हृदयाकाशी मेघराशी

हृदयाकाशी मेघराशी
आल्या का जमून
हृदयाकाश त्यांच्या भारे
सारे गेले नमून।।

येणार आहे स्वामि माझा
येणार आहे राजा माझा
त्याच्यासाठी म्हणून
मनोमंदिर धुवून टाकिन
निर्मळ ठेविन करून।। हृदया....।।

कामक्रोधांच्या वटवाघळांनी
नाना वासनांच्या उंदिरघुशींनी
घाण ठेवली करून
धुवायाला मेघधारा
आल्या भरभरून।। हृदया....।।

अंतर्बाह्य होवो वृष्टी
भरो हृदय भरो दृष्टी
मळ जावो झडून
काने कोपरे शुद्ध होवो
मळ न राहो दडून।। हृदया....।।

हृदय निर्मळ शरीर निर्मळ
बुद्धि निर्मळ दृष्टी निर्मळ
जीवन निर्मळ बघून
प्रसन्न होइल प्राणसखा
हृदयिं ठेविल धरून।। हृदया....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३२

देवा! झुरतो तव हा दास

देवा! झुरतो तव हा दास
करितो जरि सायास।। देवा....।।

वापीजवळी बाळ जाउन
आत पाहतो डोकावून
माता येई हळूच मागुन
प्रेमे उचली त्यास।। देवा....।।

मोहाजवळी देवा जाता
का न पकडशी माझ्या हाता
असुनी सकल जगाची माता
का मजशीच उदास।। देवा....।।

धी- बलवैभव माते नलगे
जनगौरव- यश माते नलगे
एक मागणे तुजला मागे
दे निर्मळ हृदयास।। देवा....।।

लहानसा दंवबिंदु साठवी
विमल निजांतरि तेजोमय रवि
तेवि तुला मी निर्मल हृदयी
ऐशी मजला आस।। देवा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

प्रभु! सतत मदंतर हासू दे

प्रभु! सतत मदंतर हासू दे।।
तुझ्या कृपेचा वसंतवारा
जीवनवनि मम नाचू दे।। प्रभु....।।

विश्वग्रंथी पानोपानी
दृष्टि तुजचि मम वाचू दे।। प्रभु....।।

ठायी ठायी तुजला पाहुन
उचंबळुन मन जाउ दे।। प्रभु....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

जागृत हो माझ्या रामा!

जागृत हो माझ्या रामा!
हे हृदयस्था! सुखधामा!।। जागृत....।।

तू भक्तजना आधार
तू ब्रह्मांडा आधार
हरि सकल मोहअंधार
जलदश्यामा!।। जागृत....।।

करि मन्मति निर्मळ पूत
भरि भक्ती ओतप्रोत
त्वद्ध्यान लागु दिनरात्र
सद्विश्रामा!।। जागृत....।।

लाविले तुजकडे डोळे
शतवार जाहले ओले
हे हृदय किती गहिवरले
घेता नामा।। जागृत....।।

मज नको मान धन कीर्ती
मज लौकिकाचि ना प्रीती
निज दाखव मंगल मूर्ती
पुरवी कामा।। जागृत....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

हे नाथ! येईन तव नित्य कामी

हे नाथ! येईन तव नित्य कामी।।
भवदीय इच्छा
प्रकटीन कर्मी
अश्रांत अत्यंत करिन श्रमा मी।। हे....।।

सुखवीन हे लोक
हरुनी मन:शोक
झिदवीन काया प्रमोदे सदा मी।। हे....।।

अश्रू पुसावे
जन हासवावे
याहून नाही जगी काहि नामी।। हे....।।

वितळून जाईन
जशि मेणबत्ती
देईन अल्प प्रकाशा तरी मी।। हे....।।

चित्ता शिवो स्वार्थ
न कधीहि देवा
न जडो कधी जीव मणि-भूमि-हेमी।। हे....।।

स्मरुनी सदा मी
तुज चित्ति वागेन
तुजवीण नाही कुणी अन्य स्वामी।। हे....।।

निरपेक्ष सेवा
खरि तीच पूजा
अर्पीन ती त्वत्पदाला सदा मी।। हे....।।

इच्छा असे हीच
पुरवून ती तूच
ने दास अंती तुझ्या दिव्य धामी।। हे....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

हे तात! दे हात करुणासमुद्रा

हे तात! दे हात करुणासमुद्रा।।
निज मग्न कर्मात
जग सर्व हे नित्य
पाहील कुणि ना मम म्लान मुद्रा।। हे तात....।।

होई सुधासिंधु
होई दयाइंदु
होई मला गोड माहेर रुद्रा!।। हे तात....।।

शिवो ना अमांगल्य
मजला शिवेशा!
अभद्र धरो जीव हा ना, सु-भद्रा!।। हे तात....।।

प्रभु! जे खरे थोर
देती सदा धीर
सांभाळिती ते हता दीनक्षुद्रा।। हे तात....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

तुजवीण अधार मज कोणि नाही

तुजवीण अधार मज कोणि नाही।।
पथ कोण दावील
कर कोण घेईल
नेईल सांभाळुनी कोण, आई!।। तुजवीण....।।

बघतो तुझी वाट
नयनांतानी पाट
गळा दाटतो सांगु तुजलागि कायी।। तुजवीण....।।

हसतात सारे
न दया कुणा रे
दिशा शून्य राया! तुझ्यावीण दाही।। तुजवीण....।।

पथि मी उभा रे
हसतात सारे
मला होटिती, मी रडे धायिधायी।। तुजवीण....।।

जग मत्त हे जात
नत मी उभा तात!
ये हात धरुनी मला नीट नेई।। तुजवीण....।।

कधिही तुझ्यावीण
पद मी न टाकीन
जावो जरी जन्म हा सर्व जाई।। तुजवीण....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

कापनी

आतां लागे मार्गेसर

आली कापनी कापनी

आज करे खालेवर्‍हे

डाव्या डोयाची पापनी

पडले जमीनीले तढे

आली कापनी कापनी

तशी माझ्या डोयापुढें

उभी दान्याची मापनी

शेत पिवये धम्मक

आली कापनी कापनी

आतां धरा रे हिंमत

इय्ये ठेवा पाजवुनी

पिकं पिवये पिवये

आली कापनी कापनी

हातामधी धरा इय्ये

खाले ठेवा रे गोफनी

काप काप माझ्या इय्या,

आली कापनी कापनी

थाप लागली पीकाची

आली डोयाले झांपनी

आली पुढें रगडनी

आतां कापनी कापनी

खये करा रे तय्यार

हातीं घीसन चोपनी

माझी कापनी कापनी

देवा तुझी रे मापनी

माझ्या दैवाची करनी

माझ्या जीवाची भरनी


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

काही कळेना, काही वळेना

काही कळेना, काही वळेना।।
निरभ्रशा अकाशात
कुठूनशी अभ्रे येत
झणी सूर्य झाकोळीत
तेज ते पडेना।। काही....।।

जरा वरी येई मोड
कुठूनशी तो ये कीड
खाइ अंकुराला गोड
वाढ ती घडेना।। काही....।।

पतंग जो वरती जाई
तोच उलट वारा येई
क्षणामध्ये गोता खाई
तो वरी चढेना।। काही....।।

मला गमे तोची आला
उठे मिठी मारायला
परी भास सारा ठरला
तो कधी मिळेना।। काही....।।

अशी निराशा ही फार
जीव होइ हा बेजार
लोचनीचि अश्रूधार
ही कधी सुकेना।। काही....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, एप्रिल १९३४

आईचा मार

आई! आई! तू मज मार मार।।

मारुन मारुन मजला रडवी
चाबुक उडवुन रक्ता उडवी
लावी मन्नयनांस धार।। आई....।।

लाल तुझ्या परि दृष्टीखाली
प्रेमसुधेची गंगा भरली
दिसते गे अपरंपार।। आई....।।

मारुन मारुन तूची रडशिल
जवळी ओढुन मजला घेशिल
तुज दु:ख होईल फार।। आई....।।

माडीवरती मज बसवशिल
हनुवट धरुनी मज हसवशिल
घेशिल मुके वारंवार।। आई....।।

प्रेमे तुजला मी बिलगेन
तव अश्रूंचे मजला स्नान
हरपेल मम दु:खभार।। आई....।।

आई! तुझा मज रुचतो मार
त्याहुन नाहि दुजे मज प्यार
मारुन मारुन तार
मारुन करि उद्धार।। आई....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

दिव्य आनंद

दिव्य आनंद
मन्मना एक गोविंद।।

विषयवासना मम मावळली
सकल अहंता माझी गळली
वृत्ती प्रभोरूपोन्मुख वळली
न दुजा छंद।। मन्मना....।।

ख-या सुखाचा झरा मिळाला
भेदभाव तो सकल निमाला
आज तपस्या येइ फळाला
तुटले बंध।। मन्मना....।।

भावभक्तिची गंगा भरली
ज्ञानपंकजे सुंदर फुलली
अपार शांती हृदयी जमली
सुटला गंध।। मन्मना....।।

सम मम आता डोळे उभय
सम मम आता प्रेमळ हृदय
परम सुखाया झाला उदय
मी निष्पंद।। मन्मना....।।

शांत समीरण, शांत अंबर
शांत धरित्री, शांत मदंतर
रहावया येतसे निरंतर
गोड मुकुंद।। मन्मना....।।

अता जगाची सेवा करित
दीनदु:खितां हृदयी धरित
नेइन जीवन हे उर्वरित
मी स्वच्छंद।। मन्मना....।।

अशांत अस्थिर लोकां पाहुन
तळमळती हे माझे प्राण
त्यांना आता नेउन देइन
सच्चित्कंद।। मन्मना....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

कैसे लावियले मी दार

पडला हा अंधार
कैसे लावियले मी दार
सौंदर्साने सृष्टी सजली
संगीताने सृष्टी भरली
दृष्टी परी मी माझी मिटिली
दिसले मजला ना सार।। कैसे....।।

तरु डोलती वेल नाचती
उत्साहाच्या अखंड मूर्ती
आनंदाची जगी निर्मिती
सतत हो करणार।। कैसे....।।

निर्मल सुंदर पुष्पे फुलती
परिमल देती लघु जरि दिसती
प्रकाश धरणीवरी उधळिती
सदैव ती हसणार।। कैसे....।।

पहा पाखरे मूर्तानंद
किती त्यांचे ते सुंदर रंग
किलबिल ऐकुन किती तरंग
सहृदय-मनि उठणार।। कैसे....।।

नभी तारका सदा चमकती
सागरावरी लहरी हसती
डोळे अमुचे जरि हे बघती
वृत्ति उचंबळणार।। कैसे....।।

सुंदर साधे चिमणे गवत
वसुंधरेला ते नटवीत
दृष्टी जगाची ते निववीत
हिरवे हिरवे गार।। कैसे....।।

विश्वामधला प्रत्येक कण
जगात फेकी प्रकाशकिरण
प्रकाशमोदे कोंदे त्रिभुवन
घेइ न तोचि भिकार।। कैसे....।।

कृतज्ञतेचा सद्भावाचा
स्नेहाचा नि:स्वार्थ प्रीतिचा
भक्तीचा निष्पाप अश्रुचा
प्रकाश अपरंपार।। कैसे....।।

जगात भरले रमणीयत्व
जगात भरले असे शिवत्व
जगात भरलेसे सत्यत्व
कोण परी बघणार।। कैसे....।।

मनुज-मानसी डोकावून
खोल असे जो सदंश बघुन
झालो केव्हाहि न तल्लीन
केला मी धिक्कार।। कैसे....।।

वृत्ति करोनी निज अनुदार
रागावोनी सकळ जगावर
काय साधले अहा खरोखर
झालो मी भूभार।। कैसे....।।

पायांपाशी माणिकमोती
प्रकाशसिंधू सदा सभोती
भिकार तिमिरी केली वस्ती
आणि अता रडणार।। कैसे....।।

अश्रूंचे बांधिले बंगले
तिमिराचे गालिचे पसरिले
नैराश्याचे गाणे रचिले
केला हाहा:कार।। कैसे....।।

जगापासुनी गेलो दूर
मोदा सोडुन गेलो दूर
प्रकाश सोडुन गेलो दूर
आणि पुन्हा झुरणार।। कैसे....।।

शोके आता भरतो ऊर
जिवास आता सदैव हुरहुर
कशांस आता करु मी कुरकुर
झाले जे होणार।। कैसे....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑक्टों. १९३०

हस रे माझ्या मुला!

