नवरसमंजरी - हास्यरस

काही शाहीर एकदा उतरले साहित्यर‍नाकरी
काढाया तळिंची वरी उपसुनी अज्ञात वाक्संपदा;
आले उत्सुक होउनी रसिकही सारे किनार्‍यावरी,
ऐशी वाङ्मयपर्वणी उगवते जन्मांतुनी एकदा !

रत्‍ने आतुनि फेकुनी दिलि कुणी, कोणी समुक्तावली,
कोणी रंगित पोवळी; कुणि तशा धातु सुरम्याकृती.
दैवे लाभत 'वैजयंति' हि कुणा, कोणा परी शिंपली,
टाळ्या-हर्षनिनाद थोर घुमुनी सर्वत्र राहे तटी?

तो गर्दीतुनि दंड ठोकित पुढे आला कुणी शाहिर,
बोले गर्जुनि 'पोरखेळ कसले हे बैसला पाहत?
माझे थक्कच व्हाल पाहुनि तुम्ही चातुर्य लोकोत्तर!
ऐसे बोलुनि घेइ सागरि उडी तो देखता देखत !

संमदी उठला गभीर ध्वनि तो निःस्तब्ध झाले पुन्हा,
डोळे फाडुनि त्याकडे टकमका जो तो बघू लागला;
झाला वेळ बरच; वीर तरिही बाहेर का येइना?
येती तर्ककुतर्क! धीर अगदी कोणा नसे राहिला !

कोणा आणिल वाटले फिरुनि हा चौदाहि रत्‍ने वरी,
किंवा ओढुनि आणणार वरती वाग्देवता शारदा !
वाटे सागर कोरडा करिल हा कोणा अगस्तीपरी,
'गेला कायमचा तळी!' भय असे वाटे कुणा एकदा!

आले बुद्धुद तो तरंग उठले, डोकेहि आले वरी,
झाले लोक अधीर! प्राण बसले डोळ्यांमधे येउनी!
तेजस्वी मुखचंद्रमा मग हळू ये पूर्ण पृष्ठावरी
फाके काहितरी अपूर्व भवती कांती मनोमोहिनी!

आनंदातिशये पटापट उड्या मारून तो ओरडे,
'या रे या, मज नाचवा रसिक हो, डोक्यावरी घेउनी!
फुंका दुंदुभि वाजवा चहुंकडे मत्कीर्तिचे चौघडे,
की पृथ्वीवर आज ये मजमुळे सत्काव्यसंजीवनी!'

ऐसे बोलूनि हात तो वर करी सर्वांपुढे जो कुठे,
आले तेहतिस कोटि देव गगनी ते पाहण्या अद्‌भुत,
संपे संशयकाल, मूठ उघडे, भांडार सारे फुटे !
हाती एक दिसे 'सुनीत' तुटके!!! झाली मती कुंठित!

हास्याचा उठला तदा खदखदा कल्लोळ विश्वातुनी,
आकाशी सुर लागले गडबडा हासून लोळावया!
मेलेले मुडदेहि ताठ उठले तात्काळ गर्तेतुनी,
दातांच्या कवट्या 'सुनीत' वदुनी हासावया लागल्या !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - वत्सलरस

बहुत दिवसांनी लांबुनी कुठून
येति भेटाया संतकवी दोन
भरुनि आली तो नयनि प्रेमगंगा,
जशी वर्षाकाळात चंद्रभागा !

एकमेका कवळिती बाहुपाशी
मिठ्या प्रेमाने घालती गळ्याशी,
हसुनि पुसती हलकेच कुशल प्रश्ना,
'काव्यप्रसुती जाहली किती कोणा?

दंग झाले मग काव्यविनोदात
एकमेका विसरले बोलण्यात
श्लेष, कोट्या, रूपके, अलंकार,
किती झाली, त्याला न मुळी पार !

तालसूरावर करुनि हातवारे,
गायनाचे मग सोडती फवारे,
ऐन ब्रह्मानंदात टाळि लागे,
जाति विसरुनि देहास पार दोघे !

जवळ सरकत मग हळूहळू येती,
एकमेकां सप्रेम डंवचताती!
घेति चिमटे चिमकुर्‍या हळुच तैशा,
बालक्रीडा त्या वर्णु तरी कैशा?

चापट्याही लागले मारण्याला,
आणि प्रेमाने तसे चावण्याला
खालि पाडुनि एकास मग अखेर,
वीर त्यावरि जाहला दुजा स्वार !

मिशा ओढुनि, घेऊन गालगुच्चा,
'बरा सापडला!' म्हणे 'अरे लुच्चा'
'नाही आता देणार हलूसुद्धा,
लबाडा, का पोटात मारु गुद्दा?'

