चिमुकल्यास

शुध्दानन्दाची तुला चिमुकल्या पाहुनि पटते खूण ! ॥धृ॥

बालभानू येइ गगनीं;
तेजसरिता न्हाणि अवनी;
परि विषण्ण होतों काळोखाचे वाडे मनिं बांधून !

झाडपानें हलति येथें,
चिवचिवे ती चिमणि तेथें;
इवल्याहि पाहुनी सौंदर्याला जाशी तूं रंगून !

आपुल्या तान्हास धरुनी,
जातसे ही तरुणि कोणी;
पाहते मत्सरें, परि तूं खिदळशि मूल तिचें पाहून !

रोखुनीयां लाल डोळे,
दुष्ट कोणी बघत चाले;
चरकतों-कापतों मनिं मी ! --निर्भय हांसशि मूठ वळून !

खुलत असलें अधरिं हासें,
ह्रुदयिं कसला भाव नाचे ?
जर का कळला मज दाविन तर मी स्वर्ग जगा उघडून !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १ जुलै १९२६

त्यांचें प्रेम

तिची त्याची जाहली कुठें भेट;

बहुत दिवसांचा स्नेह जमे दाट.

हातिं धरुनी एकदां तिचा हात,

बोलता तो;--बोलली स्मित करीत,

"इश्श, भलतें हें काय खुळ्यावाणी,

केवढी मी, केवढे तुम्हीं आणि !

धाकटा मी समजून तुम्हां भाऊ,

भगिनिप्रेमानें घालितसे न्हाऊं!"

बोल ऐकुनि संतप्त लाल झाला;

दांत चावुनि हे शब्द बोलिजेला,

"घरीं माझ्या आहेत खूप ताई,

करा काळें बघण्याक दुजे भाई".


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० फेब्रुवारी १९२६

दैविकता

सारी रात्र सरुन मंद गगनी तारा फिक्या जाहल्या;

माझी गोष्ट अजून मात्र नव्हती सांगूनिया संपली.

एकामागुनि एक आठवुनियां लीला तिच्या प्रेमाला,

जीवाच्या सुह्रुदास सर्व कथिलीं दुःखें मनींचीं मुकीं;

"आतां सांग गडया, खरी मजवरी आहे तिची प्रीत ना ?"

तो बोले, "भलताच संशय असा कां घेसि वेडयापरी ?"

तेव्हां टाकुनि श्र्वास एक वदलों नैराश्यपूर्ण खरें,

"वर्षें दोन उणीं पुरीं उलटलीं नाहीं तिची दादही !"

झाली सांज तशी उदासह्रुदयें होतों कूठेंसा उभा ;

तों मागून कुणी हळू 'तुम्हिच कां!' ऐसें वदे मंजुळ.

सारा दाटुनि जीव लोचनिं बघे-तो तीच मागें उभी !

सोन्याचा क्षण तो कसा कुणिकडे ठेवूं असें जाहलें !

दैवाची दिलदारि ही बघुनियां बेहोष झालों मनीं;

'वेडया, होइल ती तुझीच' असला उल्हास ये दाटुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ८ मे १९२६

खूळ

जिवलग राणी दुज्या भाळुनी पळे कुठे चंचळ,

मान टाकुनी म्हणुनि पडलों गाळित अश्रूजळ.

कुणी बालिका अजाण येउनि म्हणे 'प्रीति हें खुळ,

सुसकार्‍यांचे तुफान करुनी कां होता व्याकुळ ?'

खोल घोगर्‍या सुरांत वदलों हंसरा रडवा जरा,

'पांडित्याचे बोल तुझे परि झोंबति माझ्या उरा'

तरी कैकदा जवळ येउनी रमवी नानापरी,

म्हणे ' किती दिन तिच्या खंतिच्या जळवा धरणें उरी ?

अकस्मात हे शब्द ऐकुनी टकमक तिज पाहिलें,

गाळित आसू वदलि,'नाहि कां मज अजुनी जाणिलें ?"

जवळ जाउनी वदलो तिजला 'प्रीति असे ना खुळ ?

मनराणीविण खुळा जाहलो-तुम्हि कां हो व्याकुळ ? "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ८ मार्च १९२६

रानगीत

चल ग सजणे रानामधें,

चाफ्याचे फुल तुझ्या कानामध्ये !

उठे चंद्र्मा झाडिंतुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

रानवटी हिरवी झाडी,

डोंगरमाथी ही उघडी ,

चल फिरू घालुनि गळा गळे,

रोमाच्च्यांचे फुलवु मळे !