वारा वदे
कानामधे
गीत गाइन तुला
ताप हरिन
शाति देइन
हस रे माझ्या मुला।।

चिमणी येउन
नाचून बागडून
काय म्हणे मला
चिवचिव करिन
चिंता हरिन
हस रे माझ्या मुला।।

हिरवे हिरवे
डोले बरवे
झाड बोले मला
छाया देइन
फळफूल येइन
हस रे माझ्या मुला।।

सुमन वदे
मोठ्या मोदे
प्रेम देइन तुला
गंध देइन रंग दाविन
हस रे माझ्या मुला।।

रवी शशी
ताराराशी
दिव्य दाविन तुला
देईन प्रकाश
बोले आकाश
हस रे माझ्या मुला।।

पाऊस पडेल
पृथ्वि फुलेल
मेघ म्हणे मला
नद्यानाले
बघशील भरले
हस रे माझ्या मुला।।

हिरवे हिरवे
कोमल रवे
तृण म्हणे मला
माझ्यावरी
शयन करी
हस रे माझ्या मुला।।

जेथे जाइन
जेथे पाहिन
ऐकू ये मला
रडू नको
रुसू नको
हस रे माझ्या मुला।।

पदोपदी
अश्रु काढी
कुणि न बोलला
सृष्टी सारी
मंत्र उच्चरी
हस रे माझ्या मुला।।

माझ्या अश्रुंनो
माझ्या मित्रांनो
खोलिमध्ये चला
दार घेऊ लावुन
या तुम्हि धावून
तुम्हिच हसवाल मला।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

झुरतो मी रात्रंदिवस

होतो मी कासावीस। झुरतो मी रात्रंदिवस।।
श्रद्धेच्या दुबळ्या हाती। त्वत्प्रकाश धरण्या बघतो
बाळ जसा भूमीवरुनी। चंद्राला धरण्या धजतो
अंधारामधुनी देवा। त्वन्निकट यावया झटतो
मूल मी कळेना काही
कावराबावरा होई
डोळ्यांना पाणी येई
अंतरी तुझा मज ध्यास।। झुरतो....।।

त्वत्प्रसाद मज लाभेल। होती मम हृदयी आशा
तू प्रेम मला देशील। होती मम हृदयी आशा
तू पोटाशी धरशील। होती मम हृदयी आशा
परि माय माउली रुसली
या बाळावर रागवली
ती येईना मुळि जवळी
ये माझ्याजवळी बैस।। झुरतो....।।

रात्रीच्या समयी शांत। सळसळती तरुची पाने
मी खिडकीपाशी जात। सोत्कंठ बघे नयनाने
प्रभु माझा बहुधा येतो। घेतली धाव का त्याने
बाहेर खिडकीच्या हात
धरण्याला त्याचा हात
मी काढितसे सोत्कंठ
ठरला परि केवळ भास।। झुरतो....।।

आकाशी बघुनी तारे। गहिवरते माझे हृदय
हे थोर थोर पुण्यात्मे। का करिति प्रभुस न सदय
दिसती न तयांना काय। अश्रू मन्नेत्रि जे उभय
हे मंगल निर्मळ तारे
कथितिल प्रभुला सारे
हृदयातिल माझे वारे
बाळगितो ही मनि आस।। झुरतो....।।

प्रभु आला ऐसे वाटे। तो दिसे निबिड अंधार
हृदयात जरा आनंद। तोच येइ शोका पूर
सुमनांचा वाटे हार। तो करित भुजंग फुत्कार
रडकुंडिस येई जीव
कोमेजे हृद्राजीव
करितो न प्रभुजी कींव
प्राशावे वाटे वीष।। झुरतो....।।

पंकांतुन यावे वरती। रमणीय सुगंधी कमळे
भूमीतुन यावे वरती। अंकुरे मृदुल तेजाळे
दु:खनिराशेतुन तेवी। उघडी मम आशा डोळे
परि हिमे कमळ नासावे
अंकुरा किडीने खावे
आशेने अस्ता जावे
दु:खाची देउन रास।। झुरतो....।।

आसनिराशेचा खेळ। खेळुनी खेळुनी दमलो
वंचना पाहुनी माझी। सतत मी प्रभुजी श्रमलो
हुंदके देउन देवा! ढसाढसा कितिकदा रडलो
तुज पाझर देवा फुटु दे
त्वन्मूर्ति मजसि भेटू दे
त्वच्चरण मजसि भिजवू दे
हसवी हा रडका दास।। झुरतो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

काय सांगू देवा, कोणा सांगू?

काय सांगू देवा, कोणा सांगू?।।

माझ्या चित्ता आता नाही मुळी धीर
रात्रंदिन वाहे डोळ्यांतून नीर
तुजला वाटे काय माझी चीरचीर।। काय....।।

धूळीमध्ये गेले तनमन मळून
तूझ्या अमृतहाते टाकी रे धुवून
तूझ्या पायाजवळी ठेवी मग निजवून।। काय....।।

कुविकारांची थंडी टाकी गारठवून
नाही नाही काही मजला संरक्षण
तूझा शेला देवा घाली पांघरूण।। काय....।।

मेघावीण कैसा नाचेल रे मोर
चंद्रावीण कैसा हासेल चकोर
आईवीण सांग कोठे जाइल पोर।। काय....।।

तूझा एक देवा! अनाथा आधार
भक्तांचा तू सतत चालवितोसि भार
म्हणुनी आलो तूझे शोधित शोधित दार।। काय....।।

माते! मंगलमूर्ते! उघडी आता दार
माझ्या शोका नाही, आई! अंत पार
तूझ्या बाळा आता तार किंवा मार।। काय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

नमस्कार

असो तुला देवा माझा सदा नमस्कार
कसा होउ उतराई मी काय बोलु फार।। असो....।।

दिले निळे आकाश तसे चंद्र सूर्य तारे
दिले जीवनाधार असे दिवारात्र वारे
सरसरित्सागर दिधले कितिक तू उदार।। असो....।।

वसुंधरा सुंदर दिधली श्रमामूर्ति माय
हिरवि हिरवि सृष्टी दिधली दृष्टि तृप्त होय
फुले फळे धान्ये देउन चालविशि भार।। असो....।।

माय बाप बंधू भगिनी आप्त सखे स्नेही
दिले प्रेम त्यांचे म्हणुनी सकळ सह्य होई
कृतज्ञता मैत्री प्रीती तू दिलीस थोर।। असो....।।

तसा देह अव्यंग दिला हृदयी दिलेस
बुद्धिची दिली देणगि रे केवि वर्णु तीस
अशा साधनांनी तरि ते दिसो तुझे दार।। असो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

गाडी धीरे धीरे हाक

गाडी धीरे धीरे हाक।
बाबा धीरे धीरे हाक
धीरे धीरे हाक।। गाडी....।।

बैलांना तू फार न मारी
प्रेमे त्यांना तू चुचकारी
प्रेमाची जी बळकट दोरी
तीने त्यांना राख।। गाडी....।।

हाती परि तद्गती असावी
म्हणुनी वेसण ती घालावी
त्यामना परि ती कळू न द्यावी
टोचावे हळु नाक।। गाडी....।।

ठेवी अपुले प्रसन्न बैल
घाली पाठीवरती झूल
केवळ सोडी परी न सैल
वाटू दे तव धाक।। गाडी....।।

गाडी बाबा मजबुत ठेवी
उत्साहाचे ओंगण देई
मार्गी ती ना मोडुन जावी
धैर्ये पुढती ठाक।। गाडी....।।

सावध राहुन पंथा पाही
असतिल खळगे ठायीठायी
गाडी जाइल खाली पाही
करि न डोळेझाक।। गाडी....।।

अंधारी ना मार्ग दिसेल
गाडी पुढती तुझी घुसेल
असेल दलदल तिथे फसेल
रुतेल बाबा चाक।। गाडी....।।

चाक रुते तरि खांदा देई
निराश मुळि ना चित्ती होई
हृदयी भगवंताला ध्याई
करुणा त्याची भाक।। गाडी....।।

चोरहि येतिल व्याघ्रहि येतिल
बैल बुजोनी तूही भीशिल
भिऊ नको तो स्वामी येइल
मारी त्याला हाक।। गाडी....।।

पथि कंटाळा जरि कधि येई
गोड प्रभुची गाणी गाई
भूक लागली तरि तू खाई
भक्तीचा मधुपाक।। गाडी....।।

संतजनांच्या उपदेशाचा
भगवंताच्या मधु नामाचा
चारा बैला देई साचा
दिसतिल तेजे झाक।। गाडी....।।

मार्ग क्रमिता ऐसा बापा
पावशील ना पापातापा
प्रवास सुखकर होइल सोपा
चिंता सारी टाक।। गाडी....।।

इष्टस्थाना मग तू जाशिल
प्राप्तव्य तुझे तुला मिळेल
सौख्याने मन वोसंडेल
दिव्यानंदा चाख।। गाडी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

आशानिराशा

पतीत खिन्न अति दु:खी उदासीन
तळमळे जीव जैसा जळावीण मीन।।
कोठे जाऊ कोणा पाहू निराधार बाळ
अश्रूंनी ओले झाले माझे दोन्ही गाल

मदीय हृदयात निराशेचा सूर
अंधार सभोवती भरलासे भेसूर
मनोरथमुकुलांचा माझ्या झाला नाश
तिळभर उरलि नाही मला मुळि आस

आकांक्षा स्वप्ने जणू माझी स्वार्थमूल
म्हणून काय आज पडली खात धूळ
भिकारि जरि केली इतकी मी वणवण
रिकामि झोळी माझी जवळ नाही कण

लाजेने मरतो मी दावु कुणा मुख
या जन्मि नाहि जणु मजलागि सुख
कशाला मी राहु जगि फेकु दे हे प्राण
मनी म्हणे असे तोचि ऐकु येइ गान

अनंत सिंधुमध्ये मिळावा फलक
अपार अंधारात दिसावी झलक
तान्हेल्याला लाभावी पाण्याची चुळुक
घामाघूम झालेल्याला वा-याची झुळुक

तसा मला ऐकु आला शब्द मोठा गोड
दाखवु लागला मला माझ्या सौभाग्याचा मोड
‘विकारांची वासनांची तुझ्या झाली राख
आकांक्षा मनोरथ जे जे झाले खाक

त्यातून तो बघ दिसतो येत आहे वर
आशेचा प्रकाशाचा अंकुर सुंदर
भविष्य बघ तुझा सुंदर उज्ज्वल
निराश नको होऊ सोस थोडी कळ

प्रेमाचे पावित्र्याचे पल्लव फुटतील
सेवेची त्यागाची फुले फुलतील
प्रशांत शांतिची फळे लागतील
तुझ्या मनोवृत्ति मुला मोदे डोलतील

पूस पूस अश्रू सारे हास रे बाळा हास
तुझ्या भविष्याचा बघ येतो गोड वास’
कुणि तरि हृदयात बोले असा सूर
‘हुरहुर नको करु बाळा! जाईल दैन्य दूर’

निराशेतून असे येति आशेचे किरण
आशा जाउन पुन्हा घेरि निराशा भीषण
आशानिराशांच्या अशा लाटांवर मीन
खाली वर होइ तुझा, देवा! दास दीन।। पतीत...