बाळलीला चालल्या त्या अशाच,
नको वर्णन ते! करा कल्पनाच,
खरे इतुके पण, प्रौढता निमाली,
आणि भरती वात्सल्यरसा आली!

कुणा कविची सुप्रिया रसिक कांता,
हाय, दुर्दैवे कालवशा होता;
पडे त्यावरि आकाश कोसळून,
म्हणे, 'आता करु काय तरि जगून?'

'आत्महत्या जरि करू तरी पाप,
दोन बच्चांचा आणि त्यात बाप!
आजपासुनि करतोच प्रतिज्ञाही,
लग्नबंधी पडणार पुन्हा नाही!

तिच्या नावाची घेउनिया माळ;
क्रमिन आता मी कसाबसा काळ;
तिच्यावाचुनि गाणार दुजे नाही,
काव्यस्फूर्ती वाहीन तिच्या पायी!!'

दोन महिने पुरते न यास झाले,
तोच लग्नाचे दुष्ट दिवस आले,
बँण्डताशाचा नाद कानि आला,
भीष्मकविचा थरकाप उडुनि गेला !

तोच स्वप्नी येऊन म्हणे कांता,
'हाल तुमचे मज बघवती न नाथा !
मुलांचीही होतसे फार दैना,
प्रिया, फिरुनी संसार थाटवाना !'

मृतात्म्याचे आज्ञेस अप्रमाण,
मानणारा चांदाळ असे कोण?
भीष्मकविने दुसर्‍याच मुहूर्ताला,
प्रियेसाठी निजव्रतत्याग केला !

कुणी म्हणती, 'भुललाच कवि सुखाला!'
काय बोलाया होतसे टवाळा !
करी तत्त्वाचा त्याग प्रियेसाठी,
समाजाची नच त्यास लाज खोटी !

दुजी भार्या स्वर्लोकि तोच गेली,
फिरुनि आज्ञा आणखी तीच झाली!
दोन आत्म्यांचा हुकुम पाळण्याला!
जोर दुप्पट भीष्मास अता आला!

असो; झाली जरि कितिहि वेळ आज्ञा!
भीष्म नाही करणार तरि अवज्ञा !
दिसो कोणा 'बीभत्सरस' हि यात,
प्रेमगंगा परि असे आत गुप्त!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - रौद्ररस

फोटो काढविणे तशांत मग तो छापावया मासिकी,
कोणाला न रुचे? नकोच कविची बोलावया गोष्ट क!
होता एक प्रसंग मंगल असा संपादकाचे घरी,
आले शाहिर थोरथोर सगळे आशाळभूतापरी!

फोटोग्राफर त्या नियुक्तसमयी पाचारि स्थानांवर,
ईर्षेने सरसावुनी सकल तो धाविन्नले शाहिर !
आता प्रश्न पडे महा बिकट हा, कोठे कुणी बैसणे,
'मी येथे बसणार ! मान पहिला माझाच!' जो तो म्हणे!

'आहे मी तर वाल्मिकी, वसतसे श्रीशारदा मन्मुखी!'
बोले एक, तया दुजा वदतसे, 'मी व्यास प्रत्यक्ष की!'
'हा येथे कवि कालिदास असता बाता नज्का या करू'
बोले गर्जुनी वीर एक तिसरा वाग्युद्ध झाले सुरू.

पद्याला विसरून येति सगळे शाहीर गद्यावर,
झाले कत्तल गद्य!येति मग ते वाग्वीर गुद्द्यावर!
कैलासेश्वर रौद्र रूप धरितो विश्वान्तकाली जसे,
वाग्देवीसुत भासले मज तदा रौद्रस्वरूपी तसे!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - अद्‌भुतरस

सरस्वतीचा कवि हा सेवक,
बंदा नोकर आज्ञाधारक.
तिचा आज परि होई मालक
का नच अद्‌भुत हे?

सरळ येइना रेघ ओढता
शुद्ध न येई शब्द बोलता,
तरि कवयित्री कविची कांता
का नच अद्‌भुत हे?

आत्मस्तुतिचे कविस वावडे,
परि काव्याची घेउनि बाडे,
हिंडे दारोदार चहुंकडे
का नच अद्‌भुत हे?

स्फूर्तिनिर्मिता कविता म्हणती,
रोज होत परि काव्योत्पत्ती
स्फूर्तीचा बाजार मांडती
का नच अद्‌भुत हे?

शब्दसृष्टिचे हे परमेश्वर,
वाग्देवीसेवेला सादर.
'शब्दा'स्तव परि करिती संगर,
का नच अद्‍भुत हे?

