आम्ही कोण?

'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कवीची 'विरामचिन्हे'

('विरामचिन्हे' चे विडंबन)

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

त्याचें काव्यलेखन

शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे
(काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला!
स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला-
"काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला!" वदे!

टाकी बंद करून सर्व खिडक्या-जाळ्या, झरोके तसे
दारालाही तशीच लावित कडी आतूनबाहेरुनी!
दोस्ताला कुठल्यातरी बसविले दारावरी राखणी;
"काव्याची बघतो मिजास!" वदला अस्पष्ट काही असे!

आता कंबर बांधुनीच कवने 'पाडावया' तो बसे
वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लीत चोहीकडे!
आले धावुनि लोक सर्व! दुसरे कोणा सुचावे कसे?
चिंताक्रान्त मुखे करूनि बसले निःस्तब्ध दारापुढे!

झाला तब्बल तास! चाहुल परी काही न ये आतुनी,
सर्वांचा अगदीच धीर सुटला! कोमेजले चेहरे!
भाळी लावुनि हात कोणी वदती "मजी प्रभूची बऽऽरे!"
दृष्टी खिन्नपणे नभी वळवुनी निःश्वास टाकी कुणी!

गंभीर ध्वनि तोच आतुनि निघे! उंचावली मस्तके!
श्वासोच्छ्वास क्षणैक थांबत! मुखे रुंदावली कौतुके!
डोकावूनि बघे फटींतुनि कुणी-तो त्या दिसे अद्‌भुत!
होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत!!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कुणाच्या खांद्यावर

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे


कवी /गीतकार    -    आरती प्रभू
संगीत    -    भास्कर चंदावरकर
स्वर    -    रवींद्र साठे
चित्रपट    -    सामना

चांदराती खाडीच्या किना-यावर

निळ्या नभावर गिरिराजांची काळिभोर आकृती ,

उमटली चांदण्यात मोडती.

कांठाच्या नारळी ज्योत्स्नेंतुनि रंगति;

नस्तांत झपूर्झा ऊर्मी या खेळ्ती;

काठांस शुभ्र शुभ्र फेनहार अर्पिती !

नौका काळ्या 'डबक डबक ' या जळावरी डोलती;

मर्मरत ऊर्मि तयां चुंबिती !

वाळवंटिं पसरल्या वाळुच्या लहरी लहरी किती !

हि-यासम कण मधुनी चमकती !

युगेयुगें घेउनी लोळण पायावरी,

गिरिकडे कशाची सागर विनती करी ?

गंभीर न बघतो वळुनि मुळीं हा गिरी !

दुःख गिळुनिया अंतरिं सिंधू फेंसाळे परि वरी,

हांसतो निराश जणु वरिवरी !

चराचरावरि शुभ्र रुपेरी मोहन हें पसरलें,

मोहने जीवभाव भारले ;

अस्मान वर्षतें शीत धवलता अशी;

नसनसांत थरके लहर थंड गोडशी;

कुणि जवळ बसावें बिलगुनिया छातीशीं !

चांदरातिच्या कोंदणांत दिक्काल विसरुनी असें,

पडावें स्पर्शसुखीं धुंदसें !

दिव्य कुणी यक्षिणी येऊनी सौंदर्यक्षण असा,

अक्षयीं ठसविल का गोडसा !

चांदणें असेंच्या असें फुलुन राहिल,

गिरिपदीं स्थिरावुन राहिल सिंधूजल,

वक्षावर माझ्या मान तिची निश्चल !

भावि युगें विस्मयें पाहतिल कोरिव लेणें असें,

म्हणतिल 'झालें तरि हें कसें ?'


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ३ मार्च १९२६

स्वर्ग दोनच बोटें उरला !

चुंबणार तुला तोंची मुख हालविलेंस कीं,

आणि बिंबाधराजागीं चुंबिलें हनुलाच मी !

फसलों जरि मी ऐसा धीर ना तरि सोडतों;

स्वर्ग दोनच बोटें हा उरला मज वाटतो !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

पतंगप्रीत

तव पतंगप्रीत मजवरती
ही सोड, गडे आशा भलती !
गळ्यांत माझ्या जी झगमगते,
तेज जियेचें तुला भुलवितें,

माणिकमाला तुज जी गमते,
ते धगधगते लाल निखारे !
तूं मजसाठीं भोळीभाळी,
जाइजुंईची विणिशिल जाळी;

तुझी परंतू होइल होळी.
कुंज नसे हा असे सहारा !
स्पर्शे माझ्या कळ्या करपती,
मनास जडती जळत्या खंती.

त्यांत नको करुं आणिक भरती
दुरुन पाहिन तुझें उमलणें !
चांदरात तर कधिंच संपली,
काळरातिची वेळ उगवली;

मृत आशांचीं भुतें जमविलीं.
तूं आशा ! - तुज इथें न थारा.
पहा गुलाबी पहांट होइल,
कलिकारविकार सुखें खिदळतिल;

तुलाहि कितितरि रविकर मिळतिल,
कां कवळिसि मग अनलज्वाला ?
ही सोड, गडे आशा भलती;
तव पतंगप्रीती मजवरती !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ मार्च १९३८