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

ये रे मला तार

ध्येयहीन
कर्महीन
शक्तिहिन दीन
घृतहीन
मतिहीन
पदोपदि शीण।।

मतिमंद
निरानंद
हृदयि दुर्गंध
नाना बंध
नाना छंद
नाही सुखकंद।।

नाही मान
नाही स्थान
मनावर ताण
मनी घाण
जाई प्राण
होई ओढाताण।।

निराधार
हृतसार
झालो भूमिभार
डोळ्यां धार
अनिवार
ये रे मला तार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

निराधार

फुलापरी
दंवापरी
हळु मदीय मन
विजेपरी
विषापरी
कठोर सारे जन।।

तृषा मला
क्षुधा मला
मदीय कंठ प्राण
कण न मिळे
जळ न मिळे
मजसि मारित बाण।।

नयन झरे
हृदय भरे
कुणाचे पाहु दार
दार लाविती
हाकलुन देती
कुणि न मज आधार।।

अंधार पडे
गगन रडे
वणवण मी करित बाळ
तुझ्या दारी
आलो तारी
करि तू तरि सांभाळ।।

अंगावरुन
हात फिरवून
घे मला जवळ
डोळे पुशी
बोले मशी
प्रेमे दे कवळ।।

अंकि निजव
गीते रिझव
ताप मम सरो
तूहि निष्टुर
होशि जरि दूर
तरि हा दारी मरो।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

दाखव मज अपुले चरण

हे शरणामतजन-करुण! दाखव मज अपुले चरण।।
मी पतंग सूत्रावीण
मी पाखरु पंखावीण
मी मीन जीवनावीण
मज फारच होई शीण।। दाखव....।।

हे प्रबळ वासनावारे
खेळणे करिति मज बा रे
उडविती भ्रमविती जोरे
सांभाळिल तुजविण कोण।। दाखव....।।

मी पापपंकरत कीट
दुर्गंधि मनी ये वीट
होईल हृदय कधि नीट
मज बरवे वाटे मरण।। दाखव....।।

वेढितो घोर अंधार
मजसि ना दिसतसे पार
कोण रे असे आधार
कासाविस होती प्राण।। दाखव....।।

मी तुझी बघतसे वाट
डोळ्यांत अश्रुचे लोट
हृदयात शोक घनदाट
तू माय बाप गुरु जाण।। दाखव....।।

ये करे मला कुरवाळी
मी मूल मला प्रतिपाळी
मी फूल होइ तू माळी
ये येइ करी उद्धरण।। दाखव....।।

घे मांडीवर निज बाळ
प्रेमानं चुंबी गाल
ही इडापिडा तू टाळ
तू मंगल तू अघहरण।। दाखव....।।

हे जीवन होवो सफळ
करि पूर्ण हेतु मम विमल
मम निश्चय राहो अचळ
आदर्श असो आचरण।। दाखव....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

येवो वसंतवारा

नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओतणारा
सुकल्यास हासवीता। आला वसंतवारा

आला वसंतवारा। वनदैन्य हारणारा
सुटला सुगंध गोड। भरला दिगंत सारा

रानीवनी बहार। आला फुलांफळास
समृद्धि पाहुनीया। आनंद पाखरांस

वेली तरू रसाने। जातात भरभरोनी
डुलतात नाचतात। नवतेज संचरोनी

फुटतो मुक्या पिकाला। तो कंठ गोड गोड
सजते सुपल्लवांनी। ते शुष्क वृक्ष-खोड

सोत्कंठ गायनाने। पिक नादवीत रान
परिसून ते सहृदय। विसरून जाइ भान

सृष्टीत सर्व येतो। जणु जोम तो नवीन
जे जे वठून गेले। ते ते उठे नटून

सृष्टीत मोद नांदे। सृष्टीत हास्य नांदे
संगात गोड गोड। सृष्टीत सर्व कोंदे

सृष्टीत ये वसंता। परि मन्मनी शिशीर
मम जीवनी वसंत। येण्यास का उशीर

का अंतरी अजून। नैराश्य घोर आहे
का लोचनांमधून। ही अश्रुधार वाहे

अंधार अंतरंगी। भरला असो अलोट
काही सुचे रुचे ना। डोळ्यांत अश्रुलोट

उत्साह लेश नाही। उल्हास अल्प नाही
इवलीहि ना उमेद। झालो हताश पाही

सत्स्फूर्तिचा स्फुलिंग। ना एक जीवनात
मेल्यापरी पडे मी। रडतो सदा मनात

हतशुष्क जीवनाचा। निस्सार जीवनाचा
जरि वीट येइ तरिही। न सुटेच मोह त्याचा

ओसाड जीवनाची। भूमी सदा बघून
वणवेच पेटतात। मनि, जात मी जळून

ओसाड जीवनाचे। पाहून वाळवंट
करपून जीव जाई। येई भरुन कंठ

पाहून जीवनाचा। सारा उजाड भाग
मज येइ भडभडोनी। मज ये मदीय राम

कर्मे अनंत पडली। दिसतात लोचनांते
परि एकही कराया। राया! न शक्ति माते

संसार मायभूचा। सारा धुळीत आज
काही करावयाला। येई मला न काज

हृदयी मदीय भरते। देवा अपार लाज
काहीच हातुनिया। होई न मातृकाज

असुनी जिवंत मेला। जो कर्महीन दीन
मनबुद्धि देह त्याची। ती व्यर्थ, फक्त शीण

या मातृसेवनात। या मातृकामकाजी
वाटे मनातकाया। झिजुदे सदैव माझी

परि जोर ना जराही। संकल्पशक्ति नाही
मनिचे मनी तरंग। जाती जिरून पाही

मम जीवनात देवा। येवो वसंतवारा
गळू देत जीर्ण पर्णे। फुटु दे नवा धुमारा

शिरु देत मनात जोम। शिरु दे मतीत तेज
करण्यास मातृसेवा। उठु देच जेवि वीज

खेळो वसंतवात। मज्जीवनी अखंड
करुदेच मातृसेवा। अश्रांत ती उदंड

असु दे सदा मदीय। मुखपुष्प टवटवीत
असु दे सदा मदीय। हृत्कंज घवघवीत

तोंडावरील तेज। आता कधी न लोपो
आपत्ति आदळोत। अथवा कृतांत कोपो

दृष्टीमध्ये असू दे। नव दिव्य ब्रह्मतेज
वाणीतही वसू दे। माझ्या अमोघ आज

पायांमध्ये असू दे। बळ अद्रि वाकवाया
हातामध्ये असू दे। बळ वज्र ते धराया

हसु दे विशंक जीव। पाहून संकटांना
निश्चित जाउ दे रे। तुडवीत कंटकांना

निर्जीव मी मढे रे। पडलो असे हताश
चढु दे कळा मुखाला। करु दे कृती करांस

हातून अल्प तरि ती। सेवा शुभा घडू दे
न मढ्यापरी पडू दे। चंडोलसा उडू दे

चैतन्यसिंधू तू रे। दे दिव्य जीवनास
जरी मृत्यू तो समोर। विलसी मुखी सुहास्य

संजीवनांबुधी तू। संजीवनास देई
दे स्फूर्ति जळजळीत। नैराश्य दूर नेई

तू एक शक्ति माझी। तू एक तारणारा
जे दीन हीन त्यांची। तू हाक ऐकणारा

हतजीव-जीवनांच्या। रोपास कोण पाळी
तू एक वाढविवी। तूचि प्रबुद्ध माळी

हृदयी बसून माझ्या। फुलवी मदीय बाग
मातापिता सखा तू। गुरु तूच सानुराग

फुलतील वाळवंटे। हसतील शुष्क राने
नटतील भू उजाड। गातील पक्षि गाणे

जरि त्वत्कृपा-वसंत। येईल जीवनात
चंडोलसा उडेन। संस्फूर्त गात गात

त्वत्स्पर्श अमृताचा। मजला मृता मिळू दे
मम रोमरोमि रामा। चैतन्य संचारु दे

आता सदा दयेचा। सुटु दे वसंतवारा
फुलु देच जीवनाचा। जगदीश भाग सारा


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

माझे ध्येय

करीन सेवा तव मोलवान। असो अहंकार असा मला न
मदीय आहे बळ अल्प देवा। बळानुरूपा मम घेइ सेवा।।

कधी कुणाचे मजला पुसू दे। जलार्द्र डोळे मग तो हसू दे
अनाथदीनाजवळी वदेन। सुखामृताचे प्रभु शब्द दोन।।

कधी करावा पथ साफ छान। कधी हरावी मयल-मूत्र-घाण
बघून रागार्त करीन घाई। बनेन त्याची निरपेक्ष आई।।

जया न कोणी प्रभु मी तयाचा। तदर्थ हे हात तदर्थ वाचा
तदर्थ हे प्रेमळ नेत्रदीप। सदैव जागा मम तत्समीप।।

कधी कधी मंगल मी लिहीन। कथा नवी वा कविता नवीन
लिहीन मी नाटक वा निबंध। करीन भाषांतर वा सबंध।।

जगात जे जे सुविचारवारे। मदीय भाषेत भरोत सारे
असे सदा वाटतसे मनात। तदर्थ माझे शिणतील हात।।

करीन ज्या ज्या लघुशा कृतीस। तिच्यात ओतीन मदंतरास
समस्तकर्मी हृदयारविंद। फुलेल, पूजीन तये मुकुंद।।

असे प्रभूची कृतिरूप पूजा। असे सदा भाविल जीव माझा
मदंतरीची मिसळून भक्ती। मदीय कर्मी, मिळवीन मुक्ती।।

कुठेही सांदीत जरी पडेन। तिथे फुलाचेपरि मी हसेन
मला समाधान असो तयात। असो तुझे चिंतन ते मनात।।

असो तुझे नाम मदीय वक्त्री। असो तुझे रूप मदीय नेत्री
असो तुझे प्रेम मदन्तरात। भरून राही मम जीवनात।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

तुझ्या हातातला

खरोखरी मी न असे कुणी रे। चराचराचा प्रभु तू धनी रे
हले तुझ्यावीण न एक पान। उठे तुझ्यावीण न एक तान।।

त्वदंगणांतील लतेवरील। लहान मी क्षुद्र दरिद्र फूल
तुझ्या कृपेने रस गंध दावो। तुझ्याच सेवेत सुकोन जावो।।

मदीय हा जीवनकुंभ देवा। तसे, उदारा! मधुरे भरावा
करून त्वत्कर्म रिता बनावा। तुझ्याच पायी फुटुनी पडावा।।

फुटे जरी नीट तुम्ही करावा। रिता तरी तो फिरुनी भरावा
रसा समर्पून पुन्हा फुटेल। फुटून आता चरणी पडेल।।

फुटे करा नीट रिता भरावा। असाच हा खेळ सुरू रहावा
तुझ्या न सेवेत कधी दमू दे। अनंत खेळांत सदा रमू दे।।

जणू तुझ्या मी मुरली मुखात। तुझेच गीत प्रकटो जगात
बनेन वेणू तव मी मुखीची। असे असोशी प्रभु एक हीची।।

तुझ्या करांतील बनून पावा। कृतार्थ हा जन्म मदीय व्हावा
करावया मूर्त शुभ स्वहेतू। करी मला साधन आपुले तू।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

रडण्याचे ध्येय

केव्हा मी कृतिवीर होइन, न ते काहीच माते कळे
डोळ्यांतून मदीय नित्य विपुला ही अश्रुधारा गळे

स्वप्ने खेळवितो किती निजमन:सृष्टीत रात्रंदिन
ना येती परि मूर्तीमंत करण्या नाही मला तो गुण।।

या माझ्या हृदया बघा उघडुनी मी ध्येयवादी असे
ध्येयालाच अहर्निश स्मरतसे चित्ती दुजे ना वसे

ध्येये मात्र मदंतरी विलसती, ध्येयेच ती राहती
माझे लोचन अश्रुपूर्ण म्हणुनी खाली सदा पाहती।।

इच्छाशक्ति जया नसे प्रबळ ती जी पर्वता वाकवी
यच्चित्ता लघुही विरोध रडवी नैराश्य ज्या कापवी

त्याला ध्येय असून काय? रडतो निर्विण्ण रात्रंदिन
वाटे ध्येयविहीन कीट असणे, तेही बरे याहुन।।

ध्येये जी धरिली उरी न मम का ती? चित्त त्या का भुले?
देवा! ध्येय मदीय नित्य रडणे हे का असे निर्मिले?।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२७

द्विविध अनुभव

भरला हा अंधार। सारा भरला हा अंधार।।
क्रूर पशू हे हिंसक भेसुर
गदारोळ करितात भयंकर
थरथरते भीतिने मदंतर
निरखुनि हे कातार।। सारा....।।

वाघ गुरगुरे अंगावरती
भुजंग फूत्काराते करिती
विंचू करिती नांगी वरती
नाहि कुणी आधार।। सारा....।।

डोळे जैसे खदिरांगार
झिंज्या पसरुन भेसुर फार
धावुन येई हा अंगावर
पिशाच्चगण अनिवार।। सारा....।।

काटे रुतती टुपती दगड
भुजंग विंचू दिसती रगड
मरुन जाइन राहिन ना धड
डोळ्यां लागे धार।। सारा....।।

भयभीतीने मी गांगरत
शतदा मार्गी मी अडखळत
जखमा होती वाहे रक्त
केला हाहा:कार।। सारा....।।

पाहुनि दु:खाचा बाजार
माझे झाले मन बेजार
अंगी उरला अल्प न जोर
पडली गात्रे गार।। सारा....।।

तीक्ष्ण नखांनी फाडफाडुन
दातांनी चावुन कडकडुन
टाकतील मजला खाऊन
करितिल वाटे ठार।। सारा....।।

झंजावाते जैसे पान
कांपे, तेवी मी बलहीन
प्रभुजी, कोणा जाऊ शरण
वदवे ना मज फार।। सारा....।।

हे विश्वंभर करुणासागर
हे परमेश्वक परमोदार
शेधित आहे तुझेच दार
तार मला रे तार।। सारा....।।

सरला घन अंधार। आला प्रकाश अपरंपार।।
प्रभूची मुरली हळुच वाजली
क्षणात सारी सृष्टी बदलली
सुमने पायाखाली फुलली
हरला माझा भार।। आला....।।

गदारोळ तो सकळ निमाला
प्रकाश आला सत्पथ दिसला
करुणासागर तो गहिवरला
जाइन आता पार।। आला....।।

अभ्रे येती विलया जाती
फिरुन तारकातती चमकती
तैशी झाली मदंतरस्थिति
उदया ये सुविचार।। आला....।।

विवेकदंडा करी घेउन
वैराग्याची वहाण घालुन
धैर्ये पुढती पाऊल टाकिन
खाइन मी ना हार।। आला....।।

डसावया ना धजती सर्प
व्याघ्रवृकांचा हरला दर्प
भीति न उरली मजला अल्प
विलया जात विकार।। आला....।।

हलके झाले माझे हृदय
मोह पावले समूळ विलय
सदभावाचा झाला उदय
केला जयजयकार।। आला....।।

मदंतरंगी मंजुळवाणी
वाणी तुमची शुभ कल्याणी
प्रभु! येऊ दे ऐकू निशिदिनी
विनवित वारंवार।। आला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

हे सुंदरा अनंता!

हे सुंदरा अनंता! लावण्यकेलि-सदना।
कधि भेटशील मजला। कंदर्पकोटी-वदना!

सकलांहि या जिवांच्या। प्रेमार्थ तू भुकेला
चित्ते हरावयाला। सचितोसि रंगलीला

संध्या समीप येता। भरिशी नभांत रंग
तव हृत्स्थ प्रेमसिंधु। त्याचेच ते तरंग

सांजावता नभात। उधळीत रंग येशी
रमवीशि या जिवांना। कर लेशही न घेशी

रमवावयास जीवा। सुखवावयास राया!
निज दिव्य चित्रशाळा। करिशी खुली बघाया

हसवावयास जीवा। शिकवावयास राया!
निज भव्य चित्रशाळा। करिशी खुली बघाया

पिवळे निळे गुलाबी। नारिंगी गौर लाल
संमिश्रणे सुरम्य। करितात जीव लोल

काळे कभिन्न मेघ। करितोस ते सुवर्ण
त्वत्स्पर्श दिव्य होता। राहील काय दैन्य

घालूनिया किरीट। कान्हाच का उभा तो
ऐसा कधी कधी तो। आभास गोड होतो

रक्तोत्पले सुरम्य। फुलली अनंत गंमती
ते हंस कांचनाचे। गमतात तेथ रमती

करिती प्रसन्न चित्त। करिती गंभीर धीर
चित्रे विचित्र बघुनी। हृदयात भावपूर

शोभा नभात भव्य। शोभा नभात नव्य
बघुनी अपार भरती। हृदयात भाव दिव्य

करितोस रंगबदल। राया क्षणाक्षणाला
इकडेहि रंग विविध। चढतात मन्मनाला

करितोस रंगफेर। देशी नवा मुलामा
तू दावतोस गोड। जादू मुलांस आम्हां

मोडूनिया क्षणात। रचिशी नवाकृतीस
बघुनी तुझी चलाखी। किती मोद मन्मतीस

गंभीर होइ चित्त। दुस-या क्षणीच हसते
हसले न जो पुरेसे। तिस-या क्षणीच रडते

येती मनी विचार। ते मृत्यु- जीवनाचे
जणु जीव त्या घडीला। दोल्यावरीच नाचे

होताच वासरान्त। होताच भास्करान्त
जणु पूर वैभवाला। चढतो वरी नभात

येता समीप अंत। जीवासही अनंत
ऐसे मिळेल भाग्य। करु मी किमर्थ खंत?

जणु मृत्यु रम्य दार। त्या जीवना अनंत
सौभाग्यहेतु अस्त। करु मी किमर्थ खंती?

श्रीमंत त्या प्रभूचा। मी पुत्र भाग्यवंत
होऊ सचिंत का मी। करु मी किमर्थ खंत?

ऐसा विचार माझ्या। हृदयात गोड येई
माझी महानिराशा। प्रभुजी पळून जाई

जे रंजले प्रपंची। जे गांजले जगात
रिझववयास त्यांना। नटतोसि तू नभात

दारिद्रय दु:ख दैन्य। निंदापमान सर्व
सायंनभा बघोनि। विसरून जाइ जीव

रंगच्छटा अनंत। आकार ते अनंत
करु वर्णना कसा मी। बसतो मुका निवांत

बघतो अनंत शोभा। हृदयी उचंबळोनी
मिटितो मधेच डोळे। येतात ते भरोनि

गालांवरून अश्रू। येतात घळघळोनी
सायंतनीन अर्घ्य। देतो तुला भरोनि

नटतोसि रंगरंगी। तू दिव्य- रूप- सिंधू
तू तात मात गुरु तू। प्रिय तू सखा सुबंधु

राहून गुप्त मार्गे। करितोसी जादुगारी
रचितोसि रंगसृष्टी। प्रभु तू महान चितारी

किती पाहु पाहु पाहु। तृप्ती न रे बघून
शतभावनांनि हृदय। येई उचंबळून

भवदीय दिव्य मूर्ति। केव्हा दिसेल नयनां
भिजवीन आसवांनी। केव्हा त्वदीय चरणां

हे सुंदरा अनंता। लावण्यकेलि-सदना
कधि भेटशील माते। कंदर्पकोटि-वदना।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२

रडायाचा लागलासे देवा एक छंद

अनंत दिधली ही वसुंधरा घर
विशाल अंबराचे वितान सुंदर

चंद्रसूर्य तारे दिले दिवारात्र दीप
वारा दिला प्राणसखा सदैव समीप

निर्झरांचे सागराचे दिलेस संगीत
कितितरी देवा तुझी अम्हांवर प्रीत

हिरव्या हिरव्या तृणाचे दिले गालिचे
सौंदर्याने भरलेले जणु मखमालीचे

हिरव्या गर्द तरुवेली यांची मंदिरे
दिली मनोहर ज्यांत कुणीही शिरे

पाण्याने भरलेले दिलेस सागर
सरित्सरोवर, वपी, झरे मनोहर

फुले, फुलपाखले दिली खेळायास
जिकडे तिकडे लाविलीस चित्रे बघायास

भव्य असे उभे केलेस डोंगर, पहाड
कितितरी पुरविशी बापा आमचे लाड

माता, पिता, बहिण, भाऊ, सखे यांचे प्रेम
दिलेस, देवा! चालविशी नित्य योगक्षेम

देह बुद्धि इंद्रिये हे हृदय देऊन
जगात खेळायाला दिलेस धाडून

आनंदाने ओतप्रोत भरुन दिलेस जग
परि माझ्या हृदयाची सदैव तगमग

तुझ्या सृष्टीमध्ये कोंदे आनंद
परि माझ्या अंतरंगी भरे शोकपूर

सृष्टीमध्ये तुझ्या देवा भरले रे संगीत
परि माझ्या अंतरंगी सदा शोकगीत

देवा! दिले खरे तू परि कर्महीन
मतिमंद भाग्यहीन तव दास दीन

देशी परि घेता यो ना करु काय सांग
शोकांबुधिमधि गेलो बुडुन रे अथांग

हसुन खेळुन जीवन न्यावे जगि या मुदे
कला मला साधेना ती, जीव हा स्फुंदे

घेता ये ना आनंदाचा आस्वाद मी मंद
रडायाचा लागलासे मला एक छंद।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

रामवेडा

मला हसता का? हसा हसा सारे। चित्त माझे परि रडे शोकभारे
मनामधिल खुडू केवि मोहमोडा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

मला झडकार कुणि राम दाखवा रे। तयावीण मला शून्य गमे सारे
कोण उकलिल त्यावीण मोहवेढा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

मला पत्ता सांगाल काय कोणी। राम राहे तो कोणत्या ठिकाणी
रामसीतेचा कुठे असे जोडा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

द्याल कोणी का मला वदा राम। द्याल कोणी तो का मुनीजन- विश्राम
कुणी माझ्या पुरवील काय कोडा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

उठा सत्वर मज राममूर्ती दावा। जया ध्यावे जो अहोरात्र गावा
मला धरवेना धीर अता थोडा। मला सांगा, मी असे रामवेडा।।

राम कोठे? तव अंतरंगि आहे। राम कोठे? सर्वत्र शोभहाते
नयन वेड्या! उघडून बघे नीट। धीट होऊन घे, ऊठ रामभेट।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

आई, दार उघड

किती धडपडलो किती भागलो मी। किती श्रमलो यावया तुझ्या धामी
किती रडलो मी सतत धायिधायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

तुझ्या पायांशी देइ आस-याला। नको दूर करु आई वासराला
तुझ्या पायांविण काहि नको पाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

मला भिवविति हे वृक व्याघ्र घोर। मला घाबरविति उग्र दुष्ट चोर
खाऊखाऊ करितात धीर नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

थंडिवा-याचा बाळ उभा दारी। सकळ थरथरते अंग बघे भारी
घेइ पोटाशी ऊब मला देई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

ठेव मजला तू निजवुनी कुशीत। मला अंगाई गाइ गोड गीत
कितिक जन्मावधि झोप मला नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अमित जन्मांची लागली तहान। कसे तडफडती प्राण हीन दीन
तव प्रेम- पयोधर गोड देई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

तुला करुणेचा बोलतात सिंधु। मला का देशी एकही न बिंदु
मीच नावडते पोर सांग कायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अनेकांना तू सतत पावलीस। परी मजवरती का ग कावलीस
तुझ्यावीणे आधार अन्य नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अनेकांना तू देशि साउलीस। का ग माऊली! मजवरी रुसलीस
तुझ्यावीण मला ओस दिशा दाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

बाळ दारी रडतसे दीनवाणा। तुला ये ना का आज प्रेमपान्हा
कसे आईचे हृदय कठिण होई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

चकोराते तो आइ! असा इंदु! चातकाला तो जेवि नीरबिंदु
तुझे दर्शन मज तसे प्राणदायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

बोल माझ्याशी,आइ! एक बोल सुधा- सागरकल्लोळ
तुझा शब्द मला नवप्राणदायी। दार उघड अता,आइ! जीव जाई।।

आइ! गेले हे खोल किती डोळे। तुझ्यासाठी मत्प्राण हे भुकेले
अहर्निश त्वद्विरहग्नि फार दाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

पिके पाण्याविण जाति गे सुकून। मुले मातेविण जाति गे झुरुन
तुझ्याविण माझा जीव सुकुन जाई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

कामधेनू होईल का कठोर। ताप देइल का कधी चंद्रकोर
कशी गंगा होईल तापदायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

मातमहिमा ना आज मालवावा। मातृगरिमा ना आइ! घालवावा
ब्रीद सांभाळी ते न लया नेई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

आइ! माझी ही शेवटील हाक। आइ! बाहेरी येउनिया टाक
अजुन बाहेरी तू जरी न येशी। तुझ्या पोराचे प्रेत तू पहाशी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

देवाजवळ

तुझ्याविणे कोणि न माते वत्सले मला गे
तुझा ध्यास आता आई सर्वदैव लागे
अनाथास नाथ ग कोणी ना कुणीहि पाता
तूच तात माझा, प्रेमस्निग्ध तूचि माता।।

पाप अंतरंगी आहे संचले अनंत
सुचे रुचे काहि न वाटे दिवारात्र खंत
पापपंकमग्न मला तू काय ठेवशील
नसे असे आई!  तव गे क्रूर दुष्ट शील।।

परम सदय कोमल माते!  ते त्वदंतरंग
त्वत्कृपाबुधीचे येवो मजवरी तरंग
मलिन मानसी मम जे जे सकल ते धुवावे
विमल पुण्यवान आई!  लेकरु करावे।।

नको गर्व हेवा दावा लोभ तो नसावा
विषयवासनाकंद मळासकट तो खणावा
नको मान उच्च स्थान प्रभु!  नकोच किर्ती
मनी वसो एक सदा ती तुझी मधुर मूर्ती।।

करु काय?  संतापविती वासनाविकार
हीन दीन दुबळा मी तो शीण होइ फार
विषयडोहि डुंबे मोदे मन्मनोमतंग
कधी आइ!  या वृत्तीचा करिशि सांग भंग।।

मदिंद्रिया सकळा करितो मी तुझ्या अधीन
तूच त्यास आवर मी तो त्वत्पदी सुलीन
तुझ्यावरी घालुन आता सर्व दु:खभार
विसंबून राहिन देवा!  तार किंवा मार।।

मला देवदेवा! वाटे सांगण्यास लाज
मान घालुनीया खाली असे उभा आज
जगी घालवोनी देवा!  वत्सरांस तीस
काय मेळवीले?  काही नाहि!  धिक् कृतीस।।

कोप अल्प झाला न कमी, कामवासना ती
अहोरात्र गांजित, चित्ती अल्प नाही शांति
लोभ लुप्त झाला नाही, व्यर्थ सर्व काही
फुकट फुकट सारा गेला जन्म हाय पाहि।।

क्षुद्र- वस्तु- लोभी गेलो गुंतुनी कितीदा
क्षुद्र वस्तु हृदयी धरुनी मानिले प्रमोदा
कला नाहि, विद्या नाहि, शील तेहि नाहि
हाय हाय देवा!  स्थिति ही मन्मनास दाही।।

अता तरी देवा! ठेवा हृत्स्थ मोह दूर
आता तरी होवो मन हे विमल धीर वीर
सद्गुणाचि सत्कृत्याची मौत्किके अमोल
जीवनांबुधीत बनू दे रुचिर गोल गोल।।

नसो व्यर्थ, सार्थक होवो, प्रभो!  जीवनाचे
फुलो फल जीवनमय हे अता एकदाचे
दिसो रंग रमणीय असे वास दरवळू दे
तुझी कृपा झाली आहे हे मला कळू दे।।

मदाचरण होवो धुतल्या तांदळासमान
पुढे पुढे पाउल पडु दे जाउ दे चढून
तुझी कृपा होई तरि हे सर्व शक्य वाटे
नको अंत पाहू आता, लाव बाळ वाटे

स्नेहमयी माउलि तू गे साउली जिवाची
तूच एक आधार मला आस तू नताची
नको उपेक्षू तू, माते!  अश्रु हे पुसावे
मला नीट मार्गावरती आणण्यास धावे।।

तिमिर घोर नैराश्याचा मानसास घेरी
मला येइ मदध:पाता बघुन घोर घोरी
कृपाकौमुगदीचे आता किरण येउ देत
उदासीनता चित्ताची सकळ संहरोत।।

किती मनोरथ मी देवा मनी मांडियेले
भव्य किति ध्येयांना मी मनी खेळवीले
दिसे मला जे जे मोठे तेच तेच व्हावे
असे मनी वाटे, हाती काहिही न व्हावे।।

जसे मुल यात्रेमध्ये खेळणी विलोकी
फुगा घेइ किंवा चिमणी खळखुळाच तो की
असे त्यास होई, कोपे तो पिता तयाचा
काहिही न घेउन देई, बाळ रडत त्याचा।।

तसे जगी बाप्पा देवा!  जाहले मदीय
करु हे करु की ते हा निश्चयो न होय
मदुत्साह सतरा कामी विभागून जाई
म्हणुन देवराया!  हाती काहिही न येई।।

ग्रंथकार प्रतिभावान् या सत्कवि प्रभावी
राष्ट्रवृत्त- संशोधक- सत्कृति करी करावी
दयावंत व्हावे संत प्रभुपदाब्जरक्त
करुन लोकसेवा किंवा आटवू स्वरक्त।।

अशी किती ध्येये रात्रंदिन मला दिसावी
काहिही न करिता वर्षे व्यर्थ सर्व जावी
उभा रिक्त हस्ते त्वत्सिंहासनासमोर
प्रलज्जित, प्रभुजी!  ठरलो मी दिवाळखोर।।

दिली बुद्धि, शक्तिहि, दिधली इंद्रिये समर्थ
दिला देह अव्यंग असा व्हावया कृतार्थ
अल्प सार्थकाहि ना केले, मनोबुद्धिदेह
भ्रष्ट विकल सारी केली, नाशिले स्वगेह।।

वास घेतला रे माझा नित्य वासनांनी
कशी तुझी पूजा कारु मी वासल्या फुलांनी
अता तुझ्या ओतिन पायी कढत अश्रु माझे
प्रभो!  असे वदताना हे किति मदंत भाजे।।

दिले भांडवल तू देवा!  सत्कृपासमुद्रा !
काहि मी न केले झाली म्लान दीन मुद्रा
पोटि होइ अनुताप परी टिकत अल्प काळ
मोह-मधर-रुपे फसतो फिरुन फिरुन बाळ।।

पुन्हा पुन्हा पापे रचितो येति अश्रू डोळा
नाहि त्यांस किंमत, तू न प्रभुजि!  मूढ भोळा
खरे अश्रु अनुतापाचे येति एकदाच
म्हणुन अश्रु माझे हे तो नसति खास साच।।

प्रभो!  तुला सारे कळते तुजसि सांगु काय
तार तार तार मदीया तूच थोर माय
नाहि काय माया?  ये ना कळवळा तुला गे
तुझा बाळ भागे, घेई लोभुनि वा रागे।।

कधी कधी, आई!  वाटे जाउ की मरुन
नाही काहि उपयोग जगी हे जिणे जगून
भूमिभार केवळ झालो कर्महीन कीट
न लागेल आता माझ्या मना वळण नीट।।

पदोपदी घसरत जातो मोहमार्गगामी
कामना अनंता धरितो मी मनात कामी
या न जन्मि मज लाभेल प्रभा पुण्यतेची
अहा अहोरात्र मनाला गोष्ट हीच जाची।।

अहोरात्र झगडत आहे अंतरात, आई !
समर हे न संपेल असे वाटते कदाही
रिपूंजवळ झुंजत आहे एकला सदैव
अता धीर नाही आई!  मद्विरुद्ध सर्व।।

नको नको जीवन देवा!  नको अता आयु
ज्योत जीवनाची विझवी सरो प्राणवायु
जगा प्रभो!  उपयोग असे तरि नरे जगावे
भूमिभार जो कुणि त्याने शीघ्रची मरावे।।

भले जगाचे मी देवा अल्पही न केले
पुण्यवंतजननयनी मी अश्रु आणियले
परस्वांत निष्ठुरतेने नित्य पोळियेले
अन्य जीवनांस कितीदा दु:खदग्ध केले।।

मनी नित्य पापविचारा हसत खेळवीले
कुकर्मात जीवन सारे अहोरात्र नेले
विंचु अंतरंगी डसती शेकडो सदैव
म्हणुन मरण आता हेतू मनी एकमेव।।

पापविस्मृती ना देवा दीवनी पडेल
स्मृतिपिशाच्चगण मानेला सर्वदा धरील
मरुन जाउ दे रे आता दे मला मृतीस
मरण देइ, करितो चरणा साश्रु मी नतीस।।

होय, येति विमलहि माझ्या अंतरी विचार
अल्पकाळ टिकुन परू ते फिरुन जात दूर
जशी वीज लवुनी जाई ध्वांत फिरुन राही
तशी होइ मच्चित्ताची गति सदैव पाही।।

सद्विचार धरण्या जावे तोच जाति दूर
हर्षफुल्ल मद्वदनींचा जाइ गळुन नूर
खिन्नता अपारा पसरे अति निराश वाटे
येति अश्रु नयनी किति हे अंतरंग फाटे।।

त्वत्कृपा न, म्हणुनि न राहे सद्विचार चित्ती
दु:खदैन्यनैराश्याची घेरिते विपत्ती
पदोपदी होणारे हे बघुन मदन्याय
सांग तूच जीवन मग हे मज रुचेल काय।।

असा सरी, देवा!  ऐक प्रार्थना विनम्र
हृदय समुन्नत हे होवो विमल शांत शुभ्र
तुझी मूर्ति मधुरा राहो मनि, घडो विकास
पुरव पुरव, देवा!  माझी एक हीच आस।।

नयन येति भरुनी वदतो तुजसि कळवळोनी
आत जात आहे, आई!  बघ किती जळोनी
नको अंत आता पाहू धाव धाव धाव
सत्पती मला सतत तू हात धरुन लाव।।

अजुन पाप करण्यातचि ना वाटते कृतार्थ
पाप जाहल्यावरि तरि ते नयन आर्द्र होत
अजुन नाश नाही झाला सर्व तोच येई
असे अजुन आशा म्हणुनी शीघ्र येई आई!।।

तुझ्या करी देतो माझी मंद रुग्ण नाडी
असे अजुन धुगधुगि तोची औषधास काढी
रसायना दिव्या देई बाळ हासवावा
निज प्रभो!  करुणामहिमा आज दाखवावा।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

जीवननाथ

तृणास देखून हसे कुरंग। मरंदपाने करि गान भृंग
जलांतरंगी करि मीन नाच। तवानुरागी प्रभु मी तसाच।।

दयासुधासिंधु तुम्ही अपार। सुखामृताचे तुम्हि डोह थोर
लहानसा तेथ बनून मीन। विजेपरी चमचम मी करीन।।

मदीय तू जीवननाथ देवा। मला स्वपायांजवळीच ठेवा
तव स्मृति श्वाससमान जीवा। मदीय संजीवन तूच देवा।।

मदीय तू नाथ मदीय कांत। मदीय तू प्राण मदीय स्वांत
मदीय तू सृष्टी मदीय दृष्टी। मदीय तू तुष्टी मदीय पुष्टी।।

जिथे तिथे मी तुजला बघेन। कुदेन नाचेन मुदे उडेन
तुलाच गातील मदीय ओठ। तुझेच ते, ना इतरा वरोत।।

कधी कधी तू लपशी गुलामा। परी तुला मी हुडकीन रामा
तुला लपंडाव रुचे सदैव। गड्या परी तू मम जेवि जीव।।

कधी न जाई बघ दूर आता। तुझ्या वियोगे मज मृत्यु नाथा
प्रिया! तुझे पाय मदीय डोई। बसू असे सतत एक ठायी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, डिसेंबर १९३२

सुखामृताची मग नित्य धार

कळ्या जळीवीण कशा फुलाव्या। दिशा उषेविण कशा खुलाव्या
उचंबळे इंदुविना न सिंधु। तसाच मी त्वद्विण दीनबंधु।।

कशास चिंता परि ही उगीच। जिथे तिथे माय असे उभीच
जिवा कशाला करितोस खंत। जिथे तिथे हा भरला अनंत।।

अनंत नेत्री तुज माय पाहे। अनंत हाती तुज वेढताहे
जरा तुझे तू उघडी स्वनेत्र। दिसेल सर्वत्र पिता पवित्र।।

जरा जरी ते उघडाल दार। प्रकाश तेथे भरतो अपार
हवा शिरे निर्मळ आत खूप। तसेच आहे प्रभुचे स्वरुप।।

करी न तू बंद निजांतरंग। शिरेल तो अंतरि विश्वरंग
सताड ठेवी उघडून दार। सुखामृताची मग नित्य धार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

तुला देतो मी जमिन ही लिहून

जीवनाच्या ओसाड वाळवंटी। कधी करिशिल कारुण्यमेघवृष्टि
कधी झिमझिम पाऊस पाडिशील। वाळवंटांचे मळे शोभतील।।

जीनाची मम पडित ही जमीन। लागवडिला आणील सांग कोण
मला शक्ति नसे कुशलताहि नाही। जगी कोणाचे साह्य तेहि नाही।।

मशागत कर तू पडित वावराची। मला काही नको सर्व घेइ तूची
तुला जे जे प्रभु मनी आवडेल। पडित भूमित या सकळ ते पिकेल।।

मला मोबदला नको एक दाणा। लागवडिला ही पडित भूमि आणा
तुला देतो ही जमिन मी लिहून। मला काहि नको दावि पीकवून।।

मळे होतिल ओसाड वावराचे। पाहुनिया सुखतील नेत्र साचे
जमिन माझी ही फुकट न रे जावी। तुला करुणा एवढी आज यावी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

आशा

संपोनीया निशा। उजळते प्रभा
दिनमणी उभा। राहे नभी

लाखो मुक्या कळ्या। त्या तदा हासती
खुलती डुलती। आनंदाने

ऊर्ध्वमुख होती। देव त्या पाहती
गंध धुपारती। ओवाळिती

तैसे माझे मन। येताच प्रकाश
पावेल विकास। अभिनव

तोवरी तोवरी। अंधारी राहिन
दिन हे नेईन। आयुष्याचे

फुलेल जीवन कळी। केव्हा तरी
आशा ही अंतरी। बाळगीतो


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८

सोन्याचा दिवस

जन्ममरणांची। पाउले टाकीत
येतो मी धावत। भेटावया

पापांचे पर्वत। टाकूनिया दूर
येतो तुझे दार। गाठावया

दिवसेंदिवस। होउनी निर्मळ
चरणकमळ। पाहिन तूझे

पाहुन पायांस। निवतील डोळे
सुखाचे सोहळे। लाभतील

कधी तो सोन्याचा। येईल दिवस
पुरेल ही आस। अंतरीची


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२

प्रेम का करावे?

उदास झालो त्या दिवशी। निराश वाटे फार मनी
कष्टी झालो मनात मी। बुडतो वाटे घोर तमी
सभोवती भरे अंधार। दिसे न कोठे आधार
भोजनावरी नसे मन। दुस-यांस्तव परि जाऊन
दोन घास ते कसे तरी। खावून गेलो बाहेरी
होते रडवेले वदन। होते पाणरले नयन
सायंवेळा ती झाली। प्रभा न धरणीवर उरली
प्रभा न उरली हृदयात। शिरते हृदयी घन रात्र
मदीय मृदु हळु हृदयात। वाटे कुणि मज न जगात
प्रेम जयांचेवरि केले। डोळ्यांपुढती ते आले
डोळ्यांपुढती त्या मूर्ती। क्षणात सुंदर अवतरती
तनमन मी ज्या दिधले। समोर सगळे ते आले
यदर्थ डोळे मम रडले। यदर्थ देवा आळविले
ज्यांच्या हितमंगलास्तव। प्रेमे रडला मम जीव
मदीय सुंदर जे काही। जयांस दिधले सदैवही
स्मृती तयांची मदंतरी। आली एकाएकि खरी
असेल का मत्स्मृति त्यांना। येइल जल का तन्नयना
दिसेल का मन्मूर्ति तया। गहिवर येइल का हृदया
विसरलेच ते असतील। उठे असा मन्मनि बोल
मदर्थ ना कुणी रडतील। मदर्थ ना कुणी झुरतील
मला न कोणी स्मरतील। मला न कोणी लिहितील
कशास लिहितिल मी कोण। कोण्या झाडाचे पान
असे जवळ तरि ते काय। केवळ आहे हे हृदय
विशाल बुद्धि न मज काहि। स्वयंप्रज्ञता ती नाही
विद्या नाही कला नसे। अभिमानी जग मला हसे
कशात नाही पारीण। जगात दिसतो मी दीन
धैर्य धडाडी ती नाही। सदैव मागे मी राही
शरीरसौष्ठव ते नाही। घरदार मला ते नाही
पैसा अडका ना एक। जगात केवळ कफल्लक
भव्य भडक जे लखलखित। झगमगीत ते दिपवीत
असे न मजपाशी काही। मत्स्मृति कोणा कशि राही
कुणी स्मरावे का मजला। कुठल्या झाडाचा पाला
परी मी तरी करु काय। आहे केवळ हे हृदय
प्रेम त्यात जे मला मिळे। सदा जगाला ते दिधले
असेच जे ना मजजवळी। द्याया ये ना कधिकाळी
प्रेम मदंतरीचे दिधले। तुच्छ जगा परि ते दिसले
असेल दोषी मत्प्रेम। असेन किंवा मी अधम
प्रेमपूर जे मी दिधले। असेल विष ते त्या गमले
जगात मी तर कमनशिबी। धिक्कारी मज सृष्टी उभी
प्रेम तरी मी का केले। स्वार्थे होते का भरले?
प्रेमाचा तो मोबदला। हवा कशाला तरी मला
प्रेम जगाला दिल्याविना। जगी रहाया मज ये ना
हृदय प्रेमे भरलेले। कळा लागती जरी न दिले
देउ एकदा मी लागे। काहि न ठेवी मग मागे
सर्वस्वा मी अर्पितसे। कोण परी हे जाणतसे
मना! जगाचे पासून। व्यर्थ काय इच्छा करुन
प्रेमाचा तो मोबदला। हवा कशाला बरे तुला
देत सदा रे तू राही। हृदय रिकामे जो होई
विचार ऐसे हळुवार। मनात उडवित कल्लोळ
विचार कोमल मनि भरले। माझे मानस गजबजले
तुडुंब भरला हृदंबुधि। अगतिक वाटे मनामधी
पाझरले हो मदंतर। डोळ्यां लागे जलधार
माझे भरलेले हृदय। भरलेले डोळे उभय
भावनोत्कटा मदवृत्ती। गात्रे सगळी थरथरली
तो मार्गाने जात। ‘कुणी न मजला’ हे गात
तोचि पाहिली समोर मी। फुले मनोहर अति नामी
काहि रुपेरी सोनेरी। विमल पाकळ्या एकेरी
परागपुंजासभोवती। सकळ पाकळ्या जपताती
पुंज मधोमध काळासा। नयनाममध्ये बुबुळ जसा
जपति पापण्या बुबुळाला। तेवि पाकळ्या पुंजाला
फुले न प्रेमे भरलेले। मजला गमले ते डोळे
प्रेमाने ओथंबलेली। दृष्टी तयांची ती दिसली
सत्प्रेमाचे भरुन घडे। डोळे लावून जगाकडे
होति उभी ती गोड फुले। लक्ष जगाचे ना गेले
वाट पाहानी दिवसभरी। निराश झाली निजांतरी
दृष्टी जराशी लवलेली। मला फुलांची ती दिसली
उघडे अद्यापी नयन। होते त्यांचे रसपूर्ण
उभा राहिलो तिथे क्षण। हृदय येउनी गहिवरुन
प्रेम द्यावया जगाप्रती। होती उत्सुक फुले किती
प्रेम भरलेली दृष्टी। करिती मजवर ती वृष्टी
प्रेमे भरली मनोहर। प्रेमे न्हाणिति मदंतर
दिवसभर कुणी ना भेटे। आले गेले किति वाटे
मला थांबता पाहून। त्यांचे आले मन भरुन
डोलु लागली मोदाने। बोलु लागली प्रेमाने
होती तोवर फुले मुकी। वदती परि होऊन सुखी
सहानुभूतीचा स्पर्श। उघडी त्यांच्या हृदयास
बोलु लागली मजप्रती। गोड तरी ती गिरा किती
‘दिले आमुचे प्रेम तुला। प्रेमतृषार्ता भल्या मुला!
प्रेम द्यावया आम्हि जगतो। देउन आनंदे मरतो
फार अम्हा जरि न सुगंध। आहे त्यातच आनंद
सदा मानितो, जे असते। जवळ, देतसे जगता ते
देण्यासाठी समुत्सुक। देण्यामध्ये खरे सुख
कुणी न भेटले आम्हाला। खंत वाटली चित्ताला
दिवस संपुनी अंधार। पडू लागला बाहेर
भरलेले प्रीतीचे घडे। रिते न झाले कुणापुढे
भरलेले प्रीतीचे घडे। तसेच पडलेत बापुडे
तशात तू आलास। प्रकाश जैसा अंधास
तसे वाटले आम्हाला। मोद मनाला बहु झाला
येऊन येथे रमलास। प्रेमे बघुनी आम्हांस
घे तर सारे प्रेम तुला। प्रेमतृषार्ता भल्या मुला
घे सारे हे प्रेम तुला। प्रेम हवे ना तुला मुला’
असे बोलुनी मज बघती। गोड मनोहर ती हसती
अमृतवृष्टिच जणु करिती। सुकलेल्या हृदयावरती
सुकून गेल्या शेतास। जसा मिळावा पाऊस
तसे झाले मदंतरा। विसरुन गेलो जगा जरा
डोलु लागली फुले मुदे। वा-यावरती आनंदे
येई मदंतरही भरुन। पुढे ओढवुन मम वदन
तयांस धरिले मी भाली। करी तयांना कुरवाळी
धरिले प्रेमे हृदयाशी। प्रेमसिंधु त्या सुमनांसी
पुन्हा बघतसे पुन्हा करी। हृदयी त्यांना घट्ट धरी
अपार भरला आनंद। सकळ पळाला मत्खेद
दाउ कुणा हे रमणीय। दृश्य मनोहर कमनीय
प्रसंग मोठा स्मरणीय। हृदयाल्हादक कवनीय
तया फुलांना मी म्हटले। ‘तुम्ही मज किति तरि सुखवीले
विसावा तुम्ही मज दिधला। शोक तुम्ही मम घालविला
मदीय डोळे हासविले। ओले होते जे झाले
मदीय हृदया फुलवीले। होते कोमेजुन गेले
धरितो तुम्हां हृदयाशी। कृतज्ञता मी दावु कशी
तुम्हास काव्यी गुंफीन। कृतज्ञता मी दावीन
वदुनी धरिले हृदयाशी। जाणारे बघती मजसी
मज वेड्याला ते हसले। लज्जेने क्षण मन भरले
फिरुन फुलांना पाहून। फिरुन एकदा हुंगून
फिरुन तया कुरवाळून। फिरुन हृदयाशी धरुन
निघून गेलो तेथून। प्रेमाने ओथंबून
विचार आला मदंतरी। सृष्टिश प्रेम सदा वितरी
मनुज देतसे प्रेमकण। परमेश्वर हे कोटिगुण
सुमन तारका तरु वारि। प्रकाश-रुपे प्रकट हरी
प्रेम देतसे सर्वांते। कळे न वेड्या जीवाते
प्रकाशकिरण प्रेमाचे । भरलेले कर देवाचे
कवटाळाया येतात। मोदप्रेमा देतात
या वा-याच्या रुपाने। प्रभुच येतसे प्रेमाने
अंगा प्रेमे स्पर्श करी। गुणगुण गाणे उच्चारी
नद्या वाहती ज्या भव्य। प्रभुची करुणा ती दिव्य
जिकडे तिकडे प्रेमाचा। पाउस पाडी प्रभु साचा
अनंत देतो प्रेमास। कळे न वेड्या जीवास
प्रभुचे प्रेम न बोलतसे। मुके राहुनी वर्षतसे
प्रेम करो वा न करोत। अनंत हस्ते भगवंत
प्रेम देतसे सकळांला। विचार हृदयी मम आला
मला वाटली मग लाज। चित्तामाजी ता सहज
प्रेम अगोदर देवाने। दिले तयास्तव मनुजाने
कृतज्ञ राहुन आजन्म। द्यावे निरपेक्ष प्रेम
भगवंताची ही पूजा। सदा जिवा रे करि माझ्या
यातच सार्थक खरोखर। पुन्हा न मळवी निजांतर
पुन्हा न केव्हा रड आता। प्रेम सर्वदा दे जगता
प्रेम सदा तू देत रहा। प्रेमसिंधु तू होइ पहा
प्रेमसागर प्रभुराज। प्रेम द्यावया ना लाज
जगास द्यावे स्वप्रेम। हाच करी तू निजनेम
जगास निरपेक्ष प्रेम। देणे हा करि निजधर्म
सरोत दुसरे ते धर्म। प्रेमदान हे त्वत्कर्म