शिष्यत्वाला नक्कल म्हणती,
परी भामटे जमवुनि भवती
स्वता सिद्धसाधकता करिती,
का नच अद्‍भुत हे?

गुलामगिरिचा छाप कपाळी
खर्डे घासुनि बोटे काळी,
तरि दास्याची करी टवाळी,
का नच अद्‌भुत हे?

स्तुतिपाठक ते रसिक तेवढे,
स्पष्टभाषिणी शत्रु बापुडे;
सत्याचे परि गाति पवाडे,
का नच अद्‌भुत हे?

पायापुरती यांची सृष्टी,
समोर जे जे त्यावर दृष्टी,
विश्वबंधुता तोंडी नुसती,
का नच अद्‌भुत हे?

कुठेहि रसिका, टाकी भोवती दृष्टि सांप्रत
दिसेल तुजला तेथे असले तरि 'अद्‌भुत.'


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - शांतरस

जेव्हा होतिल शब्द धेडगुजरी भाषेतुनी नाहिसे,
बुद्धीचे 'अरबी' समुद्र सगळे जातील की आटुनी!
स्फूर्तीच्या गिरण्याहि बंद सगळ्या होतील काव्यांतुनी
शांतीचे झरतील निर्झर तदा स्वच्छंद पीयूषसे!

जेव्हा होतिल ते पसार सगळे शाहिरकंपू कुठे,
काव्याचीहि खलास होइल सदा पैदास साप्ताहिकी!
जेव्हा बेचव अर्थशून्य सु (शु?) निते भुकेल कोणी न की,
तेव्हा शांतिरसाभिषिंचित अहा ! होतील सारस्वते!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

श्यामले

तू छोकरी, नहि सुन्दरी । मिष्कील बाल चिचुन्दरी,
काळा कडा मी फत्तरी । तू काश्मिरांतिल गुल-दरी !
पाताळिंचा सैतान मी । अल्लाघरींची तू परी,
तू मद्रदेशिय श्यामला । मी तो फकीर कलन्दरी !

मैदान मी थरर्पाकरी । तू भुमि पिकाळ 'गुर्जरी,
अरबी समुद्रहि मी जरी । तू कुद्रती रसनिर्झरी !
आषाढिंचा अन्धार मी । तू फाल्गुनी मधुशर्वरी !
खग्रास चंद्र मलीन मी । तू कोर ताशोव सिल्व्हरी !

बेसूर राठ 'सुनीत' मी । कविता चतुर्दश तू खरी,
'हैदोस' कर्कश मी जरी । 'अल्लाहु अक्बर' तू तरी!
माजूम मी, तू याकुती । मी हिङ्ग काबुलि; तू मिरी,
अन् भाङ्ग तू चण्डोल' मी, । गोडेल मी, तू मोहरी !

मी तो पिठ्यातील बेवडा । व्हिस्कीतली तू माधुरी,
काडेचिराइत मी कडू । तू बालिका खडिसाखरी
पँटीस तू, कटलेट मी । आँम्लेट मी, तू सागुती,
कांदे-बटाटे-भात मी । मुर्गी बिर्‍यानी तू परी !

अक्रोड मी कन्दाहरी । तू साहर्‍यातील खर्जुरी,
इस्तम्बुलीय अबीर मी । नेपाळची तू कस्तुरी !
मी घोङ्गडे अन् लक्तरी । मख्मूल तू मउ भर्जरी,
बेडौल वक्र त्रिकोण मी । तू लम्बवर्तुळ गे परी ।

तू वाढली कितीही जरी । मज वाटसी पण छोकरी,
जरी मूल हे कमरेवरी । तरी तू मला छकुल्यापरी !
गाम्भीर्य आणि वयस्कता । जरि ही तुझ्या मुखड्यावरी,
स्मरते मला तव सानुली । मूर्ती मनोहर पर्करी !

लव हासरी, लव लाजरी । लव कावरी, लव बावरी,
चिनिमातिची जणु बाहुली । मउ शुभ्र, सफेत नि पांढरी !
चल सोनुले, छकुले, घरी । वात्सल्य गे दाटे उरी,
निर्दोष तो देशील का । पापा छुपा फिरुनी तरी?

तू दोन इच्च जरी दुरी । फलाङ्ग भाससि गे परी,
चल श्यामले, म्हणूनी घरी ! बसु खेटुनी जवळी तरी !
घे माडगे, घे गाडगे । घे गुलचमन् घे वाडगे,
ताम्बूल घे, आम्बील घे, । घे भाकरी, घे खापरी !
किति थाम्बु मी? म्हण 'होय' ना । खचली उमेद बरी उरी,
झिडकारुनी मजला परी । मत्प्रीतिचा न 'खिमा' करी !




कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें
वृत्त - तुङ्गभद्रा, मिथुनराशी, राक्षसगणी

पाय घसरला तर-?'


भाउजी - चल जपून अगदी वहिनी,!
               हे बोट घट्ट मम धरुनी । तव करी, ।
              हा बुधवारातिल रस्ता, ।
              रविवार त्यातुनी असता । आजला ।
             आबाल-वृद्ध नर-नारी, ।
              चालली जुन्या बाजारी । सकल ही ।

गे म्हणून । बोट हे धरून । पदर आवरून ।
चाल हळुहळु तू ।
घसरला पाय तर 'छीःथू' । होइल ।

चोरिची 'बुके' विकण्याला, ।
बेकार छात्रगण सुटला । या स्थळी ।
हे तसे प्रौढ विद्यार्थी, ।
कसलिशी खरेदी करिती । पुस्तके ।
फिरवीत नजर चोहिंकडे ।

बघ बडबडी ही धेंडे । चालली ।
मागुनी । हळुच ढकलुनी । जाइलहि कुणी;
राहि सावध तू ।
घसरला पाय तरी 'छीः थू' । होइल ।

'कमिटी चे' नोकर आणी ।
रस्त्यावर गेले पाणी । टाकुनी ।
जोडाहि घातला त्यात ।
गादिचा मऊ पायात । नवनवा ।
लुगडेहि टोपपदराचे, ।
रेशमी भडक काठाचे । नेसले ।
हळु चाल । नातरी चिखल । पाठ भरवील ।
राहि सावध तू
घसरला पाय तर "छीःथू' । होइल ।

वहिनी - होणार असे जरि 'छीःथू' ।
             होउ द्या ! धरु नका किंतू । भाउजी ।
             मी बोलुनिचालुनि अबला ।
             चुकुनिया पाय जरि पडला । नवल ना ।
            परि शौर्य-मेरु जे अढळ, ।

शक्तीचे दगडी' पूल । पुरुष ते ।
निसटून । मुळापासुन । पडति गडगडून ।
तरीहि परंतू ।
कोणिही तयांची 'छीःथू' । करित ना ।

जरि असलो दुबळ्या आम्ही ।
परि नाही म्हणू ज्या कामी । नाहि ते ।
'स्वैपाक आज ना' म्हटले ।
तो, कसे कचेरित गेले । चुंबित ।
'नाही मी झाडित' वदले, ।
तो, केरसुणीसह उठले । झाडण्या ।
परि तुम्ही । बहिष्कारुनी । शिक्षणा फिरुनी ।
जरी शाळेत ।
जाता, तरि 'छीःथू' करित । ना कुणी ।

जरि कजाग आम्ही असलो, ।
भांडण्या कामि कसलेलो, । खंबिर ।
चिमकुर्‍या,चापट्या, चिमटे,
घेतले जरी आम्ही ते । आमुचे ।
परि 'तिकडे' त्याची दाद ।
मागाया जाउ न याद । ही धरा
पण तुम्ही । बहिष्कारुनी । न्यायगृही फिरुनी ।
उघड जाताना ।
तरि "छीःथू' करण्या कोणा । धैर्य ना ।

ते 'पिंगे' 'फेर' धराया, ।
आहोत न आम्ही का या । तत्पर ।
मर्दासम मर्दचि दिसता, ।
ते फेर कशाचे धरिता । नाचरे ।
विसरलात 'मारुनि-मरणें, ।
आणिलेत 'घुसुनी-रुसणें' । बायकी ।
नादान । उघड होऊन । कौन्सिलांतून ।
मिरवण्या बघता ।
तरि होउनि 'छीःथू' लाथा । मिळति ना ।

वहिनीच्या ऐकुनि बोला ।
भरुनिया कंठ गद्गदला ! भाउजी ।
डोळ्यांत आसवे आली, ।
परि रुमाल नव्हता जवळी । त्याचिया ।
सरकली स्मृतीच्या पुढुनी, ।
ती शाळा कोर्टे,-आणी । कौन्सिले ।
भडभडून । गळा काढून । (लाज सोडून)
बोलला बोल, ।
'घसरला पाय तर छीःथू । होइल'

त्या गोंगाटात परंतु ।
'घसरला पाय तर छीःथू-' । शब्द हे ।
तडफडुनी वरती उठले ।
बुरुजांतुनि फुटक्या घुमले । क्षणभरी ।
चिवड्यांचे गाणे गरम !
क्षणमात्रच पडले नरम । तेधवा ।
तुम्हि जरी । जुन्या बाजारि । जाल कधि तरी ।
तरी ऐकाल । 'घसरला पाय तर छीःथू' । होइल ।'


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें