प्रीति

'प्रीती काय ?' म्हणून कोणि पुसतां, मी बोललों हांसुनी,

'बाला कोणिहि पाहुनी तिजसवें तें बोलणें हांसणें.

येवोनी गृहिं जेवणें, मग पुन्हा निष्काळजी झोपणें !'

आतां प्रीती कळे तदा पुनरपी हे बोल येती मनी.

चक्रव्यूह असे पहा विरचिला हा प्रीतिचा सुंदर,

वेडे होऊनि आंत आम्हि घुसतो--कांहीं न आम्हा कळे !

जीवाला भगदाड खोल पडुनी हा जीव जेव्हां वळे,

तेव्हां त्यास कळे पुन्हा परतणें झालें किती दुष्कर !

देवालाहि उठून निर्भय जयें आव्हान तें टाकणें,

प्रीतीनें परि कोंकरु बनुन तो, हो दैववादी जिणें !

कांहीं रम्य बघून, शब्द अथवा ऐकूनियां वेधक,

जीवानें उगिच्या उगीच बसणें होऊन पर्युत्सुक !

इष्टप्राप्तित जी सुधा, जहर जी त्यावांचुनी होतसे,

'प्रीती प्रीति' म्हणूनि नाचति कवी ती हीच प्रीती असे !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० सप्टेंबर १९२६

जेव्हां चिंतित

जेव्हां चिंतित मी मनांत बसतो माझ्या तुझ्या प्रीतितें,

तेव्हां दावित भीति ठाकति पुढें तीं बंधनें धार्मिक ;

प्रीतीच्या परि सृष्टिनिर्मित अशा धर्मापुढें पावक,

अस्वाभाविक बंधनें सहजची तोडीनसें वाटतें.

हे सारे तुटतील बंध सहसा धार्मीक सामाजिक;

आईच्या परि भाबडया दुखुवुं का जीवास मी प्रेमळ,

सारीं तोडुनि बंधनें सुखविण्या माझ्या जिवा केवळ ?

आईचाहि विचार पार पळ्वी मूर्ती तुझी मोहक !

अंतश्र्वक्षुपुढें परंतु सहसा ये मातृमूर्ती तदा,

जन्मापासुनि हाल सोसुनि मला जी वाढावी माउली;

माझ्या मात्र कृतघ्न नीच ह्रुदया ती कोणि ना वाटली !

हातांनीं मुख झांकिलें---मज गमे ती वृत्ति लज्जास्पदा.

दीना, वत्सल माय चित्तनयनां तेव्हां दिसूं लागली;

दुःखाचे कढ येउनी घळघळा अश्रूजळें वाहलीं.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १८ सप्टेंबर १९२६

मीं म्हटलें गाइन

'मी म्हटलें, गाइन तुलाच गीतशतांनीं;
ह्रुदयाची वीणा म्हणुनी ही लावोनी,

भिरिभिरी गाइलीं गीतें तव प्रीतीचीं;
मज दिनें वाटलीं अशीच हीं जायाचीं.

जीव हा लावुनी तुझिया जीवावरती,
म्हटलें मी, जडली तुझीहि मजवर प्रीती.

चित्तीं शंकेचीं परी वादळें उठती;
झगडतां जिवा या अनन्त खन्ती जडती.

तिमिरांतुनि कुणि ही दुसरी तारा हंसते,
क्षणभरी तुझी मग विस्मृति मजला पडते !

या नवतारेचीं गीतें गाण्या उठतों;
ह्रुदयाची वीणा छेडाया जों जातों,

तों जुनीच गाणीं वीणेवरती येती !
लज्जेनें दुःखद पीळ जिवाला पडती.


परि प्रीत असे फुलपांखरु गोजिरवाणें;
औदासीन्याच्या हिमांत तें ना जगणें !

त्या हवें स्मिताचें ऊन कोवळें जगण्या,
आणिक चुंबनमधु स्वैरसुखानें लुटण्या !

तव सौदर्याची जादु न आतां उरली ;
तव जादू कसली !--भूल मला ती पडली !

माझ्याच प्रीतिचे रंग तुझ्यावर उठले;
त्यांतून तुझें मज रुप जादुचें दिसलें !

ही दो ह्रुदयांविण जादु न चालायाची;
प्रीत ना अशी वा-यावर वाढायाची !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २८ मे १९२७

प्रीतीची त-हाच उलटी असे !

सौंदर्याचे तुझ्या पवाडे गाती हे येउनी;

ऐकतों हांसत मनिच्या मनीं !

मूक राहुनीं सर्व ऐकतों, कांहि न वदतों परी,

बोलतों दुसरें कांही तरी !

उदास मजला बघुनी म्हणती 'ह्रुदयच ना याजला,

प्रीतिची काय कळे या कळा !'

ह्रुदयाचे माझ्या काय असें जाहलें,

जर खरी प्रीत तर तुलाच सारें कळे;

यांनी गावें तुला, आणि मी स्वस्थ बसावें असें,

प्रीतिची त-हाच उलटी असे !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १९ सप्टेंबर १९२६

चिमुकल्यास

शुध्दानन्दाची तुला चिमुकल्या पाहुनि पटते खूण ! ॥धृ॥

बालभानू येइ गगनीं;
तेजसरिता न्हाणि अवनी;
परि विषण्ण होतों काळोखाचे वाडे मनिं बांधून !

झाडपानें हलति येथें,
चिवचिवे ती चिमणि तेथें;
इवल्याहि पाहुनी सौंदर्याला जाशी तूं रंगून !

आपुल्या तान्हास धरुनी,
जातसे ही तरुणि कोणी;
पाहते मत्सरें, परि तूं खिदळशि मूल तिचें पाहून !

रोखुनीयां लाल डोळे,
दुष्ट कोणी बघत चाले;
चरकतों-कापतों मनिं मी ! --निर्भय हांसशि मूठ वळून !

खुलत असलें अधरिं हासें,
ह्रुदयिं कसला भाव नाचे ?
जर का कळला मज दाविन तर मी स्वर्ग जगा उघडून !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १ जुलै १९२६

त्यांचें प्रेम

तिची त्याची जाहली कुठें भेट;

बहुत दिवसांचा स्नेह जमे दाट.

हातिं धरुनी एकदां तिचा हात,

बोलता तो;--बोलली स्मित करीत,

"इश्श, भलतें हें काय खुळ्यावाणी,

केवढी मी, केवढे तुम्हीं आणि !

धाकटा मी समजून तुम्हां भाऊ,

भगिनिप्रेमानें घालितसे न्हाऊं!"

बोल ऐकुनि संतप्त लाल झाला;

दांत चावुनि हे शब्द बोलिजेला,

"घरीं माझ्या आहेत खूप ताई,

करा काळें बघण्याक दुजे भाई".


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० फेब्रुवारी १९२६

दैविकता

सारी रात्र सरुन मंद गगनी तारा फिक्या जाहल्या;

माझी गोष्ट अजून मात्र नव्हती सांगूनिया संपली.

एकामागुनि एक आठवुनियां लीला तिच्या प्रेमाला,

जीवाच्या सुह्रुदास सर्व कथिलीं दुःखें मनींचीं मुकीं;

"आतां सांग गडया, खरी मजवरी आहे तिची प्रीत ना ?"

तो बोले, "भलताच संशय असा कां घेसि वेडयापरी ?"

तेव्हां टाकुनि श्र्वास एक वदलों नैराश्यपूर्ण खरें,

"वर्षें दोन उणीं पुरीं उलटलीं नाहीं तिची दादही !"

झाली सांज तशी उदासह्रुदयें होतों कूठेंसा उभा ;

तों मागून कुणी हळू 'तुम्हिच कां!' ऐसें वदे मंजुळ.

सारा दाटुनि जीव लोचनिं बघे-तो तीच मागें उभी !

सोन्याचा क्षण तो कसा कुणिकडे ठेवूं असें जाहलें !

दैवाची दिलदारि ही बघुनियां बेहोष झालों मनीं;

'वेडया, होइल ती तुझीच' असला उल्हास ये दाटुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ८ मे १९२६