'कोण ग बाई चावट हा

पानांच्या जाळींत पहा ! "

चंद्र ग बघतो जाळिंतुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

ओसाडी बघ पुष्करिणी,

बसलि कशी जळ झाकळुनी;

दोघांचे मुखबिंब गडे,

जाउनिया पाहूं तिकडे.

" कोण ग बाई चावट हा

पांढुरका पाण्यात पहा ! "

डुले कवडसा जळातुंनी

बावरशी कं तूं सजणी ?

पदर आडवा बांध झणी,

कर गुम्फूं कमरेमधुनी

" हूं,हूं करूनिया चावट हा ,

कानोसा कुणि घेत पहा !"

वायु ग फिरतो तृणातुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

बावरुनी गेलिस बाई,

चाफा मुळिं फुलतच नाही !

चल तर साजणे जाउं घरी;

"नका साजणा , राहुं तरी ! "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ६ मार्च १९२६

हिंदुस्थानवर्णन

चोहो वर्णातुन कोण मुशाफर वर्ण मला सांगा । तुम्हाला वर देते जागा ॥ध्रु०॥

विपवंश संपूर्ण दरिद्रे आजवर नाचवले, ब्रह्मकर्माला आचवले ॥

संकटी पडता पक्षी खगेंद्रे जसे काय वाचवले, सकळस तेजे नाचवले ॥

श्रीमंतांनी तसे थोर पदाला ब्राह्मण पोचवले, तया करी शत्रू वेचवले ॥चा०

जे उदार धीर देणार खबर घेणार क्षणामध्ये रूमची ॥

ते तर नव्हे आपले बेट राज बीज थेट कला दिसे तुमची ॥

नारो शंकर विंचुरकर बोला लौकर धरते करी दुमची ॥चा०॥

ओढेकर नायगावकर पुरंधरे पानशांतिल आपुण ।

तुम्ही अमात्य की राजाज्ञा प्रतिज्ञा पुरवा कपट वाणुण ॥

प्रतिनिधी सचिव सुमंत न झालो श्रीमंत दिसती गुण ॥चा०॥

रणशूर पुरे पटवर्धन सर्वदा युद्ध साधन । नाही रास्त्यामध्ये निर्धन, भरपुर भांडारी धन ॥

किती नानाचे शोधन दश दिशा करी बंधन ॥चा० मसलती राजकारणी सखाराम बापू हो ॥

रामाजीपंती वेढिला जंजिरा टापु हो ॥ हरीपंत म्हणती सृष्टित स्वराज्य स्थापू हो

॥चा० त्रिंबकराव राव भाऊसाहेबांचे मामा रावजीजी ॥

हर वक्त विसाजी कृष्ण हजर प्रभु कामा राव जी जी ॥

रामचंद्र गणेश वांछितात नित संग्रामा राव जी जी ॥चा०॥

कृष्ण राव बल्लाळ, कोळी भिल रामोशांचे काळ, पारोळकर काळाचे महाकाळ ॥

चा० रणांगणी बुंदेले मजबुत ॥ घोडे स्वार शिपाई कलबुत ॥ केले गिराशाचे ताबुत ॥

चा० संस्थान शाबूत लढाया रोज नाही नागा, वसविल्या ब्रह्मपुर्‍या बागा ॥१॥

क्षत्रीय मंडळित मुख्य घराणे उदेपुरचे, सुरजमल जाट भरतपुरचे ॥

अश्वमेध कलियुगात केला जयसिंग जैपुरचे, भारमलसिंग जोतपुरचे ॥

बळिभद्रसिंग आणिक सुरूपसिम्ग श्रींगी राजापुरचे, प्रभंजनसिंग कुंजपुरचे ॥चा०

पुरी चेतसिंग काशीचे कर्मनाशीचे इंद्रजितसिंग ॥

हरि भक्त हाती जमाल प्रभु नेपाळचे रणजित सिंग ॥

पडे बर्फ सदा काहूर सुभा लाहूरचे दळजितसिंग ॥चा० अजमेरचे सुरतसिंग मस्तकी लिंग शिवाचे सदा ॥

नरवरचे हरि हरमल एक दिल अचळ संपदा ॥

रजपूत चितोडकर मर्द गर्दअफिमेत न टळती कदा ॥ चा० झरण्या परण्याचे वीर, संग्रामसिंग रणधीर ॥

देती राघोगडास्तव शीर, दुर्जनसिंग गुण गंभीर ॥ मानसिंग तरलाचे तीर, गोहदेस ठेवला खंजीर ॥ चा०

