मीं म्हटलें गाइन

'मी म्हटलें, गाइन तुलाच गीतशतांनीं;
ह्रुदयाची वीणा म्हणुनी ही लावोनी,

भिरिभिरी गाइलीं गीतें तव प्रीतीचीं;
मज दिनें वाटलीं अशीच हीं जायाचीं.

जीव हा लावुनी तुझिया जीवावरती,
म्हटलें मी, जडली तुझीहि मजवर प्रीती.

चित्तीं शंकेचीं परी वादळें उठती;
झगडतां जिवा या अनन्त खन्ती जडती.

तिमिरांतुनि कुणि ही दुसरी तारा हंसते,
क्षणभरी तुझी मग विस्मृति मजला पडते !

या नवतारेचीं गीतें गाण्या उठतों;
ह्रुदयाची वीणा छेडाया जों जातों,

तों जुनीच गाणीं वीणेवरती येती !
लज्जेनें दुःखद पीळ जिवाला पडती.


परि प्रीत असे फुलपांखरु गोजिरवाणें;
औदासीन्याच्या हिमांत तें ना जगणें !

त्या हवें स्मिताचें ऊन कोवळें जगण्या,
आणिक चुंबनमधु स्वैरसुखानें लुटण्या !

तव सौदर्याची जादु न आतां उरली ;
तव जादू कसली !--भूल मला ती पडली !

माझ्याच प्रीतिचे रंग तुझ्यावर उठले;
त्यांतून तुझें मज रुप जादुचें दिसलें !

ही दो ह्रुदयांविण जादु न चालायाची;
प्रीत ना अशी वा-यावर वाढायाची !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २८ मे १९२७

प्रीतीची त-हाच उलटी असे !

सौंदर्याचे तुझ्या पवाडे गाती हे येउनी;

ऐकतों हांसत मनिच्या मनीं !

मूक राहुनीं सर्व ऐकतों, कांहि न वदतों परी,

बोलतों दुसरें कांही तरी !

उदास मजला बघुनी म्हणती 'ह्रुदयच ना याजला,

प्रीतिची काय कळे या कळा !'

ह्रुदयाचे माझ्या काय असें जाहलें,

जर खरी प्रीत तर तुलाच सारें कळे;

यांनी गावें तुला, आणि मी स्वस्थ बसावें असें,

प्रीतिची त-हाच उलटी असे !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १९ सप्टेंबर १९२६

चिमुकल्यास

शुध्दानन्दाची तुला चिमुकल्या पाहुनि पटते खूण ! ॥धृ॥

बालभानू येइ गगनीं;
तेजसरिता न्हाणि अवनी;
परि विषण्ण होतों काळोखाचे वाडे मनिं बांधून !

झाडपानें हलति येथें,
चिवचिवे ती चिमणि तेथें;
इवल्याहि पाहुनी सौंदर्याला जाशी तूं रंगून !

आपुल्या तान्हास धरुनी,
जातसे ही तरुणि कोणी;
पाहते मत्सरें, परि तूं खिदळशि मूल तिचें पाहून !

रोखुनीयां लाल डोळे,
दुष्ट कोणी बघत चाले;
चरकतों-कापतों मनिं मी ! --निर्भय हांसशि मूठ वळून !

खुलत असलें अधरिं हासें,
ह्रुदयिं कसला भाव नाचे ?
जर का कळला मज दाविन तर मी स्वर्ग जगा उघडून !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १ जुलै १९२६

त्यांचें प्रेम

तिची त्याची जाहली कुठें भेट;

बहुत दिवसांचा स्नेह जमे दाट.

हातिं धरुनी एकदां तिचा हात,

बोलता तो;--बोलली स्मित करीत,

"इश्श, भलतें हें काय खुळ्यावाणी,

केवढी मी, केवढे तुम्हीं आणि !

धाकटा मी समजून तुम्हां भाऊ,

भगिनिप्रेमानें घालितसे न्हाऊं!"

