सगळ्या बायकांना हात जोडून नमस्कार.

आजही बायका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडताना दिसतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून त्याला दोरे बांधणाऱ्या या निरागस बायका बघितल्या की सांगावं वाटतं, बाई त्या फांदीच आयुष्य का संपवलं? वड जास्त कामाचा आहे. औषधी आहे. हजारो लोकांना सावली देतो. तुझा नवरा पगार तरी घरी देतो का? पण मी असं बोलत नाही. आणि मला माहित आहे असं बरच काही डोक्यात येऊन पण बायका सुद्धा शांत बसतात.

खरतर जगात कुठलाच अर्थशास्त्रज्ञ देशाची अर्थव्यवस्था सांभाळायला सल्ला देण्यापलीकडे काही करू शकत नाही. घराची आर्थिक घडी बसवण्यात मात्र स्त्रीचं योगदान शंभर टक्के असत. तरी अर्धे नवरे बायकोला म्हणतात. तू गप्प बस. तुला व्यवहारातल काही कळत नाही. बायकांना गाडी चालवता येत नाही हे दहा वेळी गाडी ठोकलेले पुरुषसुद्धा तोंड वर करून बोलतात. तरी कशा ऐकून घेतात बायका?

हे सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या बायकांनो, सात पिढ्यात एकदाही तुमच्या नवऱ्याच्या खानदानात कुणाचंही नाव पेपर मध्ये आलं नसलं तरी तो न चुकता रोज पेपर घेऊन अर्धा तास toilet ला जातो. तेंव्हा बाहेरून कडी लावून त्याला दिवसभर कोंडून ठेवावं वाटतं तुम्हाला. पण तुम्ही एवढ्या दयाळू की तसं कधी करत नाही. तुम्हाला बघायची असते मालिका. पण नवरा खुशाल क्रिकेट बघत बसलेला असतो पाय पसरून. रागात रिमोट घालावा नवऱ्याच्या डोक्यात असं डोक्यात येतं. पण तसं तुम्ही करत नाही.

कधी छान आभाळ आलेलं असत, बाहेर पडावं, नवऱ्यासोबत पावसाचे थेंब झेलावेत अंगावर असं तुमच्या डोक्यात येतं. आणि नवरा सोफ्यावर पडल्या पडल्या म्हणतो ‘ मस्त कांदा भजी कर गं जरा.’ तेंव्हा आज कांद्या ऐवजी नवऱ्यालाच बेसनाच पीठ लावून कढईत टाकावं असं वाटून जातं. पण तरी तुम्ही भजी तळता. खमंग. उभ्या राहता खिडकीतल्या पावसाचे थेंब झेलत. तुमच्या मनातलं आभाळ मात्र डोळ्यात येतं. नवऱ्याला पत्ता नसतो त्या भरून आलेल्या आभाळाचा. नवरा मग आठवेल तेंव्हा भजी छान झालीत म्हणतो. आणि तुम्ही पण सुखात न्हावून निघाल्याचा अभिनय करता. नाहीतरी तुमच्या पैकी कित्येक जणींना पिझ्झाचे डोहाळे वडा पाववर भागवावे लागलेले असतात.

हे देशातल्या तमाम सोशिक बायकांनो,

कधी तुम्ही खूप राबून मोठ्या कौतुकाने सुरमई बनवलेली असते. वाटत असतं वासानेच वेडा होऊन मिठी मारेल नवरा. आणि दार उघडत तेंव्हा फक्त दारुचाच वास पसरलेला असतो घरभर. तेंव्हा सुरमईचा काटा काढावा त्या सहजतेने या नालायकाचा काटा काढावा असं वाटून जातं. पण असं काहीच तुम्ही करत नाही म्हणून आभारच मानले पाहिजेत. नवरे खुशाल म्हणतात ‘आजकालच्या बायका साधा फराळ पण करत नाहीत दिवाळीत. माझी आई काय काय बनवायची फराळाला.’ तेंव्हा तुम्ही ‘ तुमची आई फराळ बनवायची कारण तुमचे वडील रोज बिअर बार मध्ये चखन्याला शेव आणि चकली खाऊन येत नव्हते.’ असं का म्हणत नाही? तुम्ही रविवारी आराम करायचा ठरवलेलं असत. पण चार मित्र जमल्यावर पत्ते खेळता खेळता नवरा मोठ्या थाटात ‘ चहा टाक गं चार पाच कप आणि खायला दे काहीतरी..’ असं सांगतो. ओठावर येतं ‘नौकर आहे का मी?’ पण ते तुम्ही ओठातच ठेवता. का? आणि तरी सगळं जग म्हणत बायकांच्या पोटात काही रहात नाही. खरंतर ही पुरुषांनी सोयीस्करपणे स्वतःची समजूत घातलेली आहे. बायकांनी आपले काय काय अपराध पोटात घातलेत, बायकांचं नवऱ्या बद्दल खरं खरं मत काय आहे? हे जर त्या स्पष्ट बोलल्या तर कित्येक पुरुषांना पुन्हा आईच्या पोटात परत जावं वाटेल. या जगाला पुन्हा कधीही तोंड न दाखवण्यासाठी. तरीही हे सहिष्णू बायकांनो, मला खात्री आहे एक दिवस तुम्ही हे मनात साचलेलं नक्की बोलणार. पण आज एक पुरुष म्हणून मनापासून माफी मागतो तुम्हा सगळ्यांची. सगळ्या पुरुषांच्या वतीने.

ता.क. काही बायका म्हणतील मी असली बाई नाही. मी नाही ऐकून घेत. सरळ शिव्या देते नवऱ्याला. एकदा तर थोबाडीत पण ठेवून दिली. तर कृपया गैरसमज नसावा. हे पत्र तुमच्यासारख्या रणरागिणी साठी नाही. तमाम सोशिक, सहनशील आणि चोवीस तास घरात बिन पगारी राबणाऱ्या गृहिणींसाठी.

- अरविंद जगताप.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा