । पंढरपुरीं महाद्वारी शास्त्री ठार केले कर्मच खोटे ।

चौकुन मग इचकोबा तोबा हाय सुकुन गेले ओठ । आळ येतांच चंडाळ गडावर पदरीं काय पडला धोट ।

सर्वांची रग जिरली ह्मणुनी तळि भरली आला दीप मालवता । फंदी मूल ह्मणे असती विरस !

कां गादि पुण्याची घालवता । शाल्योदन मिष्‍टान्न०॥धृ०॥३॥


कवी - अनंत फंदी

शेवटले बाजीरावाचा पोवाडा

वडिलांचे हातचे चाकर । त्यांस न मिळे भाकर ।

अजागळ ते तूपसाखर । चारुनि व्यर्थ पोशिले ॥१॥

सत्पात्राचा त्रास मनीं । उपजे प्रभूचे मनांतूनि ।

ज्या पुरुषास न कोणी । अधीं त्याला भजावें ॥२॥

तट्टू ज्यास न मिळे कधीं । पालखी द्यावी तयास आधिं ।


मडकें टाकुनि भांडयांत रांधी । ताटवाटया भोजना ॥३॥

द्रव्य देऊन आणिक आणिक । नवे तितके केले धनिक ।

जुन्याची तिंबुनि कणीक । राज्य आपुलें हरविलें ॥४॥

जो पायलीची खाईल क्षिप्रा । पालखी द्यावी तया विप्रा ।

निरक्षर एकाद्या विप्रा । त्याला क्षिप्रा चारावी ॥५॥

एके दिवशीं व्हावी खुशाली । स्वारी पुढें शंभर मशाली ।

एके दिवशीं जैशी निशा आली । मशाल एकही नसावी ॥६॥

मेण्यांत बसावें जाउनि । कपाटें ध्यावीं लाउनि ।

स्वरुप कोणा न दावूनी । जागें किंवा निजले कळेना ॥७॥

हुताशनीच्या सुंदर गांठया । शेर शेर साकरेच्या पेटया ।

विंप्र कंठीं जैशा घंटया । उगाच कंठया घालाव्या ॥८॥

तशाच राख्या जबरदस्त । सांभाळितां जड होती हस्त ॥

दौलत लुटुनि केली फस्त । हस्त चहूंकडे फिरविला ॥९॥

तुरा शिरीं केवढा तरी । बहुताची मोठा चक्राकारी ॥

हार गजरे नखरेदारी । सोंगापरी दिसावें ॥१०॥

हात हात रेशमी धोतर जोडे । चालतां ओझें चहूंकडे

आंगवस्त्र दाहदां पडे । चरणीं खडे रुतताती ॥११॥

पोषाग दिधले बाजिरायें । मोच्यास पैकां कोठें आहे ? ॥

तैसेच अनवाणी चालताहे । शास्त्री अथवा अशास्त्री ॥१२॥

घढींत व्हावें क्रोधयुक्त । घडींत व्हावें आनंदभरित ॥

धडींत व्हावें कृपण बहुत । घडींत उदार कर्णापरी ॥१३॥

घडींत व्हावी सौम्य मुद्रा । घडींत यावा कोप रुद्रा ॥

घडींत घ्यावी क्षणैक निद्रा । स्वेच्छाचारी प्रभू हा ॥१४॥


कवी - अनंत फंदी

श्रीसवाई माधवराव पेशवे रंग खेळले त्याचे वर्णनपर पोवाडा

जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनि द्वापारात ।

तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगात अति आदरात ॥ध्रु०॥

धन्य धन्य धनि सवाई माधवराव प्रतापी अवतरले ।

किर्त दिगंतरी करुन कुळातिल सर्व पुरुष पहा उद्धरले ॥

एकापरिस एक मंत्रि धुरंधर बुद्धिबळे शहाणे ठरले ।

दौलतिचा उत्कर्ष दिसंदिस नाही दरिद्री कुणी उरले ।

शालिवाहन शक नर्मदेपावत जाऊन जळी घोडे विरले ।

श्रीमंतास करभार देउन आले शरण रिपु पृथ्वीवरले ॥