ओंकार मलराठोड लेक मोठ्याने हो ॥

अर्जुनसिंग रामसिंग हरिप खोट्याचे हो ॥ जालमसिंग भिमसिग बुंदिकोट्याचे हो ॥चा०

केशरीगिसदत्त्याचे ब्राह्मणभक्त राव जी जी ॥

वैकुंठसिंग मथुरेचे बहुत वीरक्त राव जी जी ॥

मलसिंग बाहुबळे रक्षिती बाच्छाई तक्त राव जी जी ॥

चाल॥ सबलसिंग मेवाडचे ॥ रुद्रसिंग जमिदार मारवाडचे ॥ हटेसिंग हजारी छत्तिस गडचे ॥चाल॥

अशेले स्वइच्छ फिरती किती ॥भरपूर अमल झोकिती ॥ वळखिल्या वळख टाकिती ॥चाल॥

अशा आहेत लोकांच्या रिती म्हणून येऊ नये रागा, एखादी गोष्ट येते भागा ॥२॥

वंश हजारो हजार ज्यांचे सुरतपाक बेटे, चपळ जसे वाघिणीचे पेटे ॥ नगरशेट मसुदाबादेचे वतनदार शेटे, घालिती पैकेकरी खेटे ॥

सधम गुमस्ते पदरी बांधिती शिरी मंदिल फेटे, गळ्यामध्ये लिंग गोफ गेठे ॥चाल॥

आग्र्याचे केशवलाल द्रव्य आजकाल तयांचे सदनी ॥

आल्या याचकास सत्कार पाट बस्कर मिठाक्षर वदनी ॥ परनारी सहोदर सद्य प्रफुल्लित ह्रदय विषयसुख सदनी ॥चाल॥

उज्जनचे गोकुळदास जन्मतो प्रवास करते भले ॥ गढे मळचे हंसराज बंधु जसे राजपतीने शोभले ॥

झाले मातब्बर सौद्यात होन हौद्यात सहज लाभले ॥चाल॥ आदि ठिकाण भागानगर, लागले सभोवते आगर ॥

जाई जुई शेवंती तगर, खेळती तळ्यामधी मगर ॥ सारी अलम शहरची सुगर, ना अडे एकमेकांबिगर ॥चाल॥

बेदरचे मलापा मुलुख फिरस्ते वाणि हो ॥

शिवपूजन त्रिकाळी करून सत्य वदे वाणि हो ॥

पदोपदी सांब संभाळी समयनिर्वाण हो ॥चाल॥

भावार्थि सुराप्पा श्रीरंगपुर पट्टणचे रावजी जी ॥

धट लावून मोजिती द्रव्य मोधी पल्टाचे रावजी जी ॥चाल॥

चंद्राप्पा सोंदे बिनुरचे ॥ विराप्पा दर्भशयन इंदुरचे ॥ गुराप्पा गुरु मछली बंदरचे ॥चाल॥

नावे इतुक्याची घेतलि पहा पहा यातुन तुम्ही कुणी आहा ॥

भीड सोडून कळवा राहा ॥ करीन पती परिचय हा माझे मर्जिनुरूप वागा, तदार्पण मग दौलत पागा ॥३॥

राज्य संमधी पडले प्रसंगी जिव खर्चुन कामी, मराठे लोक नामी नामी ॥

धारकरी साहेब सुभेसरदार सरंजामी, नांदती आपआपल्या ग्रामी ॥

अमरसिंग जाधव शुचिर्भुत अति अंतर्यामी. घाडगे निसंग संग्रामी ॥चाल॥

रणनवरे नवरे थोरात खरड खैरात फडतरे कवडे ॥ पाटणकर निंबाळकर भुते भापकर झेंडे बालकवडे ॥

जगताप दरेकर बुळे ताकपिर मुळे दिघे वाघचवडे ॥चाल॥ धायबर बाबर धायगुडे पायगुडे सोनवणी घागरे ॥

माहाडिक शिर्के दाभाडे गोड सावंत धुळप नागरे ॥ सितोळ्यांची मोठी वेल सवाई सरखेल सबळ आंगरे ॥चाल॥

आधी सुभेदार होळकर, नंतर पवार धारकर ॥ जगजीवनराव माणकर, मुळी चव्हाण दहिगावकर ॥

आपतुळे पिसाळ वाईकर, ढमढेरे तळेगावकर ॥चाल॥

धनी छत्रपती महाराज तख्त सातारा हो ॥

करवीर चंदिचंदावर अहो दातरा हो ॥

शिंद्यात पुरुष एक एक निवडतो ताराहो ॥

नागपुरचे भोसले होशियार घोड्याचे राव जी जी ॥

गायकवाडा मोहोरे इष्कि कंडी तोड्यांचे राव जी जी ॥

शिरी आकलकोटी लाविती तुरे गोंड्याचे राव जी जी ॥चाल॥

म्हणे मुशाफर गडे ॥ आम्ही तर राज्याचे संवगडे ॥

ऐकून सुंदर पायापडे ॥चाल॥

गुणिजन गंगुहैबती पुरे ॥ मनी कवन तयांचे मुरे ॥

किती महादेव वाखा पुरे ॥

सुगर प्रभाकर म्हणे पंचीपशी काही बक्षिस मागा, कवी नाही कुणी कवनी जागा ॥४॥


कवी/शाहीर  - प्रभाकर

पोवाडा - पेशवाचे संक्षिप्त वृत्त

जगदीश्वर कोपला गोष्ट झाली खरिच निरुपाई, म्हणुन एकाएकी सर्व बुडाली ब्राह्मणबाच्छाई ॥ध्रु०॥

सबळ वीरांचे राज्य पुरुष जे क्षणात हरणारे, आकाश कडकडल्यास सकल जे उचलुन धरणारे ॥

अणिक जागा जिंकुन जे घन भंडारी भरणारे, रिपुसन्मुख धैर्याने रणांगणी जे नर ठरणारे ॥

चोहो सागरिचे स्नान सैन्यसमवेत जे करणारे, पूल बांधुन नावांचे जान्हवी निर जे तरणारे ॥

छत्रपतीच्या कामी शरीर जे खर्चुन मरणारे, उबे कंबर आवळून वायुवत सदा जे फिरणारे ॥

स्वकर्म आचरणारे अभय जे बळी सर्वा ठाई, पहा त्यांचे वंशज हिंडती पृथ्वीवर पाई ॥१॥

शके सोळाशे तिसापसुन राज्याची अमदानी, स्वता खपुन कारखाने जमविले घरी खावंदानी ॥

कसे दप्तरी लिहिणार लेख जे लिहिले मर्दानी, त्यात चुकि नाहि ठावि लेखणी कोरी कलमदानी ॥

वेदशास्त्रसंपन्न मुखोद्गत वदति आनंदानी, असे ब्राह्मण प्रतिसूर्य पाळिले त्यांच्या छंदानी ॥

शहर पुणे हरहमेष भरले वाडे बांधिती घरवंदानी ॥

नळ वाहाती नित्यानी पाणी पीती हौदावर गाई,

पुढे उघडे बाजार सुखे जन करती कमाई ॥२॥

प्रतिवर्षिक दक्षणा लक्ष ब्राह्मण श्रावणमासी, असा धर्म आहे कुठे आवंतर कोण्या ग्रामासी ॥

निरिच्छ योगी ध्याती गाती जे ईश्वरनामासी ॥

अन्न वस्त्र धन धान्य तयांच्या धाडिती धामासी ॥

नंदादिप नैवेद्य ठाई ठाई विठ्ठल रामासी, उच्छाहास दिल्हे गाव सुभद्रा सुताच्या मामासी ॥

कितीक विडे उचलुन पावले मृत संग्रामासी ॥

त्यांचे पुत्र पौत्रांस मागे नाहि दुष्काळ दामासी ॥

मुलुख सरंजामास देऊन केली कायम गलिमाई, मनुष्यमात्रादिकांचे माहेर होति पेशवई ॥३॥

मूळ बाळाजि विश्वनाथ सुत त्यांचे बाजीराव, नाव केले आपांनी लढविले वसइस उमराव ॥

राव बाजिचे पुत्र प्रभु बाळाजि बाजिराव, कनिष्ठ दादा त्याहुन धाकटे जनार्दनराव ॥

आपासाहेबांचे एक चिरंजिव सदाशिवराव, शूर होते विश्वासराव आणि गुणी माधवराव ॥

नारायणरायांचे सवाइ झाले माधवराव, रावसाहेब घेतल्या वरी जन्मले बाजीराव ॥

चिमाजी आपासाहेब प्रसवली मग आनंदीबाई, विनायकराव बापुजी हे काही किंचित सीपाई ॥४॥

पुरुष पंध्रांतुन पराक्रमी गत झाले अकरा, तदनंतर चौघांनी दिल्या आल्या शत्रुसवे टकरा ॥

उपाय हरले ह्याच प्रसंगी गोष्ट गेलि निकरा, जो रक्षणा आणिला तोच करी दौलतिचा विकरा ॥

हरण झाले सर्वस्व राहिला नाही त्यातुन बकरा, गुप्त ठिकाण अजुन सांगती जा सत्वर उकरा ॥

अशी अवस्था बघुन जनाच्या मनि पडल्या फिकरा, हरहर हे भगवान कशा तरि घरि रहातिल ठिकरा ॥

गंगुहैबती म्हणे आज काय सरली पुण्याई, महादेव गुणी प्रभाकराच्या कवनी चतुराई ॥५॥


कवी/शाहीर  - शाहीर प्रभाकर