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३



प्रार्थना

माझ्या ओठावरि थरथरे प्रार्थना एक हीच
व्हावे माझ्या कधि न भगवन् हातुनी कर्म नीच
श्रद्धा राहो हृदयि असु दे त्वत्स्मृती देवराज!
चिंतेचे ना किमपि मग ते नाथ! केव्हाहि काज


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

प्रसन्नता

पुशी अहंता निज पापमूळ। खराखुरा होउन राहि मूल
जिथे अहंकार जिथे घमेंड। प्रसन्नता तेथ न दावि तोंड।।

समस्तपापस्मृति जै जळेल। गळा पिशाच्चापरी ना बसेल
जणू पुनर्जन्मच मानसाचा। तदा घडे लाभ प्रसन्नतेचा।।

प्रसन्नता स्वस्त न वस्तु बापा। प्रसन्नता मुक्तिच मूर्तरूपा
प्रसन्नता वस्तु न मर्त्यभूची। प्रसन्नता सुंदरता प्रभूची।।

प्रसन्नता बाळ मनोजयाचे। प्रसन्नता बाळ तपोबळाचे
प्रसन्नता संयमन-प्रसूती। प्रसन्नता मंगलपुण्य-मूर्ति।।

सदैव सेवारत शांत दात। त्वदिंद्रिये पाहुन विश्वकांत
तदंगि लोभे फिरवी कराते। प्रसन्नता तै वरिते तयांते।।

सुधारसाचा प्रभुच्या कराचा। जया शुभ स्पर्श घडेल साचा
तदीय ते जीवन होइ नव्य। प्रसन्नता-लाभ तयास दिव्य।।

वसुंधरेच्या हृदयामधून। जसा झरा येत उचंबळून
तसा मनोमोद अनंत आत। प्रसन्नतारूप धरून येत।।

असेल ज्याच्या हृदयी अथांगा। मनोहरा मंगलभावगंगा
तदार्द्रता जी झिरपे कृतीत। प्रसन्नतानाम तिलाच देत।।

अनंत जन्म प्रथम श्रमावे। अनंत जन्मावधि संतपावे
अनंत वेळा पडुनी चढावे। प्रसन्नतेने मग रे नटावे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

प्रकाश केव्हा भवनी भरेल?

मदीय या मानस-मंदिरात। तमोमयी सतत घोर रात्र
कुठे असे दीप? कसा मिळेल?। प्रकाश केव्हा भवनी भरेल?।।

जशी विजेची कळ दाबताच। प्रकाश सर्वत्र करीत नाच
कुठे असे ती कळ मंदिराची। सदैव हे धुंडित हात साची।।

मदीय हे हात दमून गेले। मदीय डोळे बनतात ओले
कधीच का ना कळ सापडेल। असाच का दास सदा रडेल?

तुझा सदा मी करितो पुकारा। पुन्हा पुन्हा दावितसा नकारा
असे प्रभो कोठवरी टिकेल। प्रकाश केव्हा भवनी भरेल?

रवी शशी अंबरी लाविलेस। निज प्रकाशे भरलेस विश्व
मदंतरी ज्योति न लावितोस। दिसे स्मशानासम गेह ओस।।

क्षणी परी येइ मनी विचार। उचंबळे तत्क्षणी मोदपूर
मना मुक्याने प्रभुपाय चेप। प्रकाश येईल पहा अपाप।।

असे विजेची कळ सत्पदांत। पदा धरी तेज भरे घरात
सदैव जो दाबिल पाय त्याचे। घरात नाचे बिजली तयाचे।।

अहा मला त्वत्कळ रे मिळाली। मदीय चिंता सगळी पळाली
अता न सोडीन कधीच पाय। चिर-प्रकाशे तम दूर जाय।।

प्रकाश येता मम मंदिरात। बसेन मी नाचत गीत गात
तव प्रभु! प्रेमसुधा पिऊन। खराखुरा पागल मी बनेन।

नुरेल माझे मज देहभान। न भूक लागेल न वा तहान
सुखाश्रु नेत्रांतुन चालतील। तनूवरी रोम उभारतील।।

प्रकाश नाचेल अनंतरंग। सुदास नाचेल डुलेल दंग
बनेल वेडाच बनेल मत्त। तुझ्यात जाईल मिळून भक्त।।

जलात जाती मिळुनी तरंग। सदैव एकत्रच अंग रंग
धरुन राही सुम नित्य वृंत। तुझ्यात जाईल मिळून भक्त।।

प्रकाश येवो सदनात थोर। हो समस्त प्रभु चित्तघोर
सदा प्रकाशास्तव मी भुकेला। प्रकाश द्यावा प्रणती पदाला।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, एप्रिल १९३३

हृदयाचे बोल

मला तुझ्यावीण कुणी कुणी न। खरोखरी मी तुजवाण दीन
नसेच आधार मला कुणाचा। मला विसावा पद- सारसाचा।।

सख्या जिवाचा मम आसरा तू। उदार माता मज वासरा तू
गड्या दिलाचा मम दिलरुबा तू। म्हणेन मी संतत एक तू तू।।

मदीय तू बोध मदीय मोद। मदीय चित्ता प्रभु! तू विनोद
मदीय संगीत मदीय गान। त्वमेक रे जीवन मामकीन।।

मदीय तू खान मदीय पान। मदीय तू स्थान मदीय मान
मदीय तू सौख्य मदीय ठेवा। तुझ्याविणे काहि न देवदेवा।।

तुझाच आधार तुझा विसावा। तुझाच हे तात! करीन धावा
तुलाच मारीन सदैव हाका। कृपांबराने निज बाळ झाका।।

तुझ्यावरी सर्व मदीय भार। तुझ्यावरी सर्व सख्या मदार
तुझेच माते जरि बंद दार। मदीय दु:खास न अंत पार।।

तुझ्यावरी सर्व उड्या मदीय। सख्या जरि प्रेम नुरे त्वदीय
तरी न सत्कर्म घडेल हाती। समस्त हे जीवन होइ माती।।

न जीव पंखाविण पाखरास। न आस गायीविण वासरास
पतंग सूत्राविण ना तरंगे। तुझ्याविणे दास तुझा न रंगे।।

न मूल हासे जरि अंबिका न। चकोर दु:खी जरि चंद्रिका न
वने वसंताविण हासती न। तुझ्याविण दास तुझा सुदीन।।

सुचे वसेताविण ना पिकाला। सुके जरी पाऊस ना पिकाला
जळाविणे जाइ जळून मीन। सुके तसा दास भवद्विहीन।।

अनाथनाथा! उघडा जगात। दरिद्र दु:खी पडलो पथात
मदीय तू लाज न राखशील। तरी निज ब्रीद गमावशील।।

सख्या अनंता करुणावसंता। तुझ्याविणे कोण कलंकहंता
मदीय मालिन्य धुवावयाते। तुझ्याविणे कोण समर्थ माते।।

करी तुझे मूल धुवून नीट। करी मुलाला शिकवून धीट
तदीय घे हात तुझ्या करोत। पडेल ना तो न घडेल घात।।

असो तुझा हात मदीय माथा। न दूर लोटी मज दीननाथा
मदंतरंगी करुनी निवास। सुवास द्यावा मम जीवनास।।

दिला कशाला नरजन्म माते। जरी न तत्सार्थक होइ हाते
दिली कशाला तनु मानवाची। जरी असे वृत्ति सदा पशूची।।

अमोल मोती मजला दिलेस। धुळीत मी मेळविले तयास
अयोग्य हाती बहुमोल ठेवा। दिला किमर्थ प्रभु देवदेवा।।

अमोल लाभे नरजन्म देवा। परी घडेना तव अल्प सेवा
कशी तुला ही नरजन्ममाती। पहावते? सांग, जयास गाती।।

मलाच ठावी मम वेदना रे। न कल्पना येइल ती परा रे
किमर्थ मी ढाळित आसवांते। तुलाहि माहित नसेल का ते?।।

अनाथ दोषी दुबळा गरीब। सदैवत्याचे रडणे नशीब
न देव ना मानव त्या न कोणी। सदा रडावे तिमिरी बसोनि।।

सकाळ होवो अथवा दुपार। प्रभात किंवा रजनी गंभीर
मला असे एकच काम साचे। अखंडनेत्राश्रुविमोचनाचे।।

रडून रात्रंदिन दोन्हि डोळे। फुटून जावोत बनोत गोळे
तुला नसे भाग्य बघावयाचे। नुरे तरी कामच लोचनांचे।।

परोपरी मी तुज आळवीन। सदैव गीते रचुनी नवीन
तुझी घडो भेट न वा घडो रे। मुळी तुझे गीत तरी असो रे।।

मुखी असो नाम तरी निदान। तयास मी मानिन मन्निधान
न आठवी माय जरी मलास। न बाळ केव्हा विसरेल तीस।।

कितीहि झाले जरि खोडसाळ। तरी उराशी धरि माय बाळ
मदीय माता परि फार मानी। न पुत्रहाका परिसे हि कानी।।

सदैव माता जपती मुलांना। सदैव माद्या जपती पिलांना
जगात माता विसरेल बाळ। तरी जगाचा जवळीच काळ।।

मला न पोटी धरिशील आई। मला न नेत्री बघशील आई
कशास हा जन्म तरी दिलास। मला अहोरात्र रडावयास।।

न आत्महत्या करण्यास वीर। जरी बघाया तुजला अधीर
न रोगही मित्र बनेल पाही। न देव त्याला जगि कोणि नाही।।

रडे रडे सतत तू रडे रे। न जोवरी त्वत्तनु ही पडे रे
रडावयाचाचि तुझा स्वधर्म। रडावयाचे करि नित्य कर्म।।

निराश होतो बनतो भ्रमिष्ट। विनिंदतो व्यक्ति जगद्-गरिष्ठ
समस्त माते हसतात लोक। कुणा कळे आंतर आइ! शोक।।

असाच हा चंचल दुर्विचार। वदून ते हासती सान-थोर
तुझ्या मुलाची करिती टवाळी। मुका बिचारा परि अश्रु ढाळी।।

अनंत आनंद तुझ्या जगात। न मी रडावे कधिही मनात
सदैव देवा मजला हसू दे। कधी उदासीन न रे बसू दे।।

हसे सदा मद्वदनी असावे। मदास्य हे खिन्न कधी नसावे
असे जरी वाटतसे मनात। सदा उभे अश्रुच लोचनात।।

भरुन येती मम नेत्र देवा। मला कळेना मम पापठेवा
मला न तत्कारण ते कळेना। मदश्रुधारा कधिही सरेना।।

वसंत येई पिक गोड गाई। वनस्थली रम्य सजून राही
फुलाफळांना प्रभु ये बहार। मदीय नेत्री परि
अश्रुधार।।

शरद ऋतू ये सुखद प्रसन्न। धरा सधान्या सरिता प्रसन्न
प्रसन्न आकाश प्रसन्न तारे। मदीय नेत्री परि अश्रु बा रे।।

विषाद जाऊन विकास येवो। अकर्मता जाउन कर्म येवो
निशा सरोनी हसु दे उषेला। वरो सदा मन्मन जागृतीला।।

सरोनी अंधार उजेड येवो। निबद्ध माझी मति मुक्त होवो
स्वतंत्रतेच्या गगनी उडू दे। विचारनक्षत्रफुले खुडू दे।।

कधी न आता प्रभु मी रडावे। विशंक उत्साहभरे उडावे
स्वपंख आनंदुन फडफडावे। वरीवरी सतत मी चढावे।।

सदैव उत्साह असो मनात। सदैव सेवा असु दे करांत
असो सदा शांति मदंतरात। भरुन राही मम जीवनात।।

अखंड आकर्षुनिया ग्रहांस। सभोवती नाचवि त्या दिनेश
पदांबुजाभोवती इंद्रियांस। धरुनिया लावि फिरावयास।।

प्रदक्षिणा ती तुजला करोत। तव प्रकाशे विमल नटोत
हरेल अंधार सरेल रात्र। तुझ्या प्रसादा बनतील पात्र।।

सुचो रुचो ना तुजवीण काही। जडो सदा जीव तुझ्याच पायी
तुझाच लागो मज एक छंद। मुखात गोविंद हरे मुकुंद।।

 तुझाच लागो मज एक नाद। सरोत सारेच वितंडवाद
तुझा असो प्रेमळ एक बंध। मुखात गोविंद हरे मुकुंद।।