चा० महावीर महादजीबाबा हुजरातीचे॥

आणुनि मरातब बाच्छाई वजिरातीचे ॥

केले महोच्छाव खुब मोथ्या गजरातीचे ॥चा०॥

तर्‍हे तर्‍हेचे ख्याल तमाशे बहुत होती दळभारात ।

श्रीमंतांचा संकल्प हाच की रंग करावा शहरात ॥१॥

कल पाहुन मर्जिचा बरोबर रुकार पडला सार्‍यांचा ।

सिद्ध झाले संपूर्ण पुण्यामधे बेत अधिक कारभार्‍यांचा ॥

मधे मुख्य अंबारि झळाळित मागे थाट अंबार्‍यांचा ।

चंद्रबिंब श्रीमंत सभोवता प्रकाश पडला तार्‍यांचा ॥

हौद हांडे पुढे पायदळांतरी पाउस पडे पिचकार्‍यांचा ।

धुमाधार अनिवार मार भर बंबांच्या फटकार्‍यांचा ।

चा० नरवीर श्रेष्ठ कुणी केवळ कृष्णार्जुन ॥

वर्णिती भाट यश कीर्ति सकल गर्जुन ॥

चालली स्वारी शनवार पेठ वर्जुन ॥

चा० घरोघरी नारी झुरझरुक्यांतुन सजुन उभ्या श्रृंगारत ।

गुलाल गर्दा पेल दुतर्फा रंग रिचविती बहारांत ॥२॥

सलाम मुजरे सर्व राहिले राव रंगाच्या छेदात ।

हास्यवदन मन सदय सोबले शूर शिपाईवृंदात ॥

दोहो दाहो हाती भरमुठी दिल्हे चत लाल दिसे खुब बुंदात ।

तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदात ॥

सुदिन दिवस तो प्रथम दिसाहुन शके सत्राशे चवदात ।

परिधावि संवत्सरात फाल्गुन वद्य चतुर्दशी धादांत ॥

चा० बाळाजि जनार्दन रंगामधे रंगले ॥

रंगाचे पाट रस्त्यात वाहु लागले ॥

किती भरले गुलाले चौक ओटे बंगले ॥

चा० कुलदीपक जन्मले सगुणी गुणी महादजीबाबा सुगरात ।

पराक्रमी तलवारबहाद्दर मुगुटमणी सरदारात ॥३॥

भोतगाडे रणगाडे गुलाले भरून चालती स्वारीत ।

गुलाल गोटे शिवाय ठिवले निरनिराळे अंबारीत ॥

आपाबळवंतराव खवाशित चौरि मिजाजित वारीत ।

लाल कुसुंबि रुमाल उडती घडोघडी मैरफगारीत ॥

कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किल करित ।

बल्लम बाण बोथाट्या इटे लगी वाद्यघोष डिमदारीत ।

चा० भले भले एकांडे मधे घोए घालती ।

बारगीर बिनीवर ध्वज रक्षित चालती ॥

संपूर्ण भिजिवले जन रंगाखालती ॥चा०॥

वत्रपाणिवारिती तरी झालि गर्दी मोठि बुधवारात ।

झुकत झुकत समुदाय सहित निट स्वारि आली रविवारात ॥४॥

आधिच पुणे गुलजार तशामधे अपूर्व वसला आदितवार ।

त्यात कृष्ण श्रीमंत आवंतर समस्त यादव परिवार ॥

हरिपंत तात्यांनी उडविला रंग केशरी अनिवार ।

हर्ष होउन राजेंद्र झांकिती शरिरानन वारंवार ॥

पाटिल बावानी नेउन शिबीरा रंग केला जोरावार ।

वस्त्रे देउन किनखाब वाटिले ठाण कुणाला गजवार ॥चा०॥

उलटली स्वारी मग महिताबा लाउनी ॥ कुरनिसा करित जन वाड्यामधे जाउनी ॥

दाखवी पवाडा गंगु हैबती गाउनी ॥चा० महादेव गुणिराज फेकिती तान तननन दरबारात ।

प्रभाकराचे कवन पसरले सहज सहज शतावधि नगरात ॥५॥


कवी - अनंत फंदी