बोल ऐकुनि संतप्त लाल झाला;

दांत चावुनि हे शब्द बोलिजेला,

"घरीं माझ्या आहेत खूप ताई,

करा काळें बघण्याक दुजे भाई".


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० फेब्रुवारी १९२६

दैविकता

सारी रात्र सरुन मंद गगनी तारा फिक्या जाहल्या;

माझी गोष्ट अजून मात्र नव्हती सांगूनिया संपली.

एकामागुनि एक आठवुनियां लीला तिच्या प्रेमाला,

जीवाच्या सुह्रुदास सर्व कथिलीं दुःखें मनींचीं मुकीं;

"आतां सांग गडया, खरी मजवरी आहे तिची प्रीत ना ?"

तो बोले, "भलताच संशय असा कां घेसि वेडयापरी ?"

तेव्हां टाकुनि श्र्वास एक वदलों नैराश्यपूर्ण खरें,

"वर्षें दोन उणीं पुरीं उलटलीं नाहीं तिची दादही !"

झाली सांज तशी उदासह्रुदयें होतों कूठेंसा उभा ;

तों मागून कुणी हळू 'तुम्हिच कां!' ऐसें वदे मंजुळ.

सारा दाटुनि जीव लोचनिं बघे-तो तीच मागें उभी !

सोन्याचा क्षण तो कसा कुणिकडे ठेवूं असें जाहलें !

दैवाची दिलदारि ही बघुनियां बेहोष झालों मनीं;

'वेडया, होइल ती तुझीच' असला उल्हास ये दाटुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ८ मे १९२६

खूळ

जिवलग राणी दुज्या भाळुनी पळे कुठे चंचळ,

मान टाकुनी म्हणुनि पडलों गाळित अश्रूजळ.

कुणी बालिका अजाण येउनि म्हणे 'प्रीति हें खुळ,

सुसकार्‍यांचे तुफान करुनी कां होता व्याकुळ ?'

खोल घोगर्‍या सुरांत वदलों हंसरा रडवा जरा,

'पांडित्याचे बोल तुझे परि झोंबति माझ्या उरा'

तरी कैकदा जवळ येउनी रमवी नानापरी,

म्हणे ' किती दिन तिच्या खंतिच्या जळवा धरणें उरी ?

अकस्मात हे शब्द ऐकुनी टकमक तिज पाहिलें,

गाळित आसू वदलि,'नाहि कां मज अजुनी जाणिलें ?"

जवळ जाउनी वदलो तिजला 'प्रीति असे ना खुळ ?

मनराणीविण खुळा जाहलो-तुम्हि कां हो व्याकुळ ? "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ८ मार्च १९२६

रानगीत

चल ग सजणे रानामधें,

चाफ्याचे फुल तुझ्या कानामध्ये !

उठे चंद्र्मा झाडिंतुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

रानवटी हिरवी झाडी,

डोंगरमाथी ही उघडी ,

चल फिरू घालुनि गळा गळे,

रोमाच्च्यांचे फुलवु मळे !

'कोण ग बाई चावट हा

पानांच्या जाळींत पहा ! "

चंद्र ग बघतो जाळिंतुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

ओसाडी बघ पुष्करिणी,

बसलि कशी जळ झाकळुनी;

दोघांचे मुखबिंब गडे,

जाउनिया पाहूं तिकडे.

" कोण ग बाई चावट हा

पांढुरका पाण्यात पहा ! "

डुले कवडसा जळातुंनी

बावरशी कं तूं सजणी ?

पदर आडवा बांध झणी,

कर गुम्फूं कमरेमधुनी

" हूं,हूं करूनिया चावट हा ,

कानोसा कुणि घेत पहा !"

वायु ग फिरतो तृणातुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

बावरुनी गेलिस बाई,

चाफा मुळिं फुलतच नाही !

चल तर साजणे जाउं घरी;

"नका साजणा , राहुं तरी ! "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ६ मार्च १९२६