अनंत हे अंबर नीलनील। उभे न मागे जरि का असेल
तरी न ताराद्युति ती खुलेल। सुपार्श्वभूमी चढवीत मोल।।

समस्त मागे कृतिच्या मदीय। असो भवन्मूर्ति विलोभनीय
समस्त कर्मे पदकासमान। तुझ्या शुभांगी झळकोत छान।।

शुभकृतीची मम वजयंती। गळा तुझ्या घालिन भूषयन्ती
उरी तुझ्या सुंदर ती रुळेल। बघून त्वन्नेत्रनदी निघेल।।

मनोज्ञपुष्पासम गंधवंत। पवित्र तारांपरि दीप्तिमंत
सुरम्य मोत्यांपरि पाणिदार। असा कधी अर्पिन कर्महार।।

नसे मला ज्ञान खरी न भक्ति। नसे मला योग न ती विरक्ति
नसे तपस्या पदरात जाड। तरी तुझी मी करितोच चाड।।

कधी मदश्रु प्रभुजी पुसाल। कधी निजांकी निजबाळ घ्याल
तुम्हास मी मानित मायबाप। कधी बरे दूर कराल ताप।।

जरी मुलाला ढकलाल आज। जरी न राखाल तदीय लाज
जरी न पाजाल अनंत पान्हा। जगेल ना तो तरि दीन तान्हा।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

जीवनार्पण

जीवनसुमना मदीय देवा! त्वच्चरणी वाहिन
दुसरी आणिक इच्छाच न
मकरंद तू घे तूच गंध घे सुंदरता तू बघ
तव सेवेतचि सुकुंदे शुभ
आहे गंध काय तो परी
आहे सुंदरता का तरी
आहे रस तरि का तिळभरी
असो कसेही तुला आवडो, गोड करुन घेउन
सुखवी प्रभुवर माझे मन।।

जर भिकारी जीवन माझे तरि तुज ते अर्पिन
हृदयी धरिशिल ते तोषुन
रित्या जीवना तव हस्ताचा स्पर्श सुधामय घडे
तरि परिपूर्णतेस ते चढे
त्वस्त्मित-किरण जीवनांबरी
पडतील दोनचार ते जरी
तरि ते होइल रे भरजरी
स्वताच ते मग निजांगावरी बसशिल तू घालुन
जाईन देवा मी लाजुन

धृवपाळाच्या मुक्या कपोला शंख लाविला हरी
वेदोच्चारण मग तो करी
मदीय जीवन अरसिक रिक्त प्रभु तू भरिशिल रसे
जरि तुज देइन ते सौरसे
ये, ये, जीवन घे तू मम
मत्करधर्ता ना त्वत्सम
प्रकाश दे मज घेउनि तम
रिता घडा मी तुला देउनी क्षीरांबुधि मिळविन
मज मौत्किक परि तुज मृत्कण।।

सख्या अनंता मनोवसंता घे मम जीवनवन
आहे निष्फळ हे भीषण
विचारतरु तू फुलवी फळवी लाव भावनालता
स्फूर्ति-समीरे आंदोलिते
सदगानांचे कूजवि पिक
सत्कर्माचे हासवि शुक
येवो भावभक्तिला पुक
जगी न अन्या फुलवाया ये हे हन्नंदनवन
फुलवी तूच जगन्मोहन।।

प्रभु तव चरणी जीवनयमुना माझी ही ओतिन
तव शुभ चरण प्रक्षाळिन
त्वत्पद- धूलि स्पर्शायाला यमुना कशि तडफडे
वरवर धडपडुनी ती चढे
वसुदेवाच्या हातातला
पद लांबवुनि तुवा लाविला
आत्मा यमुनेचा तोषला
तुझ्या पदाच्या स्पर्शासाठी देवा मज्जीवन-
यमुना तडफडते निशिदिन।।

तनमन माझे तुला वाढले जीवनपर्णावरी
यावे प्रभुजि आता लौकरी
पांचाळीच्या पानास्तव त्या अधीर झाला कसे
या ह्या दीनास्तवही तसे
पांचाळीच्या पानी चव
मम तममनाहि ती ना लव
तरि करि बाळाचे गौरव
किति विनवू मी किति आळवु मी कंठ येइ दाटुन
यावे धावुन मनमोहन।।

आला आला कृष्णकन्हैय्या राधाधर- लोलुप
प्रिय ज्या भावभक्तिचे तुप
आला आला शबरीची ती खाणारा बोरके
आला तोषणार गोरसे
जीवनपात्र तयाच्या पुढे
केले तनमन वाढुन मुदे
माझी दृष्टि तत्पती जडे
जीवनयमुना गेली तत्पदगंगेमधि मिसळुन
गेला जीव शिवचि होउन।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मार्च १९३३

जीवनात माझ्या सदा राम गुंफिन

जीवनात माझ्या सदा राम गुंफिन
सकळ इंद्रियांनी माझ्या राम चुंफिन।। जीव....।।

सत्यं शिवं सुंदराचे
पूजन मी कारिन साचे
ह्यास्तव मी या जीवाचे
मोल अर्पिन
राम गुंफिन।। जीव....।।

विमलभाव सरलभाव
मधुरभाव प्रेमभाव
सेवा नि:स्वार्थभाव
त्यात ओतिन
राम गुंफिन।। जीव....।।

ज्ञान, भक्ति, कर्म तीन
पदर असे दृढ धरुन
श्रद्धेने पीळ भरुन
मोक्ष मिळविन
राम गुंफिन।। जीव....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

तुजसाठि जीव हा उरला

कारुण्यवसंता रामा। तुजसाठि जीव हा उरला।।
या जगात तुजविण कोणी। नाहीच खरोखर रामा
तू हृदयी असुनी देवा। का चित्त भुलतसे कामा
तुज सदैव हृदयी धरुनी। तव गोड गाउ दे नामा
तुज सदैव मी आळविन
तुज सदैव मी आठविन
तू जीवन मी तर मीन
तुजविण जीव घाबरला।। तुजसाठि....।।

हृदयात जरी तू नसशी। मी अनंत मोही पडतो
तुजलगी विसरुन रामा। शतवार पडुन मी रडतो
तू नको कधीही जाऊ। हृदयातुन तुज विनवीतो
जरि मूल चुकुन दुर जाई
वापीत पडाया पाही
धरि धावत येउन आई
रघुवीर तेवि धरि मजला।। तुजसाठि....।।

जरि इतर वस्तु हृदयाशी। निशिदिन मी प्रभुवर धरितो
हृदयाच्या आतिल भागी। तुजशीच हितगुज करितो
एकांती बनुनी रामा। तुजला मी स्मरुनी रडतो
तव चरण मनि येवोनी
तव मूर्ति मनी येवोनी
येतात नेत्र हे भरुनी
कितिकदा कंठ गहिवरला।। तुजसाठि....।।

बसुनिया रघुवरा दोघे। करु गोष्टी एको ठायी
ठेवीन भाळ मम देवा। रमणीय तुझ्या रे पायी
प्रेमांबुधि गंभिर तेव्हा। हेलावुन येइल हृदयी
मन तुझ्याच पायी जडु दे
तनु तुझ्याच पायी पडु दे
मति तुझ्याच ठायी बुडु दे
तुजवीण गति दुजी न मला।। तुजसाठि....।।

एकची आस मम रामा। तू ठेव शिरी मम हात
होईन पावनांतर मी। मंगल तूच मम तात
त्वत्पर्श सुधामय होता। संपेल मोहमय रात्र
कधि मोह न मग शिवतील
पापादि दूर पळतील
भेदादि भाव गळतील
सेवीन सदा पदकमला।। तुजसाठि....।।

जे आवडते तुज देवा। ते करोत माझे हात
जे आवडती तुज देवा। ते शब्द ओठ बोलोत
जे आवडती तुज देवा। ते विचार मनि नांदोत
तनमनमती तुज अर्पीन
सेवेत सतत राबेन
जाईन त्वत्पदी मिळुन
ही इच्छा पुरवी विमला।। तुजसाठि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, एप्रिल १९३३

करुणाष्टक

अहा चित्त जाई सदा हे जळून। मला दु:ख भारी, श्रमे मी रडून
पुशी कोण नेत्रांतली अश्रुधार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

वनी निर्जनी दीप जेवी दिसावा। दिसोनी झणि तोहि वाते विझावा
तसा येउनी जातसे सद्विचार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

मला षड्रिपू भाजिती गांजिताती। मला वासना सर्वदा नागवीती
तुझ्या भक्तिची वाजू दे एकतार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

मदीयांतरी दिव्य पावित्र्य साजो। तया पाहुनी सर्वही पाप लाजो
असो मन्मती सन्मतीचे अगार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

असज्जीवने मी अहोरात्र खिन्न। न ये नीज माते, रुचे ते न अन्न
मदीयांतरंगावरी घोर भार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझा एक आधार ना अन्य माते। तुझा बाळ सांभाळ हे विश्वमाते
मला कष्टवीतात नाना विकार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझा एक विश्वास विश्वा समस्त। असत्कल्पनांचा करी शीघ्र अस्त
कृपेने मनाचा हरी अंधकार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

दिसो प्रेमळा निर्मळा वृत्ती नेत्री। वसो पुण्यता माझिया नित्य वक्त्रीं
मनी नित्य नांदोत ते सद्विचार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।

तुझे फूल मी होउ दे सद्विकास। तुझे मूल माते तुझी एक आस
किती प्रार्थु मी सांगु मी काय फार। प्रभो दीन दासा तुझ्या तार तार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, १९३०

जीवनबाग

(नाचत म्हणावयाचे गाणे)

प्रभु माझी जीवनबाग सजव।।

कुशल तू माळी
बाग सांभाळी
स्वर्गीय सौंदर्ये ती रे खुलव।। प्रभु....।।

गत काळातिल
सगळा खळमळ
भरपूर येथे खताला सडव।। प्रभु....।।

द्वेष मत्सर
हेची फत्तर
फोडुन, प्रेमाचे वृक्ष फुलव।। प्रभु....।।

मोह विकार
बाग खाणार
वैराग्य-दंडाने त्यांना घालव।। प्रभु....।।

तव करुणेचा
मंगलतेचा
शिवतम वसंतवारा वाहव।। प्रभु....।।

दृढ श्रद्धेचे
सद्भक्तीचे
सुंदर मांदार येथे डुलव।। प्रभु....।।

उत्साहाची
आनंदाची
थुइथुई कारंजी येथे उडव।। प्रभु....।।

धृताचे अभिनव
घालुन मांडव
त्यावर शांतीचे वेल चढव।। प्रभु....।।

चारित्र्याचे
पावित्र्याचे
शीतल शांतसे कुंज घडव।। प्रभु....।।

सत्प्रतिभेचे
सतज्ञानाचे
गुंगूगुंगू मिलिंद गुंगव।। प्रभु....।।

सहजपणाचे
सतस्फूर्तीचे
करु देत विहंगम गोड रव।। प्रभु....।।

परमैक्याचा
झोला साचा
बांधुन त्यावर जीव झुलव।। प्रभु....।।

फुलवुन जीवन
तेथे निवसुन
मग गोड गोड तू वेणू वाजव।। प्रभु....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

भाग्याचे अश्रु

अनुताप- आसवांनी। कासार मानसाचे
भरते तुडुंब तेव्हा। ती भक्तिवेल नाचे
त्या भक्तिवेलावरती। चित्पद्म ते फुलेल
येऊनिया मुकुंद। मग त्यात तो बसेल
रड तू सदैव बाळा। भरु दे तुडुंब हृदय
येईल भक्ति मग ती। होईल सच्चिदुदय
ते भाग्यवंत अश्रु। जवळी तुझ्या विपूल
हसशील लौकरीच। जरि आज तू मलूल


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मार्च १९३२

तळमळतो रे तुझा तान्हा

तळमळतो रे तुझा तान्हा।।
कामधेनु तू माझी देवा
चोरु नको रे अता पान्हा। तळमळतो....।।

धन कृपणाला जल मीनाला
तेवि मला तू सख्या कान्ह्या। तळमळतो....।।

गोकुळि गोरस सकळां दिधला
प्रभुजि अजी ते मनी आणा। तळमळतो....।।

अजुन दया जरि तू ना करिशिल
ठेवु कशाला तरि प्राणा। तळमळतो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२